Monday 26 February 2024

बहनों और भाइयों

ओ पुराना दौर सकुन का दौर् था, धीरज और संतोष का युग था औंर आज हर चीज जेट स्पीडसे भागती दौडती रहती है l बहनो और भाइयो, रहना तो हमे आखिर आज ही मे है l लेकीन गुजरे हुये दिनकी मिठास और गहराई भी अगर हम अपने साथ रखकर आगे बढते रहे, परंपरा और प्रगतीसे मिलाते रहे, तहजिब और तरक्कीसे जोडते रहे तो, और बिता अनमोल होता जायेगा हमारा जीवन l दुःख और सुख, मिलन और विरह, दोनोको झेलना आसान हो जयेगा l हे बोल आहेत अमीन सयानी यांचे 1952 ते 1955 च्या रेडिओ वरच्या बिनाका गीतमालातील. गाण्यापेक्षा हे बोल ऐकण्यासाठी शहराच्या चौका चौकातून, पानाच्या टपरीवर, मिळेल तेथे पब्लिक गर्दी करीत असे. मी सुद्धा माध्यमिक विद्यालयात धुळे येथे शिकत असातांना, संध्याकाळी आठ वाजता एक छोट्या चहाच्या टपरीवर बिनाका गीतमाला ऐकण्यासाठी हजेरी लावत असे. रसाळ आणि मधाळ वाणीने अमीन सायानीच्या आवाजाचं गारूड लाखो लोकांच्या हृदयात घर करून बसलं होतं. आज तो रेडियोवरचा आवाज कायमचा बंद झाला. राहिल्या त्या फक्त आठवणीच्या रेकॉर्डिंग्ज. त्यांच्या जाण्याने रेडियोवरचं सुवर्ण युग लयास गेलं आहे असं वाटायला लागलं. बहनों और भाइयों अशी त्यांच्या बोलण्याची शैली आज ऐकायला मिळणे दुरापास्त आहे. त्यांचे निवेदन ऐकत राहणे हा स्वर्गीय आनंद होता, शब्दांना साज चाढविण्याची कला त्यांना ईश्वरी देणगी लाभली होती. तब्बल चार दशके त्यांनी शब्दांची फुले रसिकांच्या मनावर उधळलीत. त्यांच्या शैलीदार निवेदनाने केवळ शहरी भागात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात , खेडोपाडी रसिकांवर भुरळ घातली होती. तसेच गायक, संगीतकार, गीतकार, नट नट्या यांना बोलते केले होते. तारीख 21 फेब्रुवारी 2024 ला असंख्य रसिकांना भुरळ घालणारे अमीन सयानी यांची 91 व्या वर्षी प्राण ज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Monday 5 February 2024

