शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८

शीतचंद्रलोक दिवाळी पहाट २०१८

अजून पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला

रात्र अजून रात्रीच्या काळोखातच गुरफटलेली होती. रात्रीच्या गर्भातला लालबुंद आणि तांबूस रंगाचा गोल पृथ्वीच्या पोटातून बाहेर  पडायला बराच अवकाश होता. आकाश स्वच्छ आणि निरभ्र व्हायला जणू त्यानेच मोकळीक करून दिली होती. अन अशा भव्य मंडपाखाली, शीतचंद्रलोक सोसायटीच्या प्रांगणात एक नवीन पहाट उदयास येत होती. नवीन कपडे परिधान करून आलेल्या लेडीज, जंट्स तरुणाईची लगबग चालू झाली होती. नव युवतींनी रंगमंचकासमोर काढलेली भव्य देखणी रांगोळी लक्ष वेधून घेत होती. तुळशी वृंदावन अंगणात मध्यभागी सजले होते. स्टेजवर दिव्यांचा झगमगाट होता. आकाश कंदील नेहमी प्रमाणे तटस्थ स्टेजच्या मध्यभागी मिणमिणत्या प्रकाशात लुकलुकत होता. थोड्याच वेळात  दिवाळी पहाट २०१८ चे पाचवे पुष्प गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात गुंफले जाणार होते. ज्यांनी १५७ पटकथा लिहून दोनशे पेक्षा जास्त गाण्याचा खजिना आपल्याला उपलब्ध करून दिला होता. हळू हळू काळोख्यातल्या सर्वच चांदण्या भूतलावर अवतरुन प्रज्वलित झाल्यात, एक चांदणीने मात्र दूर काळोखातच अढळपद स्वीकारलं आणि एका अनुत्तरीत प्रश्नाचं वलय निर्माण होऊन कुतूहल जागं झालं. सकाळचे साडेपाच वाजलेत,  रंगमंचकावर सर्व कलाकार भारतीय बैठक मारून स्थानापन्न झालेत. उत्सुकता शिगेला पोहचली होती. पहाटे पहाटे शेतकऱ्याने गोफणीतला दगड आपल्या उभ्या पिकांवर भिरकावून,  भुर्रकन उडणाऱ्या पक्ष्यांचा विहंगमय आवाज अजून तरी कुठल्याही कॅमेरात नजर कैद झाला नव्हता. आणि तेवढ्यात संगीत मानापमान नाटकातील नयन नटवरा विस्मयकारा या समूह गीताने कार्यक्रमाला दमदार सुरुवात झाली.

शांत भासणाऱ्या अथांग जलाशयाच्या पृष्ठभागावर उडणाऱ्या पक्षाच्या पंखाचा स्पर्श व्हावा आणि त्यातून निर्माण होणारी असंख्य वलये हळू हळू शांतपणे विस्तारीत जावून अदृश्य व्हावीत, त्याप्रमाणे निवेदिका मिसेस गाडगीळ यांनी एकेक गाण्यांचे पदर उलगडतांना आपल्या मृदू, शांत आणि सुमधुर आवाजाने हवेत आद्रतेची वलये निर्माण केलीत.  प्रेक्षकांना भुरळ पडली ती त्यांच्या ओघवत्या भाषा शैलीवर. गाणं संपल्यानंतर पुढचं गाणं कसं गुंफलं जाणार आहे, त्या गाण्याचे बोल काय असतील आणि त्या गाण्यांचे आपल्याशी नाते ते कसे उलगडतात यांकडेच सर्व प्रेक्षक कौतुकाने त्यांच्याकडे बघत होते.

सौ समता पावसकरांनी तूच सुखहर्ता तूच दुखहर्ता हे मूळ प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं गाऊन एक प्रकारे जगाच्या कल्याणासाठी देवाला साकडं घालून प्रेक्षकांची मने जिंकलीत. त्यांच्या आवाजातला कणखरपणा हा शिक्षकी पेशातून उदयाला आलेला नजराणाच होता. वाऱ्याच्या झोताने शेतातली जोंधळ्यांची ताटं पानं हलवून जशी मुजरा करतात त्याप्रमाणे प्रेक्षक या गाण्याला तल्लीन झाला.

आणि प्रेक्षकांच्या एकाग्रतेला खंड न पडू देता श्री संजय पुराणीक यांनी, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांच्या आवाजातलं नाचत नाचत गावे हे गाणं गाऊन  प्रेक्षकाला ब्रम्हानंदे तल्लीन व्हायला लावलं.

