बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

मी स्वतः माझी गाणी ऐकते तेंव्हा -- लता मंगेशकर

 कवी फक्त काव्य करतो, पण त्याचा रसास्वाद घ्यायला मात्र पंडित लागतो, अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. कलेच्या बाबतीत अक्षरशः खरे आहे हे ! विशेषतः गाण्याबद्दल म्हणाल तर हे कोणालाही पटण्यासारखे आहे. गायक स्वतःला कितीही पट्टीचा समजो; त्याचा गाण्याचा श्रोत्यांना होणारा आनंद काही वेगळाच असतो. गाणाऱ्याला सुद्धा एक प्रकारचा आनंद असतो यात शंका नाही. पण एक गोष्ट केंव्हाही निश्चित , गवयाचा आनंद आणि श्रोत्यांचा आनंद हे काही वेगळेच !

यावरून कोणाचा असा समज होईल, की स्वतःची गाणी ऐकण्याचा माझा रोजचा कार्यक्रम असेल. पण गंमत अशी आहे की, प्रत्यक्ष गाण्यातच माझा इतका वेळ जातो, की स्वतःची गाणी ऐकायला खरच मला वेळ मिळत नाही. स्वतःचा लेख वाचायला लेखकाला काय वाटते, याची मला कल्पना नाही; पण एवढे मी स्वानुभवाने म्हणू शकते की चुकून वेळ मिळाला व स्वतःचे गाणे ऐकण्याचा प्रसंग आला, की मला तो अक्षरशः एक 'प्रसंग' वाटतो !

उदाहरणार्थ गाण्याचे रेकॉर्डिंग घ्या ना - तेंव्हापासून या आपत्तीची सुरुवात होते. प्लेबॅकच्या तालमीकरिता डिस्क रेकॉर्डही घेतली जाते. आणि आजकाल टेपरेकॉर्डिंग ही त्यात भरीला पडले आहे. त्यामुळे होते काय , की घेतलेले गाणे आपण ताबडतोब ऐकू शकतो. आणि तीच मला मोठी आपत्ती वाटते ! खोटे नाही, आपले गाणे ऐकण्याचा मला अजूनही धीर होत नाही ! कधी कधी तीन चार 'टेक्स' आम्ही घेतो. त्यापैकी कोणता 'टेक' ठेवायचा हे तरी ऐकावे लागतेच, पण अशा वेळीही हॉल मधून मी पळून जाते आणि रेकॉर्डिस्ट बसतो ना, त्या खोलीमधून ऐकणारांची तोंडे मी न्याहाळू लागते ! बहुधा सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधानच मला दिसते. मी बाहेर आल्यावर "शाब्बास, लता"! म्हणून कोणी माझी पाठ थोपटते. पण मी मात्र आतून थोडी - तरी नाराजच असते ! ........



(लता मंगेशकर लिखित ...."फुले वेचिता" या पुस्तकातून)

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

रक्षाबंधन

हॅलो बापू,

आज रक्षा बंधन आहे. तू पुण्याला आला आहेस का, निर्मलाकडे कासारवाडीला आला आहे का ? "नाही गं, मी इंद्रायणीने येत आहे, अकरा ते साडे अकराच्या सुमारास तुझ्याकडे पोहचतो आहे. तुझ्याकडे आल्यानंतर मी कासारवाडीला निर्मलाकडे जाईन. पण नऊ वाजले, दहा वाजले अजून पर्यंत तिचा फोन आलाच नाही !

