Monday 26 February 2024

बहनों और भाइयों

ओ पुराना दौर सकुन का दौर् था, धीरज और संतोष का युग था औंर आज हर चीज जेट स्पीडसे भागती दौडती रहती है l बहनो और भाइयो, रहना तो हमे आखिर आज ही मे है l लेकीन गुजरे हुये दिनकी मिठास और गहराई भी अगर हम अपने साथ रखकर आगे बढते रहे, परंपरा और प्रगतीसे मिलाते रहे, तहजिब और तरक्कीसे जोडते रहे तो, और बिता अनमोल होता जायेगा हमारा जीवन l दुःख और सुख, मिलन और विरह, दोनोको झेलना आसान हो जयेगा l हे बोल आहेत अमीन सयानी यांचे 1952 ते 1955 च्या रेडिओ वरच्या बिनाका गीतमालातील. गाण्यापेक्षा हे बोल ऐकण्यासाठी शहराच्या चौका चौकातून, पानाच्या टपरीवर, मिळेल तेथे पब्लिक गर्दी करीत असे. मी सुद्धा माध्यमिक विद्यालयात धुळे येथे शिकत असातांना, संध्याकाळी आठ वाजता एक छोट्या चहाच्या टपरीवर बिनाका गीतमाला ऐकण्यासाठी हजेरी लावत असे. रसाळ आणि मधाळ वाणीने अमीन सायानीच्या आवाजाचं गारूड लाखो लोकांच्या हृदयात घर करून बसलं होतं. आज तो रेडियोवरचा आवाज कायमचा बंद झाला. राहिल्या त्या फक्त आठवणीच्या रेकॉर्डिंग्ज. त्यांच्या जाण्याने रेडियोवरचं सुवर्ण युग लयास गेलं आहे असं वाटायला लागलं. बहनों और भाइयों अशी त्यांच्या बोलण्याची शैली आज ऐकायला मिळणे दुरापास्त आहे. त्यांचे निवेदन ऐकत राहणे हा स्वर्गीय आनंद होता, शब्दांना साज चाढविण्याची कला त्यांना ईश्वरी देणगी लाभली होती. तब्बल चार दशके त्यांनी शब्दांची फुले रसिकांच्या मनावर उधळलीत. त्यांच्या शैलीदार निवेदनाने केवळ शहरी भागात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात , खेडोपाडी रसिकांवर भुरळ घातली होती. तसेच गायक, संगीतकार, गीतकार, नट नट्या यांना बोलते केले होते. तारीख 21 फेब्रुवारी 2024 ला असंख्य रसिकांना भुरळ घालणारे अमीन सयानी यांची 91 व्या वर्षी प्राण ज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Monday 5 February 2024