आताच झिणी झिणी वाजे बीन वाजे सख्यारे हे मूळ आशा भोसलेंच्या आवाजातलं गाणं आपण त्यांच्या आवाजात ऐकलं, ज्यांनी निवेदिकेची भूमिका आजपर्यंत अगदी सहजपणे हसत खेळत पार पाडली होती,  शितचंद्रलोकच्या रंग मंचकावर होणाऱ्या नाटकात आजपर्यंत बहुमूल्य योगदान त्यांनी दिलं होतं, "साजणी बाई येणार साजण माझा" ही गायलेली लावणी दिवाळी पहाट २०१५ चं एक खास आकर्षण ठरलं होतं. आणि आता असे  किती बरे स्वल्पविराम देऊन पुढे जात राहिलो तर त्यांचा नांवाचा उल्लेख करायला विसरेन मी.  त्या म्हणजे, श्रीमती गौरी गोठीवरेकरांना मागे वळून बघायला वेळ कुठे आहे. आज तर त्यांनी कानडी भाषेतलं भाग्यदा लक्ष्मी बरंम्मा हे भजन गाऊन आश्चर्याचा धक्काच दिला. न जाणो भविष्यात त्यांच्याकडून कोणत्या सप्तगुणांची मालिका बघायला मिळेल. आत्ताच असा खोल पाण्यातला तळ न बघितलेला बरा !  परंतु शितचंद्रलोक मधील प्रेक्षकांना समजावणार कोण !

गदिमांचं विकत घेतला शाम बाई मी, विकत घेतला शाम आणि नेसले गं बाई चंद्रकला मी ठिपक्यांची अशा सुदंर गाण्यांची निवड करून सौ साक्षी सनगरे यांनी त्यांच्या सुंदर आवाजात गाऊन  प्रेक्षकांची मने जिंकलीत. त्यांच्या आवाजात गोडवा आहे.

आटपाट एक शीतचंद्रलोक नावांचं नगर होतं आणि त्या नगरात तिचा आवाज घुमतो असे म्हणतात. तर उर्वी तिचं नांव असावं. तीने ज्या स्वरात सुरेख आणि अप्रतिम असं गाणं गायलं, त्या शब्दांचा मोह मलाही आवरता आला नाही आणि चक्क मी माझ्या या अभिप्रायाला त्याच शब्दांची फुले वाहिलीत. अजुनी पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला. गाडगीळ साहेबांनी सुरेख साथ दिली.

सौंदर्याची उधळण तू 

लई दिसाची हौस राया, चला आता पुरी करू, चला जेजुरीला जाऊ हे गाणं गाण्यासाठी एकाच या जन्मी जणू फिरुनी जन्मेन मी नव्हे तर पुढच्या वर्षी फिरुनी हीच लावणी गाईन मी. झी चोवीस तास गौरवीत सौ शोभा गावडेंना सौंदर्याची उधळण तू, नवरत्नाची खाण तू म्हणत परत एकदा वन्स मोअर होऊ द्या अशी सर्व जण आतुरतेने वाट बघत आहेत.

प्रीत लपवुनी लपेल का, लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का.श्रीयुत पुराणिक काकां, वॉ क्या बात है. जीसकी तारीफ करना भूल जाय, उससे बडी दाद और क्या हो सकती है.

मनात सुंदरा तूझीच मूर्ती श्यामला  आणि २०१५ ची दिवाळी पहाटचं शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी  चंद्र आहे. अशी एकाहून एक क्लासिकल गाणी आजपर्यंत आपण गायलीत. गाडगीळ साहेब, मनात सुंदरा तूझीच मूर्ती श्यामला तुम्हीच आहात.

देहाची तिजोरी, भक्तीचाची ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा हे जगदीश खेबुडकरांचं गीत सुधीर फडके यांच्या अवजातलं गाणं, काटकर साहेबानी गायलं आणि एका नवीन कलाकार गवसला. त्यांच्या गाण्यावर एवढा कमांड होतं जणू ते आपल्या माध्यमिक शाळेपासून गात असावेत. त्यांना संगीताची देखील आवड आहे असं कळलं. Very good, Excellent

श्रवण गोठीवरेकर - माळीण नाटकात झलक दाखविल्यानंतर सायन आया गाणं गातांना चेहऱ्यावरच्या छटा आणि मुरलेले हावभाव बरच काही दर्शवीत होते. आम्ही म्हणतो म्हणून नव्हे, आता तू सायनला उतरुच नको , असाच पुढे जात रहा. यशस्वीभव.

