Wednesday 22 April 2020

खमोशियों की सदाएँ बुला रही हैं तुंम्हे (लॉक डाऊन २९ वा दिवस)

सूर्याला झोप लागली आणि तो उगवायचा विसरूनच गेला, असं कधी स्वप्नात सुद्धा घडनार नाही. पण हे असं काही घडू शकतं का असे बालिश प्रश्न वेड्यांच्या इस्पितळात असलेल्या वेड्याला सुद्धा पडणार नाहीत. कारण विश्वाचं चक्र क्षणभरही न थांबता अहोरात्र अखंडपणे चालू आहे. शिशिरची पानगळ नुकतीच थांबली आहे. वसंत ऋतू सुरू झाला आहे. सशाच्या कानासारखी इवली इवली बारीक कोवळी पालवी, लंहान मुले जसे आईला बिलगतात तशी ती पातळ पाने झाडांच्या फांद्यांना कोणी चिटकवली आहेत असा भास होत आहे. थोडक्यात वसंत जागो जागी बहरल्याच्या खुणा दिसत आहेत. कळ्यांनी आपलं उमलणं थांबविलेलं नाही, कोकिळचा मंजुळ स्वर कानाला मंत्रमुग्ध करत आहे. धबधब्यांचा प्रपात अहोरात्र स्वतःचा उर बडवीत सुरू आहे. निळ्या आकाशात आज सुध्दा रवीराजाने वेलबुट्टी काढून ठेवली आहे. सूर्याचं पूर्वेकडून पश्चिमेकडे असं त्याचं सतत भ्रमण चालू आहे. सकाळच्या प्रहरी धुंदपणे विहारणारा तो ओझोन अजून दरवळतो आहे आणि ते बघा क्षितिजावर सूर्याचे द्यूत देखील उभे आहेत. अथांग महासागराचं निळ्याशार पाण्यावर लाटांच्या कमानी उभ्या राहातांना दिसत आहेत. किनाऱ्यावर एका पायावर उभे राहून माडाची झाडे वाकून वाकून बघत आहेत. सूर्याने सकाळची कोवळी सोनेरी उन्हे लांबच लांब  अशा एका ओळीने उभ्या असलेल्या पर्वत राजीवर उधळायला सुरुवात केली आहे. निसर्गात तीच रम्य संध्याकाळ आणि तोच पक्षांचा किलबिलाट सुरू आहे. शतकानुशतके निसर्गाची गुपिते मानवी मनाला न कळत शांतपणे उलगडली जात होती. परमेश्वराने जशी रात्र बनविली तसा दिवसही बनवला, प्रचंड डोंगर, नद्या, दऱ्या, जंगल, वाळवंट, समुद्र, सुपीक जमीन, पाऊस, थंडी, ऊन, वारा, ऋतू बनवून सृष्टी संतुलित ठेवून कशाचीही कमतरता जाणू दिली नाही. म्हणून तर अनादी काळापासून या सृष्टीचं चक्र न थांबता अखंड पणे आणि तेही व्यवस्थित चालू आहे. आणि जगाच्या इतिहासात एकविसावे शतक हे प्रचंड फेरबदल आणि घडामोडीचं शतक ठरले आहे. आपल्यापुरते बोलायचे झाल्यास, आपल्याला कळायला लागल्यापासून ते आजतागायत सर्व काही व्यवस्थित सुरळीत चाललं असतांना अचानक एक विचित्र धोकेदायक वळणावर आपण सगळेजण येवून पोहचलो आहोत. आयुष्याच्या वळणावर कोणती वळणे कशी येतील हे सांगणे खूपच अवघड असतं. अति आत्मविश्वसाच्या जोरावर चाललेल्या या जगाला एकदम ब्रेक लागला आणि होत्याचे नव्हते झाले आहे. मानवाची नशा निसर्गदेवतेने अशा काही पद्धतीने उतरवली आहे की, चंद्रावर भरारी मारणाऱ्या मानवाच्या दोन्ही हात पाय बांधून त्याला जश्या कोरड्या खोल विहिरीत अधांतरी टांगून ठेवले आहे. हवेतला ऑक्सिजन अजून तसूभर ही कमी झालेला नाही, परंतु नाकातून श्वास घेतांना आता चक्क फिल्टर लावून घ्यावी लागत आहे. प्रत्येकाने आपल्या तोंडावर मास्क चढविले आहे. सध्या जगावर कोरोना हुकमत गाजवितो आहे आणि त्याने भल्या भल्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. निर्मनुष्य रस्ते आणि गल्ल्या, निरभ्र आकाश, थंडावलेला कारखान्यांचा गोंगाट, शांत झालेला विमानाचा गगनभेदी सुळसुळाट, निपचित पडलेली कर्कश रेल्वे इंजिने आणि अजगरासारखे पहुडलेले महाकाय एक्प्रेस हायवे, शेपटासारख्या विचलित पडलेल्या विमानांच्या धावपट्ट्या, ओस पडलेली फुटबॉल आणि क्रिकेटची मैदाने सारे कसे शांत शांत.  मोर, नीलगाय  शहरी रस्त्यावर दिसायला लागलेत, बिबट्या जंगल सोडून मानवी वस्त्यांवर फेर फटका मारायला लागला, गंगेचं पाणी निळेशार दिसायला लागले, डोंगर रांगा एक पाठोपाठ एक असे शिस्तीत उभे दिसत आहेत. दुसरीकडे आयफेल टॉवर, नायगारा वॉटर फॉल सारखे प्रेक्षणीय स्थळे मानव विरहित ओस पडली आहेत. हा काय चमत्कार आहे आणि एवढी दहशत अजून कधी वाचनात आली नव्हती की ती आज प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहोत. बा.सी. मर्ढेकरांच्या कवितेतली एक ओळ वाचाविशी वाटते, "काळ मारुनी गेला टपली, न कळत डोक्यावरती तळुई"

चूका करणे ही काळाची गरज आहे, त्याशिवाय नवनिर्मिती होणे अशक्यच असं म्हणतात ! परंतु कोरोना व्हायरसने सर्व स्तरावर पाणी फिरवले आहे. जागतिक मंदिचं संकट घोंगावत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लॉक डाऊन मुळे या विषाणूची साखळी खंडित झाली आहे. जगण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इतिहासावर नजर टाकली तर पृथ्वीवरील मानवावर आजतागायत अशी बरीच संकटे येवून गेलीत, तसच कोरोनाचं संकट जाईल सुद्धा, परंतु मानवाला निसर्गाच्या प्रकृती बाबतीत बरंच काही शिकवून जाणार आहे हे निश्चित.

कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज लॉक डाऊनचा २९वा दिवस, परंतु ही गोष्ट सोपी तर मुळीच नव्हती. ही मानसिकता, हे धैर्य, हे मनोबल आलं कोठून, देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री पासून ते जय जवान जय किसान पर्यंत,  डॉक्टर्स, सिस्टर्स, कर्मचारी, पोलीस दल ते अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पर्यंत, या सर्वांच्या योगदानाचं मूल्य अमूल्य आहे. ओ सुबह अब दूर नही, सर्व काही सुरळीत होण्याची चिन्हे दिसून येतील. मुलांच्या शाळा परत चालू होतील, रस्त्यावर वाहने धावू लागतील, पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी किलबिल अंगणात उतरतील, म्हणतात ना कुदरत अच्छी चिजे बिना बनाये नही रह सकता. त्याच्या कुशीत परत येण्यासाठी निसर्ग आपल्याला खुणावतो आहे बघा.......मचल मचलती हवाये बुला रही है तुंम्हे.



No comments:

Post a Comment