गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हां !

पोळ्यापर्यंत त्याचं कसं आलबेल चाललं होतं. हिरवी चादर अंथरावी तसा धामाणगांवचा रानोमाळ शिवार हिरवागार पहुडलेला होता. पिके टरटंराट वाढलेली होती. नुकतेच लगीन झालेल्या पोरसवादा नवी नवरीला आपल्या माहेरची ओढ लागून कधी ती माहेराला जाते आणि आईच्या कुशीत पदराखाली विसावते, तशी शेतातील पिकांमध्ये एकमेकात चढाओढ चालू होती !   आम्ही सुद्धा सहकुटुंब सहपरिवार वीर देवाचं दर्शन घेण्यासाठी धामणगांवी आलो होतो. आदल्या दिवशी नुकताच पाऊस पडून वरून देवाने शेतातली वाफ मोडून टाकली होती. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. ते हिरवेगार पीक बघून काका सुद्धा म्हणाले की आज मी अर्धा श्रीमंत झालो आहे. हे वर्ष सुख समृद्धीचे जाणार म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीची ओढ लागली होती. पण ताटात देवाने भलतेच वाढून ठेवले होते आणि तशी त्याने तसूभरही कल्पना लागू दिली नव्हती. टप टप अंगावरती पडती पावसाची फुले असं कविला लिहायला मोह आवरत नाही आणि त्यात मनमुराद ओलाचिंब व्हायलाही त्याला आवडतं.  पण !

पण प्रत्यक्षात टप टप पडणारे पावसाचे थेंबानी यावर्षी चक्क हुलकावणी दिली होती. लहानपणी बघितलेली श्रावणातली पावसाची झडी गायब झाली होती. जंगलातून येणारे गवताचे भारे दिसत नव्हते. पोळ्यापासून पावसाने दडी मारून जशी त्याने आपली कवाडे बंद करून घेतली होती.  बांधावरची खुरटे सुकलेले गवत स्वतःच हसत होते. कापसाची वयात आलेली बोन्डे निपचीत बघत होती. बहिनाबाई चौधरींची कविता स्मरून मन सुन्न झाले. बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही, हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही.  ती बोन्ड तरी उमलणार कशी. पानं पानं झाडं झाडं करपून गेलीत. बाभळीच्या ढोलीतली पिलं तहानेने कासावलीत. शेवटी काय म्हणू देवासी !  स्वामी कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हांसी !


टप टप पडती चौफेर पानांवरती पहिल्या पावसाचे थेंबे !

नकोरे गरजू असा ओल्या झाल्यात माझ्या पापण्या आणि वेणीची फुले

सांग मजसी, दडी मारुनी गेला होतास कुठे तू आजवरी

वाट बघून फेकून दिली कविता तुझी त्या कोरड्या विहिरीच्या तळाशी

पानं पानं झाडं  करपून गेली, बाभळीच्या ढोलीतली पिलं तहानेने कासावलीत

माजुरे बांधावरचे खुरटे गवत हसते कसे, अजून नाही समजले तुला

तुझ्याविना उमलेल कसे,  कोवळे बोन्ड ते कापसाचे

चारही बाजूने खिन्न अवस्था, दुष्काळ सावटाचे

शेवटी काय म्हणू देवा तुला !

कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हां !



