Friday 25 December 2020

खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते

थंडीचा महिना सुरू झाला की आठवतं लहानपणी गल्लोगल्ली

शेकोट्या पेटलेल्या दिसायच्या. थंडी आणि धुक्याने ओल्या

आणि गार झालेल्या पायवाटेने रानात जाण्याची मजा आणि

धुंद नजारा काही वेगळाच असतो. शेतकऱ्याने पावसाळी पिके

आवरलेली असतात आणि रानात शेताच्या बांधावर, पडीक

जागेवर जागोजागी वनफुलें, वेली यांना बहर आलेला असतो.

निसर्ग नवनिर्मितीची बीजे जणू रोपत असतो. शेतकऱ्यांनी

काही शेतात भुईमुगाच्या शेंगांच्या झोपडीवजा गऱ्या

साकारलेल्या असतात. काही पलीकडच्या शेतात कापसाचं

चांदणं विखुरलेलं दिसतं तर झाडाच्या बाजूला असलेल्या 

विहिरीवर पिकांना पाणी भरण्यासाठी मोट आणि मोटेचा नाडा 

पडलेला दिसायचा. एव्हाना  पूर्व दिशेच्या क्षितिजावर कुजबुज

सुरू झालेली असते. दुसऱ्या बाजूला राजवाड्याच्या महालात 

झुंबरं लटकावीत त्याप्रमाणे गव्हाच्या टंच भरलेल्या वयात 

आलेल्या ओंब्या सूर्य किरणांच्या कवडसात आपल्याकडे वाकून 

वाकून कुतूहलाने बघत असतात, तर हरभऱ्याची बुटकी झाडे 

आपल्या पायाला चरचर खाजवीत आपले लक्ष विचलित करत 

असतात. निसर्ग फळं फुलं पिकं यांना कसं आणि किती गोंडस 

रूप देईल याची देही याची डोळा आपण कल्पनाही करू शकत

नाही. नोकरी निमित्त शहरात आयुष्यंची बरीच वर्षे निघून गेलीत. 

त्या थंडीच्या दिवसातली रानात चराचर बहरलेली हिरवाई आणि

निसर्गाचे ते अविष्कार बघण्यासाठी अजून बालपण मोठे हवे होते.

कितीही समजावून सांगितले तरी मन मानायला तयारच होत नाही.

बा.सी.मर्ढेकरांच्या ओळी परत त्या  विश्वात मनाला ओढून नेतात. 

अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी 

पाला खाते.

Monday 3 August 2020

ललित

एखाद्या चित्रकाराने दाट धुक्याचं चित्र रेखाटावं, त्या विरघळलेल्या धुक्यात निसर्गाची अनेक अस्पष्ट रूपे त्याने रेखाटवीत आणि आपण डोळे किलकिले करून फक्त पाहत राहावे पाहत राहावे आणि त्या धुक्याच्या पलीकडे काय असावे याचा अंदाज बांधत राहतो. तसच काही पण अगदी निराळं असं वि.स. खांडेकर यांनी लिहिलेल्या "धुके" या पुस्तकात तीन खेड्यातल्या बायका धुक्याला कसा शृंगार चढवतात आणि लिहिलेल्या पुस्तकाचं नांव कसं सुशोभित करतात ते त्यांच्याच शब्दात वाचा...

धुके

नेहमीप्रमाणे डोक्यावर शेणाच्या पाट्या घेतलेल्या खेडवळ बायका समोरून येत असाव्यात ! असल्या बायका म्हणजे काही फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्यातल्या नायिका नव्हेत. त्यांच्या जाण्या-येण्याकडे एरव्ही मी क्वचित लक्ष देतो. पण हे अचानक पडलेले धुके वस्तुमात्रावर जणू काही जादूची कांडी फिरवीत होते. समोरून येणाऱ्या त्या तीन स्रियांच्या आकृतीत काही निराळेच सौंदर्य आहे, असे वाटू लागले. सभोवार पसरलेला धुक्याचा समुद्र आणि त्या अस्पष्ट आकृती पाहून समुद्रातून अप्सरा वर आल्याची पौराणिक कथा मला आठवली. अप्सरा म्हटली, की तिची नृत्यचांदण्यातकुशलता आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. समोरून येणाऱ्या त्या बायकांनी डोक्यावरल्या पाट्या संभाळण्याकरिता वर धरलेले अंधुक हात त्या सुंदर धुक्यात तसेच रेखीव वाटत होते !

...........घटकाभराने तो धुक्याचा समुद्र जसा आला होता, तसा निघून गेला.....माझा निरोप सुद्धा न घेता ! त्याचे पुसट पाऊल देखील कुठे दिसेना. तरी माझ्या मनावरील त्याची धुंदी तशीच होती.आज अशावेळी हे धुके कोठून आले, याचा विचार करायला माझे मन तयार नव्हते. धुके झाले, घटकाभर दिव्य आनंदाचा अनुभव देऊन गेले. तेवढ्याने मी तृप्त झालो होतो. मातीला सुगंधी फुलांचा वास लागावा, तसे त्या ब्रम्हानंदाने माझे मन आपलेसे करून टाकले होते.

वि.स. खांडेकर यांच्या __________"धुके" या पुस्तकातून


Monday 20 July 2020

लोहार दादा

(लोहार दादा आणि सशाची जुगलबंदी, व्हाट्सएप वरून पार्शली कॉपी पेस्ट)


ससा             :    लोहार दादा लोहर दादा गाजर आहे का

लोहार दादा   :     ससोबा ससोबा मंडईत जा
                        गाजर घेवून घरी जा

ससा           :     दुसऱ्या दिवशी ससोबा हजर
                       लोहार दादा लोहर दादा गाजर आहे का

लोहार दादा  :    लोहर दादाने उपटले कान
                       दाखवतो तुला गाजराचे दुकान
                       परत आला तर दातच तोडीन
                       नंतर कधी येणारच नाही

ससा           :   तिसऱ्या दिवशी ससोबा हजर
                       विचारतो कसा गाजर आहे का

लोहार दादा  :  लोहर दादाला आला राग
                       तोडले त्याने सशाचे दात

ससा            :   चवथ्या दिवशी
                       लोहार दादा बसला होता निवांत
                       ससोबा प्रगट झाला पुढ्यात
                       लोहर दादा लोहर दादा गाजराचा ज्युस आहे का

लोहार दादा ज्युस देईना, ससोबा आपला हट्ट सोडीना !

 

Sunday 19 July 2020

डोंबिवली 2003

(दवाने थबथबून गेलेल्या सकाळी डवरलेल्या बागेत मधोमध काट्यांच्या शिरावर एखादे गुलाबाचे फुल फुललेले आहे. वारा वाहतो की नाही तेही जाणवत नाही, पण फुलाचा गंध मात्र सर्वत्र मंदपणे पसरत आहे असा काहीसा समज तुमचा हा खलील लेख वाचून होणार असेल तर तो तुमचा भ्रम आहे. असं काहीही या लेखात नाही आहे.)

डोंबिवली 2003

डोंबिवली या शहराला म्हणावे असे काहीच नाही. इथे सरकारी इमारती, खाजगी कंपन्यांचे कार्यालये, बहुमजली इमारती नाहीत. या आधुनिक शहरात सगळ्या गैरसोयी आहेत. उंदरांच्या बिळासारखी माणसांची घरे आहेत. घरात हवेला मज्जाव आहे, त्यामुळे पंखा लागतो. माणसांच्या गर्दीने एके काळचे निसर्ग संगीत हिरावून घेतले आहे. आठवड्यातले पाच दिवस काम करून मनुष्य इथे कंटाळतो. त्यांचा जीव आंबून जातो तेंव्हा टाईमपास साठी शॉपिंग, आराम करण्यासाठी येथे कोलोम्बो, सिंगापूर, बेंगलोर सारखे इथे काहीही नाही. मग आहे तरी काय या शहरात. सगळ्या जगापासून दूर, जिथं कुणी म्हणजे कुणी नाही, ते आसपास घुटमळत असतं असं अप्रतिम सुंदर विश्व या शहरात निर्माण करण्याचं कुणालाही सुचत नाही. इथल्या नद्या सुकल्या नाहीत पण इथल्या नद्यांवर अतिक्रमण झाले आहे. साईन बोर्ड आणि टी.व्ही. टॉवरनी या शहराला उघडे नागडे करून टाकले आहे. संपूर्ण शहरात नजरेत भरेल असं एकही झाड इथे नाही.
                                                       -०-
वरील "डोंबिवली" हा लेख 2003 या वर्षी वर्तमान पेपरात छापून आला होता. कोणी लिहिला आणि कोणत्या वर्तमान पेपरात छापून आला होता ते आठवत नाही. परंतु 2003 च्या माझ्या "जुनी डायरी"त लिहून ठेवलेला आहे. तो पूर्ण नाही असे वाचल्या नंतर जाणवते. परंतु ते काही असो आज 2020 या वर्षी हा लेख काहीसा आजच लिहिला आहे असंच वाटतं. प्रगतीची पाऊले या जगात जोराने येऊन आदळलीत. तुम्ही इतिहासाची पाने चाळली असतील तर तुमच्या लक्षात आल्या शिवाय राहणार नाही की मानवी संस्कृतीच्या इतिहासात एव्हढा गतिशील आणि श्रेष्ठ कालखंड कधीच आला नव्हता पण आमची 2003 ची डोंबिवली आहे तशीच आहे. बऱ्याच वर्षानंतर बालपणीचा एखादा जिवलग मित्र भेटावा  आणि त्याने घट्ट मिठी मारावी. संभाषणाला सुरुवात करण्यापूर्वी, अरे तू लहानपणापासून आहे अजून तसाच!! कोणताही बदल नाही ! ग्रेट !

Wednesday 22 April 2020

खमोशियों की सदाएँ बुला रही हैं तुंम्हे (लॉक डाऊन २९ वा दिवस)

सूर्याला झोप लागली आणि तो उगवायचा विसरूनच गेला, असं कधी स्वप्नात सुद्धा घडनार नाही. पण हे असं काही घडू शकतं का असे बालिश प्रश्न वेड्यांच्या इस्पितळात असलेल्या वेड्याला सुद्धा पडणार नाहीत. कारण विश्वाचं चक्र क्षणभरही न थांबता अहोरात्र अखंडपणे चालू आहे. शिशिरची पानगळ नुकतीच थांबली आहे. वसंत ऋतू सुरू झाला आहे. सशाच्या कानासारखी इवली इवली बारीक कोवळी पालवी, लंहान मुले जसे आईला बिलगतात तशी ती पातळ पाने झाडांच्या फांद्यांना कोणी चिटकवली आहेत असा भास होत आहे. थोडक्यात वसंत जागो जागी बहरल्याच्या खुणा दिसत आहेत. कळ्यांनी आपलं उमलणं थांबविलेलं नाही, कोकिळचा मंजुळ स्वर कानाला मंत्रमुग्ध करत आहे. धबधब्यांचा प्रपात अहोरात्र स्वतःचा उर बडवीत सुरू आहे. निळ्या आकाशात आज सुध्दा रवीराजाने वेलबुट्टी काढून ठेवली आहे. सूर्याचं पूर्वेकडून पश्चिमेकडे असं त्याचं सतत भ्रमण चालू आहे. सकाळच्या प्रहरी धुंदपणे विहारणारा तो ओझोन अजून दरवळतो आहे आणि ते बघा क्षितिजावर सूर्याचे द्यूत देखील उभे आहेत. अथांग महासागराचं निळ्याशार पाण्यावर लाटांच्या कमानी उभ्या राहातांना दिसत आहेत. किनाऱ्यावर एका पायावर उभे राहून माडाची झाडे वाकून वाकून बघत आहेत. सूर्याने सकाळची कोवळी सोनेरी उन्हे लांबच लांब  अशा एका ओळीने उभ्या असलेल्या पर्वत राजीवर उधळायला सुरुवात केली आहे. निसर्गात तीच रम्य संध्याकाळ आणि तोच पक्षांचा किलबिलाट सुरू आहे. शतकानुशतके निसर्गाची गुपिते मानवी मनाला न कळत शांतपणे उलगडली जात होती. परमेश्वराने जशी रात्र बनविली तसा दिवसही बनवला, प्रचंड डोंगर, नद्या, दऱ्या, जंगल, वाळवंट, समुद्र, सुपीक जमीन, पाऊस, थंडी, ऊन, वारा, ऋतू बनवून सृष्टी संतुलित ठेवून कशाचीही कमतरता जाणू दिली नाही. म्हणून तर अनादी काळापासून या सृष्टीचं चक्र न थांबता अखंड पणे आणि तेही व्यवस्थित चालू आहे. आणि जगाच्या इतिहासात एकविसावे शतक हे प्रचंड फेरबदल आणि घडामोडीचं शतक ठरले आहे. आपल्यापुरते बोलायचे झाल्यास, आपल्याला कळायला लागल्यापासून ते आजतागायत सर्व काही व्यवस्थित सुरळीत चाललं असतांना अचानक एक विचित्र धोकेदायक वळणावर आपण सगळेजण येवून पोहचलो आहोत. आयुष्याच्या वळणावर कोणती वळणे कशी येतील हे सांगणे खूपच अवघड असतं. अति आत्मविश्वसाच्या जोरावर चाललेल्या या जगाला एकदम ब्रेक लागला आणि होत्याचे नव्हते झाले आहे. मानवाची नशा निसर्गदेवतेने अशा काही पद्धतीने उतरवली आहे की, चंद्रावर भरारी मारणाऱ्या मानवाच्या दोन्ही हात पाय बांधून त्याला जश्या कोरड्या खोल विहिरीत अधांतरी टांगून ठेवले आहे. हवेतला ऑक्सिजन अजून तसूभर ही कमी झालेला नाही, परंतु नाकातून श्वास घेतांना आता चक्क फिल्टर लावून घ्यावी लागत आहे. प्रत्येकाने आपल्या तोंडावर मास्क चढविले आहे. सध्या जगावर कोरोना हुकमत गाजवितो आहे आणि त्याने भल्या भल्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. निर्मनुष्य रस्ते आणि गल्ल्या, निरभ्र आकाश, थंडावलेला कारखान्यांचा गोंगाट, शांत झालेला विमानाचा गगनभेदी सुळसुळाट, निपचित पडलेली कर्कश रेल्वे इंजिने आणि अजगरासारखे पहुडलेले महाकाय एक्प्रेस हायवे, शेपटासारख्या विचलित पडलेल्या विमानांच्या धावपट्ट्या, ओस पडलेली फुटबॉल आणि क्रिकेटची मैदाने सारे कसे शांत शांत.  मोर, नीलगाय  शहरी रस्त्यावर दिसायला लागलेत, बिबट्या जंगल सोडून मानवी वस्त्यांवर फेर फटका मारायला लागला, गंगेचं पाणी निळेशार दिसायला लागले, डोंगर रांगा एक पाठोपाठ एक असे शिस्तीत उभे दिसत आहेत. दुसरीकडे आयफेल टॉवर, नायगारा वॉटर फॉल सारखे प्रेक्षणीय स्थळे मानव विरहित ओस पडली आहेत. हा काय चमत्कार आहे आणि एवढी दहशत अजून कधी वाचनात आली नव्हती की ती आज प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहोत. बा.सी. मर्ढेकरांच्या कवितेतली एक ओळ वाचाविशी वाटते, "काळ मारुनी गेला टपली, न कळत डोक्यावरती तळुई"

