Saturday 3 March 2018

किलबिल कोवळी मने


मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांची मनं निर्व्याज्य असतात. चिखलात उमलल्या स्वच्छ कमळांच्या पाकळ्यांसारखी. फुल उमलायच्या अगोदर त्या निर्व्याज्य नाजूक कळ्यांकडे बघा, कशी हात लावताच ती गळून पडतात.  त्यामुळे त्यांना झाडावरून तोडायचं नसतं. त्यांना झाडावरच फुलू द्यायचं असतं. आपण नुसते डोळे जरी वटारले तर त्यांच्या नाजूक पापण्या चिंब भिजतात. तृणांच्या पात्यांवर दवाने थब थबून गेलेल्या दवबिंदूसारखी त्यांची मने कधी ओथंबून विरघळतील हे त्या मातेशिवाय कोणालाच कळत नाही.  मी ज्यावेळेस तिला विचारलं, कि तुम्ही लहान मुलं पायात बूट का घालतात. "पायमोजे खराब होवू नयेत म्हणून" असं तिने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं. या नाजूक, कोवळ्या किलबिल मनाच्या भावना , त्यांनी दिलेली उत्तरे ही तितकीच कोमल पिंजलेल्या कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि परिपक्व असतात. नितळ आणि निर्मळ पाण्यात खडा टाकून त्या नाजूक लहरी निवळेपर्यंत ती कोवळी मने असच तास न तास आपलं प्रतिबिंब बघत राहतात. त्यांच्या अदा बघा किती सुंदर असतात. रीम झिम पावसात पायाने पाणी तुडविणे, साबणाच्या पाण्याचे बुडबुडे हवेत सोडणे, मोठया माणसाचे बुट पायात घालून चालण्याचा प्रयत्न करणे, बाबांचा चष्मा काढून आपल्या स्वतःच्या डोळ्यावर चढविणे, लग्नात नवरदेवाचा घोडाच पाहिजे असा हट्ट करणे, आईच्या शेजारी उभे राहून छोटया छोटया पोळ्या तयार करणे, वाकडा तिकडा वाळूचा किल्ला तयार करणे, घरात लपंडाव खेळणे, दसरा असो किंवा मकर संक्रात असो, सोनं आणि तिळगुळ घरोघरी जावून यांना कसलां कमालीचा आनंद होतोय. मांजराचं आणि कुत्र्याचं पिलांशी यांची चांगलीच गट्टी जमते.

No comments:

Post a Comment