Friday 14 February 2020

लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची



एक लहान मुलगी, शीतचंद्रलोक मध्ये आपल्या समोर लहानाची मोठी झाली. शाळेत जाता जाता खेळली, बागडली, हसली, फुलासारखी दरवळली. निसर्ग आपली रूपे कळू देत नाही ते खरेच आहे, त्याप्रमाणे दारातली कोमल वेल कधी वाढली हे कोणाच्या लक्षात आलेच नाही. नेहमी फुलांच्या कळीसारखा खुललेल्या तिच्या चेहऱ्यावर आज मात्र, वसंत ऋतूत झाडांना पालवी फूटावी तसं तेज तिच्या चेहऱ्यावर बहरलं होतं. काल पावेतो पोरसवदा होतीस. पी हळद आणि हो गोरी ही म्हण सुद्धा तिच्या पुढे फिकी वाटते, ती म्हणजे तीच तिच्या बापाची एकुलती एक लाडकी लेक "जागृती"आज रोजी १४ फेब्रुवारी 2020 ला तिला लग्नाची हळद लागतांना तिच्या वडिलांच्या गालावर आनंदाश्रू ओघळलेत.

शीतचंद्रलोकमधील सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकारिणी अधिकाऱ्यांनी लहान मुले मुली यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला आणि त्यांच्यासाठी शीतचंद्रलोक सांस्कृतिक  कला मंच असा भव्य  प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. याच प्लॅटफॉर्मवर जागृतीचा अभिनय फुलला आणि पुढे तिने कॉलेजमध्ये सुद्धा आपल्यातले कलागुण जोपासलेत.

स्त्रीला तिचं माहेर म्हणजे भूतलावरचं नंदनवंन वाटतं असतं. सासरी एक वेळेस मोरपीस गालावर खरचटल्यासारखे वाटेल पण माहेरचा वारा तिच्या मुलायम मनात इतका गारवा निर्माण करतो की, तेंव्हा तिला स्वर्गीय आभास निर्माण होत असतो. शीतचंद्रलोक असंच भूतलावरचं नंदनवनच आहे. काल शीतचंद्रलोक मध्ये "मी जाते माझ्या गांवा माझ्या, अंगाला हळद लावा" या क्षणाला  तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तसेच शीतचंद्रलोक मधील तर तरुणी आणि विशेष शीतचंद्रलोक सख्यांनी मंडपात हजेरी लावली. तरुण, तरुणी आणि शीतचंद्रलोक सख्यांनी मुझिकच्या तालावर नृत्य केले. हा सोहळा बराच उशिरापर्यंत चालू होता. त्यानंतर जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. एक लेक शीतचंद्रलोक मधून सासरी जाईल तेंव्हा शीतचंद्रलोक सख्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू असतील हे सांगायला नको.

"झाडाने  एका कळीला उमलतांना पाहिलं, आणि बघता बघता कळीचं फुलात कधी रूपांतर झालं ते कळलंच नाही"

Friday 7 February 2020

केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर


वाऱ्याचा मागमूस नसतांना मोगऱ्याचा सुगंध कसा चौफेर दरवळतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी काल शीतचंद्रलोक सोसायटीत आलेल्या खास पाहुण्यांचं आणि शीतचंद्रलोक कुटुंबियांचं मन गहिवरून आलं होतं. आतापर्यंत बऱ्याच कवी लेखकांनी या विषयावर विपुल लिखाण केले असेल कदाचित, परंतु परमेश्वराने सारी कल्पकता वापरून स्त्री साठी जसं सुंदर माहेर निर्माण केलं तसं जोडीला एक सुंदर सासर ही निर्माण केलं पाहिजे असं त्याला कोडं पडलं असेल, म्हणजे लेखिका कुसुमताई देशपांडेंच्या भाषेत *आहे मनोहर तरी..."असावं. असा प्रत्यक्ष प्रत्यय काल साजरा झालेल्या त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या दिनी सौ समता आणि श्रीयुत पावसकर यांची पंचवीस वर्षाच्या आयुष्याची पाने उलगडून दाखविण्यात आलीत.

