Monday 29 July 2019

खतरों का खिलाडी

आपण त्यांना कधी लहान मुलांच्या घोळक्यात, तर कधी योग करतांना, तर कधी स्वच्छता अभियान मध्ये झाडू मारतांना बघितले असेल तर कधी मनकी बात मध्ये रेडियो द्वारे भारतीय जनतेशी संवाद साधतांना, तर कधी प्रचंड जनसमुदया समोर विरोधकांवर शब्दप्रहार करतांना आपण त्यांना नक्कीच पाहिले आहे. राजकारणात पंतप्रधान पदी असलेले मोदी यांनी जीएसटी, नोट बंदी सारखे कडू औषध आणून देशाला सशक्त बनविले. विरोधी पक्षांचा तोफांचा भडिमार सहन करून, एअर सर्जिकल स्ट्राईक धाडसी निर्णय घेवून जगाला अचंबित करून सोडले. अशा या धाडशी खिलाडने सडक्या विचार धारणा असलेल्यांची गय न करता  देशाला चंद्रायन 2 पर्यंत  नेऊन सोडले. 24 चोवीस तास न थकता काम करणारा पंतप्रधान देशाला लाभला म्हणून मोदी मोदी ची गुंज ऐकतांना विरोधक सुद्धा अचंबित होतात. आणि सर्वच आघाड्यांवर निष्प्रभ ठरलेल्या विरोधी पक्षाला आपल्या दुकानंतली जुनी मोड विकायची पाळी येवून पोहचली.

असा हा धुरंदर, खतरोंका खिलाडी आता ब्रिटिश साहसी खेळपटू बेयर ग्रिल्स यांच्या बरोबर जंगलात भटकंती आणि राफ्टिंग करतांना, मॅन व्हर्सेस वाईल्ड या जगभर लोकप्रिय असलेल्या डिस्कव्हरी वाहिनीच्या विशेष भागात दिसणार आहे.

Tuesday 9 July 2019

तुमची गाडी कालच गेली !

प्रवास आणि तोही पावसाळ्यात, माझ्याबाबतीत याच्यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही. परंतु तुमचं पूर्वनियोजित नियोजन असेल तर प्रवास सुद्धा तुमचा आनंदात होतो. नोकरीच्या कालावधीत माझं प्रवासाचं प्रिप्लॅन असायचं, सर्वकाही साहेबासारखं, परंतु रिटायरमेंट नंतर माझी सगळीच गणितं बदललीत. मुंबई पुणे लक्झरीने जायचं असेल तर चारशे रुपये लागतात, ओलाने जायचं असेल तर टोलबील धरून 1900 ते एकविसशे रुपये लागतात. आणि ब्लाब्ला ने जायचं ठरविलं तरी साडेतीनशे ते चारशे रुपये लागतात. आणि ट्रेनने एसी चेअर कारने जायचं म्हटलं तरी दोनशे ते अडीचशे रुपये लागतातच. आजकाल मला पुण्याला वारंवार जावे लागत असल्यामुळे इकॉनॉमी पद्धतीने सुद्धा जात येतं, कल्याण पासून पुणे पर्यंत चक्क मी चाळीस रुपयात सुखरूप आणि फास्ट जातो. आणि हें सर्व क्रेडिट सेंट्रल गव्हर्नमेंटला जातंय. कारण सिनिअर सिटीझनला 40 टक्के प्रवास भाड्यात सूट असल्यामुळे मी अवघ्या चाळीस रुपयात पुणे गाठतो. मी स्टेट गव्हर्नमेंटचे आभार मानणार नाही कारण त्यांनी जेष्ठ नागरिकांचे वय 65 वर्षे ठरविलेले आहे.

