मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

पुरणाच्या पोळ्या

अक्षय तृतीया, होळी, बैल पोळा आणि दिवाळीला किंवा कोणतेही शुभ कार्य असो की कोणताही सण असो आमच्या खानदेशात पुरणाच्या पोळ्या हमखास बनविल्या जातात. चणाडाळ रात्रभर भिजत घालून सकाळी पाटावरवंटावर गूळ मिश्रित करून येथेच्छ रगडून म्हणजे वरवंट्याने वाटून पुरण बनविले जाते. मातीची चूल आणि मातीचेच खापर आणि चुलीत धगधगता विस्तव. विस्तव म्हणजे एवढा धगधगता की एक टक नजर लावून नाही बघू शकत आपण त्याच्याकडे. त्या मातीच्या खापरावर भाजल्या जाणाऱ्या पुरणपोळ्यांना एक विशिष्ट प्रकारची चव निर्माण होते. ज्या ज्या वेळेस सणानिमित्त मी गावी जातो त्या वेळेस आमच्या काकूच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे जणू भरजरी तलमवस्त्र आपल्या ताटात मांडून ठेवले आहे असा भास होतो. चव म्हणजे सांगून नाही सांगता येणार त्यासाठी येवा खानदेश आपलोच आसा. मु.पो. धामणगांव तालुका चाळीसगाव.

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

झेप

आयुष्य ही एक सुंदर कविता आहे. जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे. आपल्या जीवनाच्या कवितेला सुंदर बनविण्याचे काम त्याने केले. त्याच्याबद्दलच मी आज दोन शब्द तुमच्यासाठी मांडत आहे. फार वर्षापूर्वी नव्हे तर तुमच्या आमच्या समोर आकार घेत असलेल व्यक्तिमत्व. साधारण कल्याणच्या वस्तीमध्ये राहणारा एक लहान मुलगा अल्फा लव्हल मध्ये क्याज्युअल म्हणून शॉपफ्लोअर ऑफिस मध्ये कामास लागला. नवीनच होता तो. आणि एके दिवशी मी त्याला हटकले कारण मटेरियल रिक्विझीशनचे खालीवर विस्कळीत प्रिंट झालेले स्टिकर्स घेऊन शॉपफ्लोअर साठी लागणारे स्पेअर्स घेण्यासाठी माझ्याकडे आला. मी तिमिरला सांगितले की याला साधे स्टिकर सुद्धा प्रिंट करता येत नाहीत. अगोदर त्याला शिकवा. पण म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण जेवढी गोंडस आहे तेवढीच ती कर्तृत्वाने ओत प्रोत भरून त्याच्या कामाच्या मूल्यांची उंची गाठणारी आहे. आणि तेथेच ते छोटं रोप फुललं आणि त्याची वेल गेली गगनावरी. त्याच्या कर्तृत्वाचं सौंदर्य लेखणीने पकडणे मला कदाचित जमणार नाही. त्याने अल्फा लव्हल मध्ये बरीच वर्षे घालवल्या नंतर असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करून सुद्धा अल्फा लव्हल मध्ये त्याला स्थिरता मिळाली नाही परंतु तो सिस्टीम मध्ये मास्टर झाला होता. ज्या प्रमाणे नदी एकाच ठिकाणी कधी थांबत नाही, ती सतत पुढे अविश्रांत वाहत असते त्या प्रमाणेच या तरूण मुलाने मागे कधी वळून पाहीलेच नाही. त्याने नोकरी सोडली नंतर simphony कंपनी तर्फे अल्फा लव्हल मध्ये ट्रेनिंग देण्यासाठी येऊ लागला. ही एक सुवर्ण संधी होती काय मला माहित नाही कारण बरीच वर्षे मी त्याच्या संपर्कात नव्हतो, आणि त्या संधीचे सोने करायचे असे त्या अभ्यासु आणि जिद्दी मुलाने पक्का निर्धारच केला असेन. पूर्णविराम आणि स्वल्पविराम कुठे द्यायचा मी गोंधळात पडलो आहे पण ही कहाणी इथेच थांबत नाही. तो तरूण मुलगा म्हणजे आपला जितेंद्र अनारे इंग्लंड मध्ये स्थायिक झाला. त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळाले. खरोखर त्याच्याबद्दल अभिमानाने ऊर भरून येतो. ताजे गुलाब फुलतात कसे त्याचं उत्तर सहज मिळालं. म्हणून अजून वाहतात वारे, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंधावर चढूनी अजून बकरी पाला खाते.

गुरुवार, १२ जून, २०२५

विद्रोही साहित्य संमेलन

विद्रोह या शब्दाचा अर्थ सर्वसाधारण सर्वांनाच माहीत आहे. अजून थोडे खोलात गेले तर विद्रोह या शब्दाचा हिंदी अर्थ बगावत, प्रतिरोध, सत्ताके खिलाप तर मराठी मध्ये या शब्दाचा अर्थ बंड, उठाव, उद्रेक असे अनेक शब्द मिळतात. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात आयोजित करण्यात आले आहे. आणि यंदाचे विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा साताऱ्यामध्येच भरविले जात आहे अशी बातमी वाचली. हा काही योगायोग आहे असे म्हणता येणार नाही. सर्व सामान्य आम जनतेसाठी खुले असलेले अखिल भारतीय साहित्य संमेलनात सर्वस्तरीय भरगच्च कार्यक्रमाची नांदी असतांना विद्रोही साहित्य संमेलनाची काय गरज पडली असावी बरे ! दोन्ही संमेलनामध्ये काय मूलभूत फरक असेल, अखिल भारतीय साहित्य संमेलन असो किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संमेलन असो, या मध्ये जाणून बुजून कोणी कोणाविरुद्ध आखाड्यात दंड थोपटून उभा नाही आहे मग दोन्ही साहित्य संमेलने एकाच शहरात भरविण्याचं प्रावधान काय ! विद्रोही हे नांव का बरे निवडले असावे. विद्रोह म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे वाद, फूट, बंड, उद्रेक, बगावत इत्यादी. साहित्य क्षेत्रात विद्रोह म्हणजे सर्जनशीलतेच्या आस्तिक मनाला झालेल्या वेदनाच असे म्हणता येईल. आणि या वेदनांचे मुळगाव कोणी सांगेल तर बरे होईल. दोन्ही संमेलनाच्या घटकांनी, आयोजकांनी जर एकत्र येऊन विचारविनिमय करून, सखोल चर्चा करून सहमतीने एकाच व्यासपीठावर, एकाच तंबूमध्ये मराठी भाषेचे एकच साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले तर दुधात साखर पडण्यासारखे होईल. साताऱ्यात या वर्षी भरणारे हे १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यातील सर्व भाषिय लोक, कार्यक्रम, रूढी, रिवाज, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक संमेलने चांगल्या परंपराप्रमाणे, गुण्या गोविंदाने पार पडतात. मग मराठी भाषेच्या साहित्य संमेलनामध्येच विद्रोह का ? एक भाषा आणि एकच मराठी साहित्य संमेलन असावे असे आपल्या भाबड्या मनाला वाटत राहते . पण आपल्याकडे जेष्ठ विचारवंत, कवी, लेखक, समाजसुधारक, पंडित आहेत, त्यांना सुद्धा असले प्रश्न पडत असतील!

शुक्रवार, १६ मे, २०२५

आहे मनोहर तरी....सुंदर माझे गांव

धुळे चाळीसगांव हाय वे आणि चाळीसगांव धुळे रेल्वे चा आवाज झोपेत कानापर्यंत ऐकू जाईल एवढ्या अंतरावर वसलेले माझे गांव धामणगांव तालुका चाळीसगांव. शहरापासून धामणगांवपर्यंत डांबरी पक्की सडक , आता तर शिदवाडी आणि करमुड पर्यंत त्याचा विस्तार झाला आहे. आणि हे पण खरे आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटली आहेत. तरी आपलं धामणगांव एसटीच्या नियमित सोईपासून वंचितच आहे. कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी एक बस येते. परंतु सुटी च्या दिवशी आणि उन्हाळ्याच्या सुटीत तसेच पावसाळ्यात ही बस बंद असते. आहे की नाही अफलातून आश्चर्य. येथील मतदार मतदान करून मुकाट्याने हा त्रास प्रामाणिकपणे सहन करत असतो. गांवातील लोकांना पायपीट करत खडकीसीम फाट्यावर जावे आणि यावे लागते. पायपीट करण्यासाठी सरकार पक्के रोड बांधून देते मात्र एसटीची सोय करू शकत नाही हे एक दुसरं मोठं आश्चर्य आहे. मी सुद्धा आता सत्तरी ओलांडली आहे. जेंव्हा चाळीसगाव डेपोमध्ये चौकशी काउंटरला हा प्रश्न विचारला की धामणगांवाला एसटी ची सोय का नाही. तेंव्हा त्याने काय उत्तर दिले माहीत आहे! धामणगांवचे लोक एसटीतून प्रवास करत नाहीत. स्वातंत्र्याच्या अमृत वर्षकालीन देशात अशी उत्तरे आणि कर्तव्य हीन नेतृत्व असलेली पुढारी असतील तर धामणगावातील सामान्य व्यक्तीने कुठे दाद मागावी ! बरं आपल्या गावांत अशा सामान्य जणांना असे प्रश्न देखील पडत नाहीत कारण धामणगावांतून प्रवासासाठी त्यांना वेदना सहन करण्याची सवय पडलेली आहे. आणि हेच खरे जीवन समजून सामान्य लोकांचा दिनक्रम चालला आहे. ट्रॅक्टरच्या मागील पाण्याच्या टँकरचा आसरा घेवून जीव मुठीत घेऊन प्रवास करतांनाचे बोलके चित्र आपले सहज लक्ष वेधून घेईल. आजकाल पालक मंत्री असो किंवा जिल्हास्तरीय पक्षीय पुढारी असो, त्यांच्या कडूनन बऱ्याच लोककल्याणपयोगी उपक्रम राबविले जात असतात, व्हॉट्सॲप च्या माध्यमातून अशा उपक्रमांचा खूप गाजावाजा चालतो. गावोगावी नाक्यावर पुढाऱ्यांचे बरेच बॅनर सुद्धा सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी कायम स्वरूपाचे लावलेले आढळतात. आपल्या गावासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी एसटी ची कायम स्वरूपाची सोय असावी असे कोणाला का वाटत नाही. Own vehicle is the best हे जरी खरे असले तरी गावातील सर्वसामान्य स्वतःचे वाहन नाही विकत घेऊ शकत, गावात येणारे सर्वच पाहुणे रावळे स्वतःची किंवा स्पेशियल गाडीची सोय नाही करू शकणार ती मंडळी ? ( उन्मेश दादाना लिहिलेले पत्र 24.01.2019 श्री उन्मेश दादा पाटील सस्नेह नमस्कार सर आपले पत्र मिळाले, आपण तुरंत विस्तृत रिस्पॉन्स दिला, हे कौशल्य आमच्या सारख्या साध्या माणसाला जमणे अशक्यच. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. सर आम्ही आपल्याकडे एक उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षेने पाहत आहोत , पन्नास वर्षांपासून धामणगावांत एसटी ची सोय नाही. ट्रान्सपोर्ट च्या अभावी बाहेरगावचे आमचे नातेवाईक आमच्या येथे मुली सुद्धा द्यायला कचरतात. कोणत्याही कार्यक्रमाला यायचे टाळाटाळ करतात. गांवातला शेतकरी, विद्यार्थी, महिला, आप्तेष्ट यांना चाळीसगांवी जाण्यासाठी खूप कष्ट पुरतात आणि वेळ वाया जातो. ट्रान्सपोर्ट अभावी कामं ठप्प होतं. कृपया या गावकऱ्यांच्या मागणीला प्राथमिकता दिली तर आम्ही ऋणी तर राहूच, परंतु आपलं आमच्याशी एक कायम स्वरूपाचं नातं निर्माण होईल. धन्यवाद आनंदराव कौतिक चव्हाण धामणगांव, तालुका चाळीसगांव.) _____ हा सर्व खटाटोप मी एकदा २०१९ मध्ये करून पाहिला होता , त्यांच्याकडून एक उत्तर आले होते परंतु पुढे काही झाले नाही. आताच्या घडीला हा प्रोजेक्ट जर कोणी घेतला तर त्याचे आपण ऋणी राहू. या प्रश्नाला वाच्या फोडून त्यांच्या पर्यंत पोहचवून पाठपुरावा केला पाहिजे. नाहीतर सर्व गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे. ज्या गावांत माझा जन्म झाला, जी माझी जन्मभूमी आहे त्या गावांची एसटी विना अशी उपेक्षा आणि फरफट बघतांना डोळे पाणावतात. आणि अजून किती दिवस! एसटी ची सोय नसली तरी शहराला जोडणारे पक्के डांबरी रोड आहेत हे काय कमी आहे काय! काही असो , "आहे मनोहर तरी....सुंदर माझे गांव"