शेकोटी 2024

संस्कृती म्हणजे काय तर आपल्या समजाची जीवन पद्धती की जेथे शिष्टाचार, खानपान, भाषा, साहित्य, विचार,आदर, सदभाव, सभ्यता आणि कला याचा संगम. आणि हाच संगम शीतचंद्रलोक सोसायटीत जवळ जवळ दोन ते अडीच दशकापासून बघायला मिळत आहे. मग तो विषय कोणताही असो, राम मंदीर प्राण प्रतिष्ठा असो, श्री सत्यनारायण वार्षिक पुजा किंवा वुमेन्स डे असो, तसेच कोजागिरी पौर्णिमा, किंवा दिवाळी पहाट असो, अशा कितीतरी उत्सव सेलिब्रेट केले जातात की त्यांच्यावर वेळोवेळी भाष्य केले आहे. नेहमी एक गोष्टीचा विसर पडतो ती म्हणजे शीतचंद्रलोक च्या सख्या. चुलितले निखारे आणि टोपलीतले चार पाच वांगे उचलून टाकून चक्क काळेकुट्ट भाजून निघेपर्यंत एका दगडी खलबत्त्यात हिरव्या मिरच्या, लसूण जिर, मीठ कांदा कुटून निघेपर्यंत इकडे वांगी चांगलीच होरपळलेली असतात आणि खमंग वास सुटलेला असतो दुसऱ्या मिनिटाला वांग्याचं भरीत कुच्करून तयार झालेलं असतं, घरधनी नाकात वास भरून मळ्याकडे रवाना होतो. हीच ती संकल्पना शीतचंद्रलोकमध्ये कोणी रुजविली हे कोडे उलगडण्याच्या भानगडीत न पडता लहान थोर सगळीच मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं अशी खूणगाठ बांधून रिपीट रिपीट वांग्याचं भरीतचा फडशा पाडला जात होता. खर म्हणजे आदल्या दिवशी शेकोटी कार्यक्रमावर दुःखाची सावली पसरल्यामुळे शीतचंद्रलोक सख्यानी आपल्या कर्तृत्वाचं भान ठेवून नियोजित शेकोटीचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला होता. सकाळ पासून त्यांची ही लगबग किती शिस्तीत चालू होती ही कॅमेरात बंद झालेली असतांना, घरची कामे आवरून या लोकांना वेळ मिळतोच कसा, बाजार केंव्हा करतात, कोण कोण जातंय बाजाराला, आणि यांना हे जमतं कसं ! खलबत्ता, मुसळ, शेंगदाणे, लसूण, हिरव्या झणझणीत मिरच्या यांचे कुटण, बेसन, वांगे भाजणी, तवा, कढई, मीठ मसाला आणि चुलितील निखारे ....... कुठं थांबायचं तुम्ही सांगा. आणि शेवटी आइस्क्रीम कुल्फी !! शीतचंद्रलोक सख्यांची ही तपश्चर्या चक्क बारा वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे. आणि आम्ही सर्व सदस्य मंडळी अगदी चवीने या मेजवानीवर कोणतेही आढेवेढे न घेता लोट पोट होवून कौतुकाची थाप देवून मार्गस्थ होतो . सर्वांची जेवणं झाल्यानंतर शीतचंद्रलोक सख्यांनी जेवणास सुरुवात केली. सगळा पसारा आवरून, भांडीकुंडी लख्ख करून, साधारणतः 10 वाजता शेकोटी या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. अशाप्रकारे शीतचंद्रलोक सोसायटीत सुसंस्कृतीची सूत्रे घट्ट रोवली गेली आहेत. धन्यवाद

फुले वेचता वेचता "फुले वेचिता".......

लता मंगेशकर यांना आपल्यातून जावून सहा फेब्रुवारी 2024 ला एक वर्ष होईल. त्यांचे आपल्यात नसण्याने फार मोठी पोकळी जाणवते. त्यांची रेडीयोवरची गाणी ऐकून मन संगीतमय होऊन जातं. कोकीळ गातो त्याचं गाणं कानावर पडतं परंतु त्याचं दर्शन मात्र घडत नाही. सुरच त्याच्या अस्तित्वाची खूण असते. असा कोकीळ आवाज असलेला सुवर्णयुग पुन्हा अवतरेल का नाही सांगणे कठीण आहे परंतु अशी लता पुन्हा होणे दुरापास्त आहे. त्यांची गाणी म्हणजे भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यातला अमूल्य ठेवा आहे. लता मंगेशकर आपल्या "फुले वेचिता" या पुस्तकात लिहितात, कला निर्मितीही अशीच असते. अशीच रम्य, अशीच सहज, अशीच सुंदर, कृष्णाच्या मुकुटातल्या मोरपिसासारखी, राधेच्या हातातल्या श्रीकृष्णाच्या बासरी सारखी; कर्णाच्या वेदनेसारखी; द्रौपदीच्या जाज्जवल्यासारखी; सीतेच्या त्यागासारखी, ज्ञानेशाच्या मराठी सारखी ! एके ठिकाणी त्या आपल्याच संवेदनशील मनाला प्रश्न विचारतात, खरेच माणसाला पुनर्जन्म असतो का? किती अवघड प्रश्न? काय याचे उत्तर? फक्त शून्य ! क्षितिजाच्या पलिकडे काय आहे? वाऱ्याच्या भरारीत काय आहे ! सूर्याच्या तापात, चंद्राच्या शीतलतेत, सागराच्या खोलीत, मृत्यूच्या उदरात पुनर्जन्म असेल का? हे अथांग, अथांग विश्व पार केल्यावर परत यायला रस्ता असेल का? सगळेच गूढ प्रश्न. या प्रश्नांची उत्तरे म्हणजे प्रतिप्रश्र्नच.