रविवार, २२ एप्रिल, २०१८

गुलाब ताजे फुलतात कसे

निवृत्तीनंतर फेकून दिलेलं इंजिन जास्तच काळवंडून गेलं. त्याचा रंग निघून पत्र्यांना गंज चढायला लागला होता. आपल्या हाताला इजा होईल म्हणून कोणी त्या गंजलेल्या पत्र्यांना हात लावायला देखील तयार होईना. अशी काहीशी अवस्था आपली देखील होत असते. तशी माझी काही प्रमाणात  झाली होती. अशा परिस्थितीत प्रवासाची कुठे संधी मिळते का, कधी घराच्या बाहेर पडायला मिळेल म्हणून कुठूल्या तरी आमंत्रणाची मन तन्मयतेने वाट बघत असतं. नारळाच्या झाडावरील नारळ केंव्हा खाली पडेल सांगता येत नाही. कधी कधी तुम्ही पाठमोरं झाल्या झाल्या धपकन आवाज येतो तसं, आणि काय म्हणता,  19 एप्रिलला माझ्या गांवी धामाणगांवी जाण्याचा योग चालून आला कारण 20 तारखेचं लग्न अटेंड करायचं होतं. म्हणून मी गुढघ्याला बाशिंग बांधून पुणे भुसावळ ट्रेनचं सिनिअर सिटीझन च्या सवलतीत कल्याण ते चाळीसगांव रिसर्व्हेशन देखील केलं. डोंबिवलीहून भर उन्हातान्हात घरून अडीच वाजता निघालो. अर्धा तास कल्याण स्टेशनवर अगोदरच पोहचलो.  सव्वातीन ला येणारी ट्रेन "बिस मिनीटसे देरीसे चल रही हैं" ची आकाशवाणी झाली ! आणि आली चक्क चाळीस मिनिटांनी. दुःख सांगायचं कोणाला !  एक तर सवलतीत प्रवास करतोय. 'तेरी भी चूप मेरी भी चूप'. कोंबडा बिचारा सकाळी सकाळी अरवण्याचं काम करून मानव जातीवर प्रचंड उपकार करतो, पण त्याला उदंड आयुष्य लाभो असा कोणीही आशीर्वाद देत नाही. परंतु गाडी अर्धा तास काय दोन तास जरी लेट झाली तरी तिचं तोंड भरून कौतुक करून  बिचारे पॅसेंजर सुखासमाधानाने  प्रवास करत असतात. खरी गंमत तर अजून पुढेच आहे. माझं रिझर्वेशन असून सुद्धा माझ्या जागेवर बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी मला त्याचे पाय धरावे लागले. दुसरं काय "ये मेरा इंडिया हैं" बरं हे चालायचंच ! आपण दुसऱ्याला समजून घ्यायचं असतं. बरं किती समजून घ्यायचं त्याचंही काही मोजमाप नाही. वाशिंद रेल्वे स्टेशनवर आमची आगगाडी चक्क साईडला टाकून दिली. उपनगरीय लोकल पुढे काढण्यात आली. मनाचा थोडा जळफळाटच झाला. ही कसली पद्धत आहे बाबा रेल्वेची. अजून पंधरा मिनिटे गेलीत आणि चक्क मागची सेवाग्राम एक्सप्रेस पुढे काढण्यात आली. अजून पंधरा मिनिटांनी दुसरी कोणतीतरी गाडी पास झाली. आता मनाचा ताबा सुटून रेल्वे अधिकाऱ्यांवर  माझ्या तोंडून आगपाखड सुरु झाली होती. खरं म्हणजे या संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारून चौकशी व्हायलाच पाहिजे. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण. हेच आपलं चुकतं. माझा तिळपापड झालेला बघून समोरच्या बेंचवर बसलेली ताई मला म्हणालीच. बाबा जाऊद्याना, तुमची कुठं तान्हुली लेकरं वाट बघताहेत, घ्या काकडी खावा. खूप थंड असते.  माझ्या चेहऱ्यावरच्या कळ्या खुलून, लुप्त झालेल्या हसऱ्या पेशी गालावरच्या खळीत सामावल्या. प्रत्येक जण एन्जॉय करत होते. गाडी एवढी लेट झाली तरी सर्व पॅसेंजर शांत आणि आनंदित कसे. कोणताही राग रोष टीका टिपण्या नव्हत्या. किती सहिष्णुता, सर्जनशीलता आणि सहनशीलता आहे या लोकांच्या मर्यादेत. गुलाब ताजे फुलतात तरी कसे याचं उत्तर मिळालं होतं मला. किरकोळ विक्रेते, चायवाले चालत्या गाडीत फेऱ्या मारत होते. परंतु अंधाऱ्या रात्री मला फाट्यावरून चालत धामणगांवी चालत जावं लागणार होतं. त्या भागात बिबट्याचा वावर आहे असं ऐकायला मिळालं होतं. म्हणून घबराहट जाणवत होती. अगोदरच दीड तास लेट झालेली गाडी आता कसारा घाटात धावत होती. आणि तेवढ्यात तिशीतल्या तरुण मुलीने गाडीची चेन खेचली. झालाना दुष्काळात तेरावा महीना. माझ्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडलेत. एका मिनिटात गाडी जागेवरच थांबली. बरेच पॅसेंजर खाली उतरले. आता पंचनामा होऊन अर्धा तास तरी जाणार अशी खात्री झाली. त्या मुलीचा खिडकीतून मोबाईल पडला म्हणून तिने चेन खेचली होती. ही बातमी वाऱ्यासारखी पोहचली.  गाडी लेट होण्यासाठी होत्या नव्हत्या साऱ्या पॉसीबल गोष्टी आजच घडत होत्या. बहुतेक नियतीचाच हा खेळ असावा. म्हणून शांत राहणेच योग्य होते. केअर टेकर आला आणि निघून गेला. त्या मुलीची कोणतीही चौकशी अथवा दंड तिला झाला नाही. गाडी लवकरच चालू झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला. मला घेण्यासाठी सुद्धा माझा पुतण्या आला होता आणि मी रात्री अकराच्या सुमारास सुखरूप घरी पोहोचलो. माणसाने संयम शील  असावं, आणि विपरीत परिस्थितीत आयुष्याचा आनंद लुटावा. गुलाब ताजे आपोआपच  फुलतात.
 