चूका करणे ही काळाची गरज आहे, त्याशिवाय नवनिर्मिती होणे अशक्यच असं म्हणतात ! परंतु कोरोना व्हायरसने सर्व स्तरावर पाणी फिरवले आहे. जागतिक मंदिचं संकट घोंगावत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लॉक डाऊन मुळे या विषाणूची साखळी खंडित झाली आहे. जगण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इतिहासावर नजर टाकली तर पृथ्वीवरील मानवावर आजतागायत अशी बरीच संकटे येवून गेलीत, तसच कोरोनाचं संकट जाईल सुद्धा, परंतु मानवाला निसर्गाच्या प्रकृती बाबतीत बरंच काही शिकवून जाणार आहे हे निश्चित.

कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज लॉक डाऊनचा २९वा दिवस, परंतु ही गोष्ट सोपी तर मुळीच नव्हती. ही मानसिकता, हे धैर्य, हे मनोबल आलं कोठून, देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री पासून ते जय जवान जय किसान पर्यंत,  डॉक्टर्स, सिस्टर्स, कर्मचारी, पोलीस दल ते अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पर्यंत, या सर्वांच्या योगदानाचं मूल्य अमूल्य आहे. ओ सुबह अब दूर नही, सर्व काही सुरळीत होण्याची चिन्हे दिसून येतील. मुलांच्या शाळा परत चालू होतील, रस्त्यावर वाहने धावू लागतील, पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी किलबिल अंगणात उतरतील, म्हणतात ना कुदरत अच्छी चिजे बिना बनाये नही रह सकता. त्याच्या कुशीत परत येण्यासाठी निसर्ग आपल्याला खुणावतो आहे बघा.......मचल मचलती हवाये बुला रही है तुंम्हे.



Friday 17 April 2020

मला आवडलेली गाणी



**************************************
गीत : शाहीर होनाजी बाळा
चित्रपट   :  अमर भूपाळी


घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला

सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी

कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला

**************************************

गीत : मधुसूदन कालेलकर
चित्रपट : एक धागा सुखाचा


ठाऊक नाही मज काही !
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

मऊ जशी ती साय दुधाची,
होती आई का तशी मायेची ?
बागेतील ते कमल मनोहर,
आई होती का तशीच सुंदर ?
देवाघरी का एकटी जाई ?
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

चिउकाऊची कथा चिमुकली,
सांगत होती का ती सगळी ?
अम्हांसारखे शुभंकरोती,
म्हणे रोज का देवापुढती ?
गात असे का ती अंगाई ?
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

मऊ साइहुन आई प्रेमळ !
गंगेहून ती आहे निर्मळ
अमृताचे घास भरविते
आभाळापरी माया करीते
आईवाचून मीही विरही
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

**************************************

गीत : पी. सावळाराम
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा


जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहते

डोंगर दरिचे सोडून घर ते
पल्लव पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे प्रीत नदीची एकरुपते

वेचित वाळूत शंख शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते

बघुनी नभींची कोर ती
सागर हृदयी ऊर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते

**************************************


गीत : मधुसूदन कालेलकर
चित्रपट : एक धागा सुखाचा


अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरी खट्याळ, तरी मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडीवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई

**************************************

गीत : मधुसूदन कालेलकर
चित्रपट : बाळा गाऊ कशी अंगाई

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील मधुसूदन कालेलकर 
यांचं गीत सुमन कल्याणपूर यांनी इतक्या मंजुळ आणि सहजतेने 
गोड आवाजात गायले आहे की थोड्या वेळासाठी आपल्या मनाला 
भुरळ पडते आणि आपणही त्या विश्वात रमून जातो की निंबोणीच्या 
झाडामागे चंद्र खरोखर शांतपणे निद्रा घेत पहुडला आहे. अप्रतिम 
शब्द रचना, आणि अप्रतिम भावार्थ भरलेल्या या गाण्याने आपल्या 
मनावर एवढा विलक्षण प्रभाव पडतो की घटकाभर आपण विसरून 
जातो की चंद्रावर मानवाने कधीकाळी पाऊल ठेवले होते.


निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

गाय झोपली गोठयात घरटयात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई

देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई

रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊं कशी मी अंगाई

**************************************


गीत     :   संत नामदेव
संगीत   :   दत्ताराम गाडेकर
स्वर      :   गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर

रात्र काळी घागर काळी ।
यमुनाजळें ही काळी वो माय ।।१।।

बुंथ काळी बिलवर काळी ।
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय ।।२।।

मी काळी कांचोळी काळी ।
कांस कांसिली ते काळी वो माय ।।३।।

एकली पाण्याला नवजाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ।।४।।

विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहू काळी वो माय ।।५।।



Sunday 5 April 2020

शहरातली रात्र

 दोन वाजलेत, रातकिडे सुद्धा शांत झोपून गेले होते. काल दुपारच्या शांततेत आणि रात्रीच्या मध्यांनीच्या शांततेत कसलाही फरक जाणवत नव्हता. मी खिडकीच्या आत उभा होतो. आकाशात चांदणं बहरलं यावर असंख्य कविता लेख लिहिणारे कवी लेखक सुद्धा शांत झोपले असतील. ते न्याहळण्यासाठी डोकं खिडकीतून बाहेर काढण्याची माझी सुद्धा हिंमत होत नव्हती. रात्र आपली काळीकुट्ट शाल भूतलावर पांघरून उभी होती. कुत्रे बीभत्स स्वरात विव्हळत होते. सर्व काही अलबेल चालू होतं, मग अचानक असा सन्नाटा चोहोकडे कसा काय पसरला होता. झाडे निपचित उभी होती, पानांची सळसळ नव्हती. त्या हिरव्या कोवळ्या लुसलुशीत पालविला हे कसे ज्ञात असणार. डोक्यातले विचार शांत झोपू देत नव्हते. बालकवींची "खेड्यातली रात्र" ही कविता नजरे समोर तरळू लागली.

त्या उजाड माळावरती
बुरुजाच्या पडल्या भिंती
ओसाड देवळापुढतीं
वडाचा पार - अंधार दाटला तेथ भरे भरपूर.
ओढय़ांत भालु ओरडती
वाऱ्यांत भुतें बडबडती
डोहांत सावल्या पडती
काळ्या शार - त्या गर्द जाळिमधि रात देत हुंकार
भर-रानी काकस्थानी
उठतात ज्वाळ भडकोनी
अस्मान मिळाले धरणी
आर ना पार - अवकाळ रात्रीचा प्रहर घुमे तो घोर

पण कालच मी शहरातली रात्र अनुभवली होती. बाल कवींच्या कवितेतील शब्द प्रहाराप्रमाणे इथे शहरात कोणतेही बुरुज ढासळले नव्हते, उजाड माळरान ही नव्हते, की कुठल्याही डोहाच्या सावल्यानी अक्राळ रूप धारण केले नव्हते. तरी सुद्धा एव्हढा सन्नाटा पसरला होता. कारण कोरोना व्हायरसने दहशत बसविली होती. वैद्यकीय दृष्ट्या बलाढ्य असणाऱ्या देशांमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता, दिवसाला मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी बघून मन बेचैन होत होते. भारतात लॉक डाऊन चा बारावा दिवस होता. एक आशेचा किरण दिशा, बळ आणि साहस देत होता. रात्री नऊ वाजता दीप प्रज्वलित करून सर्व भारतीयांनी आम्ही एक आहोत, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद आमच्यात आहे असे दाखवून दिले. शीतचंद्रलोक सोसायटीतील राहिवासीयांनी सुद्धा रात्री ठीक नऊ वाजता दिपप्रज्वलंन केले आणि "शुभं करोती म्हणा, मुलांनो, शुभं करोती म्हणा" हे ध्वनी कानावर पडले.

आदरणीय रतन टाटाजी, लाखोंचा पोशिंदा, देव माणूसच तो, हातात दिवा घेऊन उभा राहतो, याच्यापेक्षा सुंदर दृश्य असूच शकत नाही.



Wednesday 25 March 2020

CSC के शोले कर्जतच्या जंगलात !

(आपण आपल्याच घरात बसला आहात ना ! बोअर झालात !  सुचत नाही काय करायचं ! पुस्तक वाचायला जड जातंय, डोळे चुरचुरतात. मॉर्निंग वॉक चा कंटाळा, साखर झोपेत कोण जातंय पायपीट करायला ! चला तर कॅलेंडरच्या मागच्या पानावर नजर टाकू या. तारीख 11.01. 2020 )


येऊरच्या नव्या नवरीची हळद फिटून दोन वर्षे होत आली तरी सुद्धा आमच्या प्रयोजकांना दुसरं गेटटुगेदर करण्यासाठी मुहूर्त काही सापडेना. कारण साहजिकच आहे, एके काळी एक ठिकाणी एका छताखाली काम करणारे सर्वजण, परंतु आता बरेच जण मुंबई पुणे येथे स्थायिक झालेले, रिटायर्ड अवस्थेत तर कोण स्वतःचा बिझिनेस मध्ये व्यस्त, कोण अजूनही सर्व्हिस करत असून आपलं कर्तव्य बजावत आहेत, तर कोण आपलं पूर्वी जगायचं राहून गेलं होतं ते आता जगण्याचा मनमुराद आनंद लुटत असतांना, त्या सर्वांची मोट बांधणे म्हणजे तारेवरची कसरत होती. तरी आपल्या काही मित्रांनी हे धनुष्य उचललं आणि त्यांनी सर्वांनाच सिमेंटच्या जंगलातून काढून थेट कर्जतच्या अभय अरण्यात आणून सोडले. जसा संजीवनी पर्वत हनुमानाने हिमालयातून लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी उचलून आणला होता तसा!

 नगरे महानगरे आणि सिमेंटच्या जंगलात राहणारी आणि  महिनाभर ऑफिसातला कामाचा डोलारा सांभाळता सांभाळता माणूस प्राण्याला कुठेतरी ओला सुखा ब्रेक हवा असतो. खरं तर ही आता काळाची गरज बनली आहे. पण ही गरज आता नियतीने वासनात गुंडाळून ठेवायला सांगितली आहे. कारण कोरोना व्हायरस हा राक्षसरुपाने हैदोस घालत आहे.  आपण सर्वांना तीन आठवडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त कदाचित व्हरांडाच्या बाहेर मारलेली लक्ष्मण रेषा ओलांडून जायची नाही आहे. खिडकीतलं बसलेलं मन बसून बसून कंटाळलं आणि ते सरळ 11.01.2020 च्या फ्लॅशबॅक मध्ये जावून गेट टूगेदर साठी कर्जतच्या जंगलात येवून धडकले.