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. हा अभंग अप्रतिम आवाजाचं लेणं लाभलेल्या नेहा आणि उर्वी यांनी सुरेख आवाजात गायला आणि शीतचंद्रोक मधील पहाट पंढरीमय झाली.

श्रीमती पेडणेकरांचे विशेष कौतुक, की ज्यांनी निवेदनाची रूपरेषा आखून दिली होती. तुमचं ज्ञान कौशल्यं चं प्रतिबिंब त्या नितळ निवेदनात दिसलं.

ज्यांना जर कधी एखादा दुर्मिळ धागा सापडला तर त्याच्यावर एक तास लेक्चर देणारे आणि ज्यांना त्यांची स्तुती केलेली अजिबात आवडत नाही ते श्रीयुत पोंक्षे साहेब आज मला थांबवूच शकत नाहीत. त्यांनी एका उत्कृष्ट गाण्याची निवड केली होती. मंगेश पाडगावकरांचं गीत, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. गाण्याचे शब्दच त्यांच्या सर्जनशीलता विषयी बोलून जातात.  दिवाळी पहाटची सुंदर चकाकणारी किनार त्यांच्यामुळेच प्रकाशित झाली. परंतु हे श्रेय ते स्वतः घेत नाहीत. कोणतंही प्रिप्रेशन नसलेला कागद हातात नसतांना सर्वांचे आभार प्रदर्शन मानून काही चुकलबिकल तर क्षमा असावी असे भाव प्रगट करून कार्यक्रम वेळेत संपवतात. उद्देश साध्य झाल्यानंतर ग्रुप क्लोज सुद्धा करतात. अशा व्यक्तिमत्वाला सलाम. अध्यक्ष श्रीयुत फाटक आणि सेक्रेटरी श्रीयुत कुंभार यांनी दिलेले मोल अनमोल आहेत. श्रीयुत सनगरे यांचं विशेष कौतुक की ज्या कार्यक्रमासाठी तुळशीवृंदावन आणि आकाशकंदील चं ते वर्षभर काळजी घेतात.

दिवाळी पहटच्या निमित्ताने व्यक्तिमत्वाला सांस्कृतिक आकार देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फुर्ती गीताने संपन्न झाला.

कितीही परिसर जलमय झाला, तरी शुभेच्छा वर्षावाचा बोर्ड वाहून जाणार नाही. कारण त्याची ओहरहेअड वायर मजबूत आहे. म्हणून बा. सी. मर्ढेकर त्यांच्या कवितेत म्हणतात,

अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते.

धन्यवाद
                                                 

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

खिडकीतलं चांदणं

आपली कोणतीही गुपितं कोणालाही कळनार नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीची खबर बात हिच्यामार्फत घेतली जावून तुमच्यावर नजर ठेवली जाते. प्रत्येक घर, हवेली, कचेरी, राजवाडा किंवा गगनचुंबी इमारतींचा आराखडा तिच्याशिवाय पूर्ण होत नाही. आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी इमारतींना भव्य सुशोभित दरवाजे असतील भले, परंतु ही नसेल तर त्याचं रूपांतर बंद अडगळीची कोठडी असाच करावा लागेल. आणि हिच्यातूनच म्हणजे याच खिडकीच्या माध्यमातून, अर्थात कॉम्प्युटरच्या आधुनिक विंडोज मधून साऱ्या जगाचा वेध घेतला जातो.