आकाशाहून विशाल असे अंतःकरण आणि समुद्राहून खोल असे सौंदर्य असलेली जोडी म्हणजे आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीत वास्तव्यात असलेले सौ समता आणि श्रीयुत जगन्नाथ पावस्कर यांचा आज रोजी सहा तारखेला त्यांच्या पंचविसवा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. या कार्यक्रमात सौ समता यांच्या सासर आणि माहेरच्या मंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती. सौ समता यांच्या नणंद, त्यांचे मामा, त्यांची बहीण ही आप्तेष्ट दूर गांवावरून येऊन कार्यक्रमात उपस्थिती राहिलीत, तसेच त्यांच्या ऑफिसमधील वरिष्ठ आणि स्टाफ आवर्जून उपस्थित होते. सौ समता पावसकर जेंव्हा मनोगत व्यक्त करतांना पोडीयम समोर आल्या तेंव्हा त्यांना काहीसे आनंदाने गहिवरून आले. सर्वांचीची नांवे घेतांना त्यांची दमछाक झाली. निमंत्रण पत्रिका सर्वांनाच पाठविल्या गेल्या नाहीत, काहींनी तर स्वतः कार्यक्रमाला येण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु मी सर्व काही मॅनेज करू शकले नाही, हे त्यांनी स्नेहभरीत दाटून आलेल्या अंतकरणाने कबूल केले. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, शीतचंद्रलोक कुटुंबीय आणि त्यांचे दोन्ही परिवाराचं अतूट प्रेम बघून श्रीयुत पावस्कर साहेबांना तर कोणते विचार आधी प्रगट करू आणि प्रथम कोणाचे आभार मानू असे झाले होते. शेवटी त्यांच्या संवेदनशील मनाला शब्द पेलवेनासे झाले. ज्या वेळेस मन अति संवेदनशील होते त्यावेळेस भावनांना फुलायला चांगलं अंगण मिळतं, परंतु त्या अंगणात शुभेच्छां देणाऱ्यां मंडळींनी आधीच कब्जा करून घेतला होता.

समारंभाच्या स्वागतोत्सुक सौ गावडे, सौ भुवड आणि सौ सनगरे यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. शीतचंद्रलोकचा मंच रंगीबेरंगी विशिष्ट फुग्यांनी सजविला होता, सुरुवातीला सौ प्राची भोईर यांनी त्यांच्या मृदू आवाजात सूत्रसंचलन केले. पाठीमागे सौ समता आणि जगन्नाथ यांच्या २५ व्या लग्नाचा वाढ दिवस 25 th wedding anniversary Samata & Jagannath असा सोनेरी अक्षरांनी लिहिलेला बॅनर आपलं लक्ष वेधून घेत होता. हवेत काहीसा गारवा जाणवत होता स्टेजच्या मध्यभागी सजविलेल्या सोफ्यावर सौ समता आणि श्रीयुत जगन्नाथ पावस्कर स्थानापन्न होऊन लक्ष्मी नारायणाची जोडी शोभून दिसत होती. दीप प्रज्वलन झाले. सौ समता आणि श्रीयुत जगन्नाथ पावसकर यांना त्यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरघोस शुभेच्छा देण्यात आल्या.

वर चांदणे आकाशाला गुदगुल्या करीत होत्या आणि शीतचंद्रलोकच्या भूतलावर केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर या गाण्याने वातावरण धुंद झाले. आणि एकापेक्षा एक गाण्यांची महफील सादर करत कलाकारांनी अशी गाणी निवडली होती की पाहुणे आणि प्रेक्षक मंडळी जणू सौ समता आणि जगन्नाथ पावसकरांचा जीवनपटच बघत आहेत !


लाजून हसणे लाजून पाहणे, मी ओळखून आहे तुझे बहाणे

स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी

दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन

हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा

माझे राणी, माझे मोगा

केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर

मेंदीच्या पानांवर मन अजुन झुलते गं

जीवनात ही घडी अशीच राहू दे

जसजशी एकएक गाणी सुरेल आवाजात गायली गेलीत, जणू काय समता आणि पावसकर या चित्रपटाचा फ्लॅशबॅक चालू होता.

शालू हिरवा पाच नि मरवा वेणि तिपेडी घाला । सजिणी बाई, येणार साजण माझा ! सौ गौरी गोठीवरेकर यांनी हे आवडीचं गाणं त्यांचा आवाज बसलेला असतांना गाऊन त्यांनी दिवाळी पहाट च्या स्मृती जाग्या केल्यात.

एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. सौ शोभा गावडे यांनी हे गाणं एवढ्या सुंदर रीतीने सादर केलं की, त्यांना ते गाणं गाण्यासाठी पुन्हा आग्रह करण्यात आला. हे गाणं चालू असतांना सौ.समता पावसकारांच्या मुद्रा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासारख्या होत्या, परंतु निर्दोष कॅमेऱ्यांचा काय दोष ! की त्यावेळचा क्षण त्यांना टिपता आला नाही.