तर आज झालं काय, मी काही महत्वाच्या कामानिमित्त एक दिवसासाठी पुणे येथें आयटीआय रोड औंधला गेलो होतो. मला मुंबईला परत यायचं होतं म्हणून जवळच दहा मिनिटांवर असलेललं खडकी स्टेशन गाठायचं होतं. एका रिक्षावाल्याला विचारलं त्याने 100 रुपये सांगितलं, चला याचं चुकलं असेल म्हणून दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारलं तर त्याने 150 रुपये सांगितलं. यांना मी रेसकोर्सचा घोडा वाटलो की काय, असं मला सहज वाटून एक टक आश्चर्यकारक नजरेने मी त्याच्याकडे बघतच राहिलो, अन तो चटकन समजला टांग्यावालं गिऱ्हाईक दिसतंय म्हणून सटकन सटकला ! शेवटी मी ब्रेमेन चौकापर्यंत पायीच गेलो आणि तेथून अवघ्या तीस रुपयात खडकी स्टेशन गाठले. तेथून धोधो पावसात लोकलने  लोणावळा गाठलं. परंतु माणुसकी नांवाची चीज मला अनुभवास मिळाली ती डेक्कन एक्सप्रेस मध्ये. गाडीला अतिवृष्टीमुळे तुरळक गर्दी होती. काही लोक स्टँडिंग होते अर्थात तो रेझर्वडं कंपार्टमेंट होता. मी सुद्धा एका बाजूला खांद्यावर माझी कमी वजनाची बॅग लटकवून केविलवाण्या चेहरेने उभा होतो अर्थात सर्वांचेच चेहरे मला कमी नजरेमुळे सारखेच भासत होते . मधल्या दरवाज्या जवळ तीन चार मुली आणि चार पाच जेन्ट्स उभे होते त्यांनी मला इशारा करून जवळ बोलवून घेतले आणि एक सीट खाली होती ते त्या जागेवर स्वतः न बसता मला बसविले. क्षणभर मला काही सुचलच नाही, गाडीने खंडाळा सोडले होते आणि मला त्यांचे आभार देखील मानायचे भान राहीले नाही. राहून राहून विचार येत होता माणुसकी, आपुलकी, सर्जनशीलता दुनियेत अजून भरपूर शिल्लक आहे. आपल्या नजरेने ती ओळखता आली पाहिजे. ताजे गुलाब फुलतात कसे असा प्रश्न आपल्याला पडणारच नाही.

असाच एक प्रसंग आठवला, रात्रीचे बारा वाजून दहा मिनिटे झाली होती. आम्ही सहकुटुंब सह परिवारासह आमची कुलदेवता तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालो होतो. आम्ही सोलापूरचं 17 तारखेच्या रिझर्वेशन प्रमाणे कल्याण प्लॅटफार्मवरून चेन्नई एक्सप्रेस रात्री 12.25 ला पकडली. एक्सप्रेस ट्रेन ने केलेला प्रवास तर अविस्मरनियच होता कारण मध्यरात्री नंतर चोर पावलाने येवून बदलणाऱ्या तारखेमुळे होणारा प्रवासाचा महा खेळ खंडोबा झाला होता. आमची स्लीपर सिटे दुसऱ्या लोकांनी अगोदरच ऑक्युपाय केलेली होती.  रेल्वे टीसी हळूच माझ्या कानात कुजबुजला, "तुमची गाडी कालच गेली हो". मी म्हणालो असं कसं काय होऊ शकतं ! त्यांनी सांगितलं "साहेब आज 18 तारीख आहे" कालांतराने या स्मृती जरी जाग्या झाल्यात तरी हसून हसून शरीराची पुरे वाट लागते. शेवटी टीसी मास्तरांनी आमची हतबलता बघून विना तिकीट, विना रिझर्वेशन आणि विदाऊट पेनल्टी घेऊन झोपायची व्यवस्था करून दिली होती. त्याही वेळेस माझ्याकडून त्यांचे आभार मानायचे राहून गेले होते. ताजे गुलाब फुलतात कसे याच उत्तर समजायला मी आयुष्य घालवून दिलं.

