Wednesday 5 June 2019

उन्हातलं चांदणं



२५ मे २०१९ दुपारचा एक वाजून वीस मिनिटे झालीत. गरम लालबुंद कढईत चणे भाजून काढावेत त्याप्रमाणे तळपता सूर्य दिवसा धरणी भाजून काढत होता. पहिल्या पावसाची वाट बघतांना वेडी झालेली धरणी आतुर झाली होती, परंतु आकाश निरभ्र होते. ऊन मी म्हणत होते. फक्त एक हाती सत्ता होती. आग, ऊन,चटके आणि तेथे कोणाचेच चालत नव्हते. दुपारचा मध्यांनं. मी खडकी फाट्यावर उतरलो होतो. सावली नामशेष झाली होती. डोक्याभोवती सफेद रुमाल लपेटून घेतला. पायावर कोणी ऍसिड ओतत आहे असं जाणवत होतं. तेवढ्यात गोलू मोटरसायकलवर माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मी त्याचे आभार मानावे का देवाचे काहीच सुचत नव्हतं. घरी एकदाचा पोहचलो. तात्पुरती सुटका झाली होती असेच वातावरण होते.

आता सकाळचे पाच वाजलेत, मुंबईला जाण्यासाठी खडकी फाटाच्या दिशेने निघालो होतो. गांवाबाहेरच्या मंदिरात रेकॉर्डिंग वर वाजत असलेलं देवाची सुमधुर धून रात्रीच्या अंधारात स्पष्टपणे ऐकू येत होती. आकाश निरभ्र होतें, थंडगार हवा गालाला घासून जात होती. नांगरून चिरा पडलेली शेतं लक्ष वेधून घेत होती. रस्त्याच्या कडेने झाडे शांत शांत उभी होती. जीसकी आवाज ही पहचान है, दर्शन मात्र तिचे होत नाही अशा त्या कोकिळेचा सुमधुर कुहू ss कुहू ss आवाज कानी पडला आणि वातावरण प्रसन्न झाले. शिवार संपायला अजून वेळ होता. निष्पर्ण झाडे रात्रीच्या गर्भात शितलतेची चादर ओढून आईच्या कुशीत जणू विसावली होती. मला मात्र फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही.

Saturday 1 June 2019

दुखतंय कुठं आणि सांगतंय कुठं

एसटीला ३५०० नवीन बसची गरज - एसटी महामंडळ


एसटी महामंडळ ७१ व्या वर्षात पदार्पण करत असले तरी १७ वर्ष्याची उमेद त्यांच्या जवळ राहिलेली नाही. एसटी महामंडळाचा असा दावा आहे की गाड्यांची वानवा आणि प्रवाशांची कमी होणारी संख्या अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या आपल्या देशात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे अशा देशात प्रवाशांची संख्या कमी होऊ शकते का ? हा दावा मनाला न पटणारा आहे. एसटी महामंडळाचं असं झालं आहे की, दुखतंय कुठं आणि सांगतंय कुठं.

मी माझ्या गांवच्या जवळच्या खडकिसींम बस स्टॉप वर तासभर उभा होतो पण एकही बस थांबत नव्हती. काही बसेस फास्ट होत्या, काही बिना कंडक्टर वाहक एसटी होत्या तर लोकल बस एक ते दोन तासाच्या अंतराने असतात असे कळलें. खाली बसेस डोळ्या समोरून जात असतात आणि पॅसेंजर प्रत्येक बसला हात देऊन हैराण होत असतो. परंतु एसटी बस मिळत नाही अशी परिस्थिती मी स्वतः डोळ्याने पहिली. दूध वाला घरी दूध द्यायला येतो तरी पठया दूध घेत नाही, पण हाच माणूस दारूच्या अड्ड्यावर मात्र सुसाट पळत जातो. एसटी महामंडळाने सुद्धा याचाच कित्ता गिरवला आहे. कारण या महामंडळाचा धंदा कालिपिली, मोडक्या तोडक्या टॅक्सी, जिप्स, कार वाले यांनी गिळंकृत केला आहे. या प्रायव्हेट गाड्या एसटीच्याच भाडे रेट मध्ये पॅसेंजर ओव्हरलोड भरून सुसाट घेऊन जातात. पॅसेंजर सुद्धा हशिखुषीने, दाटीवाटीने बसून प्रवास करतांना दिसतात, कारण त्याला टाइमावर घरपोच गाडी मिळालेली असते आणि एसटी पेक्षा भाडं सुद्धा जास्त द्यावे लागत नाही.

मी मागील महिन्यात मे मध्ये माझ्या गांवी धामणगांव येथे गेलो होतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झालीत तरी आमच्या गांवात अजून एसटी बस येत नाही हे ऐकून तुम्ही आश्चर्य चकित झाले असणार. मुंबईवरून येतांना चाळीसगांव स्टेशनला उतरल्यावर धामणगांव जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नाही आहे. चक्क स्पेशल गाडी करून जावे लागते ही सत्य परिस्थिती आहे. शाळा चालू असतात त्या काळात विद्यार्थ्यांसाठी बस येत असते, शनिवार रविवार सुटीच्या दिवशी बस येत नाही, उन्हाळ्याच्या सुट्टीत बस बंद असते आणि पावसाळचे निमित्त साधून बस बंद असल्याचे आढळून येते. गावांतील शेतकरी, कामकरी, शाळकरी, लोकांना, पाहुण्यांना किती त्रास सहन करावा लागतो याची आपण कल्पना करू शकत नाही.

प्रवाशांची कसलीही कमतरता नसतांना, एसटी महामंडळ तोट्यात चालते तरी कशी, कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल तरी कसा ?

हात दाखवा आणि एसटी थांबवा याचा वानवा, वाहक चालकासह फास्ट गाड्या, आणि विना वाहक नॉन स्टॉप गाड्या म्हणजे तोट्याला खतपाणी देणारे निर्णय काही प्रमाणात बदलायला हवेत. जिथे एसटी नाही तेथे एसटी गेली पाहिजे. जिथे पक्के रोड आहेत तेथे कमीत कमी दिवसातून दोन वेळा तरी एसटी उपलब्ध असली पाहिजे. हाथ दाखविल्यावर एसटी थांबली पाहीजे. मी एसटीनेच प्रवास करणार असं प्रवाशी आग्रहाने म्हटल्याशिवाय राहणार नाही.