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

नर्मदा परिक्रमा

नर्मदा परिक्रमा शिशिरची पानगळ संपली होती, आणि चैत्र सुरु झाला होता.निसर्गात चैत्र महिन्यात झाडांना नवीन पालवी फुटण्याची आणि ऋतू बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु आपले मित्र पराग ओवळेकर यांच्या मनात देखील असेच चैत्र पालवी सारखे एक सुंदर विचाराने घर केले होते आणि चैत्र महिन्यात त्यांनी त्याला आकार दिला सुद्धा. तो त्यांचा स्तुत्य विचार म्हणजे नर्मदा परिक्रमा. नर्मदा परिक्रमा म्हणजे आहे तरी काय ते थोडक्यात जाणून घेऊ. नर्मदा मैया मधे सर्व देवांचा वास आहे म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा ही सर्व देवांची परिक्रमा आहे. नर्मदा मैयाच्या किनारी बळी राजा पासून तर ब्रम्हदेवापर्यंत असंख्य देव देवता, ऋषी मुनी यांनी तप केलं, आणि म्हणून नर्मदा किनारी असलेला प्रत्येक दगड हा शिवस्वरूप समजला जातो. खरे तर हे सर्व माझ्या समजण्याच्या पलीकडचे. श्रीयुत पराग ओवळेकर चक्क नर्मदा परिक्रमा करून आले आहेत. हे जेंव्हा मला त्यांच्या कडून कळले तेंव्हा आपल्याला कोणीतरी सोनचाफ्याचे फुल आवडीने द्यावे, त्याच्या मुग्ध सुगंधाने आपण उल्हसित व्हावे आणि त्याचा नाजूक पिवळा रंग डोळे भरून पाहत रहावा पाहत रहावा ! कधी कधी माणूस अशा जागेवर पोहचतो की जिथे आजवरचा सारा फोलपणा जाणवू लागतो. कदाचित असाच क्षण पराग ओवळेकरांच्या आयुष्यात समोर उभा राहिला असेल, माता नर्मदेने त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दृष्टांत दिला असेल, त्यांच्या जवळीक मित्रांच्या प्रेरणेने त्यांच्यापर्यंत आदेश पोहचवला असेल. आणि इच्छा प्रबळ झाल्याशिवाय ही परिक्रमा शक्य नाही. एकदा का इच्छा प्रबळ झाली तर तेथे त्याला कोणी ही रोखू शकत नाही. असे मला त्यांच्या बोलण्यावरून जाणवले. आणि त्यांच्या पराग रूपी नर्मदेचे कवडसे मला त्यांनी व्हॉट्सॲप द्वारे पाठवून दिलेत. ते पुढे म्हणतात ही परिक्रमा नर्मदा मातेनेच आमच्या कडून करून घेतली , एवढे सुरक्षेचे कवच तुम्हाला मिळाल्यानंतर खरंच तुम्ही भाग्यवान आहात नर्मदा परिक्रमाची अनुभूती तुम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहतील. त्यांच्या फोनवरील discussion मध्ये त्यांच्या सात्विक वाणीत कुठलाही अभिमानाचा लवलेश नव्हता. श्रीयुत पराग ओवळेकर आणि त्याचा ग्रूप 12 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 नर्मदा परिक्रमाच्या मार्गावर होते ग्रुप मेंबर डॉक्टर आशुतोष जोशी सर, मिस्टर प्रशांत जोशी, मिसेस मंजिरी जोशी, मिस्टर समीर वैद्य आणि मिस्टर पराग ओवळेकर ते त्यांच्या शब्दात कथन करतात 13 एप्रिल आणि 14 एप्रिल 2025 रोजी चालत नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनी करण्याचा एक संस्मरणीय अनुभव होता. नर्मदा परिक्रमेचे अनेक YouTube व्हिडीओ पाहत असताना. ती नर्मदा परिक्रमा मी एका दिवसात २१ किमी चालवून करू शकतो का ! असे मनात होते. कोणी म्हणतात नर्मदा मैया प्रेरणा देत आहे आणि जर नर्मदा मैयांचा तुमच्यावर आशीर्वाद असेल तर तुम्ही २१ किमी चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण करू शकता. आणि अचानक. एके दिवशी सकाळी माझा मित्र समीर वैद्य मला विचारत होता की तो डॉक्टर आशुतोष जोशी सरांसोबत नर्मदा परिक्रमेला जात आहे आणि त्यांचे भाऊ श्री प्रशांत जोशी त्यांच्या पत्नी सौ मंजरी जोशी सोबत नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनीला जात आहेत. मी लगेच म्हणालो हो मी पण येतोय तुमच्या सोबत नर्मदा परिक्रमेला. डॉ आशुतोष जोशी सरांनी मागील २ वर्षात २ वेळा ही परिक्रमा केली होती. त्यामुळे ते आम्हाला परिक्रमा करण्यासाठी मार्गदर्शन करणार होते. त्यामुळे आता आम्ही पाच जणांचा गट चालत नर्मदा परिक्रमेला जाण्याचे निश्चित झाले. आमचा कार्यक्रम 12 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:50 वाजता एकता एक्सप्रेसने जाण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल 2025 एकता नगर स्टेशनवर पोहोचणे, त्या दिवशी सर्व मंदिरांना भेट देणे जे कार्यक्रमाअतंर्गत अंतर्भूत केले नव्हते. सोमवार 14 एप्रिल 2025 रोजी नर्मदा परिक्रमणासाठी प्रयाण करणे.नर्मदा परिक्रमा संपल्यानंतर परतीचा प्रवास एकता एक्स्प्रेसने सकाळी 5.30 वाजता दादर पर्यंत श्री समीरने सर्वांसाठी ऑनलाइन बुकिंग केले होते. श्री जोशी यांनी नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनीबद्दल वाचण्यासाठी मला एक पुस्तक दिले, त्याच्यात तपशीलवार माहिती होती. लेखक श्री ओझा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव नर्मदा परिक्रमा असे आहे. डॉ. आशुतोष जोशी यांनी नर्मदा परिक्रमेसाठी प्रत्येक सभासदाने आपल्या बरोबर घेण्याच्या वस्तूंची तपशीलवार यादी तयार केली. आणि आता आम्ही सर्व सदस्य नर्मदा परिक्रमेला जाण्यासाठी सज्ज झालो. 12 एप्रिल 2025 रोजी प्रवासाचा दिवस आला आणि आम्ही दादर पश्चिम स्टेशनवर ठरलेल्या सकाळी 11:50 वाजता एकता एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढल्यानंतर आम्ही आमच्या सीटवर स्थानापन्न झालोत. आणि दुसऱ्या दिवशी रविवार 13 रोजी सकाळी 7:30 वाजता आम्ही एकता नगर स्टेशनवर पोहोचलो. तिथून पुढे जीपकारने आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही थेट श्री गरुडेश्वर मंदिरात गेलो जिथे आमची रूम बुकींग त्यांच्या भक्तनिवासात केली होती. आम्ही आंघोळ करून गरुडेश्वर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिराचे दर्शन घेतले. मग आम्ही गाडीने श्री कुबेर भांडार मंदिराकडे निघालो. रविवारची सुट्टी असल्याने मंदिराबाहेर प्रचंड गर्दी होती. म्हणून आम्ही मंदिराबाहेरून दर्शन घेतले आणि पुढे श्री स्वामी नारायण मंदिराकडे निघालो. हे मंदिराच्या खूप मोठ्या क्षेत्रावर आहे. आम्ही श्री स्वामीनारायणाचे दर्शन घेतले आणि नंतर हॉटेल महाराजा येथे दुपारचे जेवण केले. दुपारचे जेवण करून आम्ही सती अनुसूया मंदिराकडे निघालो, पुढचे मंदिर नरेश्वर मंदिर होते. दर्शन घेतल्यानंतर भालोदला जाण्यासाठी आम्ही छोटी फेरी बोट घेऊन भालोदला पोहोचलो जिथे एक मुखी दत्त मंदिर आहे, तेथे दर्शन घेतले आणि आश्रमात जवळपास ९५ वर्षांचे श्री प्रताप महाराज यांचे आम्ही आशीर्वाद घेतले. त्याआधी आम्ही श्री रंग अवधूत स्वामी महाराज आश्रमाला भेट दिली जिथे आम्ही श्री शंकर महादेव मंदिराचे दर्शन घेतले. मग आम्ही बडी पनोती मंदिर आणि छोटी पनोती मंदिराला भेट देण्यासाठी पुढे गेलोत.भक्तनिवासात परतताना आम्ही दोघांचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी सोमवार 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनीचा मुख्य दिवस होता. पहाटे 2:00 वाजता आपण सर्वजण उठून आंघोळ करून परिक्रमेचा प्रवास सुरू केला. प्रथम आम्ही टिळकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमाला भेट दिली जिथून पहाटे साडेचार वाजता आपली नर्मदा परिक्रमा सुरू झाली. त्यानंतर आम्ही रामेश्वराला भेट दिली की जेथे श्री समर्थ रामदास महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे. पुढे सप्त मातृका मंदिर आहे जिथे सात देवी माता मूर्ती आहेत. त्यानंतर श्री शंकर महाराज मंदिर जेथे श्री शंकर महाराज पुतळा आहे. त्यानंतर नर्मदा माता मंदिर आहे जिथे आम्ही नर्मदा मातेचे दर्शन घेतले आणि नर्मदा देवीला ओटी समर्पण केली. पुढे मनी नागेश्वर मंदिर, कपिलेश्वर मंदिर मग आम्ही रेंगण घाट येथे छोटी फेरी बोट घेऊन नर्मदेच्या दक्षिण वाहिनीला गेलो. नर्मदा माता नदीवर स्नान केल्यावर आम्ही रामपुरा आणि रणछोडदास मंदिराकडे निघालो जिथे श्रीकृष्णाची मूर्ती आहे. बहुतेक मंदिरात श्री महादेव पिंडीची मूर्ती आहे. नंतर आम्ही मंगळेश्वर मंदिराला भेट दिली, पुढची भेट रामानंद आश्रम, गोपरेश्वर आश्रम जिथे श्री महादेवाची मूर्ती मर्क्युरी पासून बनवली आहे. त्यानंतर तपोवन आश्रम, मग सीताराम मोठा आश्रम आणि नंतर परत टिळकवाडा वासुदेव कुटीर येथे 12.30 वाजता पोहचलो की जेथून आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली होती. 21 किमी चालण्याचा नर्मदा परिक्रमा आपण 7 तासात पूर्ण करू शकलो कारण आपल्याला नर्मदा माता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद लाभला आहे. नर्मदा परिक्रमा खरोखर एक अविस्मरणीय अनुभूती होती. रात्री 7:30 वा. सोमवारी आम्ही एकता नगर स्थानकावर एकता एक्सप्रेसमध्ये चढलो आणि मंगळवारी सकाळी 15 एप्रिल 2025 रोजी आम्ही दादर पश्चिम स्थानकावर पोहोचलो आणि त्यानंतर लोकल ट्रेनने आम्ही सकाळी 6:30 वाजता ठाणे स्थानकावर पोहोचलो. केंव्हा तरी एकदा चांदण्यात पुन्हा जाईन मी नर्मदा माईच्या जलाशयात पुन्हा जलमय होईन मी

सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

मेव्हणी माझी जेंव्हा रिटायर होते

व्यासपीठावरील अध्यक्ष, मान्यवर आणि समस्त गुरुजन असा मोठा परिवार जमलेला होता. पी पी चेंबर मधील चवथ्या माळ्यावरच्या हॉल मध्ये लगबग चालू होती. हॉल बाहेर मेव्हणीचा रांगोळीचा विशिष्ठ फोटो काढण्यात आला होता. शिक्षिका आणि मेव्हणीच्या मैत्रिणी अप्सरासारख्या नटून थटून आल्या होत्या. स्टेज च्या मागे "सेवापूर्ती गौरव सोहळा" असा बॅनर मोठ्या दिमाखात झळकत होता. कारण तिने चक्क 37 वर्षे सेवा केली होती. वरिष्ठ मंडळी एकदाची स्थानापन्न झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली देखील. बऱ्याच शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. नंतर मी जास्त वेळ न घेता माझ्या भाषणाला सुरुवात केली. सगळी हयात शिक्षकी पेशात घालवल्या नंतर कोणता उद्योग आरंभायचा हा जसा मोठा यक्ष प्रश्न असतो. तसे मेव्हणी बद्दल एव्हढे नामवंत गुरुजन शिक्षकांसमोर काय बोलावे हा मला लहान तोंडी .... पडलेला प्रश्नच होता. मी स्वतः रिटायर्ड असल्यामुळे माझ्याकडे गाईड लाईन्स भरपूर असतील परंतु स्टेज वरून भाषण देणे सोपे नक्कीच नव्हते. कारण मी काही वक्ता नाही, की मी कुठे भाषणही दिले नाही. कारण भाषण देण्यासाठी सर्जनशीलतेची प्रतिभा असावी लागते ती माझ्यात मुळीच नाही. म्हणून मी चक्क भाषणच लिहून आणलं आहे. अर्थात मीच ते लिहिलं आहे. आमच्या हीच आणि माझं लग्न झाल्यापासून गेली चव्वे चाळीस वर्षे मी संगितालां पाहतो आहे. माझ्या समोर तिने ग्रॅज्युएशन केलं, नृत्य कलेत तिने प्रावीण्य मिळविले, तिला आदर्श शिक्षिका म्हणून सुद्धा गौरविण्यात आले. ही किती अभिमानाची आणि मोठी गोष्ट आहे. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात ती अग्रेसर असते. आईवडिलांची सेवा करण्यात ही ती कुठे कमी पडलेली नाही. तिने डीएड पूर्ण केल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराची चांगली शिक्षकी पेशातली नोकरी, एवढं सर्व काही आपल्या पदरी विपुलता येणार आहे अशी पुसटशी कल्पना नसताना, एक दिवस घरासमोरच्या सारवलेल्या अंगणात नववधूने तुळशी वृंदावन जवळ नुकतीच रांगोळी काढली, आणि थोड्याच वेळात पावसाची सर येऊन तुळशीवृंदावन पावसात ओलचिम्ब झाले ! पावसाने सारवलेलं ते सारवण रांगोळीसह वाहून नेलं ! जे नशिबात होतं त्याला ती सामोरे गेली. डगमगली नाही. अनेक वळणे आली असतील त्यांच्याशी तीने जुळवून घेतले. आणि इथपर्यंत ती येवून पोहोचली आहे. रिटायरमेंट ला अवघे काही तासच उरले आहेत. मला कल्पना आहे, तिच्या मनात प्रचंड उलथापालथ चालू असेल. शांता शेळके यांच्या गीतातून सांगायचे झाले तर जायचे इथून दूर, काहूर मनी उठले, दाटे नयनात पूर. जसे सर्व ऋतूत येणारे सर्व सण आपण अगदी आनंदाने साजरे करतो, आणि शेवटी आपल्या शरीराची लाही लाही करणारा शिशिर येतोच ना ! झाडांच्या फांदीला तो शुष्क करून टाकतो. त्याला कोणी नाकारले आहे का. कारण नंतर नव पालवी घेवून वसंत येणारच असतोच. आतापर्यंत जगलेल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुझ्या हातून सुटून गेल्या असतील. ऐन उमेदीच्या काळात जे आयुष्य जगायचं राहून गेलं होतं आता ती जगायची संधी तुला मिळणार आहे. माधव ज्युलियन म्हणतात "चल उडुनी पाखरा पहा जरा, किती रम्य पसरली वसुंधरा". हो, आज आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत. तुझे कोडकौतुक करत आहोत. उद्या मात्र आम्ही सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होणार आहोत. सकाळची लोकल, शाळेची घंटा, विद्यार्थ्यांचा किलबिलाट. अटेंडडन्स रजिस्टर वर केलेली सही आणि विद्यार्थ्यांचा हजेरीपट, हुशार विद्यार्थ्याच्या पाठीवर मारलेली शाबासकीची थाप, हा चालू असलेला अध्याय एकदम खंडित होणार आहे. जसा वीजपुरवठा खंडित होतो आणि चुहुकडे अंधार पसरतो आणि क्षणभर आपल्याला काही सुचत नाही त्याप्रमाणे निवृत्तीनंतर थोडी हुरहूर, थोडे नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक छोटासा गुंता तयार होईल. भिंत असली म्हणजे तिच्यावर पाल फिरणारच, भाजीपाल्याची पिशवी घरी घेवून येतांना रस्त्यावर मांजर आडवी जाणारच, कोणाच्या घरात दूध अजूनपर्यंत ओतू गेलं नाही, हे सांगा बरं ! मग तू त्यांच्या पेक्षा वेगळी कशी असेन. निवृत्तीनंतर आपले कोणी कौतुक करेल ! पण असं घडतं नाही. का बरं अशी अपेक्षा करावी. आपणच आपल्या मुलांचे, त्याच्या लग्नाचे आणि येणाऱ्या नवीन सुनेचे, कौतुक करायचे दिवस चालून येणार आहेत. तो कौतुकाचा शब्द भांडार तुला तुझ्या रेशमी पदरात जपून ठेवावा लागणार आहे. निराशेचे दिवस संपणार आहेत आणि नवीन आयुष्य जगण्याची तुला संधी चालून येणार आहे. कारण अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते. ही बा.सी. मर्ढेकरांची कविता तुला नेहमी 'प्रेरणा' देत राहील. पुढच्या भावी आयुष्यासाठी तुला शुभेच्छा.....धन्यवाद.