आपलं काहीसं माणूसपण विरघळून गेलेले असतं आणि अशा खुणा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी लपलेल्या असतातच. शहरी संस्कृतीच्या कोरडेपणाला जंगली कोरपडीचा ओरखडे ओढण्याची आवश्यकता भासते. मग तो कोरडे पणा कशात तरी बुडवून ओले करण्यासाठीच सर्वच जण आपाला वेळ काढून, आपल्याच अलिशान गाड्यातून कर्जत येथील लाईफ फार्मवर 11.01.2020 तारखेला सकाळी 11 ते बाराच्या दरम्यान आगमन झाले. पण इथेच एक लोच्या झाला ! झालं काय तर, ......वह कौन थी" या रहस्यमय चित्रपटात साधना ही नटी आपल्या डोक्यावरचे काळे कुरकुरित ओले केस मोकळे करून आणि सफेद साडी परिधान करून तुफान पावसात काळाकुट्ट अंधाऱ्या अमावास्येच्या रात्री रस्त्यावर एकटीच उभी असते. त्याच वेळेस मनोज कुमारची महिंद्रा गाडी भरकटून त्याच रस्त्याने जात असतांना मनोजकुमार साधनाला लिफ्ट देतो. आणि मनोजकुमारच्या गाडीची वायफर बंद पडतात आणि एक विरान जागेवर साधना गाडी थांबवायला सांगते.  स्मशान भूमीची कवाडे आपोआप उघडून ती आत स्मशान भूमीच्या त्या धुंद वातावरणात चालत जाते आणि त्या कब्रस्तानचे दरवाजे करकच आवाज करत आपोआप बंद होतात. मनोजकुमार तिच्या पाठमोरी आकृती कडे बघतच राहतो. थांबा तुमचा संयम बघून मी तुम्हाला अगोदर सॅल्युट करतो.  त्याप्रमाणे आमच्या आय.टी. आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातले तिन्ही मास्टर्स येलने, वैभव आणि तिमिर या मित्राचं गूगल च हरवलं आणि त्यांची मनोजकुमार सारखी केविलवाणी अवस्था होवून त्यांची गाडी भलत्याच दिशेने भरकटली. या ठिकाणी त्यांच्या समोर अमावस्येची रात्र ही नव्हती की मुसळधार पाऊसही नव्हता आणि लिफ्ट मागणारी कोणी सिलेब्रिटी ही नव्हती. हातात गुगल सारखे रायफल असताना आमचे तीनही जवान त्या चकव्यात फसले. चार वर्षांपूर्वी पुण्याजवळील घनघोर पावसाच्या लोंढ्याने, कागदावरची शाई पुसावी तसे एका क्षणात "माळीण" गांव वाहून गेलं होतं आणि सकाळी नेहमी प्रमाणे एसटी, माळीण गावच्या प्रवाशांना घेण्यासाठी आली खरी पण बस चालकाला गावच सापडेना, त्या प्रमाणे आमच्या तिन्ही फौजींना लाईक फार्म हाऊसचा राजमार्ग काही सापडेना ! परंतु आमच्या ओवळेकर साहेबांना काही चैन पडेना! सर्व जगाचे काळजी वाहक ओवळेकर यांना काळजीने सतावले, त्यामुळे ते सतत फोनवरून त्यांची विचारपूस करत होते आणि आमचे तिन्ही मित्र चकव्याच्या चक्रव्युव्हात अडकल्यामुळे त्यांना काही ओवळेकरांचे समाधान करता येत नव्हते. मुळातच रस्ता चुकल्यामुळे जंगलात ते कोणत्या खाणाखुणा सांगणार. म्हणून ओवळेकर कमालीचे गोंधळलेत..... बरं या तिरकूट जवळ होकायंत्र ही नव्हते, आकाशात मांज्याने कटलेला पतंग गिरक्या घेत कुठे तरी गंजलेल्या इलेक्ट्रिक खांब्याला अडकून थांबतो त्याप्रमाणे आमचे वाटसरू लाईक फार्म हाऊस येऊन धडकले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडून त्यांना आपला ग्लास उंचावून चिअर्स केले आणि शेवटी जीव लाईफ फार्मच्या प्रेमात पडला. ......पण खरी गंमत तर अजून पुढेच आहे. कारण खडकीकर साहेबांजवळ कुठलीही व्हेईकल नसतांना भर जंगलातून वाट काढत काढत ते गुगलच्या साहाय्याने सहीसलामत संध्याकाळपर्यंत डेऱ्यावर येवून दाखल झालेत. साहेब येण्यापूर्वी माती आणि शिवार यांचा जसा रंग असेल तसा सरड्याने रंग बदलावा त्याप्रमाणे पार्टीला रंग चढला होता. सकाळपासूनच दाभोळकराने सर्व हक्क विकत घेतल्यासारखे भरघोस उस तोडणीचा सपाटा लावला होता. साहेबांचे आगमन झाल्यामुळे भाजीला लसणाची फोडणी द्यावी तस तसा राजकारणाचा तडका देवून उकाळ्या पाखाळ्या सुरू झाल्यात, कारण सर्वांनीच आपापले ग्लास उपडे करून साहेबांसमोर सरेंडर झाले होते. आणि आता अभयने जसे एक्कावन्न टक्के शेअर खरेदी करून दाभोळकर कडून सर्व मालकी हक्क काढून घेतलेत, त्यामुळे अभय थांबायलाच तयार नव्हता, कोण काय म्हणाले, कोणी काय नाही म्हणायला पाहिजे, तीन पायाचं सरकार कसं चालतं, खिचडी करपणार, की मी पुन्हा येईन खायला अशा गप्पांचा फैरी झडत राहिल्यात. कोण घायाळ होत होतं, कोण उठून उभा राहत होता पण सुप्रीमोंच्या पुढे कोणाची हिंमत होत नव्हती. शेवटी साहेबांनी सर्वांना आपल्या कुशल विचारांनी कुरवाळले. त्यांच्याकडे  एक कटाक्ष टाकला जगत, तिमिर, भास्कर,भाटिया, वैभव पंडित, ओवळेकर, येलने, इथापे, वांजपे, पाठक, दाभोळकर, अभय, रामदास हे सारे वन टीम वन गोलचे सदस्य CSC-THANE कॅप परिधान करून साहेब काय बोलतात त्या उत्सुकतेने त्यांच्याकडे नजरा लावून बसले होते. असं वाटायला लागलं की आपण त्यांच्या आज्ञेत आहोत, त्यांच्या अंडर मध्येच काम करत आहोत. ते केंव्हा आज्ञा देतील आणि आपण कामाला लागू! अगदी सर्वांचे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या गालाच्या मध्यभागी प्रसन्नतेने विसावल्या होत्या. थोड्याच वेळात काही जणांनी स्विमिंग टॅन्कचा आसरा घेतला. येलने, पाठक, रामदास,वांजपे, वैभव, अभय यांनी स्विमिंग टॅन्क मध्ये पोहून येथेच्छ एन्जॉय केला. दाभोलकर आणि ओवळेकर यांनी काठावरच उभे राहून फोटो काढण्यात रस घेतला.पाण्यात उताणे पडून हात पाय न हलवता स्तब्ध पडून राहणे ही एक कलाच आहे. या कलेत वांजपे आणि रामदास हे निपुण आहेत. त्यांच्याकडून खूप शिकून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आडातच पाणी नाही तर पोहऱ्यात येणार कोठून😂

चारही बाजुंनी जंगल, चहूकडे लाल मातीचा सुगंध पसरलेला, कुठे बिबट्याच्या पायाचे ठसे दिसतात का शोधून बघितले पण सापडले नाहीत. फार बरं वाटलं आणि मन तेवढेच हलके झाले. छोट्या छोट्या पर्ण कुट्या आजूबाजूला पाने फुले वेली त्याच्यात आमची ही पर्णकुटी,  परंतु आमच्या सर्वांची एकाच छप्पर असलेल्या कुटीत सोय करण्यात आली होती. बाहेर लांबलचक व्हरांडा, त्याच्यात लांब आयताकृती टेबल आणि त्याच्याभोवती खुर्च्या. रात्रीचे आठ वाजलेत, एरव्ही मिटिंगची वेळ न पाळणारे आजच्या मिटींगला पाच मिनिटे अगोदरच खुर्च्यांवर विराजमान झाले होते. सर्व जुन्या ऑर्डर्स वर उहापोह झाला. विषय सर्व काही अल्फा लव्हल एके अल्फा लव्हल. संचारबंदी असते तशी दुसऱ्या विषयाला बंदी होती जणू. कोणती ऑर्डर कोणी आणि कशी मिळवली आणि ती कशी एक्सिक्युट झाली. कोणी किती योगदान दिले, कोणी किती कष्ट घेतलेत. थोडक्यात एव्हढ्या कमी अवधीत CSC ने कसा आकार घेतला याचं कोडकौतुक आपल्या शिवाय कोण करणार होतं. सांगायचं तात्पर्य

साधारणतः वीस ते पंचवीस वर्षानंतर सुद्धा कामाची पावती मिळते हे सर्वांचं भाग्यच होतं. आपण एकमेकांपासून कसे आणि का अलग झालो याची सर्वांनाच खंत जाणवत होती. आंब्याचे झाड लावणाऱ्याला त्या झाडाची आंबे खायला मिळत नसतात हे खरे आहे, परंतु पुढच्या पिढीला त्या झाडाची फळे आणि सावली नक्की मिळते हे सुसंस्कृतीचं सूत्र त्याच्यात लपलेलं असतं. दुसऱ्याच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप मारणारा, त्याने मात्र स्वतःच्या पाठीवर कधीच कौतुकाची थाप मारून घेतली नाही आणि आजही इतिहासाची तीच पुनवृत्ती होतांना दिसत होती. कारण त्याकाळचे सर्व साक्षीदार आज समोर हजर होते. अशा त्या विनम्रशील सर्जनशीतेला म्हणजे आमच्या खडकीकर साहेबांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा.

नेहमी अडीच ते रात्री उशिरापर्यंत चालणारं सिलेब्रेशन यावेळेस मात्र रात्री साडेबाराच्या आसपास थंडावलं. कारण जवळपास सर्वच जण सिनियर सिटीजनच्या अवस्थेत होते आणि त्यांनी आपल्या मर्यादा ओळखून कार्यक्रम यथेच्छ एन्जॉय केला होता. शेजारच्या कुटीमधल्या यंग गर्ल्स अँड बॉईज यांचा धुमाकूळ मात्र रात्री उशिरापर्यंत चालू होता.

मॉर्निग वॉक वारे गांव


धुक्यात हरवलेली डांबरी वाट निग्रोसारखी स्पष्ट दिसायला लागली होती. आम्ही एकेक शेतातल्या पिकांचे निरीक्षण करून,  सायंटिस्ट सारखे अजमावून बघत होतो. परंतु निसर्गाचे ते पेच आम्हाला सोडविता येईनात ! साहेबांनी मला विचारले हे कोणतं पीक आहेरे चव्हाण ? मी शेतकऱ्याचा मुलगा असून मला ते ओळखता येईना, शेवटी ते मुळाचं पीक आहे असं सांगून वेळ मारून नेली खरी पण माझा दावा काही जास्त वेळ टिकला नाही! आणि मी अजून किती कच्चा आहे हे सिद्ध झालं कारण पुढच्याच शेतात त्याच जंगली गवताने रान माजवलं होत. आता गवत म्हटल्यानंतर साहेबांनी काँग्रेस गवत विषय काढून आम्हाला बुचकळ्यातचं टाकलं. आम्हाला म्हणजे मी, इथापे आणि वैभव. कारण काँग्रेस गवत कितीही कापा किंवा नांगरून काढा ते कधीही नष्ट होत नाही. शेतात उगवल्यावर कोणत्याही पिकांना वाढू देत नाही. काँग्रेस गवत कुठून आलं, त्याचा जन्म कसा झाला, त्याची पाळेमुळे इथापेंनी अतिशय चांगल्या रीतीने सोप्या भाषेत समजेल अशी समजावून सांगितली. ज्यावेळेस भारतात 1952 साली दुष्काळ पडला होता त्यावेळचे काँग्रेस सरकारने मिलो हा गव्हाचा प्रकार गरीब लोकांसाठी अमेरिकेतून आयात केला होता. Milo हा शब्द गुळगुळीत आणि सोबर वाटतो खरा परंतु ज्यावेळेस मिलो आयात केला त्यावेळेस त्याच्याबरोबर  या काँग्रेस गवताचा भारतात प्रवेश झाला. तेंव्हा पासून शेताच्या बांधावर, शेतात, नदी नाल्यांच्या काठावर कुठेही लागवड न करता हे काँग्रेस गवताची भरभरून वारेमाप जोपासना होत असते, शेतकऱ्याने कितीही औषध, फवारणी केली तरी त्याचा नायनाट होत नाही. काँग्रेस सरकारने मिलो आणला आणि  मिलो बरोबर मिळते जुळते असे काँग्रेस गवत हे भारतभर अजरामर झालं. पाऊले पडती वारेगावकडे वरेगावाच धूसर दिसायला लागलं,रात्र आपल्या अंगावरचं पांघरून काढत होती तसतसं धारतीचं, तिथल्या शेतीबाडीचं तिथल्या संस्कृतीचं मूळ रूप आमच्या नजरेस पडत होतं. आजूबाजूला विरळ झाडे असलेली, वळणावळणाची, किंचित खड्डे असलेली ती डांबरी वाट लक्ष वेधून घेत होती. शेवटी वारेगाव नजरेस पडले. शोधत शोधत हायवे च्या बाजूस असलेल्या चहाच्या झोपडीवजा टपरीवर आम्ही सर्वांनी चहा मारला आणि परत माघारी लाईक फार्म हाऊसकडे आम्ही प्रयाण केले. मॉर्निंग वॉक करून नऊच्या आसपास सर्व जण आपल्या जागेवर पोहचलेत, सकाळचा परत एकदा चहा झाला, काहींनी क्रिकेटचा आनंद घेतला, काही जण लॉंग मॉर्निंग वॉक करून आले होते.

अलविदा

सर्वजण लाईफ फार्मला अलविदा करण्यासाठी गेटवर जमा झालेत. ग्रुप फोटो काढण्यात आलेत, एकमेकांना आलिंगन देऊन एकमेकांचा निरोप घेतला ते पुढचं गेट टूगेदर लवकर करण्याचं एकमेकांकडून आश्वासन घेण्यात आलं.









