शनिवार, २० एप्रिल, २०१९

लबाड लांडगं ढाँग करतंय

सध्या राजकारणात "लबाड" या शब्दाने जबरदस्त धुमाकूळ घातला असून तो खऱ्याला खोटं, आणि खोट्याला खरं करण्यात गुंतलाआहे. त्याने विकृतीची एक नवीन परिभाषा जन्माला घातली असून लोकशाहीचं मूल्य त्याने आपल्या आतल्या खुंटीला बांधून ठेवलं आहे. निरनिराळ्या स्टेजवरून राजकीय मुखवट्याद्वारे जनतेला तो सहजपणे दर्शन देतो. तो कधी वर्षाला बहात्तर हजार रुपयातून तर कधी शेतकऱ्यांची दोन दिवसात कर्जे माफ करण्यात गुंतला आहे. कोणत्या स्टेजववरून तो घरटी एक सरकारी नोकरीचं आमिष दाखवेल, तर कोणाला दरवर्षी दोन लाखाची मदत करेल याचा ताळमेळ सांगण्यास कोणी तयार नाहीत तरी सुद्धा तज्ञ मंडळी या लबाड्याला भरीव पाठिंबा देतात हे आश्चर्यकारक खेदजनक आहे. खोटं का असेना, एक मात्र नक्की की सर्व  भारतीयांना चांगले दिवस येतील अशी अमिष त्याने दाखविली आहे. आपला भारत देश हा अतिशय श्रीमंत देश असून सुख समृद्धी साधनांनी विपुल असा आहे, अशी त्याने खोटी खोटी प्रतिमा जगापुढे सादर केली आहे. भारताचा जागरूक मतदार मात्र अचंबित झाला असून तो आपले रंग रूप कसे दाखविणार हे 23 मे 2019 ला आपल्याला समजेल.

बुधवार, १७ एप्रिल, २०१९

राज साहेबांचा बुलंद आवाज

हिंदुस्तानात सध्या एका बाजूला प्रचार सभेतला नेत्यांचा बयान बाजीचा स्तर इतका कमालीचा घसरला आहे की नेत्यांनी आपल्या जिभेचं कव्हर बाजूला काढून तिला मोकाट सोडून दिली आहे. महाराष्ट्रात सुद्धा जागो जागी त्यांच्या बिया पाणस्थळी रुजल्या आहेत.

प्रश्नांना विचित्र लॉजिक लावून भाजपकडे राजसाहेबांची उत्तरे नाहीत हा एक चर्चेच्या विषयाला उत आला असताना राज साहेब असे प्रश्न इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांना विचारण्याचे धाडस दाखवत नाहीत हा  सस्पेन्स आपण समजू शकतो. नोटबंदी, शौचालय आणि इतर विविध विषयांवर भाष्य करताना साहेबानी विचित्र लॉजिक लावून सुंदर टिपण्या करून नितळ पाण्यात शेवाळ बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. पण वाईट एवढंच वाटतं त्यांनी संधीचं सोनं नाही केलं. राजकारणात काहीही होऊ शकतं हे त्यांना चांगलं माहीत आहे. राष्ट्रवादीनेच मोदीला पाठिंबा दिला तर सारंच मुसळ केरात !! . पण असो, आम्हाला राजसाहेबांचा एक तरी उमेदवार पाहिजे होता, प्रचंड बहुमताने जनतेने त्यांना निवडून दिलं असतं. संसदेत आवाज दुम दुमला असता साहेबांचा. संधी चालून आली होती पण दारालाच कडी लावलेली होती म्हणून ती वापस निघून गेली. साहेब स्वतःच्या बागेतल्या झाडांना पाणी द्यायची चिंता नाही करत, जंगली झाडं तर बिगर पाण्याने पण जगतात, साहेब त्यांची चिंता करतांना घमेघुम झाले आहेत. मतदार आणि कार्यकर्ते बुचकळ्यात पडलेत ! हे मात्र खरं आहे

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

आडात नाही तर पोहऱ्यात येणार कोठून

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी अगोदरच स्ततः जाहीर केले आहे की, काँग्रेस जर सत्तेत आली तर ज्यांना बारा हजार पेक्षा कमी पगार आहे किंवा ज्यांची मिळकत शून्य आहे, अशा गरीब लोकांसाठी महिन्याला 6 हजार ते बारा हजार असे वर्षाला गरीबाच्या खात्यात 72000 रुपये प्रतिवर्षी मिळतील.