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

चांदणं

एखाद्या चांदण्या रात्री घरातून बाहेर पडायला मिळणे असे म्हणणे मुंबई सारख्या ठिकाणी हास्यास्पद ठरेल. तेथे समुद्र गर्जत राहतो लाटा किनाऱ्यावर येवून काही तरी सांगण्यासाठी आक्रोश करून आदळत राहतात परंतु तेथे कोणी कोणाची दाखल घेत नाही. परंतु हा दुर्मिळ योग, मी जेंव्हा वैशाख महिन्यात गावी जातो त्यावेळेस काळया आभाळाचे आणि अनेक चांदण्या रात्रीचे सौंदर्य मी अनेकदा माझ्या काकांच्या मातीच्या घराच्या धाब्यावर झोपताना अनुभवली आहे. तसेच चांदण्या रात्रीत शेतात राखण करण्यासाठी मी त्यांच्या बरोबर जात असे. शेत माळ्यावर खाटेवर झोपताना आभाळभर अथांग चांदण्याच्या लाह्या आकाशात विखुरलेल्या दिसायच्या. एव्हढ्या असंख्य चांदण्या आल्या तरी कोठून आणि दिवसा कुठे गायब होतात याचं गणित मला कधीच उलगडलं नव्हतं. कधी कधी शेतातून परस्पर शेजारच्या बाजारपेठेच्या गावी तमाशा बघण्यासाठी सुद्धा आम्ही बैलगाडी जुंपून जात असू. अशा बऱ्याच चांदण्या रात्रिंच्या आठवणी आयुष्याच्या गाभाऱ्यात निपचित पडल्या आहेत. त्यांना कोणतेही उपमा अलंकार देण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. परंतु हे शिंपले जेंव्हा उफाळून वर येतात तेंव्हा ते अनुभवतांना कुसुमाग्रजांची कविता गुदगुल्या करते. काढ सखे गळ्यातील तुझे चांद्ण्याचे हात क्षितीजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दुत. अचानक झोपेतून जाग आली. रात्रीचे तीन वाजलेत. मी अमृतसर एक्स्प्रेस ने प्रवास करत होतो. खिडकी उघडली. थंडगार वाऱ्याची झुळूक चेहऱ्याला अलगद स्पर्शून जात होती. तोच चांदण्याचा शुभ्र प्रकाश चौफेर उधळला जात होता. खुल्या आभाळाची विशाल चंदेरी चादर जमीवर अंथरली जात होती. ट्रेन डोंगराला चकवा देत मार्ग परिक्रमण करीत होती. चंद्र साक्षीला होता. कधी डोंगर आडून कधी दाट झाडीतून माझ्या संगतीला होता. त्याच्या किरणांनी सारा आसमंत लखलखाट झाला होता. ही रात्र आणि प्रवास संपूच नये अशा वेड्या मनाची समजूत कोण काढणार. सकाळचे साडेचार वाजलेत तरी ट्रेनला रात्रीच्या चांदण्यातून सुसाट धावण्याचा मोह आवरत नव्हता. मघापासून अखंड धावल्याने चंद्रही थकला होता. मी त्याचा निरोप घेण्याच्या तयारीत असताना त्या रमणीय पहाटे मी पाचच्या सुमारास चाळीसगांव प्लॅटफॉर्म वर उतरलो. विनंती वरून मला अक्कलकुआ एस टी बस कंडक्टरने खडकी फाटा स्टॉपवर उतरवून दिले. दीड मैल मला पायी चालावे लागणार होते. गावाकडची ती पहाटेची नवलाई अनुभवल्यानंतर येथे परमेश्वर निसर्गात भरलेला आहे याची खात्री पटली. काही वेळाने मी माझ्या धामणगांवी पोहचणार होतो. माझ्या मनातले आनंदाचे दवबिंदू विरघळलेत. कारण आता आई तेथे नव्हती. ती खूप खूप दूर सात समुद्राच्या पलीकडे निघून गेली होती कधी न वापस येण्यासाठी. अजून एक आशेचा किरण मला उत्साहित करत होता. लहानपणी मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, ज्यांनी मला प्रचंड माया लावली ते माझे काका अजून आहेत. आणि अजून त्याच मातीच्या भिंतीच्या धाब्याच्या घरात राहतात. ते समोर दिसताच त्यांच्या खांद्यावर दोन्ही पाय आजूबाजूला सोडून बसावे आणि त्यांची टोपी डोक्यावरचे केस विस्कटून वस्कटून ओरबाडून घ्यावेत. अजून त्यांच्याबरोबर हातात कंदील आणि काठी घेवून शेतावर जावे. शेंगा भाजून खाव्यात, मोटेवर बसून गाणी ऐकावेत. चांदण्यात गवत कापून बैलांना टाकावे. हे बालपणीच चित्र नेहमी नेहमी आयुष्यात डोकावत राहतं.

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

जीनकी बजहसे बिनाका गीतमाला को पहचान मिली

ओ पुराना दौर सकुन का दौर् था, धीरज और संतोष का युग था औंर आज हर चीज जेट स्पीडसे भागती दौडती रहती है l बहनो और भाइयो, रहना तो हमे आखिर आज ही मे है l लेकीन गुजरे हुये दिनकी मिठास और गहराई भी अगर हम अपने साथ रखकर आगे बढते रहे, परंपरा और प्रगतीसे मिलाते रहे, तहजिब और तरक्कीसे जोडते रहे तो, और बिता अनमोल होता जायेगा हमारा जीवन l दुःख और सुख, मिलन और विरह, दोनोको झेलना आसान हो जयेगा l हे बोल आहेत अमीन सयानी यांचे 1952 ते 1955 च्या रेडिओ वरच्या बिनाका गीतमालातील. गाण्यापेक्षा हे बोल ऐकण्यासाठी शहराच्या चौका चौकातून, पानाच्या टपरीवर, मिळेल तेथे पब्लिक गर्दी करीत असे. मी सुद्धा माध्यमिक विद्यालयात धुळे येथे शिकत असातांना, संध्याकाळी आठ वाजता एक छोट्या चहाच्या टपरीवर बिनाका गीतमाला ऐकण्यासाठी हजेरी लावत असे. रसाळ आणि मधाळ वाणीने अमीन सायानीच्या आवाजाचं गारूड लाखो लोकांच्या हृदयात घर करून बसलं होतं. आज तो रेडियोवरचा आवाज कायमचा बंद झाला. राहिल्या त्या फक्त आठवणीच्या रेकॉर्डिंग्ज. त्यांच्या जाण्याने रेडियोवरचं सुवर्ण युग लयास गेलं आहे असं वाटायला लागलं. बहनों और भाइयों अशी त्यांच्या बोलण्याची शैली आज ऐकायला मिळणे दुरापास्त आहे. त्यांचे निवेदन ऐकत राहणे हा स्वर्गीय आनंद होता, शब्दांना साज चाढविण्याची कला त्यांना ईश्वरी देणगी लाभली होती. तब्बल चार दशके त्यांनी शब्दांची फुले रसिकांच्या मनावर उधळलीत. त्यांच्या शैलीदार निवेदनाने केवळ शहरी भागात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात , खेडोपाडी रसिकांवर भुरळ घातली होती. तसेच गायक, संगीतकार, गीतकार, नट नट्या यांना बोलते केले होते. तारीख 21 फेब्रुवारी 2024 ला असंख्य रसिकांना भुरळ घालणारे अमीन सयानी यांची 91 व्या वर्षी प्राण ज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

शेकोटी 2024

संस्कृती म्हणजे काय तर आपल्या समजाची जीवन पद्धती की जेथे शिष्टाचार, खानपान, भाषा, साहित्य, विचार,आदर, सदभाव, सभ्यता आणि कला याचा संगम. आणि हाच संगम शीतचंद्रलोक सोसायटीत जवळ जवळ दोन ते अडीच दशकापासून बघायला मिळत आहे. मग तो विषय कोणताही असो, राम मंदीर प्राण प्रतिष्ठा असो, श्री सत्यनारायण वार्षिक पुजा किंवा वुमेन्स डे असो, तसेच कोजागिरी पौर्णिमा, किंवा दिवाळी पहाट असो, अशा कितीतरी उत्सव सेलिब्रेट केले जातात की त्यांच्यावर वेळोवेळी भाष्य केले आहे. नेहमी एक गोष्टीचा विसर पडतो ती म्हणजे शीतचंद्रलोक च्या सख्या. चुलितले निखारे आणि टोपलीतले चार पाच वांगे उचलून टाकून चक्क काळेकुट्ट भाजून निघेपर्यंत एका दगडी खलबत्त्यात हिरव्या मिरच्या, लसूण जिर, मीठ कांदा कुटून निघेपर्यंत इकडे वांगी चांगलीच होरपळलेली असतात आणि खमंग वास सुटलेला असतो दुसऱ्या मिनिटाला वांग्याचं भरीत कुच्करून तयार झालेलं असतं, घरधनी नाकात वास भरून मळ्याकडे रवाना होतो. हीच ती संकल्पना शीतचंद्रलोकमध्ये कोणी रुजविली हे कोडे उलगडण्याच्या भानगडीत न पडता लहान थोर सगळीच मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं अशी खूणगाठ बांधून रिपीट रिपीट वांग्याचं भरीतचा फडशा पाडला जात होता. खर म्हणजे आदल्या दिवशी शेकोटी कार्यक्रमावर दुःखाची सावली पसरल्यामुळे शीतचंद्रलोक सख्यानी आपल्या कर्तृत्वाचं भान ठेवून नियोजित शेकोटीचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला होता. सकाळ पासून त्यांची ही लगबग किती शिस्तीत चालू होती ही कॅमेरात बंद झालेली असतांना, घरची कामे आवरून या लोकांना वेळ मिळतोच कसा, बाजार केंव्हा करतात, कोण कोण जातंय बाजाराला, आणि यांना हे जमतं कसं ! खलबत्ता, मुसळ, शेंगदाणे, लसूण, हिरव्या झणझणीत मिरच्या यांचे कुटण, बेसन, वांगे भाजणी, तवा, कढई, मीठ मसाला आणि चुलितील निखारे ....... कुठं थांबायचं तुम्ही सांगा. आणि शेवटी आइस्क्रीम कुल्फी !! शीतचंद्रलोक सख्यांची ही तपश्चर्या चक्क बारा वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे. आणि आम्ही सर्व सदस्य मंडळी अगदी चवीने या मेजवानीवर कोणतेही आढेवेढे न घेता लोट पोट होवून कौतुकाची थाप देवून मार्गस्थ होतो . सर्वांची जेवणं झाल्यानंतर शीतचंद्रलोक सख्यांनी जेवणास सुरुवात केली. सगळा पसारा आवरून, भांडीकुंडी लख्ख करून, साधारणतः 10 वाजता शेकोटी या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. अशाप्रकारे शीतचंद्रलोक सोसायटीत सुसंस्कृतीची सूत्रे घट्ट रोवली गेली आहेत. धन्यवाद

फुले वेचता वेचता "फुले वेचिता".......