कोणी कल्पनाही केली नसेल की पूर्ण विश्वात राज राजवाडे पासून गगनचुंबी इमारतींचे सौंदर्य खिडकी शिवाय खुलून दिसत नाही. म्हणूनच गृह रचनेच्या आराखड्यात दरवाजा इतकेतच खिडकीला सुद्धा महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. खिडकी विषयी प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं. कुणाचं आणि कशासाठी तरी हळवं मन तिच्यात दडलेलं असतं. घड्याळाचा उपयोग न करता खिडकीतूनच रस्त्यावरील चहाची टपरीवर कोणकोण लोक उभे आहेत,  वाण्याचं दुकान अजून उघडलं कसं नाही.  दूधवाला, इस्त्रीवाला यांची दुकानं आज का बरं लवकर बंद झालीत. एरवी बहिणाबाईंच्या गार्डन पर्यंत हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत जाणारी रिक्षावाल्यांची लाईन आज सामसूम का दिसत आहे, आज रिक्षावाल्यांचा संप-बिम्प तर नाहीना,  या सर्व प्रश्नांची उत्तरं या खिडकीतून व्यवस्थित मिळतात. पण खिडकीतून न बघताही भाजीची गाडी केव्हापासून येऊन तो आता जायच्या तयारीत आहे हे खिडकीतून येणारी त्याची ललकारी बायकांच्या लक्षात आलेली असते आणि म्हणून हातातला पेपर वाचायचा सोडून भाजी घ्यायला मला पळावं लागतं.  एरवी नाही त्या रिकामटेकड्या गोष्टींची दखल सुद्धा या खिडकीतूनच घेतली जाते. भिंतीला कान असतात तसे खिडकीलाही डोळे असतात बरे. कोणाच्या घरी मुलगी बघण्यासाठी पाहुणे आले, तरी त्याची खबरबात आपल्या घरच्या मंडळींना या खिडकीतून पुराव्यानिशी लागतो आणि चाळीत त्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी या खिडकीतून त्या खिडकी पर्यंत पोहचते. सासू कितीही चलाख आणि हुशार असली तरी तुमच्या घरातली गुपितं सुद्धा याच खिडकीतून बाहेर पसार होतात. माहेरचा कोणीतरी दिसेल आणि त्याला निरोप देऊ या इच्छेने मिनीमिनीटाला खिडकीच्या बाजूने येरझारा घालणाऱ्या सुनेच्या आशा सुद्धा याच खिडकीत जिवीत असतात.
आपण इतिहासात डोकावून बघितले तर आपल्याला आढळून येईल की गड किल्यातल्या राणी महालांच्या खिडक्या तेवढ्याच सुशोभित असायच्या जेवढे महालांचे दरवाजे. याच खिडकीत बसून राजकुमारी आपल्या स्वप्नातला राजकुमार स्वार होवून येत असलेल्या घोड्याच्या टापांचा आवाज ऐकण्यासाठी तासन तास वाट बघत असे. राजकुमार परतीच्या प्रवासाला निघाला असतांना याच खिडकीच्या पडद्या आडून त्याला प्रेमाचा इशाराही करत असे. अश्या प्रकारे राजकुमारीचं हळवं मन याच खिडकीत दडलेलं असे .शहजहानला ज्या कारागृहात बंदिस्त केले गेले होते त्या कारागृहाच्या खिडकीतूनच ताजमहालचं सौंदर्य तो रात्रंदिवस  न्याहाळत असे.

पूर्वी गडकिल्ल्यांच्या तटबंदीला सुद्धा छोटया छोटया खिडक्या असायच्या, पण त्यांचा उपयोग शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी असायचा. आजच्या युगात अश्या तेल ओतीव खिडक्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजकाल राजकारणातल्या खिडक्यातून गरम गरम तेल एकमेकांच्या अंगावर रोज सर्रास ओतले जात आहे. तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी सरकारी मदतीची खिडकी असते परंतु असल्या खिडकीचे गज हे गंजून पूर्ण निकामी झालेले असतात.  नोव्हेंबर 2016 च्या नोट बंदीच्या काळात बँकांच्या मागच्या खिडकीतूनच नोटा बदलल्या गेल्या असं आपण प्रत्यक्ष पाहिलं होतं.

खिडकीत बसून चहा अथवा कॉफीचा घोट घेत मस्त बाहेरचा माहोल न्याहळाने हा आनंदाचा क्षण प्रगट करण्याचा आपला आयुष्यातला एक आविष्कार असतो. अशा प्रकारे मानवी मनाच्या खीडकीतूनही भाव भावनांचे अनेक वारे वाहत असतात. कवी आणि लेखकांनी सुद्धा खिडकीला आपल्या साहित्यात मानाचं स्थान दिले आहे. लेखिका सौ शुभदा खरे, त्यांच्या दोनहजार साली लिहिलेल्या वृत्तपत्रीय लेखात  खिडकीचं वर्णन करतांना म्हणतात "मध्यरात्र टळून गेली पण डोळ्यात झोपेचं नामोनिशाण नाही. येणार कशी झोप ? नुकतीच मिलर आणि बुन्सची बेहद्द रोमँटिक कादंबरी वाचून संपविली....मी लिहियतेना या टेबलावर सुद्धा चांदणं पसरलंय. खिडकी समोरच चंद्र आलाय आणि मिस्किलपणे हसत विचारतोय, काय मधुचंद्राला येणार का माझ्या घरी ! खरच रे, आपल्याला मधुचंद्राला चंद्रावर जाता आलं असतं तर किती छान झालं असतं!" खिडकी बाहेर धुंद वातावरण पसरलय ! कुसुमाग्रजांची कविता मनात बहरून येते ‘काढ सखे, गळ्यातील | तुझे चांदण्यांचे हात 'क्षितिजाच्या पलीकडे | उभे दिवसाचे दूत’

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

रंग पानाचा हिरवा सुकला, माझ्या कापसाला ...............!