आज पाच दिवस झालेत, ती आमच्यातून निघून गेली, तिला जगण्याची खूप इच्छा होती, 2019 मध्ये तिचे मेजर बायपास झाले होते, डॉक्टरांनी सुद्धा नाही सांगून दिले होते परंतु प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर तिने मात केली होती, मी देवाचे आभार मानले की त्याने माझ्या बहिणीला सही सलामत वापस पाठवून दिले होते, नंतर कोविडच्या दीर्घ काळात तीला कधीही ऍडमिट करायची वेळ आली नव्हती, देव तिच्या पाठीमागे उभा होता जणू. पण देवाने यावेळेस हाथ वर करून दिले. मी देवाला दोष देत नाही. देवाने तिला भरपूर आयुष्य दिले, तिच्या मुलासाठी आणि तिच्या मुलींसाठी जगण्याचं तिला सामर्थ्य दिले होते. वायसीएम हॉस्पिटलला ती व्हेंटिलेटर वर होती, डॉक्टरांनी सुद्धा पोझिशन क्रिटिकल आहे असे सांगितले. आमची चांगली समजूत झाली होती की आता बहिणीला एखादा चमत्कारच वाचवू शकेल! आणि काय सांगू.....पुन्हा ती प्रबळ शक्तीच्या सामर्थ्याने ती वापस आली. वायसीएमचे डॉक्टर कनोज सरांचे मी आभार मानले, माझे आनंद अश्रू मी त्यांच्या नजरेआड करू शकलो नाही. आणि त्यांनी सांगितले की थांबा परिस्थिती कधी गरम कधी नरम होवू शकते. तिचे किडनी फंक्शन आणि श्वसन क्रिया संस्था चांगल्या पद्धतीने काम करत नाहीत. परंतु बहीण चांगली बोलायला आणि ओळखायला लागली होती. माझी बहिण निर्मला आणि माझे तिच्यावर बारीक लक्ष होते. डॉक्टरांचा फोन आल्याबरोबर निर्मला हजर राहत होती, तिचा मुलगा प्रवीण (सचिन) हा कायम तिच्या आसपास राहून काळजी घेत होता. अमेरिकेत असलेल्या तिची मुलगी सोनी कॅन्टीन्यू संपर्कात होती. सर्व इथंभूत माहिती तिला पुरविली जात होती. तिला खूप काळजी होती पण ती खूप लांब होती. पण नियती आपले पत्ते शेवटपर्यंत उघडे करत नाही याचा थांगपत्ता आम्हाला लागला नाही. 

नंतर तिला आदित्य बिर्ला चिंचवड येथे तिला हलविण्यात आले. तत्पूर्वी अम्ब्युलन्स मध्ये तिने आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीशी व्हिडियो कॉल द्वारे संपर्क साधला. तीने आपल्या नातीशी देखील हितगुज केले. प्रविणला डॉक्टरानी बोलवून घेतले आणि परत तेच डायलॉग सांगितले की सीचव्हेशन क्रिटिकल आहे. प्रवीण आम्हाला वारंवार रिपीटेडली सांगत होता, आई वायसीम मध्ये पण क्रिटिकल होती आणि वापस आली होती, आणि आता इथेही क्रिटिकल आहे, इथेही वापस येईल. आणि तिला काही होणार नाही. तुम्ही उगीच घाबरू नका. जगाच्या पाठीवर कोणत्याही मुलाला असेच वाटते की आई मुलाला कधीच सोडून जावू शकत नाही. प्रवीण ची आईबद्दलची भोळी भाबडी समजूत कशी आणि कोण काढणार !