लता मंगेशकर यांना आपल्यातून जावून सहा फेब्रुवारी 2024 ला एक वर्ष होईल. त्यांचे आपल्यात नसण्याने फार मोठी पोकळी जाणवते. त्यांची रेडीयोवरची गाणी ऐकून मन संगीतमय होऊन जातं. कोकीळ गातो त्याचं गाणं कानावर पडतं परंतु त्याचं दर्शन मात्र घडत नाही. सुरच त्याच्या अस्तित्वाची खूण असते. असा कोकीळ आवाज असलेला सुवर्णयुग पुन्हा अवतरेल का नाही सांगणे कठीण आहे परंतु अशी लता पुन्हा होणे दुरापास्त आहे. त्यांची गाणी म्हणजे भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यातला अमूल्य ठेवा आहे. लता मंगेशकर आपल्या "फुले वेचिता" या पुस्तकात लिहितात, कला निर्मितीही अशीच असते. अशीच रम्य, अशीच सहज, अशीच सुंदर, कृष्णाच्या मुकुटातल्या मोरपिसासारखी, राधेच्या हातातल्या श्रीकृष्णाच्या बासरी सारखी; कर्णाच्या वेदनेसारखी; द्रौपदीच्या जाज्जवल्यासारखी; सीतेच्या त्यागासारखी, ज्ञानेशाच्या मराठी सारखी ! एके ठिकाणी त्या आपल्याच संवेदनशील मनाला प्रश्न विचारतात, खरेच माणसाला पुनर्जन्म असतो का? किती अवघड प्रश्न? काय याचे उत्तर? फक्त शून्य ! क्षितिजाच्या पलिकडे काय आहे? वाऱ्याच्या भरारीत काय आहे ! सूर्याच्या तापात, चंद्राच्या शीतलतेत, सागराच्या खोलीत, मृत्यूच्या उदरात पुनर्जन्म असेल का? हे अथांग, अथांग विश्व पार केल्यावर परत यायला रस्ता असेल का? सगळेच गूढ प्रश्न. या प्रश्नांची उत्तरे म्हणजे प्रतिप्रश्र्नच.

रविवार, २३ जुलै, २०२३

तिकडंम आघाडी

विरोधी पक्षांचे महागठबंधन UPA चे नाव बदलून नवीन नाव ऐकून आश्चर्य वाटून घेवू नका, तर ते आघाडीचे नवीन नाव आहे Indian national developmental inclusive alliance (INDIA) राहुल गांधी यांच्या सुपर मेमरितून निघालेल्या या नवीन नावाचा अर्थ तरी काय आहे अजून तरी त्याचा नीटसा अर्थ उमगलेला दिसत नसला तरी बरीच मंडळी त्याचा अर्थ शोधण्यात गूगल ची पाने उलथापालट करण्यात व्यस्त असावेत. या I.N.D.I.A नाव असलेल्या गठबंधन मध्ये बरीच अशी मंडळी नेते किंवा पक्ष असे आहेत की ज्यांचे विळा भोपळ्याचे नाते आहे, कोणाचं हिंदुत्व वर जिवाआड प्रेम आहे आणि ते आता सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यां पक्षांचे कधी आयुष्यभर एकमेकांशी पटले नाही त्यांचे एकमेकांवर एव्हढे प्रेम कसे काय दाटून आले! या कोड्याचे उत्तर अतिशय सोपे आहे ते सांगायची गरज वाटत नाही. श्रीयुत अनय जोगळेकर यांची मी आज एक यूट्यूब पहिली, ही चर्चा चालू असताना त्यांना एक सुंदर गोष्ट आठवली. ते मजेशीर वर्णन करून सांगतात. एक नवरा बायको असतात, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. नवरा असतो त्याने हातावर एक घड्याळ बांधलेलं असतं. (राष्ट्रवादीचं नव्हे) पण एक घड्याळ बांधलेलं असतं. ते घड्याळ बांधलेलं असलं तरी त्या घड्याळाचा पट्टा तुटलेला असतो. (ही शिवसेनेची गोष्ट आहे असं समजू नका कारण ही खूप खूप जुनी गोष्ट आहे.) त्याचा घड्याळाचा पट्टा तुटलेला असतो, त्याची पत्नी सुंदर असते. तिला लांबसडक केस असतात. पण ते बांधायला तिच्याजवळ पिन किंवा क्लिप नसते. त्यामुळे त्या बिचारीला आपले केस मोकळे ठेवावे लागत असतात. नवऱ्या बिचाऱ्याला वाईट वाटत असतं की आपण गरीब आहोत, आपण बायकोला केस बांधायला साधी क्लिप ही आणून देवू शकत नाही. बायकोलाही वाईट वाटत असतं की आपल्या नवऱ्याचा घड्याळाचा पट्टा तुटला आहे तो पट्टा ही आपण बदलून देत नाही. दोघांचं प्रेम ही एव्हढ, एक दिवस काय होतं तर त्याची बायको तिचे लांबसडक केस कापून टाकते आणि विग वगैरे जे बनवतात त्यांना ते केस अर्पण करते. त्याचे जे पैसे येतात त्यातून ती नवऱ्याच्या घड्याळासाठी पट्टा विकत घेते. नवरा काय करतो, घड्याळाचा पट्टा तुटलेला आहे, घड्याळ असही काही उपयोगाचं नाही . नवरा विचार करतो की निदान आपल्या बायकोला चांगली क्लिप तरी घेता येईल, म्हणून तो आपले घड्याळ विकून टाकतो आणि बायकोसाठी क्लिप घेतो. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की नवरा बायकोचे एकमेकांवर किती प्रेम आहे. शेवटी तात्पर्य काय तर दोघांचे एकमेकांवर प्रेम असुनही नवऱ्याचं घड्याळ ही जातं आणि बायकोचे केस ही कापले जातात. शेवटी राहतो तो पट्टा आणि क्लिप चं करायचं काय ? आघाडीतील विविध पात्रे एकाच टांग्यात दाटीवाटीने येवून बसलीत आणि घोडा घाससे दोस्ती नही करेगा तो खायेगा क्या ? उसको खाली पेट सोना पडेगा. मतदाराला ही पूर्वा अनुभवानुसार चांगले माहीत आहे की असली सरकारे देश चालवू शकत नाहीत.

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट२०२२

ज्यांच्यामुळे आपण मुक्त श्वास घेत आहोत आणि ज्यांनी ज्यांनी भारत देश घडवला त्यांना सर्वप्रथम माझे वंदन आणि आपण शीतचंद्रलोकवासीयांना अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या संपूर्ण देशात घर घर तिरंगा ही सुंदर संकल्पना प्रत्यक्षात उदयास येत असताना आपल्या शीतचंद्रलोक मध्ये स्वातंत्र्य दिनाचाअमृतमहोत्सव कार्यक्रम भव्य रूपाने साजरा झाला. भव्य म्हणजे काय तर मोगरा दरवळतो, त्याचा सुगंध हा निव्वळ सुगंध या एका शब्दाने त्याचे वर्णन करता येत नाही. त्याचं उमलणं अनुभवणं आणि त्याच्या सुगांधाच्या लाटा अंगावर घेणे म्हणजे जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव साकार करण्यासाठी प्रचंड प्रतिभा आणि मेहनत लागली आहे, याचा अवाका कळण्यासफोटो आणि व्हिडिओ चा आसरा घेतला खरा परंतु पृत्यक्षात त्याचे स्वरूप, आकार उकार मात्रा वेलांटी आणि उद्गारवाचक किती सुंदर असतील बरे ! हे सर्व श्रेय त्या टीमला जाते की ज्यांनी आपले नाव कुठल्याही पत्रकात नमूद केले नाही. अमृतमहोत्सव यात्रा, गणेश पूजन, भारत माता पुजन, बैलगाडीचा रथ, बाईक धारी, झेंडे धारी, फलक धारी, आणि सोबत जमाव, भारत मातेवर अनोखी पुष्प वृष्टी, ओम् गावडेचा मिलिटरी मार्च, मान्यवरांचे आगमन, मान्यवरांच्या हस्ते तिरंगा पेटीतून बाहेर काढून ध्वजारोहन टीम कडे सुपूर्द केला गेला, आणि त्या नंतर, श्री जगन्नाथ पावसकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण, राष्ट्गीत, सांस्कृतीक कार्यक्रम, ज्येष्ठांचा मान सन्मान, शीतचांदेलोक मधील सर्वच स्री पुरुषांनी घेतलेला सहभाग, आभार प्रदर्शनआणि लक्ष वेधून घेणाऱ्या निवेदिका. इतकं अप्रतिम आणि केवळ अप्रतिम असे नियोजनबध्द काटेकोरपणे नीटनेटका आणि उत्स्फूर्तपणे कार्यक्रम सादर करणे म्हणजे श्रीयुत पोंक्षे साहेबांनी गौरवलेल्या त्यांच्या भाषेत फक्त म्हणजे फक्त श्रीयुत कांडके आणि त्यांची टीमच हे फत्ते करू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. झेंडा वंदन ते झेंडा हातात कसा धरायचा, कोणी कुठे आणि कसे उभे राहायचे, मान सन्मान, ज्येष्ठ मंडळीचे आदराने आदरतिथ्य, या सर्व बारीक सारीक आणि भव्य विचारांचे पडसाद या कार्यक्रमात बघायला मिळालेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम ते देशप्रेम अशा प्रवासाला निघालेल्या शीतचंद्रलोकच्या संस्कृतीच्या उदरात अजून किती रत्ने दडवून ठेवलेली आहेत ! मिसेस गाडगीळ त्यांच्या मेसेज मध्ये लिहितात आजचा स्वातंत्र्याच्या अमृत महत्सवोनिमित्त चंद्रलोक परिवाराचा कार्येक्रम खुप छान आणि दिमाखात साजरा झाला. तसेच श्रीयुत पावसकर साहेब लिहितात 15 ऑगस्ट २०२२ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही कल्पना श्री भरत कांडके यांनी प्रत्यक्षात आणली आणि हा सोहळा दिमाखदार व डोळ्याचे पारणे फिटणारा न भूतो न भविष्यती असा साजरा केला व मला या अमृत महोत्सवी सोहळ्याचे साक्षीदार केलेत. अमृत महोत्सवाच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली ते आदरणीय श्रीयुत कांडके साहेब आणि त्यांच्या टीमला मनापासून सलाम. जयहिंद

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

मी स्वतः माझी गाणी ऐकते तेंव्हा -- लता मंगेशकर

 कवी फक्त काव्य करतो, पण त्याचा रसास्वाद घ्यायला मात्र पंडित लागतो, अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. कलेच्या बाबतीत अक्षरशः खरे आहे हे ! विशेषतः गाण्याबद्दल म्हणाल तर हे कोणालाही पटण्यासारखे आहे. गायक स्वतःला कितीही पट्टीचा समजो; त्याचा गाण्याचा श्रोत्यांना होणारा आनंद काही वेगळाच असतो. गाणाऱ्याला सुद्धा एक प्रकारचा आनंद असतो यात शंका नाही. पण एक गोष्ट केंव्हाही निश्चित , गवयाचा आनंद आणि श्रोत्यांचा आनंद हे काही वेगळेच !

यावरून कोणाचा असा समज होईल, की स्वतःची गाणी ऐकण्याचा माझा रोजचा कार्यक्रम असेल. पण गंमत अशी आहे की, प्रत्यक्ष गाण्यातच माझा इतका वेळ जातो, की स्वतःची गाणी ऐकायला खरच मला वेळ मिळत नाही. स्वतःचा लेख वाचायला लेखकाला काय वाटते, याची मला कल्पना नाही; पण एवढे मी स्वानुभवाने म्हणू शकते की चुकून वेळ मिळाला व स्वतःचे गाणे ऐकण्याचा प्रसंग आला, की मला तो अक्षरशः एक 'प्रसंग' वाटतो !