 

रविवार, १ एप्रिल, २०१८

एप्रिल नांवाच फूल


जगात लोकांना मूर्ख बनविणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यांचा सर्वे करता येत नाही म्हणून बरं ! नाहीतर त्या आकडेवारीत कदाचित तुमची आमची ही गणना झाली असती. दुसरी गोष्ट म्हणजे मूर्ख बनविणाऱ्यांच्या दुधात साखर आणून सोडली आहे ती वर्षातून एकदा येणाऱ्या एक एप्रिलने. परंतु खरं सांगायचं म्हणजे एक एप्रिल हा सुज्ञांनी सुज्ञ लोकांना मूरख बनविण्याचा दिवस आहे. पूर्वी न्युज पेपरवाले सुध्दा मोठमोठ्या सिलेब्रिटींचे एप्रिल फूलच्या नांवाखाली लग्न लावून देत असत आणि आम्ही मोठ्या कौतुकाने आणि आश्चर्यचकित नजरेने दोन दोन वेळा तो पेपर वाचत असू. परंतु वर्षातून एक दिवस का होईना आयष्यभर मूर्ख बनविण्याचा पेशा करणार्यांना एक दिवस सज्जनतेची गुढी ऊभारता येते असो.

गोष्ट अशी आहे की, एप्रिलफूल नाही हो ! मनापासून खरं सांगतो. माझ्या मुलीचा मुलगा सोनू याचा बर्थडे दिवस सुद्धा एक एप्रिलच आहे. आता आली की पंचाईत ! त्याला कळायला लागल्यापासून जेंव्हा शाळेत त्याने बर्थडेच्या दिवशी चॉकलेट्स वाटले त्यावेळेस हा सोनू आपल्याला एप्रिल फूल बनवितो आहे अशी सर्व स्टुडंटची खात्री झाली होती. मग शेवटी शाळेच्या बाईंनी आपलं  कौशल्य वापरून हा तिढा सोडविला म्हणे. असेल कदाचित. परंतु दर वर्षी त्याच्या आई वडीलांना कमी अधिक प्रमाणात लोंकाची, नविन रिश्तेदारांची समजूत काढावीच लागते.