गाण्यांच्या सूत्रसंचालन करणाऱ्यांचं नांव जरी मी विसरलो असलो, परंतु त्यांनी गायलेलं "केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर" या गाण्यातच कार्यक्रमाचं निळं अथांग आभाळ सामावलेलं दिसलं.

श्रीयुत महेश पोंक्षे साहेबांचं मनोगत हे श्रीयुत पावस्करांच्या प्रति प्रेमाचं प्रतीक होतं तर श्रीयुत कांडके सरांनी अचानक कविता सादर करून एक सुखद धक्काच दिला. या कवितेत त्यांनी सौ समता आणि श्रीयुत पावसकर यांच्या आयुष्याची सुंदर वीण  गुंफली होती. तर सलग ३५ वर्षाचा मित्र सहवास या त्यांच्या मित्रांनी केलेल्या हळव्या आणि स्नेही निवेदनावर पाहुण्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यात.

नटून थटून आलेल्या शीतचंद्रलोक सख्यांनी दोघांचं औक्षण केलं आणि वयाच्या 79 वर्षी जगन्नाथ पावस्करांच्या वडिलांचा वाढ दिवस याच दिवशी येतो. किती शुभ दिवस आणि शुभ घडी होती म्हणून "जीवनात ही घडी अशीच राहू दे" या शेवटच्या गाण्यावर या दोघांच्या आयुष्याचं रेशमी वस्त्र फुललं आणि त्या वस्त्राला वेदांग रूपी जरी काठ लाभला.

सौ समता आणि जगन्नाथ पावसकर यांनी बाशिंग बांधलेलं फोटोज डॉक्युमेंटरी प्रोजेक्टर द्वारे प्रदर्शित करण्यात आली तेंव्हा जमलेले पाहुणे, आप्तेष्ट, मित्रमंडळी, शीतचंद्रलोक कुटुंबीय यांची मने आदराने फुलून गेली. शांता ज. शेळके आपल्या पुस्तकात एके ठिकाणी लिहितात, आयुष्याच्या फिरत्या चाकावर कुशल बोटाखाली दबणारी, समर्पणशील माती जेंव्हा मनाप्रमाणे आकार घेते तेंव्हा त्यांनी आयुष्याचा एक टप्पा यशस्वीपणे पार पडलेला असतो. म्हणून तर आज आपण सगळे जण सौ समता आणि श्रीयुत पावसकर यांच्या लग्नाच्या वर्धापन दिनी एकत्र जमलो आहोत. आयुष्य भरभरून जगणे यालाच तर जीवन म्हणतात.

महाराष्ट्राच्या संस्कृतीत पुराण पोळीच्या जेवणाला खूप महत्त्व आहे, पुरणपोळीची कीर्ती सात समुद्रापालिकडे सुद्धा गेली आहे. आणि आजचा जेवणाचा मेनू देखील सौ समता व जगन्नाथ पावसकर यांनी तोच निवडला होता. एका बाजूला फोटोग्राफीला उधाण आलं होतं तर दुसऱ्या बाजूला शीतचंद्रलोक सोसायटीच्या आवारात पुरणपोळीचा स्वाद घेणं चालू होता.

खरं सांगू का, आम्ही गुलाबाची फुले नाही आहोत हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. परंतु श्रीयुत पावस्कर आणि त्यांच्या सारख्या सोसायटीतील अनेकांची संगत आम्हाला तुमच्या आशीर्वादाने खूप छान लाभली आहे.

खूप खूप धन्यवाद

(सौ.समता आणि जगन्नाथ पावस्कर यांचे दोन्ही कुटुंबियातील सभासद, त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र, वरिष्ठ अधिकारी, स्टाफ, कलाकार, सुत्रसंचालीका यांची नांवे माहीत नसल्यामुळे किंवा कार्यक्रम चालू असतांना त्यांचा नावांचा उल्लेख होत असतांना माझ्या अनवधनापणामुळे मी त्यांची नांवे विसरलो. म्हणून माझ्याकडून त्यांचा उल्लेख होऊ शकला नाही, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो.)

