Monday 2 October 2017

दिवाळी पहाट

या वर्षाचा पाऊस पृथ्वीच्या चराचरात, अणूरेणुत बरसला. नद्या नाले तलाव पाण्याने तुडुंब भरून आलीत. पेहरणीनंतर महिन्याभरात पिके डोलू लागलीत. समुद्रातून एका मागून एक अमूल्ये रत्ने बाहेर पडावीत त्याप्रमाणे पोळा सण करे गोळा असं एकामागून एक सण येण्यास सुरुवात झाली. दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला चोहीकडे लक्ख चांदणं पसरलं. सारी सृष्टी चांदण्यात उजळून निघाली. दृष्ट  लागू नये म्हणून निसर्गाने हे सर्व चांदणं आपल्या झोळीत जणू काय भरून घेतलं आणि कानठळ्या सुन्न करणाऱ्या परतीच्या पावसाला  सुरुवात देखील केली परंतु त्याचा खरोखर परतण्याचा विचारच दिसत नाही असं वाटायला लागलंय. वरून दिसत नसल्या तरी भरून आलेल्या भुईमुगाच्या शेंगा जमिनीतून वर येण्यासाठी डोकावू लागल्या आहेत. ज्वारी बाजरीची कणसं टंच भरून आली आहेत. कापसाची बोन्डे उमलायला लागलीत. उडीद, मूग, चवळी, कुळीथ कधीच धाब्यावर सुकायला घातलीत. नुकत्याच लग्न झालेल्या मुली माहेरी दिवाळी सणाला देखील आल्यात. नाही म्हणता दिवाळी सुरू झाली. आणि वेध लागले दिवाळी पहाटचा आनंद लूटण्यासाठी.

आपल्या मनाला हवी हवीशी वाटणारी पहाट कधी कधी वाट पाहूनही आपल्याला भेटायला येत नाही. पण आज दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी पहाट आपल्याला जरूर भेटणार आहे. म्हणून निरव शांततेत कड्याक्याची थंडी जरी नसली तरी हवेत हवा हवासा गारवा जरूर आहे.

प्रभु, तुम्ही मानवाला पृथ्वीवर नितांत सुंदर, स्वर्गीय आनंद देणारी, पहाट निसर्गाच्या चौकटीत प्रत्यक्षात आणून दिली आहे, की ज्या क्षणाला चंद्र आणि तारे एकमेकांचे निरोप घेत असतात. आणि क्षितिजावर सूर्य आपल्या कोवळ्या सोनेरी किरणांचा पिसारा फुलविण्यासाठी आतुर झालेला असतो.  दिवसभर काम करून थकलेला मनुष्य त्यावेळी निद्रेतच असतो !  "देवदूता, हे दिवस आणि रात्र एकाच भिंतीच्या दोन बाजू आहेत. भिंतीच्या अलीकडे दिवस आणि पलीकडे रात्र हाच काय तो फरक आणि हे विभाजन मानवाच्या कल्याणासाठीच निर्माण केले आहे. क्रूस बदलणाऱ्या या ऋतुचक्रात जसा मी दिवस निर्माण केला तशी रात्र ही. दिवसभर तो जसा कामात व्यग्र असतो तसा तो रात्री विश्रांती घेत असतो. याच्यात त्याचं काय चुकलं नाही. देवदूता आपण पृथ्वीतलावर जावून एक फेरफटका मारू या म्हणजे माझं म्हणणं तुला कळेल आणि तुझं समाधान होईल. हे बघ सकाळी सकाळी पहाटेच्या निरव शांततेत खाली उजेड येत असलेल्या समोरच्या घरात काय संभाषण चाललंय, बघू या तर" !

त्याने, झोपेतूनच डोळे न उघडताच तिला विचारलं, "अगं आज भल्या पहाटे ही वर्दळ कसली चालली आहे ! हा तबल्याचा आवाज, आणि ही लांबून येणारी मंगल धून कानाला किती गोड वाटते आहे. कोण गात असेल बरं ह्यावेळेस". "अहो घरधनी, उठा बरं, दिवाळीचा पहिला दिवस आहे ना आज, मग पहिल्या दिवसाची ही पहिली पहाट म्हणजे दिवाळी पहाट". त्याच वेळेस रवींद्र भटांचं आशा भोसले यांनी गायलेलं गाणं रेडियोवर चालू होतं. त्याची लक्ष्मी सुराला सूर जुळवून त्या गाण्याला बारीक आवाजात साथ देत होती.