उदाहरणार्थ गाण्याचे रेकॉर्डिंग घ्या ना - तेंव्हापासून या आपत्तीची सुरुवात होते. प्लेबॅकच्या तालमीकरिता डिस्क रेकॉर्डही घेतली जाते. आणि आजकाल टेपरेकॉर्डिंग ही त्यात भरीला पडले आहे. त्यामुळे होते काय , की घेतलेले गाणे आपण ताबडतोब ऐकू शकतो. आणि तीच मला मोठी आपत्ती वाटते ! खोटे नाही, आपले गाणे ऐकण्याचा मला अजूनही धीर होत नाही ! कधी कधी तीन चार 'टेक्स' आम्ही घेतो. त्यापैकी कोणता 'टेक' ठेवायचा हे तरी ऐकावे लागतेच, पण अशा वेळीही हॉल मधून मी पळून जाते आणि रेकॉर्डिस्ट बसतो ना, त्या खोलीमधून ऐकणारांची तोंडे मी न्याहाळू लागते ! बहुधा सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधानच मला दिसते. मी बाहेर आल्यावर "शाब्बास, लता"! म्हणून कोणी माझी पाठ थोपटते. पण मी मात्र आतून थोडी - तरी नाराजच असते ! ........



(लता मंगेशकर लिखित ...."फुले वेचिता" या पुस्तकातून)

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

रक्षाबंधन

हॅलो बापू,

आज रक्षा बंधन आहे. तू पुण्याला आला आहेस का, निर्मलाकडे कासारवाडीला आला आहे का ? "नाही गं, मी इंद्रायणीने येत आहे, अकरा ते साडे अकराच्या सुमारास तुझ्याकडे पोहचतो आहे. तुझ्याकडे आल्यानंतर मी कासारवाडीला निर्मलाकडे जाईन. पण नऊ वाजले, दहा वाजले अजून पर्यंत तिचा फोन आलाच नाही !

आज पाच दिवस झालेत, ती आमच्यातून निघून गेली, तिला जगण्याची खूप इच्छा होती, 2019 मध्ये तिचे मेजर बायपास झाले होते, डॉक्टरांनी सुद्धा नाही सांगून दिले होते परंतु प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर तिने मात केली होती, मी देवाचे आभार मानले की त्याने माझ्या बहिणीला सही सलामत वापस पाठवून दिले होते, नंतर कोविडच्या दीर्घ काळात तीला कधीही ऍडमिट करायची वेळ आली नव्हती, देव तिच्या पाठीमागे उभा होता जणू. पण देवाने यावेळेस हाथ वर करून दिले. मी देवाला दोष देत नाही. देवाने तिला भरपूर आयुष्य दिले, तिच्या मुलासाठी आणि तिच्या मुलींसाठी जगण्याचं तिला सामर्थ्य दिले होते. वायसीएम हॉस्पिटलला ती व्हेंटिलेटर वर होती, डॉक्टरांनी सुद्धा पोझिशन क्रिटिकल आहे असे सांगितले. आमची चांगली समजूत झाली होती की आता बहिणीला एखादा चमत्कारच वाचवू शकेल! आणि काय सांगू.....पुन्हा ती प्रबळ शक्तीच्या सामर्थ्याने ती वापस आली. वायसीएमचे डॉक्टर कनोज सरांचे मी आभार मानले, माझे आनंद अश्रू मी त्यांच्या नजरेआड करू शकलो नाही. आणि त्यांनी सांगितले की थांबा परिस्थिती कधी गरम कधी नरम होवू शकते. तिचे किडनी फंक्शन आणि श्वसन क्रिया संस्था चांगल्या पद्धतीने काम करत नाहीत. परंतु बहीण चांगली बोलायला आणि ओळखायला लागली होती. माझी बहिण निर्मला आणि माझे तिच्यावर बारीक लक्ष होते. डॉक्टरांचा फोन आल्याबरोबर निर्मला हजर राहत होती, तिचा मुलगा प्रवीण (सचिन) हा कायम तिच्या आसपास राहून काळजी घेत होता. अमेरिकेत असलेल्या तिची मुलगी सोनी कॅन्टीन्यू संपर्कात होती. सर्व इथंभूत माहिती तिला पुरविली जात होती. तिला खूप काळजी होती पण ती खूप लांब होती. पण नियती आपले पत्ते शेवटपर्यंत उघडे करत नाही याचा थांगपत्ता आम्हाला लागला नाही. 

नंतर तिला आदित्य बिर्ला चिंचवड येथे तिला हलविण्यात आले. तत्पूर्वी अम्ब्युलन्स मध्ये तिने आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीशी व्हिडियो कॉल द्वारे संपर्क साधला. तीने आपल्या नातीशी देखील हितगुज केले. प्रविणला डॉक्टरानी बोलवून घेतले आणि परत तेच डायलॉग सांगितले की सीचव्हेशन क्रिटिकल आहे. प्रवीण आम्हाला वारंवार रिपीटेडली सांगत होता, आई वायसीम मध्ये पण क्रिटिकल होती आणि वापस आली होती, आणि आता इथेही क्रिटिकल आहे, इथेही वापस येईल. आणि तिला काही होणार नाही. तुम्ही उगीच घाबरू नका. जगाच्या पाठीवर कोणत्याही मुलाला असेच वाटते की आई मुलाला कधीच सोडून जावू शकत नाही. प्रवीण ची आईबद्दलची भोळी भाबडी समजूत कशी आणि कोण काढणार !

आणि मला त्या दिवशी डॉक्टरांचा सकाळी सकाळी फोन आला आणि मी थक्कच झालो, त्यांनी सांगितले की तुमचा पेशंट शशिकला जाधव यांचे हृदय बंद पडले होते, ते चालू करण्यात आले आहे आणि आता ती व्हेंटिलेटरवर आहे. मी त्यावेळेस मुंबई येथे आलो होतो, मी लगेच प्रविणला कळविले आणि आदित्य बिर्ला येथे जाण्यास सांगितले. निर्मला पण जाऊन आली. परिस्थिती नाजूक अवस्थेत होती. मी पु ण्याला पोहचलो आणि एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेतला, दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि हॉस्पिटलमध्येच थांबायला सांगितले. प्रविणला फोन करून मी बोलवून घेतले आणि त्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. बहिणीचा आयुष्याचा पलीकडचा किनारा दिसत होता. आणि देवाने काही तासांसाठी का होईना तिच्या पाठीमागे उभे राहायचे ठरविले होते. प्रवीण आईला भेण्यासाठी ICU मध्ये गेला खरा ! परंतु ..... परंतु डॉक्टरानी सांगितले तुमचं पेशंट शशिकला जाधव राहिल्या नाहीत. प्रविणला तेथेच रडू कोसळले. सर्वच संपले होते. सर्विकडे वाऱ्यासारखी बातमी पोहचली देखील. मामा हे असं कसं झालं ?, त्याने विचारलेल्या प्रश्नाचे मी उत्तर देऊ शकलो नाही. पाऊण तासानंतर पुढच्या हालचाली संबंधी डॉक्टरांना विचारण्यासाठी मी ICU मध्ये पोहचलो. आणि शशिकला जीवित असल्याचे त्यांनी सांगितले. देव असा कसा काय वागतोय हेच काही कळेना, दुःखाचा आघात कमजोर करण्यासाठी त्याने ही खेळी केली तर नसेन ! प्रवीणचं मन आनंदाने काठोकाठ भरून आलं आणि त्याने सांगितले आईला काहीच होणार नाही. हेच ते आदित्य बिर्ला हॉस्पिटल की जेथे 2019 मध्ये तिचं मेजर बायपास ऑपरेशन झालं होतं.

आमच्या मनाने पुन्हा एकदा झेप घेतली, आता ती जात नाही, तिचं संकट टळलंय !  आणि हो, पाच तासानंतर जे व्हायचं नव्हतं तेच झालं, देवाने दुःखाची त्रिव्रता कमी करून टाकली होती, आणि आम्ही ते स्वीकारलं होतं. आणि आम्ही ते स्वीकारलं होतं.

आयुष्याच्या अनेक चढ उतारांवर मी तिच्या सोबत होतो आणि एक दिवस तिला जायचं होतं. पुढच्या जन्मी फिरून जन्मेन मी तुला राखी बांधण्यासाठी पुन्हा येईन मी. 

परंतु नेहमी प्रमाणे येणारा तिचा फोन आज रक्षाबंधनाच्या दिवशी आलाच नाही !



रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१

भरीत भाकरी आणि ठेचा

शीतचंद्रलोक मध्ये वार्षिक श्रीसत्यनारायनाची पूजा आटोपल्यानंतर वेध लागतात ते शेकोटी अर्थातच भरीत भाकरीच्या पार्टीचं. वांग्याचं भरीत आणि ओबडधोबड शेंगदाणा आणि लसूण कुटून झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर त्याचा फडशा पाडण्यासाठी आपली जीभ आसुसलेली असते आणि तो आपल्या जिभेवर येईपर्यंत जीव नुसता कासावीस होतो. कपाळावरच्या नसा तड तड उडायला लागतात. म्हणून कालच्या दिवशी सोसायटीत शीतचंद्रलोक सख्यांनी बनविलेली भरीत पार्टी कशी झाली याच्याबद्दल काल कोणी चकार शब्द ही काढला नाही. त्याचं सस्पेन्स उलगडण्या अगोदर आपलं लक्ष वेधू इच्छितो की कोरोना काळात आपल्या ईथेच नव्हे तर संपूर्ण जगभरात कार्यक्रम बंद पडलेल्या अवस्थेत असतांना आपल्या सोसायटीतील महिला वर्गाने दरवर्षी नियमित येणाऱ्या भरीत भाकरीच्या पार्टीला खंड पडू दिला नाही त्यामुळे त्यांचे कोणत्या शब्दात कौतुक करावे हे तुम्हीच सुचवा. दुसरी गोष्ट म्हणजे कल्याणला जावून भाजीपाला आणण्यापासून, सकाळी पाण्याने स्टेज साफ कारण्यापासून ते भाजी चिरणे, निवडणे, लसूण, मिरच्या, शेंगदाणे कुटण्यापासून ते ठेचण्यापर्यंत,  बेसन भाकरी भरीत भात आणि चूल मांडून भाकऱ्या रांधण्यापर्यंत आणि ते पण हे मंडळ अजिबात न थकता रात्री साडे अकरा पर्यंत हा व्याप चालू होता ! श्रीयुत पोंक्षे साहेबांनी टाकलेली एक क्लिप बघितली, तर हे सर्व जण आपापली कामे करण्यात व्यस्त दिसत आहेत. कसलीही मिटिंग नाही, कोणताही कॉम्पुटयाराईज्ड प्रिप्लॅन नाही आणि कुठलाही गाजावाजा न करता सर्व काही व्यवस्थित पार पडलं आणि चक्क रात्री साडेआठ पर्यंत पहिला जेवणाचा मान पुरुष मंडळीला दिला. आणि शेवटी जे काही शिल्लक राहील त्याच्यात त्यांनी आपले जेवणे उरकलीत. हा एवढा आदरतिथ्य आणि मनाचा मोठेपणा जगाच्या पाठीवर केवळ आणि केवळ भारतीय स्त्री संस्कृतीतच आढळतो. कौतुकाची अपेक्षाही न बाळगणाऱ्या या स्त्री संस्कृतीच्या मागे असं कोणतं सूत्र लपलेलं असतं की ते सस्पेन्स पुरुष जातीच्या मानवाला अजूनपर्यंत कळलेलं नाही हे एक आश्चर्यच आहे. म्हणून शीतचंद्रलोक सख्यांच्या विनम्रशील स्त्री सर्जनशीलतेच्या या कर्तुत्वाला प्रथम मानाचा मुजरा.