Monday 23 March 2020

अज्ञानासारखे सुख नाही अशी समज असेल तर तो तुमचा भ्रम आहे!

वादळापूर्वीची शांतता असे शब्द ऐकण्याची सवय असल्यामुळे आपल्या लोकांनी लॉक डाऊन ला मनावर घेतलेले दिसत नाही. काल सुद्धा जनतेने जनता कर्फ्यु पाळला खरा परंतु संध्याकाळी रस्त्यावर उतरण्याची घाई करायला नको होती. म्हणूनच वादळापूर्वीचे असे बरेच शब्द आपण पचविले असतील ही, काही बरेच संकटे आलीत आणि गेलीत सुद्धा. तसेच कोरोना राक्षसी व्हायरस त्याचा टाईम आल्यावर विरेल सुद्धा ! परंतु वादळ निवळण्यापूर्वी तो किती हानी करून जाईल याचा अंदाज वर्तवणे अशक्य आहे. अश्यक्य का आहे तर कोरोनाने बळी घेतलेले लाईव्ह अपडेट्स नजरेखालून घातलेत तर तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही, आणि अनुमान लावा की ही वेळ म्हणजे वादळापूर्वीची भयाण शांतता आहे. मित्रानो अजून या जीवघेण्या व्हायरसवर कोणताही ठोस विलाज सापडला नाही आहे. कोरोना राक्षसी व्हायरसच्या गाडीला ब्रेक नाही आहेत, त्याच्या मार्गात येऊ नका, स्टे होम, कृपया डोळे उघडा आणि आपल्या घरी सुखरूप रहा.

Saturday 21 March 2020

कोरोंनाचा विळखा, कृपया इकडे लक्ष द्या

मित्रहो नमस्कार,
(श्री भरत कांडके, शीतचंद्रलोक, डोंबिवली)

आज रविवार, आपल्याला टाळता येण्यासारखी खूप कामे आहेत, पण उगाचच आपण हे काम ते काम असे करून कामाची लिस्ट तयार करतो आणि बाहेर पडतो. पण आज तसे करू नका, कारण, सध्या बाहेर कोरोनाची जी दहशत सुरू आहे, मला वाटतं या मधून आपण सर्वजण सही सलामत बाहेर पडणे हे *सर्वात जास्त महत्वाचे काम आहे*. *संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीच्या विळख्यात सापडले आहे हे आपण सर्वजण जाणत आहातच*. यामधून वाचण्यासाठी सरकारी यंत्रणांन मार्फत सर्वच स्थरावरून योग्य त्या सूचना दिल्या जात आहेतच. *आपण सुशिक्षित आहात* त्यामूळे त्या सूचनांचे पालन आपण करत असणारच. परंतु कसे असते जसे वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता सारखी नसते, त्या प्रमाणे आपल्यातील सर्वानाच या संकटांचे गांभीर्य एकाच वेळी समजेन असे नाही. त्या साठी आणि आपल्या मधील ऋणानुबंधाचे संबंध या साठी पुन्हा एकदा हा प्रयत्न. दिवसागणिक परिस्थिती बिघडत आहे हे रोजच्या आकडेवारी वरून समजते आहेच. कोरोना सारखा विषाणू शत्रू  बनून समोर उभा आहे. लढाई एका जीवघेण्या विषाणूशी आहे. आणि जर ती जिंकायची असेल तर आपल्याला एक दिलाने ती लढावी लागेल. पण या वेळी एकत्र न येता आपापल्या घरात बसून लढायची आहे. तुम्ही म्हणाल घरात बसून कुठे लढाई लढली जाते का? अहो आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रातील मावळे आहोत. जरा आठवा राजांचा इतिहास. प्रतापगडावर राजांवर आलेल्या संकटाच्या वेळी कोरोनारुपी अफजलखानाला आणि त्याच्या फौजेला संपवण्यासाठी आपल्या राजांनी किती व्यवस्थित प्लान बनवला होता. शामियान्यातील अफजलखानाच्या भेटीच्या वेळी काही मंडळी (आमच्या सरकारी अथवा खाजगी यंत्रणेतील अत्यावश्यक सेवेतील लोक) राजांसोबत आपले काम चोख बजावतील, तर बाकीचे मावळे (तुम्ही आम्ही सर्व) जंगलात   (आपापल्या घरात) दबा धरून बसून योग्य वेळेची आणि पुढील सुचनेची वाट पाहतील. असाच आहे आपल्या मोदी साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा प्लान. अगदी त्या प्रमाणे वागू या.  स्वराज्य स्थापनेतील लढाया अशा गनिमी काव्याने लढल्या गेल्या. तेव्हा कुठे प्रचंड अशा मोघल साम्राज्याचं पानिपत करून महाराजांनी स्वराज्याचा विजयी ध्वज फडकावला. मित्रहो आपल्यालाही तेच करायचंय. कोरोनाशी गनिमिकाव्याने लढूनच विजय मिळवायचाय. कारण हा विषाणू अफजलखानापेक्षाही निर्दयी आहे, तो अजिबात भेदभाव करत नाही. आपल्या पंतप्रधानांनी उद्या सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जनता कर्फ्युचं आवाहन केलंय. खूप  गर्भित असे संकेत आहेत त्यात. आपण त्याचा अभ्यास करत न बसता, आपल्या पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी आणि सरकारी यंत्रणेने ज्या ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे फक्त पालन करून, स्वतःला त्यात सामील करून घेऊ या. आणि बरोबर 5 वाजता अत्यावश्यक सेवेतील त्या सर्व देशभक्तांसाठी, त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी, त्यांच्या विषयी आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना दाखवण्यासाठी घंटानाद करू या. आपल्याला स्वतः बरोबर दुसऱ्याला, इतरांना, आणि पर्यायाने समस्त मानव जातील या महामारीपासून वाचवायचंय मंडळी. उद्याचा दिवस आणि पुढील एक आठवडा खूप महत्वाचा आहे. सहजतेने घेऊ नका, मलाही सुरवातीला वाटलं होतं, इतकं काही नाही होणार, पण दिवसेंदिवस परिस्थिती बिघडते आहे, जागरूक होणं गरजेचं आहे गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, कारण अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्या रोजच्या सवयींना काही दिवस बाजूला ठेवून काही दिवस गृहस्थाश्रमाच्या आगळ्या वेगळ्या नियमांचे पालन करून कटिबद्ध होऊ या. काय करायचंय हे सर्वांना माहीत आहेच. स्वच्छता राखा, तासातासाला हात, नाक, तोंड आणि डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. घरातच राहणे पसंत करा. आपल्या घरातील सर्वाना वेळ द्या.  गरज नसताना बाहेर जाऊ नका. कोण कुणाच्या संपर्कात आलेली व्यक्ती तुम्हाला भेटेन याचा काही नेम नाही. आणि याचीच वाट बघतोय तो कोरोना. अहो अवघ्या दिड महिन्यात ज्याने संपुर्ण जगाला वेढा घातला. त्याला आपल्या भारत भूमीवर हबी होण्याची संधी देऊ नका. खरोखर हात जोडून विनंती आहे. कारण जर चुकून असे झाले तर मित्रानो आपल्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात त्या वेळी आपल्या हातात काहीच नसेल.  आणि त्या वेळी हया सर्व उपाय योजना करण्याची वेळ निघून गेलेली असेल. तेव्हा वेळीच शहाणे बनू या. आणि निकराने लढू या. हे करताना थोडा त्रास होणारच आहे, पण त्याला ईलाज नाही. कारण ही लढाई संयमाची आणि धीराची आहे. आपल्या पंतप्रधानांच्या अवाहनाला, एक देश सेवा समजून, प्रतिसाद देऊ या स्वतःसाठी, आपल्या प्रियजनांसाठी, आणि पर्यायाने भारतमातेसाठी नव्हे नव्हे संपूर्ण मानव जातीसाठी आपले दायित्व सिध्द करू या. चला तर मग तयार होऊ या, या निश्चयाने की, "माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, संयम आणि धीराने घेऊन कोरोनाला मारू" आपण कोरोनाला मारू.

🙏🏻
- श्री. भरत कांडके, डोंबिवली.

Friday 20 March 2020

जामर

कोरोना बद्दल आतापर्यंत कितीतरी अगणिक पाल्हाळ जोक्स व्हाट्सअप वर ओतले गेले आहेत, आणि ते वाचून आपण गालातल्या गालात स्वतःवर हसत राहतो. एक बाजूला कोरोना मरिजचं आयुष्याचं काऊंट डाऊन चालू आहे आणि आपल्यातले काही लोक निराराळे प्रकारचे विनोद सप्लाय करण्यात मशगुल आहेत. ही तर आपल्या सृजनशीलतेची दिवाळखोरीच आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते. रोज हजारो ट्रक्स भरतील एवढे वाढ दिवसांचे केक्स व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर पाठविले जातात. असे ई केक भरवण्यासाठी जणू स्पर्धा चालू असते. असे अन प्रॉडक्टिव्ह मेसेजेस पाठविण्यासाठी आपल्या जवळ भरमसाठ वेळ आहे आणि एवढा वेळ असून आपल्याला एकमेकांशी बोलायला वेळ नाही. अशी बरीच उदाहरणे फेसबूक आणि व्हाट्सअप्प संदर्भात देता येतील. व्हाट्सअप्प आणि फेसबुक वरून दसऱ्याच्या दिवशी ई-आपट्याच्या झाडाची पाने भरमसाठ पाठविली जातात, मकर संक्रातीला तर याचं रेकॉर्ड ब्रेक होतं, तिळगुळाचे छायाचित्रांचे एवढे लाडू पाठविले जातात अनु तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला चे मेसेजेस वाचून भारतातील कुटुंबे किती गुण्यागोविंदाने नांदत असतील असं वाटल्या शिवाय राहत नाही, परंतु हा भ्रमाचा भोपळा दुसऱ्या दिवशी लगेच फुटतो. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पाण्याच्या नळावर कश्या एकमेकांच्या झिंज्या धरतात ते बघा. नवीन वर्ष सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो असे मेसेजेस तर हंडीभर पाठविली जातात, पण दुसऱ्या दिवशी हीच माणसे कुस्ती खेळायला मोकळे असतात. टाईम आला तर एकमेकांवर कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. स्वर्गवासी झालेल्या माणसाला अग्नी दिल्याबरोबर त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहायला सांगितले जाते खरे परंतु तेरा ते चौदा सेकंदाच्या आत सर्वांची समाधी तुटते, कारण स्मशानात गेलेला कधी वापस येणार नाही हे चांगलं आपल्याला माहीत असतं. व्हाट्सअप्पवर मात्र शोक संदेश एकामागून एक ढिगाऱ्याने पाठविले जातात. तिरडीच्या बांबूंना काय त्याचे सुख दुःख, त्याने त्याचे काम चोख केलेले असते.

देशपातळीवर पंतप्रधान आणि त्यांची टीम कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. परंतु आमचे राजकीय विरोधक पंतप्रधानांवर टिका करण्यासाठी नवनवीन आरोप करण्यात व्यस्त आहेत. काही राजपुत्र नेते म्हणतात पंतप्रधानां कोरोनाबद्दल काहीच माहिती नाही आणि देशाला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. पण त्याच्यावर उपाय काय असे लाडके नेत्यांना विचारले असता त्यांना काहीच सांगता पण येत नाही. लोकांमध्ये भ्रम पैदा करण्याचा वसा यांनीच घेतलेला असतो. हत्यार स्वतःजवळ बाळगणे भले कायद्याने गुन्हा असेल परंतु तोंडाच्या शस्त्राचं काय. चांगले नावाजलेले लोक आपला तोंडाच्या तोफखाना दिवसभर चालवत असतात. मीडिया एव्हढा आगलावू कारखाना आहे की, त्यांना त्यामुळे चांगले आयते आणि फुकटचे खाद्यच मिळते परंतु तोंडाचे तोफखाने चालवणाऱ्यांना ऊर्जा कुठून मिळते हे एक खुद परमेश्वराला पडलेले कोडे असावे. लांब कशाला जाता, जो नाही तो आजकाल उठसूठ पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला नाही तशा शिव्या देण्याची विकृती या लोकांनी अंगिकारली आहे. वृत्तपत्रे तर या गोष्टीचा धिक्कार सुद्धा करतांना दिसत नाहीत. काही हेकेखोर मंडळी आपली सर्जनशीलता गुंडाळून उगीच मैदानात उतरतात आणि एकदाचा आखाडा सुरू झाला तर मीडियाला बघायलाच नको, कारण मिडियाने सर्व जगाचा प्रसूतिगृहाचा मक्ताच घेतलेला असतो. मग टीव्हीवर आग न लावता गवताच्या गंज्या कशा जळत असतात हे आपण रोज पाहतो. आरोप प्रत्यारोप करून एकमेकांच्या अंगार कडकडीत तेल ओतत असतात.