किंतु त्याच्यात भरपूर प्रकारचे  "पण" आहेत.  25 करोड गरीब जनता x 72000 रुपये हे गणित सोडविण्याचे बरेच तज्ञ प्रयत्न करत असतील आणि प्रत्येक वर्षी एवढा पैसा आणायचा कोठून हा भाग वेगळाच.

अस समजूया, युपीए सरकार सत्तेत आलं तर, युपीए सरकारमधील घटक पक्ष ही स्कीम लागू करण्यास मान्यता देणारच नाहीत. हे पण खरंच आहे की आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. त्यावेळेस राहुल गांधी सहज पळ काढू शकतात की जनतेने आम्हाला एक हाती सत्ता दिली नाही.

या योजनेचे गाजर दाखवितांना महागाई, जिल्हा परिषद, तहसीलदार कचेरी यासारख्या आणि प्रायव्हेट क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्ट लेबर यांची मानसिकता, काम न करण्याची प्रवृत्ती, आळशी दारिद्र्य, देशाची आर्थिक स्थिती, जागतिक बँकेचे कर्ज, जीडीपी ग्रोथ,  औद्योगिक क्षमता आणि महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रातील मनुष्यबळ यावर आधारित बदलणारी समीकरणे, दारिद्य्र रेषेखाली किती जनसंख्या आहे याची अनिश्चित माहिती या गोष्टींकडे सारासार दुर्लक्ष करणे म्हणजे गाजराची पुंगी वाजविणे असाच अर्थ निघतो.

देशाची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान  इम्रानखान यांच्यावर म्हशी विकून आता गाढवं विकायची वेळ आली आहे. तशी आपल्यावर वेळ आली तर भारताला आर्थिक संकटातून उठायला भरपूर पिढ्या खर्च कराव्या लागतील.
 



गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

सांजकी दुलहन बदन चुराये, चुपकेसे आये

जेथे Work in progress चा बोर्ड असतो तेथे No Entry असते, आणि अशा ठिकाणी सर्वच activities बंद असतात हे आपणास पटवून देण्याची आवशक्यता नाही. पण त्याला अपवाद ठरली आहे आपली शीतचंद्रलोक सोसायटी. आपल्या सोसायटीत या वर्षी श्री सत्यनारायणाची पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम कसे होतील हा चिंतेचा विषय चर्चेत होता. चोवीस वर्षांपासून चालत आलेली प्रथा बंद पडते की काय अशी शंका कोणाच्याही मनात येणे साहजिकच होतं आणि कारणही तसंच होतं. चारही विंगच्या गॅलऱ्यावर प्रचंड सामान विखुरलेलं. प्रॅक्टिस करायला जागा कुठंही शोधून सापडणार नाही अशी अवस्था !  बिल्डिंग रिपेअर करण्याचे काँट्रॅक्टरचे समान, सिमेंटच्या गोणी, पाईप, बांबू, कलरिंगचं काम, ग्रील्स चे एकमेकात अडकलेले सांगाडे, विचारू नका सगळीकडे सावळा गोंधळ. परंतु त्या शंकेला सुरुंग लावलाय श्रीयुत पोंक्षे यांनी आणि त्यांना मोलाची साथ दिली ती श्रीमती गौरी गोठीवरेकर यांनी. आपल्या सोसायटीत दिवाळी पहाटही साजरी झाली आणि वार्षिक श्री सत्यनारायणाची पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही यशस्वीपणे संपन्न झालेत. त्यामुळे सर्वप्रथम मी श्रीयुत पोंक्षे आणि श्रीमती गौरी गोठीवरेकर यांचं मनापासून अभिनंदन करून आभार मानतो.