चाळीसगांव पासून जेमतेम पंधरा किलोमीटरवर वसलेलं माझं गांव "धामणगांव".  या पहिल्याच वाक्यातलं "जेमतेम" हा शब्द माझ्या गांवच्या बाबतीत खूपच अशुभ ठरला आहे. वाहतुकीसाठी चाळीसगांव ते धामणगांव  रोड अतिशय ठणठणीत जरी असले तरी गावकऱ्यांसाठी सरकारची एस.टी. वाहतूक व्यवस्था जेमतेम किंवा नाही म्हटले तरी चालेल. या वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था देखील जेमतेमच होती. मी जेंव्हा चाळीसगांव एस.टी. डेपोला धामणगांवची एस.टी. बस बंद का झाल्याची चौकशी केली , तेंव्हा त्यांनी सांगितलं की पावसाळ्यामुळे एस.टी. बंद करण्यात आली आहे. त्यांचं उत्तर ऐकून मी चकितच झालो. त्याच्या डोळ्यात निरखून बघितल्यानंतर त्याचा केविलवाणा चेहरा अधिकच आगीतून काढलेल्या मठ्ठ माठासारखा भासला. गावांत नळाला पाणी सुद्धा जेमतेम अर्धा तास आणि तेही दोन ते तीन दिवसानंतर येतं आणि त्याला पर्याय नसतो, कारण हे सर्व पावसाचे अनियमित खेळ आहेत. गावांतील काही मंडळी वर्गणी काढून सांस्कृतिक उत्सव अति उत्साहाने साजरे करतात ही चांगली बाब आहे, परंतु गांवात कमीत कमी नियमित तीन वेळा एस.टी. वाहन यायला पाहिजे, गावकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांची शाळा-कॉलेज मध्ये जाण्यासाठी सोय झाली पाहिजे असा सुध्दा प्रयत्न करायला हवा परंतु तो उत्साह दिसत नाही. ज्या मराठी शाळेत आपण शिकलो त्या मराठी शाळेची फुटलेली, घरंगळलेली कौलं, अर्धवट सताड उघड्या खिडक्या बंदिस्त धर्मशाळेसारखी वाटतात. बऱ्याच वर्षांपासून पाऊस नियमित पडत नाही म्हणून शाळा समितीला ती दुरुस्त करून घ्यावीत असे सुचले नसावे कदाचित.

माझ्या लहानपणी जिथे निसर्गाला निसर्ग भिडत होता. नदीला अथांग पूर येत होता. रान वारा पिकापीकातून शीळ घालत असे आणि जंगल ही चारही बाजूने हिरवी चादर पांघरल्यासारखी भासत असे. तसं दृश्य बऱ्याच वर्षांपासून बघितले नाही. यावर्षी पाऊस श्रावण महिन्यापासून गेला तो गेलाच. त्याला तोंड फिरवून दाखवायला सुद्धा उसंत मिळाली नाही. जेमतेम तीन ते चार वेळा तो आला आणि कौतुकाची थाप घ्यायला तो घाबरलाच. नंतर त्याने फिरून तोंडही दाखविले नाही. तरी शेतकरी अजून आतुरतेने त्याची चातकासारखी वाटच बघतच होता. मंगेश पाडगावकरांची कविता भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. दिवाळी पर्यंत शेतकऱ्यांची शेतातली लगबग थंडावली. कापसाच्या गाठीच्या गाठी शेतातून घरी यायच्या त्या नाहीशा झाल्यात. कोणी बैलजोडी विकून खांद्यावरची ओझी कमी केलीत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार सुद्धा सरकारी पद्धतीने काम करून विलंब करतंय. कापसाच्या झाडाची पानं पानं आकसून मिटलीत. कापसाची झाडाची कच्ची कैरी वयात न येताच उन्हाने केविलवाणी झाली. दिवाळीला येणाऱ्या फुलांच्या पागळ्यांचा फुलोरा फुललाच नाही.

