Tuesday 16 October 2018

रंग पानाचा हिरवा सुकला, माझ्या कापसाला ...............!

चाळीसगांव पासून जेमतेम पंधरा किलोमीटरवर वसलेलं माझं गांव "धामणगांव".  या पहिल्याच वाक्यातलं "जेमतेम" हा शब्द माझ्या गांवच्या बाबतीत खूपच अशुभ ठरला आहे. वाहतुकीसाठी चाळीसगांव ते धामणगांव  रोड अतिशय ठणठणीत जरी असले तरी गावकऱ्यांसाठी सरकारची एस.टी. वाहतूक व्यवस्था जेमतेम किंवा नाही म्हटले तरी चालेल. या वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था देखील जेमतेमच होती. मी जेंव्हा चाळीसगांव एस.टी. डेपोला धामणगांवची एस.टी. बस बंद का झाल्याची चौकशी केली , तेंव्हा त्यांनी सांगितलं की पावसाळ्यामुळे एस.टी. बंद करण्यात आली आहे. त्यांचं उत्तर ऐकून मी चकितच झालो. त्याच्या डोळ्यात निरखून बघितल्यानंतर त्याचा केविलवाणा चेहरा अधिकच आगीतून काढलेल्या मठ्ठ माठासारखा भासला. गावांत नळाला पाणी सुद्धा जेमतेम अर्धा तास आणि तेही दोन ते तीन दिवसानंतर येतं आणि त्याला पर्याय नसतो, कारण हे सर्व पावसाचे अनियमित खेळ आहेत. गावांतील काही मंडळी वर्गणी काढून सांस्कृतिक उत्सव अति उत्साहाने साजरे करतात ही चांगली बाब आहे, परंतु गांवात कमीत कमी नियमित तीन वेळा एस.टी. वाहन यायला पाहिजे, गावकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांची शाळा-कॉलेज मध्ये जाण्यासाठी सोय झाली पाहिजे असा सुध्दा प्रयत्न करायला हवा परंतु तो उत्साह दिसत नाही. ज्या मराठी शाळेत आपण शिकलो त्या मराठी शाळेची फुटलेली, घरंगळलेली कौलं, अर्धवट सताड उघड्या खिडक्या बंदिस्त धर्मशाळेसारखी वाटतात. बऱ्याच वर्षांपासून पाऊस नियमित पडत नाही म्हणून शाळा समितीला ती दुरुस्त करून घ्यावीत असे सुचले नसावे कदाचित.

माझ्या लहानपणी जिथे निसर्गाला निसर्ग भिडत होता. नदीला अथांग पूर येत होता. रान वारा पिकापीकातून शीळ घालत असे आणि जंगल ही चारही बाजूने हिरवी चादर पांघरल्यासारखी भासत असे. तसं दृश्य बऱ्याच वर्षांपासून बघितले नाही. यावर्षी पाऊस श्रावण महिन्यापासून गेला तो गेलाच. त्याला तोंड फिरवून दाखवायला सुद्धा उसंत मिळाली नाही. जेमतेम तीन ते चार वेळा तो आला आणि कौतुकाची थाप घ्यायला तो घाबरलाच. नंतर त्याने फिरून तोंडही दाखविले नाही. तरी शेतकरी अजून आतुरतेने त्याची चातकासारखी वाटच बघतच होता. मंगेश पाडगावकरांची कविता भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. दिवाळी पर्यंत शेतकऱ्यांची शेतातली लगबग थंडावली. कापसाच्या गाठीच्या गाठी शेतातून घरी यायच्या त्या नाहीशा झाल्यात. कोणी बैलजोडी विकून खांद्यावरची ओझी कमी केलीत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार सुद्धा सरकारी पद्धतीने काम करून विलंब करतंय. कापसाच्या झाडाची पानं पानं आकसून मिटलीत. कापसाची झाडाची कच्ची कैरी वयात न येताच उन्हाने केविलवाणी झाली. दिवाळीला येणाऱ्या फुलांच्या पागळ्यांचा फुलोरा फुललाच नाही.

रंग पानाचा हिरवा सुकला,
माझ्या कापसाला..............!


No comments:

Post a Comment