पहिल्या दिवसाचा कराओके कार्यक्रम इतका बहारदार असेल असं मी तसूभर ही कल्पना केली नव्हती. श्री बालासुब्रमण्यम, श्रीकांत काकडे आणि सुरेश जी यांनी किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांच्या मधुर सुरात चांगल्या चालीची क्लासिकल गाणी गाऊन प्रेक्षकांच्या खिशातल्या रोकडा नोटा बाहेर काढायला लावल्यात. कोणत्या शब्दात या नोटांचं वर्णन करू........सांजकी दुलहन बदन चुराये, चुपकेसे आये. अशी एकसे बढकर एक गाणी सादर झालीत आणि शीतचंद्रलोकवासीयांनी मनसोक्त जुन्या गाण्यांचा आनंद लुटला.  काळ्या ढगांच्या फटीतून जशी सोनेरी किरणे चकचकावीत त्या प्रमाणे या सुंदर कार्यक्रमात दुधात साखर पडली ती श्रीयुत पोंक्षे आणि श्रीमती गौरी गोठीवरेकर यांच्या अफलातून धमाल अँकरिंगमुळे. एकवेळा बालासुब्रमण्यम यांनी शंका उपास्थित केली की आप लोगोंको हमारे गाने अच्छे लगते है या इनकी, जो आप इतना रिस्पॉस दे रहे है उनको । त्यांनी तर त्यांच्या कार्यक्रमात येण्याची त्यांना ऑफर ही देऊन टाकली. ओरिजिनल लोक आहेत आमची.

ही कहाणी इथेच संपत नाही तर , पोंक्षे आणि गौरी गोठीवरीकर मॅडम यांनी A B C D च्या अद्याक्षरातून आपल्या आयुष्याचा पैलूंवर भाष्य करून त्यां अद्याक्षरांचा आपल्या समोर रहस्यमय अर्थच सांगितला.

प्रेम, मैत्रीण, आणि कोणत्याही मुलीचं शेवटचं अक्षर A किंवा आय या अक्षरानेच होतो. मी मनातल्या मनात पडताळणी करून बघितली. बायकोच्या शेवटचे अद्याक्षर A नेच संपते, काय आश्चर्य माझ्या तिन्ही मेहुण्यांचे शेवटचे अद्याक्षर सुद्धा.

V आणि H चा अर्थ ही असाच गहन सांगून, शेवटी Z च्या आद्यक्षरातून "झालं गेलं ते विसरा" हा जणू सर्व शीतचंद्रलोकवासीयांना संदेश दिला. झेड अक्षरात एवढी नम्रता मग प्रत्येकाने झेड हे अद्याक्षर आपल्या कोशात संग्रहित केलेच पाहिजे.

दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी 2019 ला श्री सत्यनारायण महापूजा  12 वाजता संपन्न होऊन चार वाजता सुश्राव्य भजन सादर झाले. महिलांचे हळदी कुंकू उत्साहात पार पडला.

सेक्रेटरी साहेबांनी मला रिक्वेस्ट केली होती की, तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे, तुमचे पर्सनल कार्यक्रम असतील ते पोस्टपोन करा. याला मात्र मी अपवाद निघालो, कारणही तसंच होतं - शिर सलामत तो पगडी पचास हे आडवं आलं. दुसऱ्या दिवसाचा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम शीतचंद्रलोक सख्यांनी गाजवला असा सुगंध दरवळला होता असं कानावर आलं. मात्र त्यांचं कौतुक करायचं राहून गेलं

प्रत्येकवेळा काही तरी सुटुन जातं आणि अभिप्राय देण्याचं औचित्य साधून ते सुटलेलं येथे थोडक्यात प्रस्तुत करतो.

