Sunday 22 August 2021

रक्षाबंधन

हॅलो बापू,

आज रक्षा बंधन आहे. तू पुण्याला आला आहेस का, निर्मलाकडे कासारवाडीला आला आहे का ? "नाही गं, मी इंद्रायणीने येत आहे, अकरा ते साडे अकराच्या सुमारास तुझ्याकडे पोहचतो आहे. तुझ्याकडे आल्यानंतर मी कासारवाडीला निर्मलाकडे जाईन. पण नऊ वाजले, दहा वाजले अजून पर्यंत तिचा फोन आलाच नाही !

आज पाच दिवस झालेत, ती आमच्यातून निघून गेली, तिला जगण्याची खूप इच्छा होती, 2019 मध्ये तिचे मेजर बायपास झाले होते, डॉक्टरांनी सुद्धा नाही सांगून दिले होते परंतु प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर तिने मात केली होती, मी देवाचे आभार मानले की त्याने माझ्या बहिणीला सही सलामत वापस पाठवून दिले होते, नंतर कोविडच्या दीर्घ काळात तीला कधीही ऍडमिट करायची वेळ आली नव्हती, देव तिच्या पाठीमागे उभा होता जणू. पण देवाने यावेळेस हाथ वर करून दिले. मी देवाला दोष देत नाही. देवाने तिला भरपूर आयुष्य दिले, तिच्या मुलासाठी आणि तिच्या मुलींसाठी जगण्याचं तिला सामर्थ्य दिले होते. वायसीएम हॉस्पिटलला ती व्हेंटिलेटर वर होती, डॉक्टरांनी सुद्धा पोझिशन क्रिटिकल आहे असे सांगितले. आमची चांगली समजूत झाली होती की आता बहिणीला एखादा चमत्कारच वाचवू शकेल! आणि काय सांगू.....पुन्हा ती प्रबळ शक्तीच्या सामर्थ्याने ती वापस आली. वायसीएमचे डॉक्टर कनोज सरांचे मी आभार मानले, माझे आनंद अश्रू मी त्यांच्या नजरेआड करू शकलो नाही. आणि त्यांनी सांगितले की थांबा परिस्थिती कधी गरम कधी नरम होवू शकते. तिचे किडनी फंक्शन आणि श्वसन क्रिया संस्था चांगल्या पद्धतीने काम करत नाहीत. परंतु बहीण चांगली बोलायला आणि ओळखायला लागली होती. माझी बहिण निर्मला आणि माझे तिच्यावर बारीक लक्ष होते. डॉक्टरांचा फोन आल्याबरोबर निर्मला हजर राहत होती, तिचा मुलगा प्रवीण (सचिन) हा कायम तिच्या आसपास राहून काळजी घेत होता. अमेरिकेत असलेल्या तिची मुलगी सोनी कॅन्टीन्यू संपर्कात होती. सर्व इथंभूत माहिती तिला पुरविली जात होती. तिला खूप काळजी होती पण ती खूप लांब होती. पण नियती आपले पत्ते शेवटपर्यंत उघडे करत नाही याचा थांगपत्ता आम्हाला लागला नाही. 

नंतर तिला आदित्य बिर्ला चिंचवड येथे तिला हलविण्यात आले. तत्पूर्वी अम्ब्युलन्स मध्ये तिने आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीशी व्हिडियो कॉल द्वारे संपर्क साधला. तीने आपल्या नातीशी देखील हितगुज केले. प्रविणला डॉक्टरानी बोलवून घेतले आणि परत तेच डायलॉग सांगितले की सीचव्हेशन क्रिटिकल आहे. प्रवीण आम्हाला वारंवार रिपीटेडली सांगत होता, आई वायसीम मध्ये पण क्रिटिकल होती आणि वापस आली होती, आणि आता इथेही क्रिटिकल आहे, इथेही वापस येईल. आणि तिला काही होणार नाही. तुम्ही उगीच घाबरू नका. जगाच्या पाठीवर कोणत्याही मुलाला असेच वाटते की आई मुलाला कधीच सोडून जावू शकत नाही. प्रवीण ची आईबद्दलची भोळी भाबडी समजूत कशी आणि कोण काढणार !

आणि मला त्या दिवशी डॉक्टरांचा सकाळी सकाळी फोन आला आणि मी थक्कच झालो, त्यांनी सांगितले की तुमचा पेशंट शशिकला जाधव यांचे हृदय बंद पडले होते, ते चालू करण्यात आले आहे आणि आता ती व्हेंटिलेटरवर आहे. मी त्यावेळेस मुंबई येथे आलो होतो, मी लगेच प्रविणला कळविले आणि आदित्य बिर्ला येथे जाण्यास सांगितले. निर्मला पण जाऊन आली. परिस्थिती नाजूक अवस्थेत होती. मी पु ण्याला पोहचलो आणि एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेतला, दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि हॉस्पिटलमध्येच थांबायला सांगितले. प्रविणला फोन करून मी बोलवून घेतले आणि त्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. बहिणीचा आयुष्याचा पलीकडचा किनारा दिसत होता. आणि देवाने काही तासांसाठी का होईना तिच्या पाठीमागे उभे राहायचे ठरविले होते. प्रवीण आईला भेण्यासाठी ICU मध्ये गेला खरा ! परंतु ..... परंतु डॉक्टरानी सांगितले तुमचं पेशंट शशिकला जाधव राहिल्या नाहीत. प्रविणला तेथेच रडू कोसळले. सर्वच संपले होते. सर्विकडे वाऱ्यासारखी बातमी पोहचली देखील. मामा हे असं कसं झालं ?, त्याने विचारलेल्या प्रश्नाचे मी उत्तर देऊ शकलो नाही. पाऊण तासानंतर पुढच्या हालचाली संबंधी डॉक्टरांना विचारण्यासाठी मी ICU मध्ये पोहचलो. आणि शशिकला जीवित असल्याचे त्यांनी सांगितले. देव असा कसा काय वागतोय हेच काही कळेना, दुःखाचा आघात कमजोर करण्यासाठी त्याने ही खेळी केली तर नसेन ! प्रवीणचं मन आनंदाने काठोकाठ भरून आलं आणि त्याने सांगितले आईला काहीच होणार नाही. हेच ते आदित्य बिर्ला हॉस्पिटल की जेथे 2019 मध्ये तिचं मेजर बायपास ऑपरेशन झालं होतं.

आमच्या मनाने पुन्हा एकदा झेप घेतली, आता ती जात नाही, तिचं संकट टळलंय !  आणि हो, पाच तासानंतर जे व्हायचं नव्हतं तेच झालं, देवाने दुःखाची त्रिव्रता कमी करून टाकली होती, आणि आम्ही ते स्वीकारलं होतं. आणि आम्ही ते स्वीकारलं होतं.

आयुष्याच्या अनेक चढ उतारांवर मी तिच्या सोबत होतो आणि एक दिवस तिला जायचं होतं. पुढच्या जन्मी फिरून जन्मेन मी तुला राखी बांधण्यासाठी पुन्हा येईन मी. 

परंतु नेहमी प्रमाणे येणारा तिचा फोन आज रक्षाबंधनाच्या दिवशी आलाच नाही !