आणि मला त्या दिवशी डॉक्टरांचा सकाळी सकाळी फोन आला आणि मी थक्कच झालो, त्यांनी सांगितले की तुमचा पेशंट शशिकला जाधव यांचे हृदय बंद पडले होते, ते चालू करण्यात आले आहे आणि आता ती व्हेंटिलेटरवर आहे. मी त्यावेळेस मुंबई येथे आलो होतो, मी लगेच प्रविणला कळविले आणि आदित्य बिर्ला येथे जाण्यास सांगितले. निर्मला पण जाऊन आली. परिस्थिती नाजूक अवस्थेत होती. मी पु ण्याला पोहचलो आणि एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेतला, दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि हॉस्पिटलमध्येच थांबायला सांगितले. प्रविणला फोन करून मी बोलवून घेतले आणि त्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. बहिणीचा आयुष्याचा पलीकडचा किनारा दिसत होता. आणि देवाने काही तासांसाठी का होईना तिच्या पाठीमागे उभे राहायचे ठरविले होते. प्रवीण आईला भेण्यासाठी ICU मध्ये गेला खरा ! परंतु ..... परंतु डॉक्टरानी सांगितले तुमचं पेशंट शशिकला जाधव राहिल्या नाहीत. प्रविणला तेथेच रडू कोसळले. सर्वच संपले होते. सर्विकडे वाऱ्यासारखी बातमी पोहचली देखील. मामा हे असं कसं झालं ?, त्याने विचारलेल्या प्रश्नाचे मी उत्तर देऊ शकलो नाही. पाऊण तासानंतर पुढच्या हालचाली संबंधी डॉक्टरांना विचारण्यासाठी मी ICU मध्ये पोहचलो. आणि शशिकला जीवित असल्याचे त्यांनी सांगितले. देव असा कसा काय वागतोय हेच काही कळेना, दुःखाचा आघात कमजोर करण्यासाठी त्याने ही खेळी केली तर नसेन ! प्रवीणचं मन आनंदाने काठोकाठ भरून आलं आणि त्याने सांगितले आईला काहीच होणार नाही. हेच ते आदित्य बिर्ला हॉस्पिटल की जेथे 2019 मध्ये तिचं मेजर बायपास ऑपरेशन झालं होतं.

आमच्या मनाने पुन्हा एकदा झेप घेतली, आता ती जात नाही, तिचं संकट टळलंय !  आणि हो, पाच तासानंतर जे व्हायचं नव्हतं तेच झालं, देवाने दुःखाची त्रिव्रता कमी करून टाकली होती, आणि आम्ही ते स्वीकारलं होतं. आणि आम्ही ते स्वीकारलं होतं.

आयुष्याच्या अनेक चढ उतारांवर मी तिच्या सोबत होतो आणि एक दिवस तिला जायचं होतं. पुढच्या जन्मी फिरून जन्मेन मी तुला राखी बांधण्यासाठी पुन्हा येईन मी. 

परंतु नेहमी प्रमाणे येणारा तिचा फोन आज रक्षाबंधनाच्या दिवशी आलाच नाही !



रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१

भरीत भाकरी आणि ठेचा

शीतचंद्रलोक मध्ये वार्षिक श्रीसत्यनारायनाची पूजा आटोपल्यानंतर वेध लागतात ते शेकोटी अर्थातच भरीत भाकरीच्या पार्टीचं. वांग्याचं भरीत आणि ओबडधोबड शेंगदाणा आणि लसूण कुटून झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर त्याचा फडशा पाडण्यासाठी आपली जीभ आसुसलेली असते आणि तो आपल्या जिभेवर येईपर्यंत जीव नुसता कासावीस होतो. कपाळावरच्या नसा तड तड उडायला लागतात. म्हणून कालच्या दिवशी सोसायटीत शीतचंद्रलोक सख्यांनी बनविलेली भरीत पार्टी कशी झाली याच्याबद्दल काल कोणी चकार शब्द ही काढला नाही. त्याचं सस्पेन्स उलगडण्या अगोदर आपलं लक्ष वेधू इच्छितो की कोरोना काळात आपल्या ईथेच नव्हे तर संपूर्ण जगभरात कार्यक्रम बंद पडलेल्या अवस्थेत असतांना आपल्या सोसायटीतील महिला वर्गाने दरवर्षी नियमित येणाऱ्या भरीत भाकरीच्या पार्टीला खंड पडू दिला नाही त्यामुळे त्यांचे कोणत्या शब्दात कौतुक करावे हे तुम्हीच सुचवा. दुसरी गोष्ट म्हणजे कल्याणला जावून भाजीपाला आणण्यापासून, सकाळी पाण्याने स्टेज साफ कारण्यापासून ते भाजी चिरणे, निवडणे, लसूण, मिरच्या, शेंगदाणे कुटण्यापासून ते ठेचण्यापर्यंत,  बेसन भाकरी भरीत भात आणि चूल मांडून भाकऱ्या रांधण्यापर्यंत आणि ते पण हे मंडळ अजिबात न थकता रात्री साडे अकरा पर्यंत हा व्याप चालू होता ! श्रीयुत पोंक्षे साहेबांनी टाकलेली एक क्लिप बघितली, तर हे सर्व जण आपापली कामे करण्यात व्यस्त दिसत आहेत. कसलीही मिटिंग नाही, कोणताही कॉम्पुटयाराईज्ड प्रिप्लॅन नाही आणि कुठलाही गाजावाजा न करता सर्व काही व्यवस्थित पार पडलं आणि चक्क रात्री साडेआठ पर्यंत पहिला जेवणाचा मान पुरुष मंडळीला दिला. आणि शेवटी जे काही शिल्लक राहील त्याच्यात त्यांनी आपले जेवणे उरकलीत. हा एवढा आदरतिथ्य आणि मनाचा मोठेपणा जगाच्या पाठीवर केवळ आणि केवळ भारतीय स्त्री संस्कृतीतच आढळतो. कौतुकाची अपेक्षाही न बाळगणाऱ्या या स्त्री संस्कृतीच्या मागे असं कोणतं सूत्र लपलेलं असतं की ते सस्पेन्स पुरुष जातीच्या मानवाला अजूनपर्यंत कळलेलं नाही हे एक आश्चर्यच आहे. म्हणून शीतचंद्रलोक सख्यांच्या विनम्रशील स्त्री सर्जनशीलतेच्या या कर्तुत्वाला प्रथम मानाचा मुजरा.



काल आपल्या येथे शीतचंद्रलोकसख्या यांच्या भरीत भाकरीच्या पार्टीत सर्व पुरुष लहानथोर मंडळी अगदी शाळेतल्या मुलांसारखी जशी गणवेश परिधान करून, हातात कुपन धरून लायनीत शिस्तीने उभे राहून, कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं की रायबाचं अशा ऐटीत सोसायटीतील पुरुष मंडळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणी एकमेकांशी ब्र शब्द बोलेल तेंव्हा ना, सर्वकाही चिडीचूप तोंडातल्या तोंडात मिटक्या मारत चाललेलं होतं. शीतचंद्रलोकच्या पाणवठ्याखाली आपल्याच डोळ्यासमोर रुजलेल्या त्या लहान बिया आता तरुण, मोठी आणि समजदार झाली होती, ती आपल्याच धुंदीत व्यस्त आणि मस्त होती, बरीच सिनियर मंडळी काही  निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेली आणि काही उंबरठा ओलांडलेली एकमेकांची विचारपूस करत होती. गेस्ट मंडळी सुद्धा अवाक झाली होती. कधी काळी शीतचंद्रलोकला लाभलेल्या भव्य पटांगणाच्या उजाड माडावर आता भव्य दिव्य आलिशान चार चाकी उभ्या दिसत होत्या. काळ बदलला तरी या समृद्धीच्या वाटचाली मागे शीतचंद्रलोक संख्यानी आपला वसा जपलेला होता. काही ठिकाणी कुजबुज चालली होती, तर काहींनी चक्क जमिनीवरच मांडी घालून जेवण करणे पसंत केले होते. बेसन, भरीत, भाकरी, ठेचा, कांदा, निंबु, आणि वरून जिलेबी, आणि एक विसरलोच शेवटी आईस्क्रीम कुल्फी सुद्धा आणि बापरे ते पण फक्त पन्नास रुपयात ! जेवणाची लज्जत एव्हढी भारी आणि चविष्ट होती की खाणारा दाद द्यायलाच विसरून गेला हो ! पाय कोणाचा तेथून निघत नव्हता. फोटोशेशन जोरात चालू होतं. जणु पावलो पावली आपलेपणाच्या खुणा दिसत होत्या. अजून ही तोच जोश आणि उत्साह जाणवत होता. म्हणून मी परत त्याच ठिकाणी येतो. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते.