सर्व सुखासुखी चाललं असतांना सुद्धा सुखाचा शोध घेतला जात असतो आणि तो थांबत नसतो. कोणी मला सुखाचं निवास दाखवलं तर मी त्याला एक लाख रुपये देईन असं म्हणणारा सुद्धा अजून माझ्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही. हे वाचून माझे जिवलग मित्र श्रीयुत गावडे साहेब मला चिमटे काढतील आणि म्हणतील साहेब अगोदर सोसायटीचा मेंटेनन्स भरा नंतर लाखाच्या गोष्टी करु आपण. ठीक आहे, come to the point   मला तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की आपल्या सोसायटीचे रिनोव्हेशनचे काम पूर्णत्वाकडे पोहचत आहे. एक अविश्वसनीय प्रोजेक्टची सांगता होईल पण काही आठवणी स्मरणात राहून जातील.

*शीतचंद्रलोक बिल्डिंग रिनोव्हेशन - एक अविश्वसनीय प्रोजेक्ट*

ज्या सोसायटीला २५ वर्षे झालीत परंतु एकही वेळा कलर दिला गेला नव्हता, जो कमीत कमी सहा वर्षातून एक वेळा दिलाच पाहिजे. अशा परिस्थितीत सोसायटीच्या ईमरतीची हालत फारच खराब झाली होती. ओपन झालेले पिलर्स , तडे पडलेल्या भिंती, उखडलेले प्लॅस्टर, गॅलरीची झालेली दुर्दशा आणि अशा परिस्थितीत गोळा झालेला सभासदांचा अपूर्ण रिपेअर फंड हा सभासदांना वापस करावा लागला. आणि साहजिकच प्रोजेक्ट लांबला. त्यातच स्टील, सिमेंट, रेती इत्यादी मटेरियल ची वाढलेली महागाईने कळस गाठला होता. परिणीती बजेट फुगलं.

स्ट्रक्चरल ऑडिट झाले, पेपरला जाहिरात दिली गेली, निविदा मागविण्यात आल्यात. कन्सल्टंट ची नेमणूक करण्यात आली. श्रीयुत फाटक साहेबांनी चॅलेंज स्वीकारलं, टीम कमिटी आणि नॉन कमिटी मेंबर्स यांनी त्यांना मोलाचं सहकार्य दिलं. रिनोव्हेशन केलेल्या सोसायटींचा वाशी, कल्याण येथे सर्वे करण्यात आला. काँट्रॅक्टरची निवड करण्यात आली, ऍग्रिमेंट बनवून त्याचं वाचन करून अर्थ समजावून घेण्यात आला. शंका objection यांचं निरसन करण्यात आलं. सोसायटी सभासदांना विश्वासात घेण्यात आले. फंड वसुली साठी कमिटीने पराकाष्टा केली. हे काम आणि हा प्रोजेक्ट साधा आणि सरळ नाही याची सर्वांना कल्पना आली होती. महिन्याला कधी पाच ते कधी सहा मिटिंग्ज घेण्यात आल्यात. फंड मॅनेजिंग श्रीयुत पावसकर साहेबानी सांभाळला, टेक्निकल बाजू श्रीयुत कुंभार आणि सचिन सुर्वे यांनी संभाळल्यात. श्री वेणूगोपाल आणि अमर यांनी टेंडर बनवून साचेबंद केले. श्रीयुत गायकवाड, काटकर आणि चव्हाण यांनी कामाची मोजदाद आणि आपापली नेमून दिलेली कामे यथोचित संभाळलीत. श्रीमती गुरव आणि सौ.गावडे यांनी ठरवून दिलेली कामे करून हातभार लावला. असा हा अविश्वसनीय प्रोजेक्ट म्हणजे प्रचंड मेहनत आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर "अनबिलिव्हेबल" अशा प्रोजेक्टचं काम पूर्ण होत आहे. And credit goes to *"Mr. Pathak and his team"*  How is the josh मी सर्जिकल स्ट्राईक वर बोलत नाही. एक वर्षांपासून काम चालले आहे आणि सर्वांना खूप त्रास होत आहे. हे तुमचं म्हणणं खरं आहे. परंतु त्याच्यात GST आडवा आला आणि विश्वकर्माने आपल्याला मार्ग दाखवला. त्यांच्यापासून खूप शिकायला मिळाले. त्यांच्याशी आपलं एक नातं निर्माण झालं हीच त्यांची आणि आपली ओळख स्मरणात राहणार आहे. शितचंद्रलोकच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी अशीच कृपादृष्टी शीतचंद्रलोकवर ठेवावी ही आर्जव आम्ही करतो.