Sunday 23 July 2023

तिकडंम आघाडी

विरोधी पक्षांचे महागठबंधन UPA चे नाव बदलून नवीन नाव ऐकून आश्चर्य वाटून घेवू नका, तर ते आघाडीचे नवीन नाव आहे Indian national developmental inclusive alliance (INDIA) राहुल गांधी यांच्या सुपर मेमरितून निघालेल्या या नवीन नावाचा अर्थ तरी काय आहे अजून तरी त्याचा नीटसा अर्थ उमगलेला दिसत नसला तरी बरीच मंडळी त्याचा अर्थ शोधण्यात गूगल ची पाने उलथापालट करण्यात व्यस्त असावेत. या I.N.D.I.A नाव असलेल्या गठबंधन मध्ये बरीच अशी मंडळी नेते किंवा पक्ष असे आहेत की ज्यांचे विळा भोपळ्याचे नाते आहे, कोणाचं हिंदुत्व वर जिवाआड प्रेम आहे आणि ते आता सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यां पक्षांचे कधी आयुष्यभर एकमेकांशी पटले नाही त्यांचे एकमेकांवर एव्हढे प्रेम कसे काय दाटून आले! या कोड्याचे उत्तर अतिशय सोपे आहे ते सांगायची गरज वाटत नाही. श्रीयुत अनय जोगळेकर यांची मी आज एक यूट्यूब पहिली, ही चर्चा चालू असताना त्यांना एक सुंदर गोष्ट आठवली. ते मजेशीर वर्णन करून सांगतात. एक नवरा बायको असतात, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. नवरा असतो त्याने हातावर एक घड्याळ बांधलेलं असतं. (राष्ट्रवादीचं नव्हे) पण एक घड्याळ बांधलेलं असतं. ते घड्याळ बांधलेलं असलं तरी त्या घड्याळाचा पट्टा तुटलेला असतो. (ही शिवसेनेची गोष्ट आहे असं समजू नका कारण ही खूप खूप जुनी गोष्ट आहे.) त्याचा घड्याळाचा पट्टा तुटलेला असतो, त्याची पत्नी सुंदर असते. तिला लांबसडक केस असतात. पण ते बांधायला तिच्याजवळ पिन किंवा क्लिप नसते. त्यामुळे त्या बिचारीला आपले केस मोकळे ठेवावे लागत असतात. नवऱ्या बिचाऱ्याला वाईट वाटत असतं की आपण गरीब आहोत, आपण बायकोला केस बांधायला साधी क्लिप ही आणून देवू शकत नाही. बायकोलाही वाईट वाटत असतं की आपल्या नवऱ्याचा घड्याळाचा पट्टा तुटला आहे तो पट्टा ही आपण बदलून देत नाही. दोघांचं प्रेम ही एव्हढ, एक दिवस काय होतं तर त्याची बायको तिचे लांबसडक केस कापून टाकते आणि विग वगैरे जे बनवतात त्यांना ते केस अर्पण करते. त्याचे जे पैसे येतात त्यातून ती नवऱ्याच्या घड्याळासाठी पट्टा विकत घेते. नवरा काय करतो, घड्याळाचा पट्टा तुटलेला आहे, घड्याळ असही काही उपयोगाचं नाही . नवरा विचार करतो की निदान आपल्या बायकोला चांगली क्लिप तरी घेता येईल, म्हणून तो आपले घड्याळ विकून टाकतो आणि बायकोसाठी क्लिप घेतो. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की नवरा बायकोचे एकमेकांवर किती प्रेम आहे. शेवटी तात्पर्य काय तर दोघांचे एकमेकांवर प्रेम असुनही नवऱ्याचं घड्याळ ही जातं आणि बायकोचे केस ही कापले जातात. शेवटी राहतो तो पट्टा आणि क्लिप चं करायचं काय ? आघाडीतील विविध पात्रे एकाच टांग्यात दाटीवाटीने येवून बसलीत आणि घोडा घाससे दोस्ती नही करेगा तो खायेगा क्या ? उसको खाली पेट सोना पडेगा. मतदाराला ही पूर्वा अनुभवानुसार चांगले माहीत आहे की असली सरकारे देश चालवू शकत नाहीत.