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

ललित

एखाद्या चित्रकाराने दाट धुक्याचं चित्र रेखाटावं, त्या विरघळलेल्या धुक्यात निसर्गाची अनेक अस्पष्ट रूपे त्याने रेखाटवीत आणि आपण डोळे किलकिले करून फक्त पाहत राहावे पाहत राहावे आणि त्या धुक्याच्या पलीकडे काय असावे याचा अंदाज बांधत राहतो. तसच काही पण अगदी निराळं असं वि.स. खांडेकर यांनी लिहिलेल्या "धुके" या पुस्तकात तीन खेड्यातल्या बायका धुक्याला कसा शृंगार चढवतात आणि लिहिलेल्या पुस्तकाचं नांव कसं सुशोभित करतात ते त्यांच्याच शब्दात वाचा...

धुके

नेहमीप्रमाणे डोक्यावर शेणाच्या पाट्या घेतलेल्या खेडवळ बायका समोरून येत असाव्यात ! असल्या बायका म्हणजे काही फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्यातल्या नायिका नव्हेत. त्यांच्या जाण्या-येण्याकडे एरव्ही मी क्वचित लक्ष देतो. पण हे अचानक पडलेले धुके वस्तुमात्रावर जणू काही जादूची कांडी फिरवीत होते. समोरून येणाऱ्या त्या तीन स्रियांच्या आकृतीत काही निराळेच सौंदर्य आहे, असे वाटू लागले. सभोवार पसरलेला धुक्याचा समुद्र आणि त्या अस्पष्ट आकृती पाहून समुद्रातून अप्सरा वर आल्याची पौराणिक कथा मला आठवली. अप्सरा म्हटली, की तिची नृत्यचांदण्यातकुशलता आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. समोरून येणाऱ्या त्या बायकांनी डोक्यावरल्या पाट्या संभाळण्याकरिता वर धरलेले अंधुक हात त्या सुंदर धुक्यात तसेच रेखीव वाटत होते !

...........घटकाभराने तो धुक्याचा समुद्र जसा आला होता, तसा निघून गेला.....माझा निरोप सुद्धा न घेता ! त्याचे पुसट पाऊल देखील कुठे दिसेना. तरी माझ्या मनावरील त्याची धुंदी तशीच होती.आज अशावेळी हे धुके कोठून आले, याचा विचार करायला माझे मन तयार नव्हते. धुके झाले, घटकाभर दिव्य आनंदाचा अनुभव देऊन गेले. तेवढ्याने मी तृप्त झालो होतो. मातीला सुगंधी फुलांचा वास लागावा, तसे त्या ब्रम्हानंदाने माझे मन आपलेसे करून टाकले होते.

वि.स. खांडेकर यांच्या __________"धुके" या पुस्तकातून


सोमवार, २० जुलै, २०२०

लोहार दादा

(लोहार दादा आणि सशाची जुगलबंदी, व्हाट्सएप वरून पार्शली कॉपी पेस्ट)


ससा             :    लोहार दादा लोहर दादा गाजर आहे का

लोहार दादा   :     ससोबा ससोबा मंडईत जा
                        गाजर घेवून घरी जा

ससा           :     दुसऱ्या दिवशी ससोबा हजर
                       लोहार दादा लोहर दादा गाजर आहे का

लोहार दादा  :    लोहर दादाने उपटले कान
                       दाखवतो तुला गाजराचे दुकान
                       परत आला तर दातच तोडीन
                       नंतर कधी येणारच नाही

ससा           :   तिसऱ्या दिवशी ससोबा हजर
                       विचारतो कसा गाजर आहे का

लोहार दादा  :  लोहर दादाला आला राग
                       तोडले त्याने सशाचे दात

ससा            :   चवथ्या दिवशी
                       लोहार दादा बसला होता निवांत
                       ससोबा प्रगट झाला पुढ्यात
                       लोहर दादा लोहर दादा गाजराचा ज्युस आहे का

लोहार दादा ज्युस देईना, ससोबा आपला हट्ट सोडीना !

