सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

खिडकीतलं चांदणं

आपली कोणतीही गुपितं कोणालाही कळनार नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीची खबर बात हिच्यामार्फत घेतली जावून तुमच्यावर नजर ठेवली जाते. प्रत्येक घर, हवेली, कचेरी, राजवाडा किंवा गगनचुंबी इमारतींचा आराखडा तिच्याशिवाय पूर्ण होत नाही. आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी इमारतींना भव्य सुशोभित दरवाजे असतील भले, परंतु ही नसेल तर त्याचं रूपांतर बंद अडगळीची कोठडी असाच करावा लागेल. आणि हिच्यातूनच म्हणजे याच खिडकीच्या माध्यमातून, अर्थात कॉम्प्युटरच्या आधुनिक विंडोज मधून साऱ्या जगाचा वेध घेतला जातो.

कोणी कल्पनाही केली नसेल की पूर्ण विश्वात राज राजवाडे पासून गगनचुंबी इमारतींचे सौंदर्य खिडकी शिवाय खुलून दिसत नाही. म्हणूनच गृह रचनेच्या आराखड्यात दरवाजा इतकेतच खिडकीला सुद्धा महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. खिडकी विषयी प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं. कुणाचं आणि कशासाठी तरी हळवं मन तिच्यात दडलेलं असतं. घड्याळाचा उपयोग न करता खिडकीतूनच रस्त्यावरील चहाची टपरीवर कोणकोण लोक उभे आहेत,  वाण्याचं दुकान अजून उघडलं कसं नाही.  दूधवाला, इस्त्रीवाला यांची दुकानं आज का बरं लवकर बंद झालीत. एरवी बहिणाबाईंच्या गार्डन पर्यंत हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत जाणारी रिक्षावाल्यांची लाईन आज सामसूम का दिसत आहे, आज रिक्षावाल्यांचा संप-बिम्प तर नाहीना,  या सर्व प्रश्नांची उत्तरं या खिडकीतून व्यवस्थित मिळतात. पण खिडकीतून न बघताही भाजीची गाडी केव्हापासून येऊन तो आता जायच्या तयारीत आहे हे खिडकीतून येणारी त्याची ललकारी बायकांच्या लक्षात आलेली असते आणि म्हणून हातातला पेपर वाचायचा सोडून भाजी घ्यायला मला पळावं लागतं.  एरवी नाही त्या रिकामटेकड्या गोष्टींची दखल सुद्धा या खिडकीतूनच घेतली जाते. भिंतीला कान असतात तसे खिडकीलाही डोळे असतात बरे. कोणाच्या घरी मुलगी बघण्यासाठी पाहुणे आले, तरी त्याची खबरबात आपल्या घरच्या मंडळींना या खिडकीतून पुराव्यानिशी लागतो आणि चाळीत त्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी या खिडकीतून त्या खिडकी पर्यंत पोहचते. सासू कितीही चलाख आणि हुशार असली तरी तुमच्या घरातली गुपितं सुद्धा याच खिडकीतून बाहेर पसार होतात. माहेरचा कोणीतरी दिसेल आणि त्याला निरोप देऊ या इच्छेने मिनीमिनीटाला खिडकीच्या बाजूने येरझारा घालणाऱ्या सुनेच्या आशा सुद्धा याच खिडकीत जिवीत असतात.
आपण इतिहासात डोकावून बघितले तर आपल्याला आढळून येईल की गड किल्यातल्या राणी महालांच्या खिडक्या तेवढ्याच सुशोभित असायच्या जेवढे महालांचे दरवाजे. याच खिडकीत बसून राजकुमारी आपल्या स्वप्नातला राजकुमार स्वार होवून येत असलेल्या घोड्याच्या टापांचा आवाज ऐकण्यासाठी तासन तास वाट बघत असे. राजकुमार परतीच्या प्रवासाला निघाला असतांना याच खिडकीच्या पडद्या आडून त्याला प्रेमाचा इशाराही करत असे. अश्या प्रकारे राजकुमारीचं हळवं मन याच खिडकीत दडलेलं असे .शहजहानला ज्या कारागृहात बंदिस्त केले गेले होते त्या कारागृहाच्या खिडकीतूनच ताजमहालचं सौंदर्य तो रात्रंदिवस  न्याहाळत असे.

पूर्वी गडकिल्ल्यांच्या तटबंदीला सुद्धा छोटया छोटया खिडक्या असायच्या, पण त्यांचा उपयोग शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी असायचा. आजच्या युगात अश्या तेल ओतीव खिडक्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजकाल राजकारणातल्या खिडक्यातून गरम गरम तेल एकमेकांच्या अंगावर रोज सर्रास ओतले जात आहे. तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी सरकारी मदतीची खिडकी असते परंतु असल्या खिडकीचे गज हे गंजून पूर्ण निकामी झालेले असतात.  नोव्हेंबर 2016 च्या नोट बंदीच्या काळात बँकांच्या मागच्या खिडकीतूनच नोटा बदलल्या गेल्या असं आपण प्रत्यक्ष पाहिलं होतं.