Saturday 1 February 2020

शीतचंद्रलोक शेकोटी 2020

देवदूत आपल्या कक्षेत देवांची वाट बघत हेरझारा घालत होता. तेवढ्यात देवांचं आगमन झाले.  "देवा देवा जरा खाली बघा भूतलावर कसला धूर येत आहे आणि काय ठसका सुटला आहे बाबा! हे पृथ्वीवरचे लोक काय उद्योग करतील त्याचा नेम नाही. मला तर खूप काहीसं बोलावसं वाटतंय देवा या लोकांबद्दल. देवदूता जेथून धूर येत आहे तेथे बाजूला भिंतीच्या कडेला एक बोर्ड पण लावला आहे. "झाडे लावा झाडे जगवा, निसर्ग हाच देव आहे". जरा थांब, आपल्या घरात सुद्धा अन्न शिजवले जातेस ना, आणि तू पुरणाची पोळी खाल्ली आहेस का कधी". "हो देवा, प्रत्येक सणाला पुरणपोळीचा नैवैद्य येत असतो आपल्याला". "हो, हे झालं गोड. ज्या सोसायटीत झाडे लावा झाडे जगवा, हा बोर्ड लावला आहे ना तेथेच वांग्याचं भरीत आणि हिरव्यागार मिरचीचा ठेचा चा खमंग सुटणार आहे आज". "चांदणं ढगाआड जरी लपलं असलं तरी शीतचंद्रलोक मध्ये चंद्र उगवतोच". "पण देवा किती प्रेम आहे तुमचं त्यांच्यावर, अजब लीला आहे तुमची, मी नतमस्तक होतो". "देवदूता, निसर्गातील हवा, फळे, फुले, भाजीपाला, धान्य, नद्या, पर्वत, समुद्र हे मीच बनविले आहे, परंतु भरीत आणि ठेचा हा उपहार त्यांनी बनविला आहे. चल तर खाली भूतलावर जावू, शीतचंद्रलोक मध्ये हा झणझणीत उपहार कसा बनवितात त्याची लगभग बघू या, परंतु सूर्यास्ताच्या आत आपल्याला स्वर्गात वापस यायला हवे ! 🍓

आणि काळ्या रंगाची कार शीतचंद्रलोक सोसायटीच्या गेट मधून सकाळी सक्काळी करिबी पावणे सातच्या सुमारास सुसाट वेगाने बाहेर पडली. एवढ्या सकाळी, आतमध्ये तीन चार लेडीज आणि एक गोऱ्या रंगाचे साहेब कार भरधाव वेगाने चालवत कुठे चालले होते हे सर्वजण !  सर्वच काही अनाकलनीय होते. सॅटेलाईट वरून या कारचे रूट डायरेक्शन्स टिपले जात होते का नाही, हे माहीत नाही परंतु सस्पेन्स वाढतच चाललाय ! गाडी चालविणारे कोण होते माहीत आहे तुम्हाला, आपले "सी झिरो झिरो टू" मध्ये राहणारे श्रीयुत गाडगीळ साहेब. यांना मोठा कमालीचा सोस, यांना अशी प्रचंड उठाठेव करण्याची आवड. ही आवड नव्हे तर देवाने त्यांना देणगीच दिलेली आहे. जेंव्हा पासून शेकोटी नांवाचा कार्यक्रम उदयास आला त्या वर्षांपासून आजतागायत हे साहेब आपलं शंभर टक्के योगदान देतात. आणि गाडी कल्याणच्या भाजी मार्केटला येऊन थडकली. शीतचंद्रलोक सख्या म्हणजे सौ. गाडगीळ, सौ. गावडे, सरिता आणि सौ. चव्हाण गाडीतून उतरून टोम्याटो, गाजर, मुळा, वांगी, मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, आलं, लसूण इत्यादी इत्यादी घेतल्यानंतर त्याच रुटने, त्याच स्पीडने, शेकोटी साठी लागणारी सामुग्री घेवून साडेनऊच्या आत घरी सही सलामत वापस. ग्रुप आणि टीम वर्क काय सुंदर असत ना ते हेच.

ओबडधोबड शेंगदाणा आणि लसूण कुटून झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर नुसता जीव कासावीस होतो. कपाळावरच्या नसा तड तड उडायला लागतात. आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीतील सख्या यांच्या शेकोटीच्या भरीत भाकरीच्या पार्टीत सर्व पुरुष लहानथोर मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. पुरुष मंडळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणी एकमेकांशी ब्र शब्द बोलेल तेंव्हा ना ! सर्वकाही चिडीचूप तोंडातल्या तोंडात मिटक्या मारत चाललेलं असत. ठेचा म्हटल्यानंतर कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही अस होणारच नाही.