रंग पानाचा हिरवा सुकला,
माझ्या कापसाला..............!


गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हां !

पोळ्यापर्यंत त्याचं कसं आलबेल चाललं होतं. हिरवी चादर अंथरावी तसा धामाणगांवचा रानोमाळ शिवार हिरवागार पहुडलेला होता. पिके टरटंराट वाढलेली होती. नुकतेच लगीन झालेल्या पोरसवादा नवी नवरीला आपल्या माहेरची ओढ लागून कधी ती माहेराला जाते आणि आईच्या कुशीत पदराखाली विसावते, तशी शेतातील पिकांमध्ये एकमेकात चढाओढ चालू होती !   आम्ही सुद्धा सहकुटुंब सहपरिवार वीर देवाचं दर्शन घेण्यासाठी धामणगांवी आलो होतो. आदल्या दिवशी नुकताच पाऊस पडून वरून देवाने शेतातली वाफ मोडून टाकली होती. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. ते हिरवेगार पीक बघून काका सुद्धा म्हणाले की आज मी अर्धा श्रीमंत झालो आहे. हे वर्ष सुख समृद्धीचे जाणार म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीची ओढ लागली होती. पण ताटात देवाने भलतेच वाढून ठेवले होते आणि तशी त्याने तसूभरही कल्पना लागू दिली नव्हती. टप टप अंगावरती पडती पावसाची फुले असं कविला लिहायला मोह आवरत नाही आणि त्यात मनमुराद ओलाचिंब व्हायलाही त्याला आवडतं.  पण !

पण प्रत्यक्षात टप टप पडणारे पावसाचे थेंबानी यावर्षी चक्क हुलकावणी दिली होती. लहानपणी बघितलेली श्रावणातली पावसाची झडी गायब झाली होती. जंगलातून येणारे गवताचे भारे दिसत नव्हते. पोळ्यापासून पावसाने दडी मारून जशी त्याने आपली कवाडे बंद करून घेतली होती.  बांधावरची खुरटे सुकलेले गवत स्वतःच हसत होते. कापसाची वयात आलेली बोन्डे निपचीत बघत होती. बहिनाबाई चौधरींची कविता स्मरून मन सुन्न झाले. बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही, हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही.  ती बोन्ड तरी उमलणार कशी. पानं पानं झाडं झाडं करपून गेलीत. बाभळीच्या ढोलीतली पिलं तहानेने कासावलीत. शेवटी काय म्हणू देवासी !  स्वामी कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हांसी !


टप टप पडती चौफेर पानांवरती पहिल्या पावसाचे थेंबे !

नकोरे गरजू असा ओल्या झाल्यात माझ्या पापण्या आणि वेणीची फुले

सांग मजसी, दडी मारुनी गेला होतास कुठे तू आजवरी

वाट बघून फेकून दिली कविता तुझी त्या कोरड्या विहिरीच्या तळाशी

पानं पानं झाडं  करपून गेली, बाभळीच्या ढोलीतली पिलं तहानेने कासावलीत

माजुरे बांधावरचे खुरटे गवत हसते कसे, अजून नाही समजले तुला

तुझ्याविना उमलेल कसे,  कोवळे बोन्ड ते कापसाचे

चारही बाजूने खिन्न अवस्था, दुष्काळ सावटाचे

शेवटी काय म्हणू देवा तुला !

कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हां !