काल आपल्या येथे शीतचंद्रलोकसख्या यांच्या भरीत भाकरीच्या पार्टीत सर्व पुरुष लहानथोर मंडळी अगदी शाळेतल्या मुलांसारखी जशी गणवेश परिधान करून, हातात कुपन धरून लायनीत शिस्तीने उभे राहून, कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं की रायबाचं अशा ऐटीत सोसायटीतील पुरुष मंडळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणी एकमेकांशी ब्र शब्द बोलेल तेंव्हा ना, सर्वकाही चिडीचूप तोंडातल्या तोंडात मिटक्या मारत चाललेलं होतं. शीतचंद्रलोकच्या पाणवठ्याखाली आपल्याच डोळ्यासमोर रुजलेल्या त्या लहान बिया आता तरुण, मोठी आणि समजदार झाली होती, ती आपल्याच धुंदीत व्यस्त आणि मस्त होती, बरीच सिनियर मंडळी काही  निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेली आणि काही उंबरठा ओलांडलेली एकमेकांची विचारपूस करत होती. गेस्ट मंडळी सुद्धा अवाक झाली होती. कधी काळी शीतचंद्रलोकला लाभलेल्या भव्य पटांगणाच्या उजाड माडावर आता भव्य दिव्य आलिशान चार चाकी उभ्या दिसत होत्या. काळ बदलला तरी या समृद्धीच्या वाटचाली मागे शीतचंद्रलोक संख्यानी आपला वसा जपलेला होता. काही ठिकाणी कुजबुज चालली होती, तर काहींनी चक्क जमिनीवरच मांडी घालून जेवण करणे पसंत केले होते. बेसन, भरीत, भाकरी, ठेचा, कांदा, निंबु, आणि वरून जिलेबी, आणि एक विसरलोच शेवटी आईस्क्रीम कुल्फी सुद्धा आणि बापरे ते पण फक्त पन्नास रुपयात ! जेवणाची लज्जत एव्हढी भारी आणि चविष्ट होती की खाणारा दाद द्यायलाच विसरून गेला हो ! पाय कोणाचा तेथून निघत नव्हता. फोटोशेशन जोरात चालू होतं. जणु पावलो पावली आपलेपणाच्या खुणा दिसत होत्या. अजून ही तोच जोश आणि उत्साह जाणवत होता. म्हणून मी परत त्याच ठिकाणी येतो. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते.

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

ललित

एखाद्या चित्रकाराने दाट धुक्याचं चित्र रेखाटावं, त्या विरघळलेल्या धुक्यात निसर्गाची अनेक अस्पष्ट रूपे त्याने रेखाटवीत आणि आपण डोळे किलकिले करून फक्त पाहत राहावे पाहत राहावे आणि त्या धुक्याच्या पलीकडे काय असावे याचा अंदाज बांधत राहतो. तसच काही पण अगदी निराळं असं वि.स. खांडेकर यांनी लिहिलेल्या "धुके" या पुस्तकात तीन खेड्यातल्या बायका धुक्याला कसा शृंगार चढवतात आणि लिहिलेल्या पुस्तकाचं नांव कसं सुशोभित करतात ते त्यांच्याच शब्दात वाचा...

धुके

नेहमीप्रमाणे डोक्यावर शेणाच्या पाट्या घेतलेल्या खेडवळ बायका समोरून येत असाव्यात ! असल्या बायका म्हणजे काही फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्यातल्या नायिका नव्हेत. त्यांच्या जाण्या-येण्याकडे एरव्ही मी क्वचित लक्ष देतो. पण हे अचानक पडलेले धुके वस्तुमात्रावर जणू काही जादूची कांडी फिरवीत होते. समोरून येणाऱ्या त्या तीन स्रियांच्या आकृतीत काही निराळेच सौंदर्य आहे, असे वाटू लागले. सभोवार पसरलेला धुक्याचा समुद्र आणि त्या अस्पष्ट आकृती पाहून समुद्रातून अप्सरा वर आल्याची पौराणिक कथा मला आठवली. अप्सरा म्हटली, की तिची नृत्यचांदण्यातकुशलता आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. समोरून येणाऱ्या त्या बायकांनी डोक्यावरल्या पाट्या संभाळण्याकरिता वर धरलेले अंधुक हात त्या सुंदर धुक्यात तसेच रेखीव वाटत होते !

...........घटकाभराने तो धुक्याचा समुद्र जसा आला होता, तसा निघून गेला.....माझा निरोप सुद्धा न घेता ! त्याचे पुसट पाऊल देखील कुठे दिसेना. तरी माझ्या मनावरील त्याची धुंदी तशीच होती.आज अशावेळी हे धुके कोठून आले, याचा विचार करायला माझे मन तयार नव्हते. धुके झाले, घटकाभर दिव्य आनंदाचा अनुभव देऊन गेले. तेवढ्याने मी तृप्त झालो होतो. मातीला सुगंधी फुलांचा वास लागावा, तसे त्या ब्रम्हानंदाने माझे मन आपलेसे करून टाकले होते.

वि.स. खांडेकर यांच्या __________"धुके" या पुस्तकातून


सोमवार, २० जुलै, २०२०

लोहार दादा

(लोहार दादा आणि सशाची जुगलबंदी, व्हाट्सएप वरून पार्शली कॉपी पेस्ट)


ससा             :    लोहार दादा लोहर दादा गाजर आहे का

लोहार दादा   :     ससोबा ससोबा मंडईत जा
                        गाजर घेवून घरी जा

ससा           :     दुसऱ्या दिवशी ससोबा हजर
                       लोहार दादा लोहर दादा गाजर आहे का

लोहार दादा  :    लोहर दादाने उपटले कान
                       दाखवतो तुला गाजराचे दुकान
                       परत आला तर दातच तोडीन
                       नंतर कधी येणारच नाही

ससा           :   तिसऱ्या दिवशी ससोबा हजर
                       विचारतो कसा गाजर आहे का

लोहार दादा  :  लोहर दादाला आला राग
                       तोडले त्याने सशाचे दात

ससा            :   चवथ्या दिवशी
                       लोहार दादा बसला होता निवांत
                       ससोबा प्रगट झाला पुढ्यात
                       लोहर दादा लोहर दादा गाजराचा ज्युस आहे का

लोहार दादा ज्युस देईना, ससोबा आपला हट्ट सोडीना !

 

रविवार, १९ जुलै, २०२०

डोंबिवली 2003

(दवाने थबथबून गेलेल्या सकाळी डवरलेल्या बागेत मधोमध काट्यांच्या शिरावर एखादे गुलाबाचे फुल फुललेले आहे. वारा वाहतो की नाही तेही जाणवत नाही, पण फुलाचा गंध मात्र सर्वत्र मंदपणे पसरत आहे असा काहीसा समज तुमचा हा खलील लेख वाचून होणार असेल तर तो तुमचा भ्रम आहे. असं काहीही या लेखात नाही आहे.)

डोंबिवली 2003

डोंबिवली या शहराला म्हणावे असे काहीच नाही. इथे सरकारी इमारती, खाजगी कंपन्यांचे कार्यालये, बहुमजली इमारती नाहीत. या आधुनिक शहरात सगळ्या गैरसोयी आहेत. उंदरांच्या बिळासारखी माणसांची घरे आहेत. घरात हवेला मज्जाव आहे, त्यामुळे पंखा लागतो. माणसांच्या गर्दीने एके काळचे निसर्ग संगीत हिरावून घेतले आहे. आठवड्यातले पाच दिवस काम करून मनुष्य इथे कंटाळतो. त्यांचा जीव आंबून जातो तेंव्हा टाईमपास साठी शॉपिंग, आराम करण्यासाठी येथे कोलोम्बो, सिंगापूर, बेंगलोर सारखे इथे काहीही नाही. मग आहे तरी काय या शहरात. सगळ्या जगापासून दूर, जिथं कुणी म्हणजे कुणी नाही, ते आसपास घुटमळत असतं असं अप्रतिम सुंदर विश्व या शहरात निर्माण करण्याचं कुणालाही सुचत नाही. इथल्या नद्या सुकल्या नाहीत पण इथल्या नद्यांवर अतिक्रमण झाले आहे. साईन बोर्ड आणि टी.व्ही. टॉवरनी या शहराला उघडे नागडे करून टाकले आहे. संपूर्ण शहरात नजरेत भरेल असं एकही झाड इथे नाही.
                                                       -०-
वरील "डोंबिवली" हा लेख 2003 या वर्षी वर्तमान पेपरात छापून आला होता. कोणी लिहिला आणि कोणत्या वर्तमान पेपरात छापून आला होता ते आठवत नाही. परंतु 2003 च्या माझ्या "जुनी डायरी"त लिहून ठेवलेला आहे. तो पूर्ण नाही असे वाचल्या नंतर जाणवते. परंतु ते काही असो आज 2020 या वर्षी हा लेख काहीसा आजच लिहिला आहे असंच वाटतं. प्रगतीची पाऊले या जगात जोराने येऊन आदळलीत. तुम्ही इतिहासाची पाने चाळली असतील तर तुमच्या लक्षात आल्या शिवाय राहणार नाही की मानवी संस्कृतीच्या इतिहासात एव्हढा गतिशील आणि श्रेष्ठ कालखंड कधीच आला नव्हता पण आमची 2003 ची डोंबिवली आहे तशीच आहे. बऱ्याच वर्षानंतर बालपणीचा एखादा जिवलग मित्र भेटावा  आणि त्याने घट्ट मिठी मारावी. संभाषणाला सुरुवात करण्यापूर्वी, अरे तू लहानपणापासून आहे अजून तसाच!! कोणताही बदल नाही ! ग्रेट !