अजून पर्यंत तरी संवेदनशीलता तरी अभादित होती, परंतु आता ती अदृश्य होत चालली आहे आणि सर्जनसजीलता ही तर तिच्या पाठीवरच आरूढ होवून तिला पण ही दुनियादारी झेपत नाही. वि.स. खांडेकरा म्हणतात प्रातःकाल आणि संध्याकाळचं वर्ण करतांना कवी लेखकांनी तर त्यांना देव्हाऱ्यात बसविले आहेत, दुपारचं वर्णन करतांना जणू त्यांना खरोखरच चटके बसतात. निसर्गाने मऊ गवत, फुले वेली निर्माण केल्या तसे मोठमोठे दगड धोंडे, दऱ्या, समुद्र आणि उंच उंच पहाड देखिल निर्माण केलेत. एव्हढी क्रूरता निर्माण केल्यानंतर त्याने सुंदर जलधारा, फ्लॉवर व्हॅली सुद्धा निर्माण केल्या. एव्हढं सुंदर विश्व निर्माण केल्या नंतर ही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी तोंडाने अणुचाचण्या घेत बसते. इंटरनेटला काही संवेदनशील ठिकाणी जामर लावले जाते असे ऐकले आहे परंतु या सर्व गोष्टींना जामर लावण्याची आपल्याकडे कायदा तयार झाला नाही अजून.

Friday 13 March 2020

आणि शीतचंद्रलोकच्या कट्ट्यावर उलगडलं होतं महिला दिनाचं पहिलं पुष्प


०८ मार्च २०२०

आज सकाळी निरव शांततेत कोकिळेचा मधुर आवाज कानावर पडला, एक शुभ संकेताने दिवसाची सुरुवात झाली होती. आंब्याच्या झाडाला मोहोर यावा त्याप्रमाणे शीतचंद्रलोक  सोसायटीतील वातावरणाला विशेष बहर आला होता. आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून शीतचंद्रलोक सख्यांचा मनःपूर्वक सन्मानाची जय्यत तयारी सुरू झाली होती. असंख्य तारकांमध्ये शुक्राची चांदणी उठून दिसावी त्या प्रमाणे एबीपी माझाच्या प्रमुख अँकर ज्ञानदा कदम ह्या महिला दिनी शीतचंद्रलोक सख्यांच्या वलयामध्ये सामील झाल्यात.

वि.स. खांडेकर म्हणतात, "नभोमंडपात अगणिक तारका चमकत असतांना शुक्राची चांदणी ओळखायला ज्योतिष शास्राचे ज्ञान कशाला हवे" साहित्यिकाच्या सृजनशीलतेच्या  उक्तीप्रमाणे शीतचंद्रलोक पुरुषांच्या सर्जनशीलतेला एक नवीन पालवी फुटली आणि तिथेच एक "शीतचंद्रलोकच्या सख्यांना मानाचा मुजरा" असं सुंदर काव्य निर्माण झाले.

परंतु दोन किनाऱ्याच्या सहवासात वाहत असलेल्या नदीला कुठे ठाऊक होते की, तिची मंजिल कुठे आहे ! म्हणून कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा न करता श्रीयुत कांडके आणि श्रीयुत पोंक्षे यांच्या टीमने शीतचंद्रलोक च्या तमाम स्त्रीवर्गाला मानाचा मुजरा करून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या आश्चर्याची पाळेमुळे रुजली गेली होती त्या भरीत भाकरीच्या पार्टीतून. वांग्याचं भरीत आणि  हिरव्या मिरचीच्या ठेच्याची चव चाखतां चाखतां  कांडके सरांच्या संकल्पनेतून एक रत्न बाहेर पडलं की, आपणही खडकावर जल विहिर खोदू शकतो. सहकाऱ्यांनी एकमतांने सहमती दर्शविल्यावर शीतचंद्रलोकच्या भव्य प्रांगणात सर्व सख्यांसामोर छोटीसी औपचारिक घोषणा करण्यात आली की एक दिवस तुमच्या साठी.

बस, खलबते सुरू झाली, लखोटे व्हाट्सएपच्या माध्यमातून इकडून तिकडे ट्रान्सफर होऊ लागले, गुप्त मिटींग्ज आणि बैठका होऊ लागल्यात, मॅनेजमेंट हे एक सिक्रेटच होतं. ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो, प्रत्यक्षात तो दिवस उजाडला, शीतचंद्रलोकच्या गेटवर शीतचंद्रलोक सख्यांचा सन्मान असे होर्डिंग्ज लावण्यात आले , गेटवरचा वृक्ष जसा कटेवरी हात, युगे अठ्ठावीस उभा या घटनेला साक्ष देत होता. गेटवर रांगोळी काढण्यात आली होती, गेटपासून ते रंगमंच पर्यंत लाल कार्पेट अंथरण्यात आले होते. रस्त्याच्या बाजूला सुशोभित कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या, शार्प संध्याकाळी सात वाजता शीतचंद्रलोक सख्यां नटून, लाल किरमिजी रंगाचे फेटे आणि "स्त्री कर्तुत्वाला मानाचा मुजरा" असा बॅज परिधान करून गेटवर एकत्र जमल्यात. आणि तेवढ्यात त्या शुक्राच्या चांदणीचे म्हणजे ज्ञानदा कदम यांचे आगमन झाले. त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शीतचंद्रलोकच्या सख्यांसमवेत त्यांना मानापानाने झान्झ पथक आणि लेजिमच्या गजरात वाजत गाजत भव्य रंगमंचकाकडे त्यांना पाचारण करण्यात आले. दिप प्रज्वललाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कांडके साहेबांचं अँकरिंगचं पहिलं पुष्प शीतचंद्रलोकच्या मंचावर झळकत होतं. त्यांचं प्रेझेन्टेशन आणि  त्यांना लाभलेला भारदस्त आवाज यात कमालीचा आत्मविश्वास दिसून आला.

मावळलीस जर कधी तू, विनाश इथला निश्चित आहे              ब्रह्मांडालाही उजळणारी तू परमेश्वराचं रूप आहे.

रंगमंचकावर खुर्च्यांची संख्या अठ्ठावीस तर सख्यांची संख्या पन्नास आणि प्रत्येक सखीला ज्ञानदा कदम समवेत बसण्याचं सौभाग्य मिळालं कसं आणि तेही कसलीही चलबिचल न होता!  याचं गणित, हा प्रोटोकॉल  मंत्र्यांच्या शपतविधीपेक्षा अवर्णनीय होता असं म्हणण्याचं कारण म्हणजे, जागेची क्षमता, बजेट, मॅनेजमेंट, सुविधा  या सर्व बाबी लक्षात घेता टीम लीडर आणि टीम मेंबर्सची ही चाणक्य नीतीचा कुशल नमुना होता.

यश, हर्ष, आर्यन आणि ऋषी यांनी अतिथीचं स्वागतम या गितवर नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, श्री कांडके यांनी निरनिराळ्या क्षेत्रातील स्त्री कर्तृत्वाची महती सांगताना झाशीची राणी ते इंदिरा गांधीपर्यंत यांनी केलेल्या आपल्या कर्तृत्वाचा महिमा वर्णिला, पृथ्वी प्रदक्षिणा करावी त्याप्रमाणे कांडकें साहेबांच्या निवेदनाला धार चढत होती. त्यांच्या आवाजातील प्रगल्भताने आसमंत उजळून निघाला. ज्ञानदा कदम यांना प्रतितात्मक मानचिन्ह देण्यात आले. नंतर त्यांच्या हस्ते सर्व महिलांना छोटीसी भेट वस्तू देण्यात आली, ही शीतचंद्रलोक पुरुषांची मानवंदना होती.

श्रीयुत कांडके यांनी  ज्ञानदा कदम यांचा अल्पसा परिचय करून त्यांच्या कर्तुत्वाला सलामी दिली. घरातील सर्व मंडळींची इच्छा होती की ज्ञानदाने शिक्षिका व्हावं, पण नियतीला वेगळंच मान्य होतं, ज्ञानदाने जर्नालिजम क्षेत्रात उतरून, एबीपी माझा या वाहिनीने त्यांच्यासाठी दरवाजे उघडे करून दिलेत. त्यांच्या छोटेखानी भाषणात त्या आपलं मत प्रांजलपणाने व्यक्त करतात की,  मोठमोठया संस्थेत, शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस मध्ये कार्यक्रमांसाठी गेलेले आहे, परंतु येथील नियोजन हे अप्रतिम आणि सर्वोत्तम आहे. हा कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी सरप्राईज होता हे जेंव्हा त्यांना कळलं तेंव्हा त्यांनी आश्चर्याचं कौतुक केलं. पुरुष वर्गाने कोणतीही गोष्टीची चाहूल न लागू देता एवढा मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणं हे नक्कीच सोपी गोष्ट नव्हती अशी त्यांनी समस्त मंडळींना जाण करून दिली, पुढे त्या म्हणाल्या की, मी शीतचंद्रलोक सोसायटीबद्दल खूप काही ऐकले आहे,  तुम्ही हा एकच कार्यक्रम नव्हे तर वर्षभरातून अनेक असे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतात , याचं त्यांनी मोठ्या मनाने तोंड भरून कौतुक केलं. सोसायटीत हेवेदावे, चुगली,चिमटे, हमरी तुमरी असे असंख्य वादविवाद असतांत, या सर्वांना छेद देवून तुम्ही मंडळी एवढ्या एकोप्याने आणि पॉझिटिव्ह एनर्जीने राहतात ही फार भारी गोष्ट आहे, तुमची वास्तू खूप चांगली आहे आणि तुमच्या वास्तूत चंद्र आहे साक्षीला असे गौरवोद्गार काढून त्यांनी उभयंतांची मने जिंकलीत. शुक्राच्या चांदणीला कार्यक्रमातून चंद्राचा निरोप घेतांना खूप गहिवरून आले होते. निरोप घ्यायच्या अगोदर, पाहुणी कलाकार नेहाने ज्ञानदा कदम यांच्यासमोर साताऱ्याचे गुलछडी मला रोखून पाहू नका या गाण्यावर अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं नृत्य केलं.

राहुल डिंगळे यांनी झेंड्याचं नाचवणं अतिशय सुंदर केलं होतं आणि जयूने त्यांना आवेशपूर्ण आणि जोशात साद दिली त्यामुळे या कार्यक्रमाला वेगळीच चकाकणारी किनार लाभली. ज्ञानदा कदम सुद्धा सरप्राईज झाल्यात. राहुल आणि जयूचं कौतुक करण्यासाठी रायगडावर पौर्णिमेच्या रात्रीची निवड करून त्यांचा चंद्रप्रकाशात गौरव केला पाहिजे.

रंगमंच फुलांनी नव्हे तर चंद्रलोक सख्यांनी नटला होता, कार्यक्रमाने प्रत्यक्षात अशी काही उंची गाठली होती की, नदीला आपल्या भावना व्यक्त करताना तिचा उर दाटून आला, तिच्या भावनांना आवर घालणे तिला जमले नाही, कधी कधी तिचे शब्द तुटत होते तर कधी तिच्या शब्दांना धार चढत होती, कोणी शब्दातून व्यथा मांडली तर कोणी कवितेतून पुरुष वर्गाने केलेल्या कृतीचा गौरव केला. ती इथेही कमी पडली नाही. तिच्या डोळ्यातले अश्रूंना ती थांबवू शकली नाही. पोडीयामला सुद्धा गहिवरून आले.

मला माहेरी करमत नाही

दक्षा गिरकर आपल्या मनोगत व्यक्त करताना  म्हणाल्यात की स्त्री चं एवढं स्वागत आणि कौतुक होत असेल तर आम्हाला माहेर ची आठवण येणारच नाही, पुरुष वर्ग स्त्रीचा एवढा सन्मान करेल असं आम्हाला स्वप्नात देखीलही वाटलं नव्हतं. या सन्मान सोहळाची त्यांनी जी तयारी केली ते सर्वं सस्पेन्स ठेवण्यात आलं होतं, त्यांना स्वतःला सर्व काही माहीत होतं, परंतु घरात ते सांगायचं नव्हतं, स्त्री बिचारी सर्व काही सांगून मोकळी होते, तिच्या पोटात काहीच राहत नाही. दक्षा मॅडम बोलता बोलता सुर्यप्रकाशा इतके अतिशय सत्य सांगून गेल्या. एकीकडे पुरुष आपली गुपितं कोणालाही कळू नये म्हणून अहोरात्र खबरदारी घेत असतो. तर स्रिया आपल्या पोटातील गुपित केंव्हा बाहेर काढू आणि दुसरीला कधी सांगू यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागलेली असते. दूर कशाला जाता ! साधारण पाच सहा वर्षपूर्वीची घटना असेल.  सौ चव्हाण परगावी म्हणजे पुण्याला गेली होती. घरात मला सर्वच गोष्टी स्वतःलाच करत लागत असल्यामुळे खूप उशीर झाला आणि त्या दिवशी मी ऑफिसला जाण्याचे टाळून दिवसभर घरीच राहिलो. साहजिकच मी घराची खिडकी उघडीच ठेवली आणि त्याच वेळेस शोभा गावडे बाहेरून सोसायटीत शिरल्या असाव्यात. खिडकी उघडी बघून त्यांनी कयास काढला की, सौ चव्हाण पुण्यावरून घरी आलेल्या दिसतात, म्हणून त्यांनी लगेच सौ चव्हाणांना फोन केला आणि विचारले की, काहो, केंव्हा आलात पुण्यावरून ।  बस, तेवढ्यात माझ्या मोबाईलची कर्कश रिंग वाजून बायकोने झापायला सुरुवात केली, तिकडून खाडकन आवाज आला "काहो, आज ऑफीसला दांडी का? मी उद्गारलो, "हॅलो तूच बोलते आहेस ना" ! तिकडून आवाज, हो मीच बोलते आहे!". क्षणभर मी अवाक झालो आणि मनातल्या मनात विचार केला की बायकांना आपल्या गोष्टी कशा काय माहीत पडतात, आश्चर्यच आहे" स्त्रीच्या पोटात कोणतीही गोष्ट थांबत नसल्यामुळे असल्या आश्चर्याना कधी कधी सामोरे जावे लागते ! परंतु यांच्यातच खरी जगण्याची मजा असते.