रविवार, २२ एप्रिल, २०१८

गुलाब ताजे फुलतात कसे

निवृत्तीनंतर फेकून दिलेलं इंजिन जास्तच काळवंडून गेलं. त्याचा रंग निघून पत्र्यांना गंज चढायला लागला होता. आपल्या हाताला इजा होईल म्हणून कोणी त्या गंजलेल्या पत्र्यांना हात लावायला देखील तयार होईना. अशी काहीशी अवस्था आपली देखील होत असते. तशी माझी काही प्रमाणात  झाली होती. अशा परिस्थितीत प्रवासाची कुठे संधी मिळते का, कधी घराच्या बाहेर पडायला मिळेल म्हणून कुठूल्या तरी आमंत्रणाची मन तन्मयतेने वाट बघत असतं. नारळाच्या झाडावरील नारळ केंव्हा खाली पडेल सांगता येत नाही. कधी कधी तुम्ही पाठमोरं झाल्या झाल्या धपकन आवाज येतो तसं, आणि काय म्हणता,  19 एप्रिलला माझ्या गांवी धामाणगांवी जाण्याचा योग चालून आला कारण 20 तारखेचं लग्न अटेंड करायचं होतं. म्हणून मी गुढघ्याला बाशिंग बांधून पुणे भुसावळ ट्रेनचं सिनिअर सिटीझन च्या सवलतीत कल्याण ते चाळीसगांव रिसर्व्हेशन देखील केलं. डोंबिवलीहून भर उन्हातान्हात घरून अडीच वाजता निघालो. अर्धा तास कल्याण स्टेशनवर अगोदरच पोहचलो.  सव्वातीन ला येणारी ट्रेन "बिस मिनीटसे देरीसे चल रही हैं" ची आकाशवाणी झाली ! आणि आली चक्क चाळीस मिनिटांनी. दुःख सांगायचं कोणाला !  एक तर सवलतीत प्रवास करतोय. 'तेरी भी चूप मेरी भी चूप'. कोंबडा बिचारा सकाळी सकाळी अरवण्याचं काम करून मानव जातीवर प्रचंड उपकार करतो, पण त्याला उदंड आयुष्य लाभो असा कोणीही आशीर्वाद देत नाही. परंतु गाडी अर्धा तास काय दोन तास जरी लेट झाली तरी तिचं तोंड भरून कौतुक करून  बिचारे पॅसेंजर सुखासमाधानाने  प्रवास करत असतात. खरी गंमत तर अजून पुढेच आहे. माझं रिझर्वेशन असून सुद्धा माझ्या जागेवर बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी मला त्याचे पाय धरावे लागले. दुसरं काय "ये मेरा इंडिया हैं" बरं हे चालायचंच ! आपण दुसऱ्याला समजून घ्यायचं असतं. बरं किती समजून घ्यायचं त्याचंही काही मोजमाप नाही. वाशिंद रेल्वे स्टेशनवर आमची आगगाडी चक्क साईडला टाकून दिली. उपनगरीय लोकल पुढे काढण्यात आली. मनाचा थोडा जळफळाटच झाला. ही कसली पद्धत आहे बाबा रेल्वेची. अजून पंधरा मिनिटे गेलीत आणि चक्क मागची सेवाग्राम एक्सप्रेस पुढे काढण्यात आली. अजून पंधरा मिनिटांनी दुसरी कोणतीतरी गाडी पास झाली. आता मनाचा ताबा सुटून रेल्वे अधिकाऱ्यांवर  माझ्या तोंडून आगपाखड सुरु झाली होती. खरं म्हणजे या संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारून चौकशी व्हायलाच पाहिजे. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण. हेच आपलं चुकतं. माझा तिळपापड झालेला बघून समोरच्या बेंचवर बसलेली ताई मला म्हणालीच. बाबा जाऊद्याना, तुमची कुठं तान्हुली लेकरं वाट बघताहेत, घ्या काकडी खावा. खूप थंड असते.  माझ्या चेहऱ्यावरच्या कळ्या खुलून, लुप्त झालेल्या हसऱ्या पेशी गालावरच्या खळीत सामावल्या. प्रत्येक जण एन्जॉय करत होते. गाडी एवढी लेट झाली तरी सर्व पॅसेंजर शांत आणि आनंदित कसे. कोणताही राग रोष टीका टिपण्या नव्हत्या. किती सहिष्णुता, सर्जनशीलता आणि सहनशीलता आहे या लोकांच्या मर्यादेत. गुलाब ताजे फुलतात तरी कसे याचं उत्तर मिळालं होतं मला. किरकोळ विक्रेते, चायवाले चालत्या गाडीत फेऱ्या मारत होते. परंतु अंधाऱ्या रात्री मला फाट्यावरून चालत धामणगांवी चालत जावं लागणार होतं. त्या भागात बिबट्याचा वावर आहे असं ऐकायला मिळालं होतं. म्हणून घबराहट जाणवत होती. अगोदरच दीड तास लेट झालेली गाडी आता कसारा घाटात धावत होती. आणि तेवढ्यात तिशीतल्या तरुण मुलीने गाडीची चेन खेचली. झालाना दुष्काळात तेरावा महीना. माझ्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडलेत. एका मिनिटात गाडी जागेवरच थांबली. बरेच पॅसेंजर खाली उतरले. आता पंचनामा होऊन अर्धा तास तरी जाणार अशी खात्री झाली. त्या मुलीचा खिडकीतून मोबाईल पडला म्हणून तिने चेन खेचली होती. ही बातमी वाऱ्यासारखी पोहचली.  गाडी लेट होण्यासाठी होत्या नव्हत्या साऱ्या पॉसीबल गोष्टी आजच घडत होत्या. बहुतेक नियतीचाच हा खेळ असावा. म्हणून शांत राहणेच योग्य होते. केअर टेकर आला आणि निघून गेला. त्या मुलीची कोणतीही चौकशी अथवा दंड तिला झाला नाही. गाडी लवकरच चालू झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला. मला घेण्यासाठी सुद्धा माझा पुतण्या आला होता आणि मी रात्री अकराच्या सुमारास सुखरूप घरी पोहोचलो. माणसाने संयम शील  असावं, आणि विपरीत परिस्थितीत आयुष्याचा आनंद लुटावा. गुलाब ताजे आपोआपच  फुलतात.
 