Monday 8 July 2019

जगबुडी

पावसाळा चालू असल्यामुळे मस्तपैकी बायकोला गिलक्याची भजी तळायला सांगावं आणि खिडकीत बसून मस्त वाफाळलेला चहाचे घुटके घेता घेता मुसळधार पावसाचं नेत्रसुख घेत राहावं, हे सर्व ठीक आहे. पण काही शब्द इतके भयानक असतात की, नुसते ते कानावर पडले किंवा डोळ्यांनी वाचले तर थरथर कापायला होतं. आज झोपेतून उठल्याबरोबर वर्तमानपत्र चाळता चाळता जगबुडी नदीला महापूर ही बातमी वाचून छातीत धडकीच भरली !  दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचे जग बुडवतेच असा इतिहास समजल्यावर पुढचं विचारू नका. बरं ही नदी आपल्या महाराष्ट्रातून वाहते हे समजल्यावर आपण काय मागच्या जन्मी दुष्कृत्य केली म्हणून या जन्मी शिक्षा उपभोगण्यासाठी आपल्याला जगबुडी नदीच्या परिसरात जन्म घ्यावा लागला असेल !  असे विचार माझ्या मनाला घाबरवून गेलेत. थोडं हिस्ट्री जाणून घेतल्यानंतर जीव भांड्यात पडला. कोकणातल्या सगळ्याच नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून अरबी समुद्राला मिळतात. म्हणून कोकणला एवढं सुष्टीसौंदर्य लाभलं कसं, असा प्रश्न पडत असेल तर येवा कोंकण आपलोच असा म्हणजे जावे त्याच्या स्थळी तेंव्हा कळे. पूर्वेला सह्याद्री पर्वत आणि पश्चिमेला अरबी समुद्र यांच्यामध्ये चिंचोळ्या कोकणपट्ट्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या वाहतात. जगबुडी नदी रत्नागिरी जिल्ह्यात वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते आणि वाशिष्ठी नदीला येवून मिळते. जगबुडी नदी वशिष्ठीचीच प्रमुख उपनदी आहे. सुष्टीसौंदर्यात भर टाकणाऱ्या या नद्या पावसाळ्यात उग्र रूप धारण करतात आणि धोक्याची पातळी ओलांडून आजूबाजूचं जग आपल्या कवेत घेतात म्हणून दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचा परिसर बुडवतेच.

Friday 5 July 2019

रिकाम्या टिकाकारांचा देश

लोकशाहीचा धागा उलगडून बघितला तर सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखविणे हे विरोधी पक्षाचे धोरण असुच शकत नाही, म्हणून टीका जरूर करावी पण ती योग्य जागी अन योग्य शब्दात. जसं भांड्याला भांडं लागावं अन मधूर नाद निर्माण व्हावा आणि सामाजिक पर्यावरणाचा समतोल राखला जावा परंतु तसे होतांना दिसत नाही. सध्या राजकारणात प्रचंड चिखलफेक चालू आहे. वि.स.खांडेकर 1997 मध्ये लिहिलेल्या "पहिले पान"  या पुस्तकात लिहितात, गवताची गंजी पेटवायला काही वाजत गाजत मशाली आणाव्या लागत नाहीत. निष्काळजीपणाने विडी ओढणारा मूर्ख मनुष्य एक ठिणगीने ते काम करू शकतो. आणि हे त्यांचे साधे विचार आज तंतोतंत लागू पडतात.

रिकामा ..... भिंतीला तुंबड्या लावी, ही म्हण ग्रामीण भागात रोजच्या दैनंदिन जीवनात सर्रास वापरली जाते . माझी हयात निघून गेली परंतु न्हावी कधी रिकामा बसलेला मी अजून तरी पाहिलेला नाही. तरी सुद्धा ही म्हण त्याच्या माथी का मारली याचा मला काही ताळमेळ लावता येईना ! एक वेळा म्हणीतला हा न्हावी परवडला अशी म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. कारण आपल्याकडे उठ सूट कोणत्याही घटनेवर टीकाकार आणि बिन टीकाकार सुद्धा जी झोड उठवितात त्यावरून असे वाटते की भारत हा रिकामटेकड्या टीकाकारांनी भरलेला देश आहे. कधी हे टीकाकार सध्या चालू असलेल्या वर्ल्ड कप चॅम्पियनशीप स्पर्धा मधील इंग्लंडविरोधातील भारताच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उभे करतात, तर कधी पावसामुळे यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं तर ते सरळ सरळ सत्ताधारी पक्षावर खापर फोडतांना दिसतात. त्यांना माहीत आहे की 45 वर्षानंतर मुंबईत तुफान पाऊस झालेला आहे, परंतु टीका करून आपल्या जिभेची हौस पूर्ण करण्याचा मार्ग मात्र सोडत नाहीत. याच्यापुढे जावून, सत्ताधारी लोक नाल्यातून पैसे खातात म्हणून मुंबई पाण्यात गेली. या टिकेला काय म्हणावं ! आता अलीकडे खेकड्यानी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फोडलं असा असा अजब युक्तिवाद जलसंधारण मंत्र्यांकडूनच ऐकायला मिळाला आणि त्याच्यावर कहर म्हणजे नवाब मलिक साहेब म्हणतात तिवरे दुर्घटना म्हणजे ‘भ्रष्ट मोठे मासे’ वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी गेला. बरं हा रमीचा डाव इथेच संपत नाही तर आता काही पक्षातील लोकांनी ठाण्यातून जलसंधारण मंत्र्यांकडे खेकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा चघाटया चघळून चघळून वीट आला नसेल तेवढ्यात दुसरं प्रॅक्टिकल समोर आलं. गोवा महामार्गावर काही राजकीय नेत्यांनी ऑन ड्युटी असलेल्याअभियंत्यावर चिखल भरलेल्या बादल्या ओतून चक्क त्याला अंघोळ घातली. आहे की नाही अजब व्यक्ती स्वातंत्र्य आपल्या देशात. आणि आताच एक बातमी येवून थडकली आहे की राहुल गांधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना खडसावले आहे की मुंबई तुंबली तेंव्हा तुम्ही झोपला होता काय.