खरं सांगू इच्छितो, आपले आभार व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत, आपण म्हणजे श्रीयुत गाडगीळ, श्रीयुत पोंक्षे, श्रीयुत चौधरी, मिसेस गोठीवरेकर आणि श्रीयुत पावसकर यांनी कमिटी सभासदांचा जो गौरव केला आहे, ती अप्रतिम भेट स्वीकारून आम्ही भारावून गेलो आहोत. भारावून गेलो आहोत.

धन्यवाद

ठेचा

ओबडधोबड शेंगदाणा आणि लसूण कुटून झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर नुसता जीव कासावीस होतो. कपाळावरच्या नसा तड तड उडायला लागतात. आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीतील सख्या यांच्या शेकोटीच्या भरीत भाकरीच्या पार्टीत सर्व पुरुष लहानथोर मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. आमच्या सोसायटीतील पुरुष मंडळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणी एकमेकांशी ब्र शब्द बोलेल तेंव्हा ना, सर्वकाही चिडीचूप तोंडातल्या तोंडात मिटक्या मारत चाललेलं असत. ठेचा म्हटल्यानंतर कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही अस होणारच नाही, परंतु माझ्या अंगाला मात्र दरदरून घाम फुटतो. ठेचा हा निव्वळ झणझणीत मिरची पासून बनविलेला असतो म्हणून नव्हे तर त्याला स्वयंपाक घरातली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजूला सारून चक्क लोखंडाच्या खोलगट तुळई मध्ये घालून व लोखंडाच्याच मुसळीने तुडवला जातो. हे रेखा चित्र नव्हे, तर माझ्या लहानपणी मी एकदा मित्रांबरोबर उकिरडे तुडवीत होतो "हे आईला कळलं" असं बहिणीने मला सांगितलं. आई आज तुझा चांगलाच ठेचा करणार आहे ! परिणाम असा झाला या दहशतीची ही परंपरा वह कौन थी या सिनेमातली मेणबत्ती घेऊन भयाण अमावस्येच्या रात्री फिरणारी स्त्री बघितल्यानंतर सुद्धा घाबरायला होणार नाही एवढी दहशत आमच्या घरी जागृत अवस्थेत वावरते असते. स्त्रीयांनी संपूर्ण राग ठेचा बनविण्यात घालविला असं कधी ऐकण्यातही आलेलं नाही आणि तसं असतं तर त्याला खमंग चवही आली नसती. हे वाचून आमचे मित्र गावडे साहेबांना राक्षसी आनंद मिळणार नाही परंतु मला चिमटे जरूर काढतील आणि म्हणतील काय हाच विषय सापडला का तुम्हाला खरडायला. सुखासुखी मिळतंय ना राव खाऊ द्या ¡ सुखाचा शोध घेता घेता ठेचा चा शोध लागला असावा का म्हणून माझ्या डोक्यातलं चक्री वादळ सैरा वैरा धावत सुटलंय. परंतु या ठेचाचे कुठलेही धागेदोरे, विकपीडिया, लिखाण सापडत नाही. ब्रिटिश लोक 1947 मध्ये भारत देश सोडून गेलेत परंतु त्यांच्या मेजवणीतही ठेचून ठेचलेल्या ठेचाचा उल्लेख सापडत नाही.