Monday 15 August 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट२०२२

ज्यांच्यामुळे आपण मुक्त श्वास घेत आहोत आणि ज्यांनी ज्यांनी भारत देश घडवला त्यांना सर्वप्रथम माझे वंदन आणि आपण शीतचंद्रलोकवासीयांना अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या संपूर्ण देशात घर घर तिरंगा ही सुंदर संकल्पना प्रत्यक्षात उदयास येत असताना आपल्या शीतचंद्रलोक मध्ये स्वातंत्र्य दिनाचाअमृतमहोत्सव कार्यक्रम भव्य रूपाने साजरा झाला. भव्य म्हणजे काय तर मोगरा दरवळतो, त्याचा सुगंध हा निव्वळ सुगंध या एका शब्दाने त्याचे वर्णन करता येत नाही. त्याचं उमलणं अनुभवणं आणि त्याच्या सुगांधाच्या लाटा अंगावर घेणे म्हणजे जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव साकार करण्यासाठी प्रचंड प्रतिभा आणि मेहनत लागली आहे, याचा अवाका कळण्यासफोटो आणि व्हिडिओ चा आसरा घेतला खरा परंतु पृत्यक्षात त्याचे स्वरूप, आकार उकार मात्रा वेलांटी आणि उद्गारवाचक किती सुंदर असतील बरे ! हे सर्व श्रेय त्या टीमला जाते की ज्यांनी आपले नाव कुठल्याही पत्रकात नमूद केले नाही. अमृतमहोत्सव यात्रा, गणेश पूजन, भारत माता पुजन, बैलगाडीचा रथ, बाईक धारी, झेंडे धारी, फलक धारी, आणि सोबत जमाव, भारत मातेवर अनोखी पुष्प वृष्टी, ओम् गावडेचा मिलिटरी मार्च, मान्यवरांचे आगमन, मान्यवरांच्या हस्ते तिरंगा पेटीतून बाहेर काढून ध्वजारोहन टीम कडे सुपूर्द केला गेला, आणि त्या नंतर, श्री जगन्नाथ पावसकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण, राष्ट्गीत, सांस्कृतीक कार्यक्रम, ज्येष्ठांचा मान सन्मान, शीतचांदेलोक मधील सर्वच स्री पुरुषांनी घेतलेला सहभाग, आभार प्रदर्शनआणि लक्ष वेधून घेणाऱ्या निवेदिका. इतकं अप्रतिम आणि केवळ अप्रतिम असे नियोजनबध्द काटेकोरपणे नीटनेटका आणि उत्स्फूर्तपणे कार्यक्रम सादर करणे म्हणजे श्रीयुत पोंक्षे साहेबांनी गौरवलेल्या त्यांच्या भाषेत फक्त म्हणजे फक्त श्रीयुत कांडके आणि त्यांची टीमच हे फत्ते करू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. झेंडा वंदन ते झेंडा हातात कसा धरायचा, कोणी कुठे आणि कसे उभे राहायचे, मान सन्मान, ज्येष्ठ मंडळीचे आदराने आदरतिथ्य, या सर्व बारीक सारीक आणि भव्य विचारांचे पडसाद या कार्यक्रमात बघायला मिळालेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम ते देशप्रेम अशा प्रवासाला निघालेल्या शीतचंद्रलोकच्या संस्कृतीच्या उदरात अजून किती रत्ने दडवून ठेवलेली आहेत ! मिसेस गाडगीळ त्यांच्या मेसेज मध्ये लिहितात आजचा स्वातंत्र्याच्या अमृत महत्सवोनिमित्त चंद्रलोक परिवाराचा कार्येक्रम खुप छान आणि दिमाखात साजरा झाला. तसेच श्रीयुत पावसकर साहेब लिहितात 15 ऑगस्ट २०२२ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही कल्पना श्री भरत कांडके यांनी प्रत्यक्षात आणली आणि हा सोहळा दिमाखदार व डोळ्याचे पारणे फिटणारा न भूतो न भविष्यती असा साजरा केला व मला या अमृत महोत्सवी सोहळ्याचे साक्षीदार केलेत. अमृत महोत्सवाच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली ते आदरणीय श्रीयुत कांडके साहेब आणि त्यांच्या टीमला मनापासून सलाम. जयहिंद