सौ शोभा गावडे यांची विलोभनीय कविता

माझी शीतचंद्रलोक इतर जगापेक्षा वेगळा कसा याचं वर्णन करतांना भारावलेल्या सौ गावडे म्हणतात, मी चंद्रावर न जाता चंद्र ही पाहिला आहे, आणि चंद्रावरचे गोड लोक ही पाहिले आहेत. शीतचंद्रलोक सख्यांचा भव्य दिव्य सन्मान सोहळाचा वर्णन करतांना, कौतुक करावं का आभार मानावेत हेच त्यांना कळत नव्हते. मी त्यांची ऋणी राहीन आणि मला त्यांच्या ऋणात राहायला आवडेल. कौतुकाच्या भरात त्यांनी एटीम कार्ड च देऊन टाकलं. किती भोळी भाबडी असते ना स्त्री, गावडे मॅडम सॅल्युट तुम्हाला.

हो आवडेल मला त्याच्या छत्र छायेत राहायला                      हो आवडेल मला त्याला माझं एटीएम द्यायला                        हो आवडेल मला त्याच्या रंगात रंगायला

किती सुरेख आणि गोड हा त्यांचा भाबडेपणा

नल्ली आजी- घरातल्या पुरुषाने घरातली कुठलीही स्त्रीची कामे करतांना मला शोधून आजपर्यंत सापडली नाहीत, परंतु शीतचंद्रलोक ने केलेला सन्मान बघून त्यांचा सर्व रोष आज शांत झाला. आज मिळालेलं अप्रतिम, अविश्वसनीय सरप्राईज बघून त्या धन्य झाल्यात. आज्जी आज्जी मला एक गोष्ट सांगना! त्याचे हट्ट पुरवतांना आजीचे असे प्रेमळ रूप आपण अनेकदा पाहिले असेल, परंतु त्याच आज्जीनी आज चक्क स्त्रीच्या मनातली व्यथा दर्शविणारी कविताच सादर केली. आहेना कमाल या मंचाची !  "आई काय असते एकदा जाणून तरी बघ" ही त्यांच्या मनातील खंत कवितेच्या रूपाने उन्मळून पडली.

सौ गौरी गोठीवरेकर

सौ गौरी गोठीवरेकर यांनी, पुरुष वर्गाने केलेल्या स्त्री सन्मानाबद्दल कृतार्थेच्या भावनेला त्यांनी प्रथम प्रणाम केला. संपूर्ण कार्यक्रमाचा समाचार घेतांना, रांगोळी, झान्झ पथक, पाणी पुरी, भेट वस्तू, सिलेब्रिटी ज्ञानदा कदम यांच्या उपस्थितीत चंद्रलोक सख्यांचा सन्मान सोहळा,  आणि विशेष म्हणजे रेड कार्पेटवरून सख्यांना सन्मानाने मंचपर्यंत नेण्यात आले, या कौतुकाने त्या अक्षरशः भारावून गेल्यात, कुठलाही थांगपत्ता लागू न देता अचानक दारावर मिळालेलं आमंत्रण बघून त्या सरप्राईज झाल्यात, काही माहीत नसतांना काय बोलायचं, कोणत्या विषयावर बोलायचं ! जणू काय सगळीकडे त्यांना उद्गारवाचक  चिन्ह दिसत होते. कठीण ऋतुचक्रातून सहीसलामत बाहेर पडलेल्या शीतचंद्रलोकला रेशीम धाग्याने गुंफताना, कांडके सरांचं कौतुक करायला त्या विसरल्या नाहीत. मोतीयोंको तो बिखर जानेकीं आदत है, लेकीन धागेकी जिद थी की ओ सबको पिरोये रखता है।  ज्यांनी स्वयंपाक घरात पाय ठेवला नाही अश्या लोकांची पोंक्षे साहेबांनी मोट बांधून दिवसभर स्वतःला स्वयंपाकात झोकून देणे आणि इडलीच्या भांड्यातून कोथिंबीर वड्या सारं काही अफलातून केल्यामुळे त्यांनी श्रीयुत पोंक्षे साहेबांना मनापासून सॅल्युट केला. स्त्री जन्मा या काव्यातून त्यांनी आपल्या माहेरच्या नात्यांची शिकवण स्निग्धपणे मांडली

आजी म्हणायची उपास तापास कर, पूजा पाठ कर सासर चांगलं मिळेल
आजोबा म्हणायचे शांत रहा, समजुतीने घे सासरी निभाव लागेल
आई म्हणायची ........
काकू म्हणायची............
काका म्हणायचे...............
आत्या म्हणायची................
मावशी म्हणायची...................
पण बाबा म्हणायचे, जग बाळा मनसोक्त,  मन मुराद, हवं तसं खेळ, ओरड, हवं ते शिक, हवं तसं नाच, हवी तशी फिर, तुझं हक्काचं घर आहे, तू तुझ्या माहेरी आहेस

पण मी आता सासरी आहे, चंद्रलोकचा परिवार म्हणतो आहे, गौरी तू येथे हवं तसं खेळ, मन मुराद, हवी तशी नाच, कारण तू तुझ्या चंद्रलोकच्या परिवारात आहे, तू चंद्रलोकच्या घरी आहेस.

काय बोलतात ना गौरी मॅडम, त्यांचं मनोगत म्हणजे  संस्कृतीच्या खजान्यातलं हिरवं पान असतं.

दाटून आला कंठ, भरून आले डोळे
चंद्रलोक ने आमचे किती केले सोहळे                                    
रीती झाली लेखणी, शब्द मला काही सुचेना
चंद्रलोकचं कौतिक माझ्या मनी म्हाईना

तर सौ समता पावसकर यांना पुरुषांची ससेहोलपट बघवली जात नव्हती, कोथिंबीर, डाळीचं पीठ मीठ कालवण चाललं होतं, त्याच्यात पाणी किती घालायचं, यांचं प्रमाण किती आणि कसं जमणार यांना!  त्यांना असं वाटत होतं की पुरुषांनी ही कामं  ही थांबवावीत आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना मदतीचा हात द्यावा.ते खिडकीतुन सर्व परिस्थितीचा आढावा घेत होत्या परंतु त्यांचा नाईलाज होता, आज आपल्याला काही बोलायचं नव्हतं, आपल्याला जे काही मिळणार आहे ते सन्मानाने मिळणार होतं, त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत आज खऱ्या अर्थाने पती पत्नी, बहीण भाऊ, मित्र मैत्रीण, मुलगा मुलगी, नात नातू, आई बाबा, सासू सासरे या सर्वांचा त्यांनी सन्मान केला आहे. त्यांच्या तळमळीने त्यांची समीक्षा ओली झाली.
सौ.गाडगीळ मॅडम ना खूप काही सांगायचं होत परंतु त्यांच्या ओठावर येईपर्यंत ते विरून जात होतं, कारण अगोदरच्या सख्यांनीच त्यांच्या मनातला गाभारा रिता केला होता.नंतर त्यांनीच एक आर्जव करून सर्व पुरुष सभासदांना स्टेजवर यायला भाग पाडून एक कृतज्ञता व्यक्त केली.

छोट्याशा तृणपात्यांवर असंख्य दवबिंदू साचलेले आपण नेहमी पाहतो, परंतु नितळ कांती असलेल्या कमळाच्या लालसर लुसलुशीत पाकळ्यांवर पाण्याचे थेंब का साचत नाहीत याचं रहस्य आज सहजतेने  उलगडले गेले, हे आपण प्रत्यक्ष पाहिले आणि शीतचंद्रलोकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अथांग समुद्रावरून उडणाऱ्या पक्षाच्या चोचीतलं जिवंत माशाचं भक्ष्य निसटता निसटता त्याने चपळाईने पुन्हा क्षणात पकडलं, परंतु विसाव्यासाठी त्याला जागाच मिळेना. त्याप्रमाणे आपल्या फोटोग्राफरची अवस्था झाली होती, कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण आणि संख्यांच्या अदा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा त्याने हट्टच धरला होता. प्रत्येक जण कार्यक्रमाचं कौतुक करत होता, आपला फोटोग्राफर मात्र एका पायावर उभा राहून आपली तपश्चर्या भंग करत नव्हता. कारण स्वतःच्या डीसीप्लिन त्याला आज्ञा देत नव्हते. ते फोटोग्राफर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले श्रीयुत गाडगीळ साहेब. अप्रतिम अभिनय आहे सर तुमचा.

केळीच्या पानावर जेवणाची लज्जत कशी असते, इडलीच्या भांड्यातून कोथिंबीर वड्या जन्माला येतात तरी कशा ही सर्व उपकरणे हाताळावीत कशी!  हे सर्व डोळ्यांनी बघतांना पोंक्षे साहेबांनी त्यांच्या मनाला किती पैलू पाडून जपून ठेवले होते याचा अंदाज बांधणे सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी मला त्यांच्याशी मैत्रीचं नातंच जोडावं लागेल त्याशिवाय हा तिढा सुटणार नाही.  जेवणाचा मेनू ठरवंतांना मसाले भात हवाच, तांदूळ पासून ते भाज्या कोथिंबीरच्या जुड्या आणण्यापासून सर्व कामे त्यांनी मनोभावे केलीत. केळीचे पानात जेवणाचा आग्रह धारतांना मला अर्धा तास त्याचं महत्व सांगताना त्यांची अजिबात दमछाक होत नव्हती तर त्यांचा उत्साह मला जाणवत होता. त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. स्टेजवर त्यांचं कौतुक चालू असतांना ते सोलकडी करण्यात व्यस्त होते. केवळ आणि केवळ स्त्री सन्मानासाठी त्यांना जेवणात कोणतीही कसूर सोडायची नव्हती.

पडद्या मागील श्रमाचे आणि त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक कसे करावे हा सर्वात मोठा कठीण विषय असतो. जोपर्यंत आपल्या अंगणात लाल माती आहे तोपर्यंत ती चमकणारच आणि खुरट्या बुंधावर चढून बकरी पाला खाणार हे आपलं सौभाग्य आहे. त्यांची किती नांवे घ्यावीत. श्री मोहन फाटक, श्री योगेश गोठीवरेकर, श्री विष्णू पाटील, श्री सुरेश भुवड, श्री बापू गावडे, श्री सचिन सुर्वे, श्री दिनेश खानोलकर, श्री दीपक हेगिष्टे, श्री महेश पोंक्षे, श्री महेंद्र घाडगे, श्री दिलीप काटकर, श्री अरुण गायकवाड, श्री सुरेश चौधरी, श्री वेणूगोपाल, श्री भरत कांडके, श्री बिळसकर, श्री जगन्नाथ पावसकर, श्री देवेंद्र सनगरे, श्री संजय सनागरे, श्री विनय गाडगीळ, श्री उमेश कुंभार, अमित, शिवाजी, किरण, संकल्प, प्रसाद, तेजस, जय, प्रणित, विशाल, मुकूल, मनिष, आर्यन, ओम, आणी माझ्याकडून बरीच जणांचा उल्लेख करायचा राहून गेला असेल तर त्यांनी मला माफ न करता जरूर टोकावे. मी चूक दुरुस्त करेन.  या सर्वांनी भरपूर आणि घसघशीत योगदान दिले म्हणूनच "शीतचंद्रलोक सख्यांना मानाचा मुजरा" हा कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी झाला. या कार्यक्रमाची कीर्ती दूरवर पसरणार आहे यात शंका नाही कारण नुसती कार्यक्रमाची चाहूल लागताच डोंबिवली रामनगर पोलीस अधिकारी पीएसआय शीतल सीसाला ह्या आपल्या कार्यक्रमास फौजफाटासह उपस्थित राहणार होत्या परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना कार्यक्रमाला हजेरी लावता आली नसेल. म्हणून सांगतो साहेबांनो, आपल्या सर्वांच खूप कौतुक ही झालं, खूप मनात भरून ही आलं. तुम्ही न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम सादर केला म्हणून हवेत तरंगू नका कारण हा ठेवा आपल्याला दरवर्षी जपायचं आहे, कार्यक्रमाचं स्वरूप कदाचित दुसरही असेल म्हणून सस्पेन्स आपल्याला दरवर्षी सिक्रेट ठेवायचे आहे.️

टेबल मांडून केळीच्या पानावर सर्व शीतचंद्रलोक संख्याना पहिला जेवणाचा मान दिला गेला, सर्व पुरुषवर्गाने अगदी आग्रहाने पदार्थ वाढले.

जेवणाचा मेनू ठरविण्यासाठी सुद्धा प्रत्येक सभासदाचे मत अजमावण्यात आले होते. मेनू काही अशा पद्धतीने होता. कोशिंबीर, कोथिंबीर वडी, मिक्स भजी, सुका बटाटा भाजी, चना मसाला भाजी, पूरी, मसाले भात, साधा भात, वरण, पापड, श्रीखंड, सोलकडी.

ज्या कोणी सख्यांची अभिप्राय देण्याची खंत राहून गेली होती त्या सर्व सख्यांनी जेवता जेवता त्यांच्या मनातल्या भावनांना मनमोकळे पणाने वाट करून दिली श्रीयुत पावसकर साहेबांनी त्यांच्या मनातल्या स्फुरलेल्या भावनांना कॅमेरात बंदिस्त केले.

मला सुद्धा शोभा गावडेंची कवितेची कॉपी करायचा मोह आवरता आला नाही .