अतिवृष्टीमुळे महामार्गावर दरळ कोसळली तर टीकाकार  सरकारला दोष देवून टीव्ही चॅनेल वर एकमेकांचे कांन फुंकत बसले तर आश्चर्य वाटून घेऊ नये.

आशा प्रकारे आपल्या देशात भरपूर भिंतीला तुंबड्या लावणारे राजकारणी असतांना गरीब बिचाऱ्या न्हाव्याला "रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी" उगीच या म्हणीचा बकरा बनवला गेला !


Monday 1 July 2019

वीर

म्यानातुनि उसळे तरवारीची पात
आकाशातून ओघळे उष्माची लाट
डोक्यावर पगडी, हातात ढाल
अनवाणी वीर नाचले रणरणत्या उन्हात



चाळीसगांव पासून पंधरा किलोमीटरवर वसलेले एक छोटेसे गांव, धामणगांव. चाळीसगांव पासून खडकिसींम वरून काटकोनात सरळ डांबरी रोड धामणगांवाची वेस ओलांडून गांवापर्यंत जातो, धामणगांवाची  रचना इतर गावांच्या पेक्षा वेगळी नाही. गांवात प्रवेश करताना मोठी गडकिल्यासारखी कमान नसली तरी गावात शिरण्यासाठी मोठा सताड उघडा दरजा आहे. विज्ञान जरी प्रगत असले तरी गांवातील प्रत्येक कुटुंबे देवधर्म पाळतात. आजही वीर देवाला वंदन करण्यासाठी, त्यांचे स्मरण करण्यासाठी वीर काढण्याची प्रथा आहे. मला आठवतं आमच्या घराण्यात माझे काका दिनकर चव्हाण, महारु आप्पा, नामदेव काका, विनायक अण्णा हे वीर झालेले मी पाहीले आहेत. वीर देव हे चव्हाण कुळाचे देव आहेत. वीर देवांची ऐतिहासिक पार्श्वभूमी कोणाला ज्ञात नसली तरी दरवर्षी परंपरेने, श्रद्धापूर्वक वीर काढण्याची प्रथा पूर्वजांपासून चालत आलेली आहे. वीर देव नदीच्या तीरावर एका शेतात स्थित आहेत. वीर संस्कृती जपण्यासाठी वीरांची गांवातून वाजत गाजत नाचत मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून वीर नृत्य करीत मार्गक्रमण करीत असतात. गांवच्या चौका चौकातून, गांवाच्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिराच्या प्रांगणात वीरांना उधाण येते. वीर जेंव्हा जोश मध्ये येवून नाचतात तेंव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. मार्चच्या रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने वीर हे बेभान होवून नाचतात कसे हे एक आश्चर्यच आहे. वीर, वाजंत्री हळू हळू पुढे सरकत मराठी शाळेवरून, तुळजापूर माता भवानीचे दर्शन घेतल्या नंतर देवगांवच्या मारुतीला फेर घातला जातो आणि पुढे मूळ वीर वसलेल्या ठिकाणापर्यंत दुपारी 12च्या मध्यान्ही समाप्ती होते. बोकड कापला जाऊन मटणचं जेवण पाहुण्यांना आणि गांवाला दिले जाते. तृप्त मनाने आलेले पाहुणे हळू हळू आपल्या मूळ गांवी वापस जातात. अशा प्रकारे आपल्या वीर देवांची पूर्वापार चालत आलेली पूर्वजाप्रती कृतज्ञता जपली जाते.