पण एक एप्रिलफूल ने असं काही बस्तान बसवलं आहे की सकाळी सकाळी कोणतीही बातमी खरी वाटच नाही. 31 तारखेला नोकरीची ऑर्डर हातात पडल्या पडल्या विश्वास दुसरया दिवशी शेजारीण काकूंना नोकरी मिळाल्याची खबरबात देतो तेंव्हा निमा काकूंना खर वाटेल तेंव्हा ना ! आज एक एप्रिल आहे ना, दिवसभर पोरींच्या मागे हुंदडत असतो, अन म्हणे नोकरी ची ऑर्डर मिळाली त्याला !! असे कॉमेंट्स सहज ऐकायला मिळतात.

तसच आज मला एके ठिकाणचं साखरपुड्याचं आमंत्रण मिळालं आणि माझ्या मनात पाल चुकचुकलीच. आमंत्रण देणारे मुलाचे वडीलच, प्रतिष्ठित माझे नातेवाईक होते म्हणून बरं नाही तर माझाही गोंधळ उडाला असता.

तसं बरं झालं महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती एक एप्रिलला केली नाही म्हणून ठीक, म्हणून विरोधकांना भांडता तरी येतं. यांच्यातली खरी गोम म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती ही एप्रिल फूल होती का अशी शंका आता घर करू लागली आहे.

आपण किती तरी अनावश्यक असे पाश्चात्य देशांचे डेज मोठ्या अनंदाने साजरे करतो आणि आपल्याच भाद्रपद महिन्यावर टीकास्त्र सोडत असतो.