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

खमोशियों की सदाएँ बुला रही हैं तुंम्हे (लॉक डाऊन २९ वा दिवस)

सूर्याला झोप लागली आणि तो उगवायचा विसरूनच गेला, असं कधी स्वप्नात सुद्धा घडनार नाही. पण हे असं काही घडू शकतं का असे बालिश प्रश्न वेड्यांच्या इस्पितळात असलेल्या वेड्याला सुद्धा पडणार नाहीत. कारण विश्वाचं चक्र क्षणभरही न थांबता अहोरात्र अखंडपणे चालू आहे. शिशिरची पानगळ नुकतीच थांबली आहे. वसंत ऋतू सुरू झाला आहे. सशाच्या कानासारखी इवली इवली बारीक कोवळी पालवी, लंहान मुले जसे आईला बिलगतात तशी ती पातळ पाने झाडांच्या फांद्यांना कोणी चिटकवली आहेत असा भास होत आहे. थोडक्यात वसंत जागो जागी बहरल्याच्या खुणा दिसत आहेत. कळ्यांनी आपलं उमलणं थांबविलेलं नाही, कोकिळचा मंजुळ स्वर कानाला मंत्रमुग्ध करत आहे. धबधब्यांचा प्रपात अहोरात्र स्वतःचा उर बडवीत सुरू आहे. निळ्या आकाशात आज सुध्दा रवीराजाने वेलबुट्टी काढून ठेवली आहे. सूर्याचं पूर्वेकडून पश्चिमेकडे असं त्याचं सतत भ्रमण चालू आहे. सकाळच्या प्रहरी धुंदपणे विहारणारा तो ओझोन अजून दरवळतो आहे आणि ते बघा क्षितिजावर सूर्याचे द्यूत देखील उभे आहेत. अथांग महासागराचं निळ्याशार पाण्यावर लाटांच्या कमानी उभ्या राहातांना दिसत आहेत. किनाऱ्यावर एका पायावर उभे राहून माडाची झाडे वाकून वाकून बघत आहेत. सूर्याने सकाळची कोवळी सोनेरी उन्हे लांबच लांब  अशा एका ओळीने उभ्या असलेल्या पर्वत राजीवर उधळायला सुरुवात केली आहे. निसर्गात तीच रम्य संध्याकाळ आणि तोच पक्षांचा किलबिलाट सुरू आहे. शतकानुशतके निसर्गाची गुपिते मानवी मनाला न कळत शांतपणे उलगडली जात होती. परमेश्वराने जशी रात्र बनविली तसा दिवसही बनवला, प्रचंड डोंगर, नद्या, दऱ्या, जंगल, वाळवंट, समुद्र, सुपीक जमीन, पाऊस, थंडी, ऊन, वारा, ऋतू बनवून सृष्टी संतुलित ठेवून कशाचीही कमतरता जाणू दिली नाही. म्हणून तर अनादी काळापासून या सृष्टीचं चक्र न थांबता अखंड पणे आणि तेही व्यवस्थित चालू आहे. आणि जगाच्या इतिहासात एकविसावे शतक हे प्रचंड फेरबदल आणि घडामोडीचं शतक ठरले आहे. आपल्यापुरते बोलायचे झाल्यास, आपल्याला कळायला लागल्यापासून ते आजतागायत सर्व काही व्यवस्थित सुरळीत चाललं असतांना अचानक एक विचित्र धोकेदायक वळणावर आपण सगळेजण येवून पोहचलो आहोत. आयुष्याच्या वळणावर कोणती वळणे कशी येतील हे सांगणे खूपच अवघड असतं. अति आत्मविश्वसाच्या जोरावर चाललेल्या या जगाला एकदम ब्रेक लागला आणि होत्याचे नव्हते झाले आहे. मानवाची नशा निसर्गदेवतेने अशा काही पद्धतीने उतरवली आहे की, चंद्रावर भरारी मारणाऱ्या मानवाच्या दोन्ही हात पाय बांधून त्याला जश्या कोरड्या खोल विहिरीत अधांतरी टांगून ठेवले आहे. हवेतला ऑक्सिजन अजून तसूभर ही कमी झालेला नाही, परंतु नाकातून श्वास घेतांना आता चक्क फिल्टर लावून घ्यावी लागत आहे. प्रत्येकाने आपल्या तोंडावर मास्क चढविले आहे. सध्या जगावर कोरोना हुकमत गाजवितो आहे आणि त्याने भल्या भल्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. निर्मनुष्य रस्ते आणि गल्ल्या, निरभ्र आकाश, थंडावलेला कारखान्यांचा गोंगाट, शांत झालेला विमानाचा गगनभेदी सुळसुळाट, निपचित पडलेली कर्कश रेल्वे इंजिने आणि अजगरासारखे पहुडलेले महाकाय एक्प्रेस हायवे, शेपटासारख्या विचलित पडलेल्या विमानांच्या धावपट्ट्या, ओस पडलेली फुटबॉल आणि क्रिकेटची मैदाने सारे कसे शांत शांत.  मोर, नीलगाय  शहरी रस्त्यावर दिसायला लागलेत, बिबट्या जंगल सोडून मानवी वस्त्यांवर फेर फटका मारायला लागला, गंगेचं पाणी निळेशार दिसायला लागले, डोंगर रांगा एक पाठोपाठ एक असे शिस्तीत उभे दिसत आहेत. दुसरीकडे आयफेल टॉवर, नायगारा वॉटर फॉल सारखे प्रेक्षणीय स्थळे मानव विरहित ओस पडली आहेत. हा काय चमत्कार आहे आणि एवढी दहशत अजून कधी वाचनात आली नव्हती की ती आज प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहोत. बा.सी. मर्ढेकरांच्या कवितेतली एक ओळ वाचाविशी वाटते, "काळ मारुनी गेला टपली, न कळत डोक्यावरती तळुई"

चूका करणे ही काळाची गरज आहे, त्याशिवाय नवनिर्मिती होणे अशक्यच असं म्हणतात ! परंतु कोरोना व्हायरसने सर्व स्तरावर पाणी फिरवले आहे. जागतिक मंदिचं संकट घोंगावत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लॉक डाऊन मुळे या विषाणूची साखळी खंडित झाली आहे. जगण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इतिहासावर नजर टाकली तर पृथ्वीवरील मानवावर आजतागायत अशी बरीच संकटे येवून गेलीत, तसच कोरोनाचं संकट जाईल सुद्धा, परंतु मानवाला निसर्गाच्या प्रकृती बाबतीत बरंच काही शिकवून जाणार आहे हे निश्चित.

कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज लॉक डाऊनचा २९वा दिवस, परंतु ही गोष्ट सोपी तर मुळीच नव्हती. ही मानसिकता, हे धैर्य, हे मनोबल आलं कोठून, देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री पासून ते जय जवान जय किसान पर्यंत,  डॉक्टर्स, सिस्टर्स, कर्मचारी, पोलीस दल ते अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पर्यंत, या सर्वांच्या योगदानाचं मूल्य अमूल्य आहे. ओ सुबह अब दूर नही, सर्व काही सुरळीत होण्याची चिन्हे दिसून येतील. मुलांच्या शाळा परत चालू होतील, रस्त्यावर वाहने धावू लागतील, पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी किलबिल अंगणात उतरतील, म्हणतात ना कुदरत अच्छी चिजे बिना बनाये नही रह सकता. त्याच्या कुशीत परत येण्यासाठी निसर्ग आपल्याला खुणावतो आहे बघा.......मचल मचलती हवाये बुला रही है तुंम्हे.



शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

मला आवडलेली गाणी



**************************************
गीत : शाहीर होनाजी बाळा
चित्रपट   :  अमर भूपाळी


घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला

सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी

कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला

**************************************

गीत : मधुसूदन कालेलकर
चित्रपट : एक धागा सुखाचा


ठाऊक नाही मज काही !
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

मऊ जशी ती साय दुधाची,
होती आई का तशी मायेची ?
बागेतील ते कमल मनोहर,
आई होती का तशीच सुंदर ?
देवाघरी का एकटी जाई ?
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

चिउकाऊची कथा चिमुकली,
सांगत होती का ती सगळी ?
अम्हांसारखे शुभंकरोती,
म्हणे रोज का देवापुढती ?
गात असे का ती अंगाई ?
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

मऊ साइहुन आई प्रेमळ !
गंगेहून ती आहे निर्मळ
अमृताचे घास भरविते
आभाळापरी माया करीते
आईवाचून मीही विरही
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

**************************************

गीत : पी. सावळाराम
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा


जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहते

डोंगर दरिचे सोडून घर ते
पल्लव पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे प्रीत नदीची एकरुपते

वेचित वाळूत शंख शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते

बघुनी नभींची कोर ती
सागर हृदयी ऊर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते

**************************************


गीत : मधुसूदन कालेलकर
चित्रपट : एक धागा सुखाचा


अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरी खट्याळ, तरी मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडीवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई

**************************************

गीत : मधुसूदन कालेलकर
चित्रपट : बाळा गाऊ कशी अंगाई

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील मधुसूदन कालेलकर 
यांचं गीत सुमन कल्याणपूर यांनी इतक्या मंजुळ आणि सहजतेने 
गोड आवाजात गायले आहे की थोड्या वेळासाठी आपल्या मनाला 
भुरळ पडते आणि आपणही त्या विश्वात रमून जातो की निंबोणीच्या 
झाडामागे चंद्र खरोखर शांतपणे निद्रा घेत पहुडला आहे. अप्रतिम 
शब्द रचना, आणि अप्रतिम भावार्थ भरलेल्या या गाण्याने आपल्या 
मनावर एवढा विलक्षण प्रभाव पडतो की घटकाभर आपण विसरून 
जातो की चंद्रावर मानवाने कधीकाळी पाऊल ठेवले होते.


निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

गाय झोपली गोठयात घरटयात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई

देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई

रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊं कशी मी अंगाई

**************************************


गीत     :   संत नामदेव
संगीत   :   दत्ताराम गाडेकर
स्वर      :   गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर

रात्र काळी घागर काळी ।
यमुनाजळें ही काळी वो माय ।।१।।

बुंथ काळी बिलवर काळी ।
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय ।।२।।

मी काळी कांचोळी काळी ।
कांस कांसिली ते काळी वो माय ।।३।।

एकली पाण्याला नवजाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ।।४।।

विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहू काळी वो माय ।।५।।