 

रविवार, १९ जुलै, २०२०

डोंबिवली 2003

(दवाने थबथबून गेलेल्या सकाळी डवरलेल्या बागेत मधोमध काट्यांच्या शिरावर एखादे गुलाबाचे फुल फुललेले आहे. वारा वाहतो की नाही तेही जाणवत नाही, पण फुलाचा गंध मात्र सर्वत्र मंदपणे पसरत आहे असा काहीसा समज तुमचा हा खलील लेख वाचून होणार असेल तर तो तुमचा भ्रम आहे. असं काहीही या लेखात नाही आहे.)

डोंबिवली 2003

डोंबिवली या शहराला म्हणावे असे काहीच नाही. इथे सरकारी इमारती, खाजगी कंपन्यांचे कार्यालये, बहुमजली इमारती नाहीत. या आधुनिक शहरात सगळ्या गैरसोयी आहेत. उंदरांच्या बिळासारखी माणसांची घरे आहेत. घरात हवेला मज्जाव आहे, त्यामुळे पंखा लागतो. माणसांच्या गर्दीने एके काळचे निसर्ग संगीत हिरावून घेतले आहे. आठवड्यातले पाच दिवस काम करून मनुष्य इथे कंटाळतो. त्यांचा जीव आंबून जातो तेंव्हा टाईमपास साठी शॉपिंग, आराम करण्यासाठी येथे कोलोम्बो, सिंगापूर, बेंगलोर सारखे इथे काहीही नाही. मग आहे तरी काय या शहरात. सगळ्या जगापासून दूर, जिथं कुणी म्हणजे कुणी नाही, ते आसपास घुटमळत असतं असं अप्रतिम सुंदर विश्व या शहरात निर्माण करण्याचं कुणालाही सुचत नाही. इथल्या नद्या सुकल्या नाहीत पण इथल्या नद्यांवर अतिक्रमण झाले आहे. साईन बोर्ड आणि टी.व्ही. टॉवरनी या शहराला उघडे नागडे करून टाकले आहे. संपूर्ण शहरात नजरेत भरेल असं एकही झाड इथे नाही.
                                                       -०-
वरील "डोंबिवली" हा लेख 2003 या वर्षी वर्तमान पेपरात छापून आला होता. कोणी लिहिला आणि कोणत्या वर्तमान पेपरात छापून आला होता ते आठवत नाही. परंतु 2003 च्या माझ्या "जुनी डायरी"त लिहून ठेवलेला आहे. तो पूर्ण नाही असे वाचल्या नंतर जाणवते. परंतु ते काही असो आज 2020 या वर्षी हा लेख काहीसा आजच लिहिला आहे असंच वाटतं. प्रगतीची पाऊले या जगात जोराने येऊन आदळलीत. तुम्ही इतिहासाची पाने चाळली असतील तर तुमच्या लक्षात आल्या शिवाय राहणार नाही की मानवी संस्कृतीच्या इतिहासात एव्हढा गतिशील आणि श्रेष्ठ कालखंड कधीच आला नव्हता पण आमची 2003 ची डोंबिवली आहे तशीच आहे. बऱ्याच वर्षानंतर बालपणीचा एखादा जिवलग मित्र भेटावा  आणि त्याने घट्ट मिठी मारावी. संभाषणाला सुरुवात करण्यापूर्वी, अरे तू लहानपणापासून आहे अजून तसाच!! कोणताही बदल नाही ! ग्रेट !