खिडकीत बसून चहा अथवा कॉफीचा घोट घेत मस्त बाहेरचा माहोल न्याहळाने हा आनंदाचा क्षण प्रगट करण्याचा आपला आयुष्यातला एक आविष्कार असतो. अशा प्रकारे मानवी मनाच्या खीडकीतूनही भाव भावनांचे अनेक वारे वाहत असतात. कवी आणि लेखकांनी सुद्धा खिडकीला आपल्या साहित्यात मानाचं स्थान दिले आहे. लेखिका सौ शुभदा खरे, त्यांच्या दोनहजार साली लिहिलेल्या वृत्तपत्रीय लेखात  खिडकीचं वर्णन करतांना म्हणतात "मध्यरात्र टळून गेली पण डोळ्यात झोपेचं नामोनिशाण नाही. येणार कशी झोप ? नुकतीच मिलर आणि बुन्सची बेहद्द रोमँटिक कादंबरी वाचून संपविली....मी लिहियतेना या टेबलावर सुद्धा चांदणं पसरलंय. खिडकी समोरच चंद्र आलाय आणि मिस्किलपणे हसत विचारतोय, काय मधुचंद्राला येणार का माझ्या घरी ! खरच रे, आपल्याला मधुचंद्राला चंद्रावर जाता आलं असतं तर किती छान झालं असतं!" खिडकी बाहेर धुंद वातावरण पसरलय ! कुसुमाग्रजांची कविता मनात बहरून येते ‘काढ सखे, गळ्यातील | तुझे चांदण्यांचे हात 'क्षितिजाच्या पलीकडे | उभे दिवसाचे दूत’

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

रंग पानाचा हिरवा सुकला, माझ्या कापसाला ...............!

चाळीसगांव पासून जेमतेम पंधरा किलोमीटरवर वसलेलं माझं गांव "धामणगांव".  या पहिल्याच वाक्यातलं "जेमतेम" हा शब्द माझ्या गांवच्या बाबतीत खूपच अशुभ ठरला आहे. वाहतुकीसाठी चाळीसगांव ते धामणगांव  रोड अतिशय ठणठणीत जरी असले तरी गावकऱ्यांसाठी सरकारची एस.टी. वाहतूक व्यवस्था जेमतेम किंवा नाही म्हटले तरी चालेल. या वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था देखील जेमतेमच होती. मी जेंव्हा चाळीसगांव एस.टी. डेपोला धामणगांवची एस.टी. बस बंद का झाल्याची चौकशी केली , तेंव्हा त्यांनी सांगितलं की पावसाळ्यामुळे एस.टी. बंद करण्यात आली आहे. त्यांचं उत्तर ऐकून मी चकितच झालो. त्याच्या डोळ्यात निरखून बघितल्यानंतर त्याचा केविलवाणा चेहरा अधिकच आगीतून काढलेल्या मठ्ठ माठासारखा भासला. गावांत नळाला पाणी सुद्धा जेमतेम अर्धा तास आणि तेही दोन ते तीन दिवसानंतर येतं आणि त्याला पर्याय नसतो, कारण हे सर्व पावसाचे अनियमित खेळ आहेत. गावांतील काही मंडळी वर्गणी काढून सांस्कृतिक उत्सव अति उत्साहाने साजरे करतात ही चांगली बाब आहे, परंतु गांवात कमीत कमी नियमित तीन वेळा एस.टी. वाहन यायला पाहिजे, गावकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांची शाळा-कॉलेज मध्ये जाण्यासाठी सोय झाली पाहिजे असा सुध्दा प्रयत्न करायला हवा परंतु तो उत्साह दिसत नाही. ज्या मराठी शाळेत आपण शिकलो त्या मराठी शाळेची फुटलेली, घरंगळलेली कौलं, अर्धवट सताड उघड्या खिडक्या बंदिस्त धर्मशाळेसारखी वाटतात. बऱ्याच वर्षांपासून पाऊस नियमित पडत नाही म्हणून शाळा समितीला ती दुरुस्त करून घ्यावीत असे सुचले नसावे कदाचित.