मलाही आवडेल आपल्या कलाकारांचं कौतुक करायला
आवडेल मला आपल्या कलाकारांना प्रोत्साहन द्यायला
आवडेल मला तुमच्याशी नातं ठेवायला
आवडेल मला तुमच्यात मिसळायला
आवडेल मला तुमच्याशी मैत्री जोडायला
आवडेल मला चंद्रलोकच्या कार्यक्रमात भाग घ्यायला
आवडेल मला चंद्रलोकमध्ये राहायला
आवडेल मला तुमच्याशी साहित्यिक गप्पा मारायला
आवडेल मला तुमच्यावर ब्लॉग लिहायला
आवडेल मला तुमच्या कविता ऐकायला
आणि आवडेल मला तुमच्या पंखानी तुम्हाला उडतांना बघायला

आता येथे थांबतो, वाचता वाचता तुम्ही इथपर्यंत पोहचला असाल तर तुमच्या संयमाला मी सॅल्युट करतो.

धन्यवाद



Wednesday 4 March 2020

शीतचंद्रलोकच्या कट्ट्यावर उलगडणार महिला दिनाचं पहिलं पुष्प

गाईच्या शेणाने अंगणात सुंदर सडा टाकला जाणार आणि रांगोळी सुद्धा छान काढली जाणार, तरी सुद्धा त्या दिवसाचा कार्यक्रम कसा असेल! छोट्याशा तृणपात्यांवर असंख्य दवबिंदू साचलेले आपण पाहिले असतील परंतु नितळ
कांती असलेल्या कमळाच्या लालसर लुसलुशीत पाकळ्यांवर पाण्याचे थेंब का साचत नाहीत याचं रहस्य त्या दिवशी उलगडले जाणार आणि शीतचंद्रलोकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

आयुष्यात आपल्या पत्नीचं योगदान आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं हे कोणताही पुरुष मनोमनी  स्वीकारत नाही. मग आपली पत्नी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने बुद्धिमान आहे अशी थट्टा जर कोणी केली तरी त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. तरी सुद्धा महिला दिनची सुट्टी एन्जॉय करायला पुरुष मंडळींना मोह मात्र आवरता येत नाही. "आपली बायको माहेरी कधी जाईल आणि आपल्याला हवे तसे उकिरडे कसे फुंकता येतील अशी चातका प्रमाणे वाट बघणारा नवरा हा काळाच्या पडद्याआड जमा झाला आहे. हे एकविसाव्ये शतक चालू आहे आणि याच शतकात शीतचंद्रलोकने आपले अनोखे पण जपले आहे. शीतचंद्रलोक नगरीची बातच न्यारी आहे. येथली संस्कृतीच वेगळी, येथे दिवाळी पहाट साजरी केली जाते, तर येथे कोजागिरी पौर्णिमेचा आनंद लुटला जातो, कला मंचावर येथील कलाकारांची कला जोपासली जावून त्याच कौतुक केलं जातं. वार्षिक सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने येथे तीन ते चार दिवस भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. येथील मुले मुली आपली कला सादर करून, हेच पंख घेऊनच ते बाहेरच्या जगात भरारी घेतात. आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीत कला ही रुजवली गेली आणि ती नसा नसातून भिनली. कुंभाराच्या चाकावर रुळणाऱ्या मातीला लवचिक पणा येतो तसा आदर्श निर्माण झाला. त्याच्यामागे आपल्या सोसायटीत एक अदृश्य झरा वाहतो. त्याची ओल आतपर्यंत झिरपते. नविन पणाच्या नवीन विचारांच्या बिया रुजतात. असाच एक विचार येथील वरिष्ठांच्या संकल्पनेतून दरवळला आणि तो प्रत्यक्षात आणायचं धनुष्य उचललं गेलं. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, शीतचंद्रलोकच्या रौप्यमहोत्सव वर्षी शीतचंद्रलोक सख्यांचा सन्मान करण्याच एक नवी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनात लिहिण्याचे तरंग तर भरपूर निर्माण झाले आहेत, लेखणीला सुद्धा कागदावर चिरभडायला खूप उत आला होता! परंतु शीतचंद्रलोक सोसायटीत ताजे गुलाब फुलतात कसे याचं रहस्य मात्र त्याच दिवशी उलगडले जाणार आहे. हे पुष्प ही तेवढेच सुंदर आणि देखणे असेल.


Friday 14 February 2020

लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची



एक लहान मुलगी, शीतचंद्रलोक मध्ये आपल्या समोर लहानाची मोठी झाली. शाळेत जाता जाता खेळली, बागडली, हसली, फुलासारखी दरवळली. निसर्ग आपली रूपे कळू देत नाही ते खरेच आहे, त्याप्रमाणे दारातली कोमल वेल कधी वाढली हे कोणाच्या लक्षात आलेच नाही. नेहमी फुलांच्या कळीसारखा खुललेल्या तिच्या चेहऱ्यावर आज मात्र, वसंत ऋतूत झाडांना पालवी फूटावी तसं तेज तिच्या चेहऱ्यावर बहरलं होतं. काल पावेतो पोरसवदा होतीस. पी हळद आणि हो गोरी ही म्हण सुद्धा तिच्या पुढे फिकी वाटते, ती म्हणजे तीच तिच्या बापाची एकुलती एक लाडकी लेक "जागृती"आज रोजी १४ फेब्रुवारी 2020 ला तिला लग्नाची हळद लागतांना तिच्या वडिलांच्या गालावर आनंदाश्रू ओघळलेत.

शीतचंद्रलोकमधील सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकारिणी अधिकाऱ्यांनी लहान मुले मुली यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला आणि त्यांच्यासाठी शीतचंद्रलोक सांस्कृतिक  कला मंच असा भव्य  प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. याच प्लॅटफॉर्मवर जागृतीचा अभिनय फुलला आणि पुढे तिने कॉलेजमध्ये सुद्धा आपल्यातले कलागुण जोपासलेत.

स्त्रीला तिचं माहेर म्हणजे भूतलावरचं नंदनवंन वाटतं असतं. सासरी एक वेळेस मोरपीस गालावर खरचटल्यासारखे वाटेल पण माहेरचा वारा तिच्या मुलायम मनात इतका गारवा निर्माण करतो की, तेंव्हा तिला स्वर्गीय आभास निर्माण होत असतो. शीतचंद्रलोक असंच भूतलावरचं नंदनवनच आहे. काल शीतचंद्रलोक मध्ये "मी जाते माझ्या गांवा माझ्या, अंगाला हळद लावा" या क्षणाला  तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तसेच शीतचंद्रलोक मधील तर तरुणी आणि विशेष शीतचंद्रलोक सख्यांनी मंडपात हजेरी लावली. तरुण, तरुणी आणि शीतचंद्रलोक सख्यांनी मुझिकच्या तालावर नृत्य केले. हा सोहळा बराच उशिरापर्यंत चालू होता. त्यानंतर जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. एक लेक शीतचंद्रलोक मधून सासरी जाईल तेंव्हा शीतचंद्रलोक सख्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू असतील हे सांगायला नको.

"झाडाने  एका कळीला उमलतांना पाहिलं, आणि बघता बघता कळीचं फुलात कधी रूपांतर झालं ते कळलंच नाही"

Friday 7 February 2020

केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर


वाऱ्याचा मागमूस नसतांना मोगऱ्याचा सुगंध कसा चौफेर दरवळतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी काल शीतचंद्रलोक सोसायटीत आलेल्या खास पाहुण्यांचं आणि शीतचंद्रलोक कुटुंबियांचं मन गहिवरून आलं होतं. आतापर्यंत बऱ्याच कवी लेखकांनी या विषयावर विपुल लिखाण केले असेल कदाचित, परंतु परमेश्वराने सारी कल्पकता वापरून स्त्री साठी जसं सुंदर माहेर निर्माण केलं तसं जोडीला एक सुंदर सासर ही निर्माण केलं पाहिजे असं त्याला कोडं पडलं असेल, म्हणजे लेखिका कुसुमताई देशपांडेंच्या भाषेत *आहे मनोहर तरी..."असावं. असा प्रत्यक्ष प्रत्यय काल साजरा झालेल्या त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या दिनी सौ समता आणि श्रीयुत पावसकर यांची पंचवीस वर्षाच्या आयुष्याची पाने उलगडून दाखविण्यात आलीत.

आकाशाहून विशाल असे अंतःकरण आणि समुद्राहून खोल असे सौंदर्य असलेली जोडी म्हणजे आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीत वास्तव्यात असलेले सौ समता आणि श्रीयुत जगन्नाथ पावस्कर यांचा आज रोजी सहा तारखेला त्यांच्या पंचविसवा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. या कार्यक्रमात सौ समता यांच्या सासर आणि माहेरच्या मंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती. सौ समता यांच्या नणंद, त्यांचे मामा, त्यांची बहीण ही आप्तेष्ट दूर गांवावरून येऊन कार्यक्रमात उपस्थिती राहिलीत, तसेच त्यांच्या ऑफिसमधील वरिष्ठ आणि स्टाफ आवर्जून उपस्थित होते. सौ समता पावसकर जेंव्हा मनोगत व्यक्त करतांना पोडीयम समोर आल्या तेंव्हा त्यांना काहीसे आनंदाने गहिवरून आले. सर्वांचीची नांवे घेतांना त्यांची दमछाक झाली. निमंत्रण पत्रिका सर्वांनाच पाठविल्या गेल्या नाहीत, काहींनी तर स्वतः कार्यक्रमाला येण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु मी सर्व काही मॅनेज करू शकले नाही, हे त्यांनी स्नेहभरीत दाटून आलेल्या अंतकरणाने कबूल केले. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, शीतचंद्रलोक कुटुंबीय आणि त्यांचे दोन्ही परिवाराचं अतूट प्रेम बघून श्रीयुत पावस्कर साहेबांना तर कोणते विचार आधी प्रगट करू आणि प्रथम कोणाचे आभार मानू असे झाले होते. शेवटी त्यांच्या संवेदनशील मनाला शब्द पेलवेनासे झाले. ज्या वेळेस मन अति संवेदनशील होते त्यावेळेस भावनांना फुलायला चांगलं अंगण मिळतं, परंतु त्या अंगणात शुभेच्छां देणाऱ्यां मंडळींनी आधीच कब्जा करून घेतला होता.

समारंभाच्या स्वागतोत्सुक सौ गावडे, सौ भुवड आणि सौ सनगरे यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. शीतचंद्रलोकचा मंच रंगीबेरंगी विशिष्ट फुग्यांनी सजविला होता, सुरुवातीला सौ प्राची भोईर यांनी त्यांच्या मृदू आवाजात सूत्रसंचलन केले. पाठीमागे सौ समता आणि जगन्नाथ यांच्या २५ व्या लग्नाचा वाढ दिवस 25 th wedding anniversary Samata & Jagannath असा सोनेरी अक्षरांनी लिहिलेला बॅनर आपलं लक्ष वेधून घेत होता. हवेत काहीसा गारवा जाणवत होता स्टेजच्या मध्यभागी सजविलेल्या सोफ्यावर सौ समता आणि श्रीयुत जगन्नाथ पावस्कर स्थानापन्न होऊन लक्ष्मी नारायणाची जोडी शोभून दिसत होती. दीप प्रज्वलन झाले. सौ समता आणि श्रीयुत जगन्नाथ पावसकर यांना त्यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरघोस शुभेच्छा देण्यात आल्या.

वर चांदणे आकाशाला गुदगुल्या करीत होत्या आणि शीतचंद्रलोकच्या भूतलावर केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर या गाण्याने वातावरण धुंद झाले. आणि एकापेक्षा एक गाण्यांची महफील सादर करत कलाकारांनी अशी गाणी निवडली होती की पाहुणे आणि प्रेक्षक मंडळी जणू सौ समता आणि जगन्नाथ पावसकरांचा जीवनपटच बघत आहेत !


लाजून हसणे लाजून पाहणे, मी ओळखून आहे तुझे बहाणे

स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी

दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन

हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा

माझे राणी, माझे मोगा

केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर

मेंदीच्या पानांवर मन अजुन झुलते गं

जीवनात ही घडी अशीच राहू दे

जसजशी एकएक गाणी सुरेल आवाजात गायली गेलीत, जणू काय समता आणि पावसकर या चित्रपटाचा फ्लॅशबॅक चालू होता.

शालू हिरवा पाच नि मरवा वेणि तिपेडी घाला । सजिणी बाई, येणार साजण माझा ! सौ गौरी गोठीवरेकर यांनी हे आवडीचं गाणं त्यांचा आवाज बसलेला असतांना गाऊन त्यांनी दिवाळी पहाट च्या स्मृती जाग्या केल्यात.

एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. सौ शोभा गावडे यांनी हे गाणं एवढ्या सुंदर रीतीने सादर केलं की, त्यांना ते गाणं गाण्यासाठी पुन्हा आग्रह करण्यात आला. हे गाणं चालू असतांना सौ.समता पावसकारांच्या मुद्रा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासारख्या होत्या, परंतु निर्दोष कॅमेऱ्यांचा काय दोष ! की त्यावेळचा क्षण त्यांना टिपता आला नाही.

गाण्यांच्या सूत्रसंचालन करणाऱ्यांचं नांव जरी मी विसरलो असलो, परंतु त्यांनी गायलेलं "केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर" या गाण्यातच कार्यक्रमाचं निळं अथांग आभाळ सामावलेलं दिसलं.