आपल्या महाराष्ट्रातला हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा, हा आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीत दरवर्षी शीचंद्रलोक सख्या कडून शेकोटी या अजरामर झालेल्या नावाने प्रचलित आहे. हा भरीत भाकरीची मेजवाणीचा उपक्रम दरवर्षी न चुकता सोसायटीच्या आवारातच राबविला जातो आणि आम्ही शीतचंद्रलोक रहिवासी सुद्धा तेवढीच आतुरतेने वाट पहात असतात. या वर्षी सुद्धा आमच्या सोसायटीच्या प्रांगणात संध्याकाळी हिरव्या मिरचीचा ठेच्याचा झणझणीत खमंग दरवळणार आहे.

सोमवार, १० डिसेंबर, २०१८

च च च दूध उतू गेलं

बायको दूध घ्यायला गेली आणि येतांना मांजर आडवी गेली. या रांडेला आताच आडवी जायचं होतं का. मागे फिरून पण जाता येत नाही कारण दुधाचा थेंब घरात नव्हता आणि चहा पिल्याशिवाय दिवसाच्या कामाला सुरुवात होणार नव्हती. दूध तापवायला गॅसवर ठेवलं आणि खरोखर ते उतू गेलं याला कसला योगायोग म्हणायचा. तेवढ्यात माजघरातून आवाज आला, तुझ्या हातून नेहमी असं होतंच कसं, लक्ष असतं कुठे तुझं सध्या. असा कितीही ठणठणाट करून झाल्यानंतर सासूबाईंनी दुधाचा फेसाळलेला ओटा साफ केला असं कुठेही वाचण्यात अजून तरी आलेलं नाही. मांजर आडवी गेली तेंव्हाच तिला सिग्नल मिळाला होता आणि आजकाल माझ्या हातून जास्तच मीठ पडायला लागलं, देव जाणे सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं असा किदरलेला आवाज घराघरातून ऐकू येत असतो. आणि दुसऱ्या दिवशी भाजी करपून गेल्यावर आपलं चित्त ठिकाणावर नाही असं उगीच बोलणं खावं लागणार या भीतीने घरातली सवाशिणीन बिचारी चिडीचूप असते. रात्रीचे साडे नऊ वाजले आहेत, बाई आता जेवणावळ्या तयार करायला घेते. पण दुष्काळातला तेरावा महिना अजून कसोटी घेण्यासाठी आसुसलेला असतो. पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्यात लाईट गेलीच समजा. खरं आहे, कोंबडा बिचारा सकाळी सकाळी अरवण्याचं काम करून मानव जातीवर अनंत उपकार करतो, पण त्याला उदंड आयुष्य लाभो असा कोणीही आशीर्वाद देत नाही हेच खरं.

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

सांडितो अवगुण रे भ्रमरा !