सोमवार, १९ मार्च, २०१८

निसटलेले

मचल मचलके ये हवाये बुला रही है तूम्हे 

वाऱ्याचा मागमूस नसतांना देखील मोगऱ्याचा वास चौफेर दरवळतो त्याचं किती वारेमाप कौतुक होतं. त्याप्रमाणे न चाहूल लागू देता शिशिरची पानगळीला सुरुवात झालेली असते परंतु त्याचं कोणालाही सोयरसुतक नसतं. पण पाऊस कधी कधी एवढा उतावीळ झालेला असतो , की तो आपल्याला  छत्री उघडू देण्याची थोडी उसंत देखील देत नाही. टप टप आवाज करत तो तिच्या वेणीवरून, गालावर, तिच्या अंगा खांद्यावरनं निथळत तिच्या पदरात सामावतो. पहिल्या पावसामुळे जमिनीतून येणारा विशिष्ट प्रकारचा सुगंध दरवळला नंतर वातावरणात होणारा बदल, फुलणारे एखादे फुल, आईच्या मांडीवर रांगणारे एखादे मूल, घरात जागा नसल्यामुळे कपाटात कोंबून ठेवलेली वाचनीय आणि आवडती पुस्तके आणि त्यातून येणारा हवा हवासा कुबट वास, स्टेशनवर पोहचण्या आधीच मीस झालेली ट्रेन, आणि कोणी तरी दिलेला मदतीचा हात. पहिल्याच वेळेला सासरी गेलेल्या पोरसवदा मुलीला लागलेली माहेरची ओढ, आईच्या शेजारी उभे राहून तिने फिरविलेला मायेचा हात. दुसऱ्याच दिवशी "मला माहेरी करमत नाही, बाई गं !  असं गाणं म्हणणाऱ्या तिच्या जिवलग मैत्रिणी.  जिवलग मित्राबरोबर रायगडावर पौर्णिमेच्या रात्री मारलेल्या मनसोक्त गप्पा, भर गर्दीच्या ठिकाणी मित्राची आठवण काढावी आणि साक्षात तुमच्यासमोर त्याने प्रगट व्हावे याच्या पेक्षा दुसरा आनंद कोणता बरे असेल. दुपारचा मध्यांनं, ऊन मी म्हणत होतं. जाणाऱ्या गाड्यांचा धुराळा सहन होत नव्हता, ऑफिसला जाण्यासाठी म्हापे बस स्टॉप वर कोणी लिफ्ट देईल का त्याची वाट बघत उभा होतो. एक छोटा टेम्पो ड्रायव्हरने लिफ्ट द्यावी आणि आपल्याला कोणी बघत तर नाहीना अशी खात्री करून अंग दुमडून त्या छोट्या टेम्पोत ड्रायव्हर शेजारी आसनस्थ झालो. अल्फा लावल कंपनीच्या इच्छित बस स्टॉप वर उतरून त्याला भाड्यापोटी पाच रुपये देवू केले असता त्याने नम्रपणे नकार द्यावा. ती व्यक्ती VIP असावी. अहंकाराचा लवलेश नसलेला, नम्रताने भरलेला आणि जमिनीवर चालणारा तो  तीन फॅक्टरीचा मालक निघावा. सारेच काही समजण्या पलीकडचे होते. त्याची गाडी दिसे नाहीसी होईपर्यंत मी ऑ करून बघतच राहिलो आणि एका सेकंदात त्याने माझं आयुष्याचं गणित बदलवून टाकलं. आता पुढच्या क्षणचित्रात रात्रीचे बारा वाजून दहा मिनिटे झाली होती. 17 तारखेच्या रिझर्वेशन प्रमाणे आम्ही कल्याण प्लॅटफार्मवरून चेन्नई एक्सप्रेस पकडली. एक्सप्रेस ट्रेन ने केलेला प्रवास तर अविस्मरनियच होता कारण मध्यरात्री नंतर चोर पावलाने येवून बदलणाऱ्या तारखेमुळे होणारा प्रवासाचा महा खेळ खंडोबा झाला होता. आमची स्लीपर सिटे दुसऱ्या लोकांनी अगोदरच ऑक्युपाय केलेली होती.  रेल्वे टीसी हळूच माझ्या कानात कुजबुजला, "तुमची गाडी कालच गेली हो". कालांतराने या स्मृती जरी जाग्या झाल्यात तरी हसून हसून शरीराची पुरे वाट लागते. अशा छोटया छोटया घटना आपल्या आयुष्यात डोकावत राहतात. अनेकदा असे फजितीचे तर कधी मनाला सुखद धक्का देणारे हे क्षण न सांगता येतात आणि खूप धावपळीचे आयुष्य घालवितांना आपल्याला कधी दिसतात तर कधी ते दिसतच नाही. अश्या निसटलेल्या क्षणातूनच आपलं आयुष्य बनत जातं.

रविवार, ११ मार्च, २०१८

बांबूच्या बनात

वेळूच्या झाडाला कधी फुले येत नाहीत. परंतु निसर्गाने याच जन्मात त्या झाडाला परतावा दिलेला आहे. झाड नष्ट व्हावयाच्या अगोदर ते फुलांनी बहरून येते हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. शास्त्रीय कारण काहीही असो, परंतु मनुष्य असल्या सद्गुणांनी कमी जास्त अधिक प्रमाणात नखशिखान्त ओतप्रोत भरलेला आहे हे नक्की.

तरुण मुले आणि मुली यांच्यात फरक एवढाच आहे  की, तरुणांना बियरच्या बाटलीचं झाकण कसं उघडायचं याचं प्रशिक्षण जसं कुठंही घ्यावं लागतं नाही, त्याप्रमाणे पारंपारिक आणि अपारंपारिक उत्सव साजरे करण्यासाठी भर रस्त्यावर बांबू गाडण्याचे ज्ञान सुद्धा त्यांना सहजगत्या प्राप्त होतं. परंतु तरुण मुलीला पोळीची कणिक सैल किंवा घट्ट कशी मळायची हे मात्र तिला आईच्या शेजारीच उभं राहूनच शिकावं लागतं.