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

खमोशियों की सदाएँ बुला रही हैं तुंम्हे (लॉक डाऊन २९ वा दिवस)

सूर्याला झोप लागली आणि तो उगवायचा विसरूनच गेला, असं कधी स्वप्नात सुद्धा घडनार नाही. पण हे असं काही घडू शकतं का असे बालिश प्रश्न वेड्यांच्या इस्पितळात असलेल्या वेड्याला सुद्धा पडणार नाहीत. कारण विश्वाचं चक्र क्षणभरही न थांबता अहोरात्र अखंडपणे चालू आहे. शिशिरची पानगळ नुकतीच थांबली आहे. वसंत ऋतू सुरू झाला आहे. सशाच्या कानासारखी इवली इवली बारीक कोवळी पालवी, लंहान मुले जसे आईला बिलगतात तशी ती पातळ पाने झाडांच्या फांद्यांना कोणी चिटकवली आहेत असा भास होत आहे. थोडक्यात वसंत जागो जागी बहरल्याच्या खुणा दिसत आहेत. कळ्यांनी आपलं उमलणं थांबविलेलं नाही, कोकिळचा मंजुळ स्वर कानाला मंत्रमुग्ध करत आहे. धबधब्यांचा प्रपात अहोरात्र स्वतःचा उर बडवीत सुरू आहे. निळ्या आकाशात आज सुध्दा रवीराजाने वेलबुट्टी काढून ठेवली आहे. सूर्याचं पूर्वेकडून पश्चिमेकडे असं त्याचं सतत भ्रमण चालू आहे. सकाळच्या प्रहरी धुंदपणे विहारणारा तो ओझोन अजून दरवळतो आहे आणि ते बघा क्षितिजावर सूर्याचे द्यूत देखील उभे आहेत. अथांग महासागराचं निळ्याशार पाण्यावर लाटांच्या कमानी उभ्या राहातांना दिसत आहेत. किनाऱ्यावर एका पायावर उभे राहून माडाची झाडे वाकून वाकून बघत आहेत. सूर्याने सकाळची कोवळी सोनेरी उन्हे लांबच लांब  अशा एका ओळीने उभ्या असलेल्या पर्वत राजीवर उधळायला सुरुवात केली आहे. निसर्गात तीच रम्य संध्याकाळ आणि तोच पक्षांचा किलबिलाट सुरू आहे. शतकानुशतके निसर्गाची गुपिते मानवी मनाला न कळत शांतपणे उलगडली जात होती. परमेश्वराने जशी रात्र बनविली तसा दिवसही बनवला, प्रचंड डोंगर, नद्या, दऱ्या, जंगल, वाळवंट, समुद्र, सुपीक जमीन, पाऊस, थंडी, ऊन, वारा, ऋतू बनवून सृष्टी संतुलित ठेवून कशाचीही कमतरता जाणू दिली नाही. म्हणून तर अनादी काळापासून या सृष्टीचं चक्र न थांबता अखंड पणे आणि तेही व्यवस्थित चालू आहे. आणि जगाच्या इतिहासात एकविसावे शतक हे प्रचंड फेरबदल आणि घडामोडीचं शतक ठरले आहे. आपल्यापुरते बोलायचे झाल्यास, आपल्याला कळायला लागल्यापासून ते आजतागायत सर्व काही व्यवस्थित सुरळीत चाललं असतांना अचानक एक विचित्र धोकेदायक वळणावर आपण सगळेजण येवून पोहचलो आहोत. आयुष्याच्या वळणावर कोणती वळणे कशी येतील हे सांगणे खूपच अवघड असतं. अति आत्मविश्वसाच्या जोरावर चाललेल्या या जगाला एकदम ब्रेक लागला आणि होत्याचे नव्हते झाले आहे. मानवाची नशा निसर्गदेवतेने अशा काही पद्धतीने उतरवली आहे की, चंद्रावर भरारी मारणाऱ्या मानवाच्या दोन्ही हात पाय बांधून त्याला जश्या कोरड्या खोल विहिरीत अधांतरी टांगून ठेवले आहे. हवेतला ऑक्सिजन अजून तसूभर ही कमी झालेला नाही, परंतु नाकातून श्वास घेतांना आता चक्क फिल्टर लावून घ्यावी लागत आहे. प्रत्येकाने आपल्या तोंडावर मास्क चढविले आहे. सध्या जगावर कोरोना हुकमत गाजवितो आहे आणि त्याने भल्या भल्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. निर्मनुष्य रस्ते आणि गल्ल्या, निरभ्र आकाश, थंडावलेला कारखान्यांचा गोंगाट, शांत झालेला विमानाचा गगनभेदी सुळसुळाट, निपचित पडलेली कर्कश रेल्वे इंजिने आणि अजगरासारखे पहुडलेले महाकाय एक्प्रेस हायवे, शेपटासारख्या विचलित पडलेल्या विमानांच्या धावपट्ट्या, ओस पडलेली फुटबॉल आणि क्रिकेटची मैदाने सारे कसे शांत शांत.  मोर, नीलगाय  शहरी रस्त्यावर दिसायला लागलेत, बिबट्या जंगल सोडून मानवी वस्त्यांवर फेर फटका मारायला लागला, गंगेचं पाणी निळेशार दिसायला लागले, डोंगर रांगा एक पाठोपाठ एक असे शिस्तीत उभे दिसत आहेत. दुसरीकडे आयफेल टॉवर, नायगारा वॉटर फॉल सारखे प्रेक्षणीय स्थळे मानव विरहित ओस पडली आहेत. हा काय चमत्कार आहे आणि एवढी दहशत अजून कधी वाचनात आली नव्हती की ती आज प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहोत. बा.सी. मर्ढेकरांच्या कवितेतली एक ओळ वाचाविशी वाटते, "काळ मारुनी गेला टपली, न कळत डोक्यावरती तळुई"