शेकोटी 2024

संस्कृती म्हणजे काय तर आपल्या समजाची जीवन पद्धती की जेथे शिष्टाचार, खानपान, भाषा, साहित्य, विचार,आदर, सदभाव, सभ्यता आणि कला याचा संगम. आणि हाच संगम शीतचंद्रलोक सोसायटीत जवळ जवळ दोन ते अडीच दशकापासून बघायला मिळत आहे. मग तो विषय कोणताही असो, राम मंदीर प्राण प्रतिष्ठा असो, श्री सत्यनारायण वार्षिक पुजा किंवा वुमेन्स डे असो, तसेच कोजागिरी पौर्णिमा, किंवा दिवाळी पहाट असो, अशा कितीतरी उत्सव सेलिब्रेट केले जातात की त्यांच्यावर वेळोवेळी भाष्य केले आहे. नेहमी एक गोष्टीचा विसर पडतो ती म्हणजे शीतचंद्रलोक च्या सख्या. चुलितले निखारे आणि टोपलीतले चार पाच वांगे उचलून टाकून चक्क काळेकुट्ट भाजून निघेपर्यंत एका दगडी खलबत्त्यात हिरव्या मिरच्या, लसूण जिर, मीठ कांदा कुटून निघेपर्यंत इकडे वांगी चांगलीच होरपळलेली असतात आणि खमंग वास सुटलेला असतो दुसऱ्या मिनिटाला वांग्याचं भरीत कुच्करून तयार झालेलं असतं, घरधनी नाकात वास भरून मळ्याकडे रवाना होतो. हीच ती संकल्पना शीतचंद्रलोकमध्ये कोणी रुजविली हे कोडे उलगडण्याच्या भानगडीत न पडता लहान थोर सगळीच मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं अशी खूणगाठ बांधून रिपीट रिपीट वांग्याचं भरीतचा फडशा पाडला जात होता. खर म्हणजे आदल्या दिवशी शेकोटी कार्यक्रमावर दुःखाची सावली पसरल्यामुळे शीतचंद्रलोक सख्यानी आपल्या कर्तृत्वाचं भान ठेवून नियोजित शेकोटीचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला होता. सकाळ पासून त्यांची ही लगबग किती शिस्तीत चालू होती ही कॅमेरात बंद झालेली असतांना, घरची कामे आवरून या लोकांना वेळ मिळतोच कसा, बाजार केंव्हा करतात, कोण कोण जातंय बाजाराला, आणि यांना हे जमतं कसं ! खलबत्ता, मुसळ, शेंगदाणे, लसूण, हिरव्या झणझणीत मिरच्या यांचे कुटण, बेसन, वांगे भाजणी, तवा, कढई, मीठ मसाला आणि चुलितील निखारे ....... कुठं थांबायचं तुम्ही सांगा. आणि शेवटी आइस्क्रीम कुल्फी !! शीतचंद्रलोक सख्यांची ही तपश्चर्या चक्क बारा वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे. आणि आम्ही सर्व सदस्य मंडळी अगदी चवीने या मेजवानीवर कोणतेही आढेवेढे न घेता लोट पोट होवून कौतुकाची थाप देवून मार्गस्थ होतो . सर्वांची जेवणं झाल्यानंतर शीतचंद्रलोक सख्यांनी जेवणास सुरुवात केली. सगळा पसारा आवरून, भांडीकुंडी लख्ख करून, साधारणतः 10 वाजता शेकोटी या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. अशाप्रकारे शीतचंद्रलोक सोसायटीत सुसंस्कृतीची सूत्रे घट्ट रोवली गेली आहेत. धन्यवाद

फुले वेचता वेचता "फुले वेचिता".......

लता मंगेशकर यांना आपल्यातून जावून सहा फेब्रुवारी 2024 ला एक वर्ष होईल. त्यांचे आपल्यात नसण्याने फार मोठी पोकळी जाणवते. त्यांची रेडीयोवरची गाणी ऐकून मन संगीतमय होऊन जातं. कोकीळ गातो त्याचं गाणं कानावर पडतं परंतु त्याचं दर्शन मात्र घडत नाही. सुरच त्याच्या अस्तित्वाची खूण असते. असा कोकीळ आवाज असलेला सुवर्णयुग पुन्हा अवतरेल का नाही सांगणे कठीण आहे परंतु अशी लता पुन्हा होणे दुरापास्त आहे. त्यांची गाणी म्हणजे भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यातला अमूल्य ठेवा आहे. लता मंगेशकर आपल्या "फुले वेचिता" या पुस्तकात लिहितात, कला निर्मितीही अशीच असते. अशीच रम्य, अशीच सहज, अशीच सुंदर, कृष्णाच्या मुकुटातल्या मोरपिसासारखी, राधेच्या हातातल्या श्रीकृष्णाच्या बासरी सारखी; कर्णाच्या वेदनेसारखी; द्रौपदीच्या जाज्जवल्यासारखी; सीतेच्या त्यागासारखी, ज्ञानेशाच्या मराठी सारखी ! एके ठिकाणी त्या आपल्याच संवेदनशील मनाला प्रश्न विचारतात, खरेच माणसाला पुनर्जन्म असतो का? किती अवघड प्रश्न? काय याचे उत्तर? फक्त शून्य ! क्षितिजाच्या पलिकडे काय आहे? वाऱ्याच्या भरारीत काय आहे ! सूर्याच्या तापात, चंद्राच्या शीतलतेत, सागराच्या खोलीत, मृत्यूच्या उदरात पुनर्जन्म असेल का? हे अथांग, अथांग विश्व पार केल्यावर परत यायला रस्ता असेल का? सगळेच गूढ प्रश्न. या प्रश्नांची उत्तरे म्हणजे प्रतिप्रश्र्नच.