 तसं म्हटलं तर रानटी झाडांचे सोयरसुतक नसलेल्या कवी लेखकांची प्रतिभा सुद्धा ह्याच बांबूच्या स्टेजवर वृक्ष वेलींचं कौतुक करण्यासाठी बहरते आणि याच स्टेजवर मंत्री महोदय सुद्धा मोठमोठी रस्ते महामार्ग बांधण्याचं सूतोवात करून तोंडभरून स्वतःचं कौतुक करून घेतात. आयुष्यभर बांबूच्या बनात वावरताना शेवटी बांबू हेच मानवाला समशान भूमीकडे नेण्याचे काम दिन रात अव्याहतपणे करत असतात. परंतु खेडोपाडी, गावो गांवी असलेल्या स्मशान भूमीला जाणारा रस्ता सुशोभित असावा आणि तेथेही पाण्याचा नळ असावा असे कोणत्याही मंत्र्यांच्या गांवी नसते. जिकडे तिकडे बांबूचं बन असतं. महिला दिनाचा पुरस्कार करणारा पुरुष सुद्धा एक दिवसापूरताच असतो. बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस वैकुंठ भूमीला कुंपण का असावं या चर्चेचं गुऱ्हाळ मांडण्यातच तो व्यस्त असतो. कोणतेही न्यूज चॅनेल लावून बघा, अश्या बरेच बांबूचे बन आपल्याला पेटलेले दिसतील.

सोमवार, ५ मार्च, २०१८

नाना

अजुनी येतो वास फुलांना अजुनी माती लाल चमकते । खुरट्या बुंधावरी चढूनं अजुनी बकरी पाला खाते ।

बा.सी. मर्ढेकरांच्या या ओळी मला त्या विश्वात परत परत खेचून नेतात. कारण लहानपणी मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, रुळलो, वागलो, माझ्या बालपणाचं आयुष्य काढलं आणि ज्याने माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला ते माझे नाना, नव्हे माझे दैवतच. अजून त्या माझ्या गांवी राहत आहेत. नात्याने ते माझे काका जरी असले तरी काका हा शब्द अजून पर्यंत माझ्या ओठावर कधी आला नाही आणि आजतागायत "नाना" म्हणूनच मी त्यांना हाक मारतो. बालपणाचा प्रत्येक क्षण मी त्यांच्या सहवासात घालविला. माझे दोन्ही पाय त्यांच्या मानेच्या बाजूला सोडून त्यांच्या खांद्यावर बसून मी प्रवास करत असे. कधी बैल गाडीवर बसून, गर्द रानातून चाकोरीबद्ध खडबडीत रस्त्याने राजमाने या शेजारील गांवच्या खंडोबाच्या यात्रेला जात असू. म्हणूनच मुबंई शहरात वास्तव्याला असून सुद्धा अजून मला बैल गाडी चालविण्याचं कसब माझ्या अंगी मौजुद आहे ते यामुळेच. मला आठवतंय, भाकर बांधून चांदण्या रात्री, बैलांच्या गळ्यातील घुंगर माळांची गाज ऐकत, शेतमळ्यावर राखण करायला झोपायला जात असू, कधी कधी शेतमळ्यावरून परस्पर  कोणाला चाहूल न लागू देता रातोरात शेजारच्या बाजारपेठेच्या गांवी तमाशाला जाण्याची मजा काही अलंगच होती, परंतु  सूर्य नारायणाचे दर्शन व्हावयाच्या आत त्यांचे शेत मळ्यावरील खळ्यात शेताच्या बांधावर गवत कापण्याचे नाही तर मोटेवरून पाणी भरण्याचे काम चालू झालेले असायचे. मी चार पायी खाटेवरच्या अंथरुणात पडल्या पडल्या ही सारी गंमत बघत असे. त्याच क्षणी एक विहंगमय दृश्य नजरेस पडायचं. सकाळच्या प्रहरी टेकड्यांच्या पलिकडून लालबुंद आणि तांबूस रंगाचा गोल मुंगीच्या पावलासारखा तर तर चालत पृथ्वीच्या पोटातून वर येतांना दिसायचा, जणू वसुंधरेने बाळाला जन्म दिला.