चूका करणे ही काळाची गरज आहे, त्याशिवाय नवनिर्मिती होणे अशक्यच असं म्हणतात ! परंतु कोरोना व्हायरसने सर्व स्तरावर पाणी फिरवले आहे. जागतिक मंदिचं संकट घोंगावत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लॉक डाऊन मुळे या विषाणूची साखळी खंडित झाली आहे. जगण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इतिहासावर नजर टाकली तर पृथ्वीवरील मानवावर आजतागायत अशी बरीच संकटे येवून गेलीत, तसच कोरोनाचं संकट जाईल सुद्धा, परंतु मानवाला निसर्गाच्या प्रकृती बाबतीत बरंच काही शिकवून जाणार आहे हे निश्चित.

कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज लॉक डाऊनचा २९वा दिवस, परंतु ही गोष्ट सोपी तर मुळीच नव्हती. ही मानसिकता, हे धैर्य, हे मनोबल आलं कोठून, देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री पासून ते जय जवान जय किसान पर्यंत,  डॉक्टर्स, सिस्टर्स, कर्मचारी, पोलीस दल ते अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पर्यंत, या सर्वांच्या योगदानाचं मूल्य अमूल्य आहे. ओ सुबह अब दूर नही, सर्व काही सुरळीत होण्याची चिन्हे दिसून येतील. मुलांच्या शाळा परत चालू होतील, रस्त्यावर वाहने धावू लागतील, पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी किलबिल अंगणात उतरतील, म्हणतात ना कुदरत अच्छी चिजे बिना बनाये नही रह सकता. त्याच्या कुशीत परत येण्यासाठी निसर्ग आपल्याला खुणावतो आहे बघा.......मचल मचलती हवाये बुला रही है तुंम्हे.