"देवदूता बघितलं, किती जय्यत तयारी चालू होती. आता खरी मजा संध्याकाळीच येणार आहे. कारण या शेकोटी कार्यक्रमात शीतचंद्रलोक कुटुंबीय मांडीला मांडी लावून पंक्तीत जेवतील, आज कोणीही घरी स्वयंपाक करणार नाही, आहे की नाही गम्मत"

"पण देवा, काल मी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर लोकल गाडीची वाट बघत उभ्या असलेल्या दोन मैत्रिणींचं एकमेकातलं संभाषण ऐकलं, आणि त्या सुद्धा याच विषयावर बोलत होत्या. त्यातली एक जण काकुळतीला येवून म्हणत होती की "अगं माझ्या नवऱ्याच सध्या माझ्याकडे अजिबात लक्ष नसतं ! मी मेले फक्त त्याची सावली बनून राहते. त्याची सावली कधी फुटपाथवर पडते तर कधी गटारीवर, याच त्याला काही सुख दुःख नसतं गं, पण असं जगण्याला पण काही अर्थ आहे की नाही ! मी मेलेेआपल सुख दुःख हौस मौस त्याच्या जवळ बोलायला गेली ना बस तो एकच सांगतो, आईला सांग. नेहमी आई आई आई. हो मी पण आई आहे. पण काही क्षण बायकोसाठी सुद्धा राखून ठेवायचे असतात. पण नाही माझं नशीबच फुटकं मेलं ! दुसरी म्हणते, तुझ्यापेक्षा मी सुद्धा निराळ्या जगात जगते असं नाही. घरोघरी मातीच्याच चुली असतात गंं. या नवरे मंडळींना स्वयंपाक घरातली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजूला सारून चक्क लोखंडाच्या खोलगट तुळई मध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून व लोखंडाच्याच मुसळीने ठेचा करतात ना तसा तुडवला पाहिजे. पण त्याला पण आता नाईलाज आहे कारण आता लोखंडाचा खलबत्ता आणि मुसळ हद्दपार झाली आहे आणि त्याची जागी आता इलेक्ट्रॉनिक उपकरण मिक्सरने घेतली आहे. मी लहानपणी बघितलं आहे आमची वहिनी घरातली जुनी अडगळ जेंव्हा भंगारात देत असे तेव्हा त्यांनी खलबत्ता मुसळ काढून घेऊन घरात लपवून ठेवला होता."

"देवा बघितलं, तिच्या मंत्रिणीच्या वहिनीसाहेबांनी खलबत्ता मुसळ मोडीत काढला नव्हता, कदाचित तिने तिच्याच  दुःखाच्या भावना खलबत्ता-मुसळ रूपी जपून ठेवल्या असतील का!".  "देवदूता, स्त्रीला रागवतांना तू बघितले असशील परंतु ती चिडलेली मी अजून तरी बघितली नाही. जसा तिला राग येतो तसा त्या रागावर कंट्रोल येण्यासाठी मी तिला सयंमशील असा मौल्यवान गुण प्रदान केलेला आहे. म्हणून तर मानवाचं संसाराचं रहाट गाडगं अखंडपणे व्यवस्थित पणे चालू आहे. स्त्रीयांनी संपूर्ण राग ठेचा बनविण्यात घालविला असं कधी ऐकण्यातही आलेलं नाही किंवा असली कोर्ट मॅटर सुद्धा ऐकवण्यात येत नाही. हे सर्व मनाचे खेळ आहेत  म्हणूनच तर ठेच्याला खमंग चव आहे."


हे वाचून आमचे मित्र गावडे साहेबांना राक्षसी आनंद होणार नाही असं कधी होणारच नाही. कारण ते मला सभ्य गृहस्थ समजून बसले आहेत. कारण मागच्या वेळेस त्यांनी मला काळजी पोटी विचारले. उद्या जेवणाच काय ! लगेच त्यांनी मला चिमटा काढलाच, हो उद्या सिद्धेश यांच्याकडे शास्त्री हॉलला बर्थ डे पार्टी आहे, तुमचं उद्याचं भागलं! म्हणून ते मला चिमटे जरूर काढतील आणि म्हणतील काय राव वर्षातून एक वेळा शेकोटीचा ठेचा खायला मिळतो ! त्याच्यावर पण लिखाण राजकारण !! हाच विषय सापडला का तुम्हाला खरडायला. सुखासुखी मिळतंय ना राव, खाऊ द्या ¡ सुखाचा शोध घेता घेता ठेचा चा शोध कधी लागला असावा ते पुढच्या शेकोटी कार्यक्रमा पर्यंत गावडे साहेबांच्या सांगण्यावरून स्थगित. तो पर्यंत वांग्याचं भरीत आणि खमंग ठेचा खायला, शीतचंद्रलोक आपलोच असा.