सकाळच्या सौंदर्याने ओतपोत भरलेलं ते माझं गांव धामणगांव आणि ते माझे नाना अजून गांवी त्या मातीच्या घरात राहतात. अजून असं वाटतं ते लहानपण परत एकदा यावं आणि त्यांच्या खांद्यावर दोन्ही पाय आजूबाजूला टाकून, त्यांच्या डोक्यातली टोपी माझ्या डोक्यात घालून त्यांचे केस विचके-वाचके करून टाकून त्यांच्या खांद्यावर ठाण मांडून बसावे. किती दिवस झालेत रात्रीच्याला त्यांच्या बरोबर शेतावर नाही गेलो, रात्रीच्याला परस्पर चाहूल न लागू देता त्यांच्याबरोबर तमाशा बघायला नाही गेलो. ते सकाळी सकाळी  मोटेवरचं पाणी, शेताच्या बांधावरचं गवत कापणं, तो लालबुंद सकाळचा सूर्यगोल मनातून पुढे सरकतच नाही. म्हणून अजुनी येतो वास फुलांना अजुनी माती लाल चमकते । खुरट्या बुंधावरी चढूनं अजुनी बकरी पाला खाते ।

शनिवार, ३ मार्च, २०१८

किलबिल कोवळी मने


मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांची मनं निर्व्याज्य असतात. चिखलात उमलल्या स्वच्छ कमळांच्या पाकळ्यांसारखी. फुल उमलायच्या अगोदर त्या निर्व्याज्य नाजूक कळ्यांकडे बघा, कशी हात लावताच ती गळून पडतात.  त्यामुळे त्यांना झाडावरून तोडायचं नसतं. त्यांना झाडावरच फुलू द्यायचं असतं. आपण नुसते डोळे जरी वटारले तर त्यांच्या नाजूक पापण्या चिंब भिजतात. तृणांच्या पात्यांवर दवाने थब थबून गेलेल्या दवबिंदूसारखी त्यांची मने कधी ओथंबून विरघळतील हे त्या मातेशिवाय कोणालाच कळत नाही.  मी ज्यावेळेस तिला विचारलं, कि तुम्ही लहान मुलं पायात बूट का घालतात. "पायमोजे खराब होवू नयेत म्हणून" असं तिने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं. या नाजूक, कोवळ्या किलबिल मनाच्या भावना , त्यांनी दिलेली उत्तरे ही तितकीच कोमल पिंजलेल्या कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि परिपक्व असतात. नितळ आणि निर्मळ पाण्यात खडा टाकून त्या नाजूक लहरी निवळेपर्यंत ती कोवळी मने असच तास न तास आपलं प्रतिबिंब बघत राहतात. त्यांच्या अदा बघा किती सुंदर असतात. रीम झिम पावसात पायाने पाणी तुडविणे, साबणाच्या पाण्याचे बुडबुडे हवेत सोडणे, मोठया माणसाचे बुट पायात घालून चालण्याचा प्रयत्न करणे, बाबांचा चष्मा काढून आपल्या स्वतःच्या डोळ्यावर चढविणे, लग्नात नवरदेवाचा घोडाच पाहिजे असा हट्ट करणे, आईच्या शेजारी उभे राहून छोटया छोटया पोळ्या तयार करणे, वाकडा तिकडा वाळूचा किल्ला तयार करणे, घरात लपंडाव खेळणे, दसरा असो किंवा मकर संक्रात असो, सोनं आणि तिळगुळ घरोघरी जावून यांना कसलां कमालीचा आनंद होतोय. मांजराचं आणि कुत्र्याचं पिलांशी यांची चांगलीच गट्टी जमते.