श्रीयुत महेश पोंक्षे साहेबांचं मनोगत हे श्रीयुत पावस्करांच्या प्रति प्रेमाचं प्रतीक होतं तर श्रीयुत कांडके सरांनी अचानक कविता सादर करून एक सुखद धक्काच दिला. या कवितेत त्यांनी सौ समता आणि श्रीयुत पावसकर यांच्या आयुष्याची सुंदर वीण  गुंफली होती. तर सलग ३५ वर्षाचा मित्र सहवास या त्यांच्या मित्रांनी केलेल्या हळव्या आणि स्नेही निवेदनावर पाहुण्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यात.

नटून थटून आलेल्या शीतचंद्रलोक सख्यांनी दोघांचं औक्षण केलं आणि वयाच्या 79 वर्षी जगन्नाथ पावस्करांच्या वडिलांचा वाढ दिवस याच दिवशी येतो. किती शुभ दिवस आणि शुभ घडी होती म्हणून "जीवनात ही घडी अशीच राहू दे" या शेवटच्या गाण्यावर या दोघांच्या आयुष्याचं रेशमी वस्त्र फुललं आणि त्या वस्त्राला वेदांग रूपी जरी काठ लाभला.

सौ समता आणि जगन्नाथ पावसकर यांनी बाशिंग बांधलेलं फोटोज डॉक्युमेंटरी प्रोजेक्टर द्वारे प्रदर्शित करण्यात आली तेंव्हा जमलेले पाहुणे, आप्तेष्ट, मित्रमंडळी, शीतचंद्रलोक कुटुंबीय यांची मने आदराने फुलून गेली. शांता ज. शेळके आपल्या पुस्तकात एके ठिकाणी लिहितात, आयुष्याच्या फिरत्या चाकावर कुशल बोटाखाली दबणारी, समर्पणशील माती जेंव्हा मनाप्रमाणे आकार घेते तेंव्हा त्यांनी आयुष्याचा एक टप्पा यशस्वीपणे पार पडलेला असतो. म्हणून तर आज आपण सगळे जण सौ समता आणि श्रीयुत पावसकर यांच्या लग्नाच्या वर्धापन दिनी एकत्र जमलो आहोत. आयुष्य भरभरून जगणे यालाच तर जीवन म्हणतात.

महाराष्ट्राच्या संस्कृतीत पुराण पोळीच्या जेवणाला खूप महत्त्व आहे, पुरणपोळीची कीर्ती सात समुद्रापालिकडे सुद्धा गेली आहे. आणि आजचा जेवणाचा मेनू देखील सौ समता व जगन्नाथ पावसकर यांनी तोच निवडला होता. एका बाजूला फोटोग्राफीला उधाण आलं होतं तर दुसऱ्या बाजूला शीतचंद्रलोक सोसायटीच्या आवारात पुरणपोळीचा स्वाद घेणं चालू होता.

खरं सांगू का, आम्ही गुलाबाची फुले नाही आहोत हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. परंतु श्रीयुत पावस्कर आणि त्यांच्या सारख्या सोसायटीतील अनेकांची संगत आम्हाला तुमच्या आशीर्वादाने खूप छान लाभली आहे.

खूप खूप धन्यवाद

(सौ.समता आणि जगन्नाथ पावस्कर यांचे दोन्ही कुटुंबियातील सभासद, त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र, वरिष्ठ अधिकारी, स्टाफ, कलाकार, सुत्रसंचालीका यांची नांवे माहीत नसल्यामुळे किंवा कार्यक्रम चालू असतांना त्यांचा नावांचा उल्लेख होत असतांना माझ्या अनवधनापणामुळे मी त्यांची नांवे विसरलो. म्हणून माझ्याकडून त्यांचा उल्लेख होऊ शकला नाही, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो.)

Saturday 1 February 2020

शीतचंद्रलोक शेकोटी 2020

देवदूत आपल्या कक्षेत देवांची वाट बघत हेरझारा घालत होता. तेवढ्यात देवांचं आगमन झाले.  "देवा देवा जरा खाली बघा भूतलावर कसला धूर येत आहे आणि काय ठसका सुटला आहे बाबा! हे पृथ्वीवरचे लोक काय उद्योग करतील त्याचा नेम नाही. मला तर खूप काहीसं बोलावसं वाटतंय देवा या लोकांबद्दल. देवदूता जेथून धूर येत आहे तेथे बाजूला भिंतीच्या कडेला एक बोर्ड पण लावला आहे. "झाडे लावा झाडे जगवा, निसर्ग हाच देव आहे". जरा थांब, आपल्या घरात सुद्धा अन्न शिजवले जातेस ना, आणि तू पुरणाची पोळी खाल्ली आहेस का कधी". "हो देवा, प्रत्येक सणाला पुरणपोळीचा नैवैद्य येत असतो आपल्याला". "हो, हे झालं गोड. ज्या सोसायटीत झाडे लावा झाडे जगवा, हा बोर्ड लावला आहे ना तेथेच वांग्याचं भरीत आणि हिरव्यागार मिरचीचा ठेचा चा खमंग सुटणार आहे आज". "चांदणं ढगाआड जरी लपलं असलं तरी शीतचंद्रलोक मध्ये चंद्र उगवतोच". "पण देवा किती प्रेम आहे तुमचं त्यांच्यावर, अजब लीला आहे तुमची, मी नतमस्तक होतो". "देवदूता, निसर्गातील हवा, फळे, फुले, भाजीपाला, धान्य, नद्या, पर्वत, समुद्र हे मीच बनविले आहे, परंतु भरीत आणि ठेचा हा उपहार त्यांनी बनविला आहे. चल तर खाली भूतलावर जावू, शीतचंद्रलोक मध्ये हा झणझणीत उपहार कसा बनवितात त्याची लगभग बघू या, परंतु सूर्यास्ताच्या आत आपल्याला स्वर्गात वापस यायला हवे ! 🍓

आणि काळ्या रंगाची कार शीतचंद्रलोक सोसायटीच्या गेट मधून सकाळी सक्काळी करिबी पावणे सातच्या सुमारास सुसाट वेगाने बाहेर पडली. एवढ्या सकाळी, आतमध्ये तीन चार लेडीज आणि एक गोऱ्या रंगाचे साहेब कार भरधाव वेगाने चालवत कुठे चालले होते हे सर्वजण !  सर्वच काही अनाकलनीय होते. सॅटेलाईट वरून या कारचे रूट डायरेक्शन्स टिपले जात होते का नाही, हे माहीत नाही परंतु सस्पेन्स वाढतच चाललाय ! गाडी चालविणारे कोण होते माहीत आहे तुम्हाला, आपले "सी झिरो झिरो टू" मध्ये राहणारे श्रीयुत गाडगीळ साहेब. यांना मोठा कमालीचा सोस, यांना अशी प्रचंड उठाठेव करण्याची आवड. ही आवड नव्हे तर देवाने त्यांना देणगीच दिलेली आहे. जेंव्हा पासून शेकोटी नांवाचा कार्यक्रम उदयास आला त्या वर्षांपासून आजतागायत हे साहेब आपलं शंभर टक्के योगदान देतात. आणि गाडी कल्याणच्या भाजी मार्केटला येऊन थडकली. शीतचंद्रलोक सख्या म्हणजे सौ. गाडगीळ, सौ. गावडे, सरिता आणि सौ. चव्हाण गाडीतून उतरून टोम्याटो, गाजर, मुळा, वांगी, मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, आलं, लसूण इत्यादी इत्यादी घेतल्यानंतर त्याच रुटने, त्याच स्पीडने, शेकोटी साठी लागणारी सामुग्री घेवून साडेनऊच्या आत घरी सही सलामत वापस. ग्रुप आणि टीम वर्क काय सुंदर असत ना ते हेच.

ओबडधोबड शेंगदाणा आणि लसूण कुटून झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर नुसता जीव कासावीस होतो. कपाळावरच्या नसा तड तड उडायला लागतात. आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीतील सख्या यांच्या शेकोटीच्या भरीत भाकरीच्या पार्टीत सर्व पुरुष लहानथोर मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. पुरुष मंडळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणी एकमेकांशी ब्र शब्द बोलेल तेंव्हा ना ! सर्वकाही चिडीचूप तोंडातल्या तोंडात मिटक्या मारत चाललेलं असत. ठेचा म्हटल्यानंतर कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही अस होणारच नाही.

"देवदूता बघितलं, किती जय्यत तयारी चालू होती. आता खरी मजा संध्याकाळीच येणार आहे. कारण या शेकोटी कार्यक्रमात शीतचंद्रलोक कुटुंबीय मांडीला मांडी लावून पंक्तीत जेवतील, आज कोणीही घरी स्वयंपाक करणार नाही, आहे की नाही गम्मत"

"पण देवा, काल मी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर लोकल गाडीची वाट बघत उभ्या असलेल्या दोन मैत्रिणींचं एकमेकातलं संभाषण ऐकलं, आणि त्या सुद्धा याच विषयावर बोलत होत्या. त्यातली एक जण काकुळतीला येवून म्हणत होती की "अगं माझ्या नवऱ्याच सध्या माझ्याकडे अजिबात लक्ष नसतं ! मी मेले फक्त त्याची सावली बनून राहते. त्याची सावली कधी फुटपाथवर पडते तर कधी गटारीवर, याच त्याला काही सुख दुःख नसतं गं, पण असं जगण्याला पण काही अर्थ आहे की नाही ! मी मेलेेआपल सुख दुःख हौस मौस त्याच्या जवळ बोलायला गेली ना बस तो एकच सांगतो, आईला सांग. नेहमी आई आई आई. हो मी पण आई आहे. पण काही क्षण बायकोसाठी सुद्धा राखून ठेवायचे असतात. पण नाही माझं नशीबच फुटकं मेलं ! दुसरी म्हणते, तुझ्यापेक्षा मी सुद्धा निराळ्या जगात जगते असं नाही. घरोघरी मातीच्याच चुली असतात गंं. या नवरे मंडळींना स्वयंपाक घरातली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजूला सारून चक्क लोखंडाच्या खोलगट तुळई मध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून व लोखंडाच्याच मुसळीने ठेचा करतात ना तसा तुडवला पाहिजे. पण त्याला पण आता नाईलाज आहे कारण आता लोखंडाचा खलबत्ता आणि मुसळ हद्दपार झाली आहे आणि त्याची जागी आता इलेक्ट्रॉनिक उपकरण मिक्सरने घेतली आहे. मी लहानपणी बघितलं आहे आमची वहिनी घरातली जुनी अडगळ जेंव्हा भंगारात देत असे तेव्हा त्यांनी खलबत्ता मुसळ काढून घेऊन घरात लपवून ठेवला होता."

"देवा बघितलं, तिच्या मंत्रिणीच्या वहिनीसाहेबांनी खलबत्ता मुसळ मोडीत काढला नव्हता, कदाचित तिने तिच्याच  दुःखाच्या भावना खलबत्ता-मुसळ रूपी जपून ठेवल्या असतील का!".  "देवदूता, स्त्रीला रागवतांना तू बघितले असशील परंतु ती चिडलेली मी अजून तरी बघितली नाही. जसा तिला राग येतो तसा त्या रागावर कंट्रोल येण्यासाठी मी तिला सयंमशील असा मौल्यवान गुण प्रदान केलेला आहे. म्हणून तर मानवाचं संसाराचं रहाट गाडगं अखंडपणे व्यवस्थित पणे चालू आहे. स्त्रीयांनी संपूर्ण राग ठेचा बनविण्यात घालविला असं कधी ऐकण्यातही आलेलं नाही किंवा असली कोर्ट मॅटर सुद्धा ऐकवण्यात येत नाही. हे सर्व मनाचे खेळ आहेत  म्हणूनच तर ठेच्याला खमंग चव आहे."


हे वाचून आमचे मित्र गावडे साहेबांना राक्षसी आनंद होणार नाही असं कधी होणारच नाही. कारण ते मला सभ्य गृहस्थ समजून बसले आहेत. कारण मागच्या वेळेस त्यांनी मला काळजी पोटी विचारले. उद्या जेवणाच काय ! लगेच त्यांनी मला चिमटा काढलाच, हो उद्या सिद्धेश यांच्याकडे शास्त्री हॉलला बर्थ डे पार्टी आहे, तुमचं उद्याचं भागलं! म्हणून ते मला चिमटे जरूर काढतील आणि म्हणतील काय राव वर्षातून एक वेळा शेकोटीचा ठेचा खायला मिळतो ! त्याच्यावर पण लिखाण राजकारण !! हाच विषय सापडला का तुम्हाला खरडायला. सुखासुखी मिळतंय ना राव, खाऊ द्या ¡ सुखाचा शोध घेता घेता ठेचा चा शोध कधी लागला असावा ते पुढच्या शेकोटी कार्यक्रमा पर्यंत गावडे साहेबांच्या सांगण्यावरून स्थगित. तो पर्यंत वांग्याचं भरीत आणि खमंग ठेचा खायला, शीतचंद्रलोक आपलोच असा.

Wednesday 1 January 2020

देवा कुठे आहेरे तुझी सोन्याची जेजुरी

सगळ्याच नेत्यांच्या कुटुंबीयांनी समाज सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे !

उद्धव ठाकरे मुख्य मंत्री तर त्यांचं कुक्कुलं बाळ कॅबिनेट मंत्री,
सध्या जामीनवर सुटकेले छगन भुजबळ चक्क सामाजिक न्याय मंत्री तर, 34 दिवसात अजित पवार हे दोन निरनिराळ्या सरकारात दोन वेळा उपमुख्यमंत्री.