उष्ण कटिबंधातले वाहणारे वारे एखादे वेळेस तुम्हाला शिथिल आढळतील, परंतु हिवाळी मोसमाचा गारवा असून देखील सुद्धा , भारतात सध्या निवडणुकीचे विषम आणि उष्ण वारे वाहत आहेत. आणि राजकारणातला दूषित घनकचरा इतका उफाळून वर आला आहे की सध्याचं सर्व वातावरणच प्रदूषित झालं आहे. कोणी कोणावर कसेही हीन दर्जाचे आरोप करत सुटला आहे. ह्या दुषीत घनकाचाऱ्याला जाळण्यासाठी कायद्याची कुठलीही चौकट अस्तित्वात नाही. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली या लोकांनी चांगलेच अवडंबर माजविले आहे. याच्यात न्युज पेपर आणि मेडिया वाल्यांनी सुद्धा काही प्रमाणात आगीत तेल ओतण्याचं काम प्रामाणिक पणे करीत आहेत.  गोळ्या नसलेल्या बंदुकीचे फुसके बार उडविण्याचे जनक म्हणून क्रेडिट आप पक्षाचा म्होरक्याकडे जाते.  कोणताही हातात पुरावा नसतांना करोडो रुपये भ्रष्टाचार केलेल्या पंधरा ते वीस  लोकांची लिस्ट  जाहीर करणे, हा त्यांचा हातखंडा झाला होता. पण त्यांना एकालाही दोषी सिद्ध करता आलं  नाही . पण अण्णा हजारेंच्या चळवळीत सामील होऊन दिल्लीत दुकान थाटून बसले हे मात्र खरे. त्याप्रमाणे  आपल्या पक्षालाही देशाच्या मध्यभागी दिल्लीत चौकीदाराची नोकरी मिळावी म्हणून काँग्रेसपक्षपती यांनी रोज पंतप्रधानांवर फुसके बार फोडण्याचे अजब शस्त्र शोधून काढलं आहे. काँग्रेस पक्षाच्या साठ वर्षांच्या राजकिर्दीत असंख्य करोडो रुपयांचे महा घोटाळे झालेत हे जनता विसरली असेल असं त्यांना वाटतंय. साठ वर्षे निर्विवाद अधिराज्य करणारा काँग्रेस पक्ष 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत चक्क 45 या आकड्यावर आपटला होता. मोदींनी विश्रांती न घेता विकासाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांची कर्जे माफ केलीत. इराणची थकित रक्कम देण्यासाठी मोदी सरकारने रणनीती, आराखडा आखला, सहा हप्त्यांमध्ये संपूर्ण ४३ हजार कोटीचं थकीत देणं भारतानं दिलं.  जीएसटी आणि नोट बंदीचं धाडसी निर्णय घेण्यात आला. परिणाम असा झाला विरोधकांची दुकाने बंद झालीत, प्रत्येक रुपयामागे सरकारला कर मिळू लागला. टॅक्स रूपाने जमा झालेला पैशाने सरकारी तिजोरीत चांगलीच भर पडून जनकल्याणासाठी योजना सरकारकडून सुरू करण्यात आल्यात. वचनपूर्तीसाठी अथक प्रवास करायचा असतो तो त्यांनी या साडेचार वर्षात केला आणि आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे.  बघता बघता 2019 च्या निवडणुकीचे सर्वानाच वेध लागलेत. पण रान कधी सपंतच नाही. काळोख सुरू झाल्यावर भर अरण्यात प्रकाशित चांदण्यांची सुद्धा भीती वाटायला लागते. महापुरात सापडलेल्या ओंडक्यांना काडीचा आधार हवा असतो तशी विविध पक्षांची गत झाली. आपलं अस्तित्व जणू धोक्यात आलं आहे आणि ते टिकविण्यासाठी, नाही ते हीन दर्जाचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.  ही विकृती एवढ्या टोकाला पोहचली, की पंतप्रधानांना नाही त्या हलक्या दर्जाच्या उपाध्या विरोधकांनी दिल्यात. आणि त्यात कोणीही मागे राहिले नाही. व्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली अवडंबर माजवून भारतीय संस्कृतीची ऐशी की तैशी करून टाकली. शहरात ओला सुका घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक   यंत्रणा सज्ज असते. परंतु राजकारणात अतिरंजित तोंडाळ  राजकारणी घनकचऱ्याची विल्हेवाट  लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे मतदारच पुढाकार घेवून अश्या प्रदूषित राजकीय दूषित घनकचाऱ्यांची मतदानाद्वारे   विल्हेवाट लावू शकतात. आणि ही संधी फक्त पाच वर्षांनी एकदाच येते.