उठी श्रीरामा । पहाट झाली । पूर्व दिशा उमलली । उभी घेऊनी कलश दुधाचा । कौसल्या माउली।

"म्हणजी ! नाही समजलं गं मला काय म्हणतेस तू ते" ! "दिवाळीचा पहिला दिवस उजेडायच्या अगुदर जी पहाट असतेना, तिला दिवाळी पहाट म्हणत्यांत" ! "आणि हे तुला कसं गं माहीत" ! "अहो वर्तमान पत्रात वाचलं आहे मी बऱ्याच दा, आणि मी काय अडाणी आहे होय"! "बरं चल, मला अंघोळीला पाणी घाल, मी पण जातूया तेथे कसली गडबड आहे ती बगून येतो. अहो पानी कवाचच तयार आहे, व्हा मोरीत. चला मी तुमच्या अंगाला, डोसक्याला उंटणं लावून देते. अंघोळी नंतर ही नवीन कापडं घाला आनी जावा लवकर, वापस आल्यावर मला बी सांगा काय काय जालं तें".

"प्रभू , ऐकला ह्या नवरा बायको जोडीचा संवाद. या गडीला चांगली आणि स्वस्वरूप अशी लक्ष्मी मिळाली आहे. धन्य प्रभो अगाध आहे तुझी लीला. एवढया रामप्रहरी नवीन कपडे घालून हा गडी कुठं निघाला लगबगीनं. चला बरं आपण जावू याच्या पाठीमागनं.!

अभ्यंगस्नान करुन पहाटे पाच वाजल्या पासून प्रसन्न वातावरणात गुलाबी थंडीचा अनुभव घेत मराठमोळ्या वेषात बरीच गर्दी भव्य निरभ्र आकाशाच्या मंडपाखाली जमा झाली होती. तरुण युवती साड्या नेसून आल्या होत्या. स्रियांनी भव्य रांगोळी काढली होती, त्याभोवती पणत्यां लख लखाट करीत होत्या. रांगोळ्या आणि आकाशदिव्यांनी त्या इमारतीचा परिसर सजवण्यात आला होता. त्या शांत वातावरणात सुगंधी उटण्यांचा घम घमाट सुटला होता. चहुदूर मंगलमय वातावरण पसरले होते. हवेत रेशीम थंडी जाणवत होती. त्या इमारतीच्या प्रांगणातील चबूतऱ्यावर कलाकार मंडळी मांडीला मांडी लावून दिपमाळेसारखी एका पंक्तीत बसली होती. उगवत्या सूर्याची किरणे डोकावण्यापूर्वीच गणपती स्तवनचे समूह सूर छेडले गेलेत. आणि मैफिलीला प्रारंभ झाला. नंतर एका मागून एक अशी सुरेल आवाजाची गाणी गायली गेलीत आणि आनंदाचे स्वर फुलून गेलेत.

माय भवानी तुझे लेकरू, मला हे दत्त गुरू दिसले, सूर तेच छेडिता, धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, देव माणूस देवळात आला, तसेच साजणी बाई येणार साजन माझा या गाण्यावर तर वन्स मोअर चा  पाऊस पडला. एक तासाचा भरगच्च कार्यक्रम यथोचित पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर काही जेष्ठ मंडळी एकमेकांना आलिंगन देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत होते.

"आलात तुमी, सांगा बरं कार्यक्रम कसा जाला तो". "अगं खूपच छान कार्यक्रम झाला. मुली साड्या नेसून सवरून सावरून आल्या होत्या. लहान मुलं बी नवीन कापडं घालून आली होती. टेज समोर लई मोट्टी रांगोळी काडली होती. टेजवर बरीच मंडळी एका लायनीत बसली होती. सकाळची वेळ असल्यामुळे लै फ्रेस वाटत होतं. कोनी गाणी म्हणली, कोनी कविता वाचून दाखविल्या. कविता म्हंजी एकंदरीत आपन बोलतो तसं नसतं, पन आपल्याला कळतं ते काय म्हणत्यांत ते. सकाळच्या प्रहारी पेटी तबल्याच्या आवाजात भान हरपून गेलं. शेवटी एक लई झकास लावनी म्हटली गेली. अवो काय बेस्ट लावनी झाली सांगू. तिथल्या एका साहेबासनी शिटी मारून जोरात दाद दिली ! आकाशात पक्षी भुर्रकन उडून गेल्या सारखी वाटली."

"देवदूता, या ब्रह्मांडात पहाट हा निसर्गाचा एक रमणीय अविष्कार आहे. पावसाळ्यात भरभरून मिळालेल्या समृद्धतेतूनच दिवाळीच्या सणातून त्याने ही कृतज्ञता जपली आहे. आणि दिवाळी च्या मंगलमय पहाट च्या माध्यमातून त्याने आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. पण ही दिवाळी पहाट त्यानेच निर्माण केली आहे. म्हणून  दिवाळी पाहटचा खरा आनंद लुटण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव घ्यायलाच हवा.

"देवदूता क्षितिजावर हालचाल सुरू झालेली आहे, तत्पूर्वी आपण तेथे पोहचायला हवं" !

No comments:

Post a Comment