Wednesday 9 February 2022

मी स्वतः माझी गाणी ऐकते तेंव्हा -- लता मंगेशकर

 कवी फक्त काव्य करतो, पण त्याचा रसास्वाद घ्यायला मात्र पंडित लागतो, अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. कलेच्या बाबतीत अक्षरशः खरे आहे हे ! विशेषतः गाण्याबद्दल म्हणाल तर हे कोणालाही पटण्यासारखे आहे. गायक स्वतःला कितीही पट्टीचा समजो; त्याचा गाण्याचा श्रोत्यांना होणारा आनंद काही वेगळाच असतो. गाणाऱ्याला सुद्धा एक प्रकारचा आनंद असतो यात शंका नाही. पण एक गोष्ट केंव्हाही निश्चित , गवयाचा आनंद आणि श्रोत्यांचा आनंद हे काही वेगळेच !

यावरून कोणाचा असा समज होईल, की स्वतःची गाणी ऐकण्याचा माझा रोजचा कार्यक्रम असेल. पण गंमत अशी आहे की, प्रत्यक्ष गाण्यातच माझा इतका वेळ जातो, की स्वतःची गाणी ऐकायला खरच मला वेळ मिळत नाही. स्वतःचा लेख वाचायला लेखकाला काय वाटते, याची मला कल्पना नाही; पण एवढे मी स्वानुभवाने म्हणू शकते की चुकून वेळ मिळाला व स्वतःचे गाणे ऐकण्याचा प्रसंग आला, की मला तो अक्षरशः एक 'प्रसंग' वाटतो !

उदाहरणार्थ गाण्याचे रेकॉर्डिंग घ्या ना - तेंव्हापासून या आपत्तीची सुरुवात होते. प्लेबॅकच्या तालमीकरिता डिस्क रेकॉर्डही घेतली जाते. आणि आजकाल टेपरेकॉर्डिंग ही त्यात भरीला पडले आहे. त्यामुळे होते काय , की घेतलेले गाणे आपण ताबडतोब ऐकू शकतो. आणि तीच मला मोठी आपत्ती वाटते ! खोटे नाही, आपले गाणे ऐकण्याचा मला अजूनही धीर होत नाही ! कधी कधी तीन चार 'टेक्स' आम्ही घेतो. त्यापैकी कोणता 'टेक' ठेवायचा हे तरी ऐकावे लागतेच, पण अशा वेळीही हॉल मधून मी पळून जाते आणि रेकॉर्डिस्ट बसतो ना, त्या खोलीमधून ऐकणारांची तोंडे मी न्याहाळू लागते ! बहुधा सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधानच मला दिसते. मी बाहेर आल्यावर "शाब्बास, लता"! म्हणून कोणी माझी पाठ थोपटते. पण मी मात्र आतून थोडी - तरी नाराजच असते ! ........



(लता मंगेशकर लिखित ...."फुले वेचिता" या पुस्तकातून)