माझ्या लहानपणी जिथे निसर्गाला निसर्ग भिडत होता. नदीला अथांग पूर येत होता. रान वारा पिकापीकातून शीळ घालत असे आणि जंगल ही चारही बाजूने हिरवी चादर पांघरल्यासारखी भासत असे. तसं दृश्य बऱ्याच वर्षांपासून बघितले नाही. यावर्षी पाऊस श्रावण महिन्यापासून गेला तो गेलाच. त्याला तोंड फिरवून दाखवायला सुद्धा उसंत मिळाली नाही. जेमतेम तीन ते चार वेळा तो आला आणि कौतुकाची थाप घ्यायला तो घाबरलाच. नंतर त्याने फिरून तोंडही दाखविले नाही. तरी शेतकरी अजून आतुरतेने त्याची चातकासारखी वाटच बघतच होता. मंगेश पाडगावकरांची कविता भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. दिवाळी पर्यंत शेतकऱ्यांची शेतातली लगबग थंडावली. कापसाच्या गाठीच्या गाठी शेतातून घरी यायच्या त्या नाहीशा झाल्यात. कोणी बैलजोडी विकून खांद्यावरची ओझी कमी केलीत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार सुद्धा सरकारी पद्धतीने काम करून विलंब करतंय. कापसाच्या झाडाची पानं पानं आकसून मिटलीत. कापसाची झाडाची कच्ची कैरी वयात न येताच उन्हाने केविलवाणी झाली. दिवाळीला येणाऱ्या फुलांच्या पागळ्यांचा फुलोरा फुललाच नाही.

रंग पानाचा हिरवा सुकला,
माझ्या कापसाला..............!


गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हां !

पोळ्यापर्यंत त्याचं कसं आलबेल चाललं होतं. हिरवी चादर अंथरावी तसा धामाणगांवचा रानोमाळ शिवार हिरवागार पहुडलेला होता. पिके टरटंराट वाढलेली होती. नुकतेच लगीन झालेल्या पोरसवादा नवी नवरीला आपल्या माहेरची ओढ लागून कधी ती माहेराला जाते आणि आईच्या कुशीत पदराखाली विसावते, तशी शेतातील पिकांमध्ये एकमेकात चढाओढ चालू होती !   आम्ही सुद्धा सहकुटुंब सहपरिवार वीर देवाचं दर्शन घेण्यासाठी धामणगांवी आलो होतो. आदल्या दिवशी नुकताच पाऊस पडून वरून देवाने शेतातली वाफ मोडून टाकली होती. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. ते हिरवेगार पीक बघून काका सुद्धा म्हणाले की आज मी अर्धा श्रीमंत झालो आहे. हे वर्ष सुख समृद्धीचे जाणार म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीची ओढ लागली होती. पण ताटात देवाने भलतेच वाढून ठेवले होते आणि तशी त्याने तसूभरही कल्पना लागू दिली नव्हती. टप टप अंगावरती पडती पावसाची फुले असं कविला लिहायला मोह आवरत नाही आणि त्यात मनमुराद ओलाचिंब व्हायलाही त्याला आवडतं.  पण !

पण प्रत्यक्षात टप टप पडणारे पावसाचे थेंबानी यावर्षी चक्क हुलकावणी दिली होती. लहानपणी बघितलेली श्रावणातली पावसाची झडी गायब झाली होती. जंगलातून येणारे गवताचे भारे दिसत नव्हते. पोळ्यापासून पावसाने दडी मारून जशी त्याने आपली कवाडे बंद करून घेतली होती.  बांधावरची खुरटे सुकलेले गवत स्वतःच हसत होते. कापसाची वयात आलेली बोन्डे निपचीत बघत होती. बहिनाबाई चौधरींची कविता स्मरून मन सुन्न झाले. बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही, हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही.  ती बोन्ड तरी उमलणार कशी. पानं पानं झाडं झाडं करपून गेलीत. बाभळीच्या ढोलीतली पिलं तहानेने कासावलीत. शेवटी काय म्हणू देवासी !  स्वामी कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हांसी !


टप टप पडती चौफेर पानांवरती पहिल्या पावसाचे थेंबे !

नकोरे गरजू असा ओल्या झाल्यात माझ्या पापण्या आणि वेणीची फुले

सांग मजसी, दडी मारुनी गेला होतास कुठे तू आजवरी

वाट बघून फेकून दिली कविता तुझी त्या कोरड्या विहिरीच्या तळाशी

पानं पानं झाडं  करपून गेली, बाभळीच्या ढोलीतली पिलं तहानेने कासावलीत

माजुरे बांधावरचे खुरटे गवत हसते कसे, अजून नाही समजले तुला

तुझ्याविना उमलेल कसे,  कोवळे बोन्ड ते कापसाचे

चारही बाजूने खिन्न अवस्था, दुष्काळ सावटाचे

शेवटी काय म्हणू देवा तुला !

कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हां !