 

रविवार, १ एप्रिल, २०१८

एप्रिल नांवाच फूल


जगात लोकांना मूर्ख बनविणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यांचा सर्वे करता येत नाही म्हणून बरं ! नाहीतर त्या आकडेवारीत कदाचित तुमची आमची ही गणना झाली असती. दुसरी गोष्ट म्हणजे मूर्ख बनविणाऱ्यांच्या दुधात साखर आणून सोडली आहे ती वर्षातून एकदा येणाऱ्या एक एप्रिलने. परंतु खरं सांगायचं म्हणजे एक एप्रिल हा सुज्ञांनी सुज्ञ लोकांना मूरख बनविण्याचा दिवस आहे. पूर्वी न्युज पेपरवाले सुध्दा मोठमोठ्या सिलेब्रिटींचे एप्रिल फूलच्या नांवाखाली लग्न लावून देत असत आणि आम्ही मोठ्या कौतुकाने आणि आश्चर्यचकित नजरेने दोन दोन वेळा तो पेपर वाचत असू. परंतु वर्षातून एक दिवस का होईना आयष्यभर मूर्ख बनविण्याचा पेशा करणार्यांना एक दिवस सज्जनतेची गुढी ऊभारता येते असो.

गोष्ट अशी आहे की, एप्रिलफूल नाही हो ! मनापासून खरं सांगतो. माझ्या मुलीचा मुलगा सोनू याचा बर्थडे दिवस सुद्धा एक एप्रिलच आहे. आता आली की पंचाईत ! त्याला कळायला लागल्यापासून जेंव्हा शाळेत त्याने बर्थडेच्या दिवशी चॉकलेट्स वाटले त्यावेळेस हा सोनू आपल्याला एप्रिल फूल बनवितो आहे अशी सर्व स्टुडंटची खात्री झाली होती. मग शेवटी शाळेच्या बाईंनी आपलं  कौशल्य वापरून हा तिढा सोडविला म्हणे. असेल कदाचित. परंतु दर वर्षी त्याच्या आई वडीलांना कमी अधिक प्रमाणात लोंकाची, नविन रिश्तेदारांची समजूत काढावीच लागते.

पण एक एप्रिलफूल ने असं काही बस्तान बसवलं आहे की सकाळी सकाळी कोणतीही बातमी खरी वाटच नाही. 31 तारखेला नोकरीची ऑर्डर हातात पडल्या पडल्या विश्वास दुसरया दिवशी शेजारीण काकूंना नोकरी मिळाल्याची खबरबात देतो तेंव्हा निमा काकूंना खर वाटेल तेंव्हा ना ! आज एक एप्रिल आहे ना, दिवसभर पोरींच्या मागे हुंदडत असतो, अन म्हणे नोकरी ची ऑर्डर मिळाली त्याला !! असे कॉमेंट्स सहज ऐकायला मिळतात.

तसच आज मला एके ठिकाणचं साखरपुड्याचं आमंत्रण मिळालं आणि माझ्या मनात पाल चुकचुकलीच. आमंत्रण देणारे मुलाचे वडीलच, प्रतिष्ठित माझे नातेवाईक होते म्हणून बरं नाही तर माझाही गोंधळ उडाला असता.

तसं बरं झालं महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती एक एप्रिलला केली नाही म्हणून ठीक, म्हणून विरोधकांना भांडता तरी येतं. यांच्यातली खरी गोम म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती ही एप्रिल फूल होती का अशी शंका आता घर करू लागली आहे.

आपण किती तरी अनावश्यक असे पाश्चात्य देशांचे डेज मोठ्या अनंदाने साजरे करतो आणि आपल्याच भाद्रपद महिन्यावर टीकास्त्र सोडत असतो.