Friday 9 August 2019

पावसाळे काय बेडूक देखील पाहतात, पिके मात्र शेतकरीच घेतो

जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा असलेले कलम 370 शी सहमती किंवा असहमती याचं अज्ञानाबद्दल आपण एक वेळ समजू शकतो. परंतु ज्यांनी साठ वर्षे सत्तेत राहून जनतेची दिशाभूल केली असे जेंव्हा जम्मू आणि काश्मीर मधील स्थानिक लोकांना समजेल त्यावेळेस ते त्यांना कदाचित माफ करणार नाहीत. मोदींनी हिंमत दाखवून, काश्मीरी जनतेला, देशाला आणि जगाला, पटवून दिलं की अनुच्छेद 370 मुळे जम्मू काश्मीरचा विकास कसा रोडावला, शिक्षण, आरोग्य सुविधा, नोकऱ्या यापासून काश्मिरी जनता वंचित कशी राहिली, भ्रष्टाचार,आतंगवाद आणि अलगावावाद ला बढावा कसा मिळाला. साठ वर्षे सत्तेवर राहून 370 या कलम हटविण्याबद्दल काँग्रेसने का प्रयत्न केले नाहीत, या सत्तर वर्षात बेचाळीस हजार लोक मृत्यू पावलेत आणि आता वेळ आली तरी काँग्रेस विरोधच दर्शवित आहे. हे देशाचं दुर्भाग्यच आहे. आंब्याचं झाड लावायचं यांच्या संस्कृतीत रुजलेच नाही. झाड लावल्यानंतर त्याची फळे आपल्याला उपभोगता येणार नाहीत हे माहीत असून सुद्धा मोदींनी प्रथम देशहिताला प्राध्यान्य दिलं, तरी सुद्धा काही बरेच मंडळी आपलं देशहित लक्षात न घेता आपल्याच जमिनीवर राहून आपल्याच ताटातील खाऊन देशाहितला विरोध दर्शवित आहेत. कोणी वैयक्तिक स्थरावर तर काही आपल्या पक्षाच्या खिडकीतून, मोदी हे केवळ पंतप्रधान आहेत म्हणून कायम स्वरूपाचा त्या व्यक्तीला विरोध करता करता देशाला विरोध करतांना दिसत आहेत. हे ते सारासार आपल्या भाकरीला विसरलेले लोक आहेत. यांना निंबाचा पाल्याचा काढा द्या किंवा, कारल्याचा कडू रस पाजा, यांच्या प्रकृतीत काही फरक पडतांना दिसत नाही. आपल्या समोर हे बेधडक विरोध दर्शवित असतांना आपण सर्वसामान्य जनता सहज विचार करतो की याना देशहित माहीत आहे की नाही आणि आपण मनात हळहळल्याशिवाय मात्र काहीच करू शकत नाहीत. रंगभूमीवर नाटकाचा सप्तरंगी पडदा उघडल्यानंतर यांना स्मशान भूमीच नजरेस पडते. आरश्यापुढे उभे राहून आपण किती कुरूप दिसतो याची त्यांना कल्पनाच येत नाही कारण त्यांना आरसाच कुरूप वाटायला लागलेला असतो. यांच्यात पारंपारिक विरोध करणारे पक्ष, सभासद, बुद्धिवंत, विचारवंत, कलावंत आणि काही मीडियावाले सुद्धा सामील असतात. शेतकरी आपल्या कोठीत अमृततुल्य धान्याचा साठा भरून ठेवतो त्या धान्यात प्रचंड प्रमाणात धनूर नांवाची बारीक कीड कालांतराने लागते. ती किड त्या धान्यात एकदम सुरक्षित राहू शकते परंतु ती कीड सर्वच दाणे पोखरून टाकते आणि धान्याची वाट लागते तशी कीड आपल्या भारतीय राजकारणात विकृत पद्धतीने फैलावलेली आहे. याचाच फायदा आपला शत्रू राष्ट्र पाकिस्तान सर्रास उचलत असतो. साठ वर्षे सत्तेत राहून काँग्रेसला स्वार्थ सोडून देशहीत साधता आले नाही आणि अजूनही तोच कित्ता ते गिरवीत आहेत. मोदींनी सहा वर्षाच्या आत 370 कलम हटवून हा कलंक धुवून काढला आणि इतिहासात सुवर्ण अक्षरांनी त्याची नोंद झाली. वी.स.खांडेकर आपल्या "वायूलहरी" या पुस्तकात मोठ्या मिश्कीलपणे नमूद करतात की, पावसाळे काय बेडूक देखील पाहतात, पिके मात्र शेतकरीच घेतो !

Friday 2 August 2019

सुडासाठी दीर्घ प्रतीक्षा - जालियनवाला बाग

जालियनवाला बागेत १९१९ मध्ये झालेले हत्याकांड म्हणजे इंग्रजांनी स्वातंत्र्यप्रेमी भारतीयांवर केलेला क्रूर अत्याचाराचा रक्तरंजित इतिहास होय. शेकडो निरपराध भारतीयांची कत्तल करणाऱ्या "डायरचा" इंग्रजांसोबत काही देशद्रोही भारतीयांनी सुद्धा गौरव केला होता. आणि ह्याच जनरल डायरला फूस होती ती पंजाबचा गव्हर्नर असणाऱ्या त्या "मायकेल ओडवायर"ची. असाच एक संतप्त तरुण जळत होता. त्याचा पिता व मानलेला भाऊ जालियनवाला बागेत शहीद झाले होते. त्याच वेळी त्याने मनोमन सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. अतिशय हुशार असणारा तो तरुण इंजिनियर झाला. दरम्यानच्या काळात ओडवायर निवृत्त होवून इंग्लंडला स्थायिक झाला होता. ती संतप्त व्यक्ती सुद्धा आपली पंजाबमधील सारी मालमत्ता विकून इंग्लंडमध्ये स्थायिक झाली. तिथे त्याने ओडवायरला शोधून काढले. त्याच्याशी परिचय केला. परिचय एवढा वाढविला की, एकदा ओडवायरने त्याला चक्क चहापानासाठी निमंत्रीतही केले होते. मात्र तो योग्य वेळेची वाट पाहत होता. तशी वेळ चालून आली ती १९४० मध्ये, म्हणजे तब्बल २१ वर्षांनीं. एका सार्वजनिक कार्यक्रमास ओडवायर उपस्थित राहणार असल्याचे कळताच ती संतप्त आगीने पछाडलेली व्यक्ती म्हणजे "उधमसिंह" तेथे पोहचला आणि तब्बल २१ वर्षांनी त्याने सूड घेतांना  ओडवायरला गोळ्या घातल्या.

अशा या भारताच्या वीर पुत्राला शत शत नमन

वृत्तपत्र जीर्ण कात्रण