Saturday 14 January 2017

विठ्ठलाच्या पायी विट, झाली भाग्यवंत

आयुष्या च्या प्रवासात बरीच वादळे, वाळवंटे आणि शालीनतेची ऋतू वेगळे सुख सागरेही येतात. अश्या सागरात किती तरी शिंपले विखुरलेली असतात. असंच एखादं शिंपलं अचानक हाती लागलं की मग आपण आपल्यातलंच हरवलेलं आपलेपण शोधायला लागतो. असेच , परवा मी पुण्याला माझ्या पेन्शनचे पॉलिसी कागदपत्र घेण्यासाठी शिवाजीनगरला एल आय सी ऑफीस मध्ये गेलो होतो. माझेच पैसे असून सुद्धा मला संबंधित कागदपत्र मला ते द्यायला तयार होईनात. मी त्यांच्याकडे कागदपत्र मागण्यासाठी याचना करीत होतो आणि ते न देण्याचं एकसुरी आसुरी आनंद लुटत होते. तरी सुध्हा त्यांचे चेहरे म्हणजे मला  पाणी न टाकलेल्या सुकलेल्या तुळशीच्या पानांसारखी भासलीत.  शेवटी हाथ जोडून मी माझी सुटका करून घेतली. जेष्ठ नागरिकाची उपेक्षा होण्याची ही कदापिही पहिली वेळ नसावी याची मला खात्री झाली. मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम केले असल्यामुळेच मी त्या चष्म्यातून बघून तुलना करत होतो हे माझ्या लक्षात आले आणि मला काही वाईट वाटले नाही कारण माझे काम झाले होते. हाथ जोडून विनंती करण्याची प्रतिभा ही भारतीयांना सयंमी मानसिकतेच्या वरदानातूनच मिळालेली असते. क्षणाचाही विलंब न लावता माझे पेपर्स घेऊनं मी तडक शिवाजीनगर रेल्वे स्थानक गाठले. अन अवघ्या पाचच मिनिटात मला पुणे कर्जत पॅसेंजर मिळाली. माझा रात्री भोसरीला बहिणीकडे मुक्काम होता. बहिणीला फोन करून सांगितले की माझे एल आय सी चे काम झाले, अन मला पुणे कर्जत पॅसेंजर देखील मिळून विंडो सीट मिळाली आहे. मी डोंबिवलीला जाण्यासाठी आता निघालेलो आहे. गाडीला गर्दी अजिबातच नव्हती. मुळातच पॅसेंजर असल्यामुळे माझ्यासारखेच रिटायर्ड झालेले , वृद्ध जोडपे तसेच परिस्थितीने गांजलेले काही गरीब लोक माझ्या मागे पुढे, तर कोणी पाय लांब करून तर कोण रिसर्व्हेशन केल्या सारखे सरळ आडवे झोपले होते. गाडीने शिवाजीनगर स्थानक सोडले होते. गाडी आता स्पीड घेईल असे वाटत होते पण छे: हळू हळूच धावत होती.  "धावणे" या शब्दाचा तरी अपमान कशाला करायचा. एखाद्या आळशी, आजारातून उठून हळू हळू चालल्या सारखं गाडी जणू एक प्रकारे चालत होती.  बऱ्याच वेळानंतर तुरळक गर्दी नसलेली पुणे उपनगरीय रेल्वे स्थानके एकामागून एक जात होती. काही स्थानके तर मला भयाण दुष्काळ ग्रस्त सारखीच भासली. कदाचित मला मुंबईतील उपनगरी स्थानकावरील भयानक गर्दीची सवय असल्यामुळे मला असा भास झाला असेल. पाच मिनिटे गेल्यानंतर अगदी शांतपणे डोळे मिटून घेतलेत. आणि लांबून अगदी बारीक आवाजात एक धून ऐकायला यायला लागली. "विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत"  कवी दत्ता पाटील यांचं भजन म्हणणारी वृद्ध व्यक्ती जसजशी जवळ येऊ लागली तसतशी त्या अभांगाची ओळ प्रखर ज्योतसारखी भासू लागली. ह्या गाण्याशी आपला काही संबंध नसतांना देखील मला माझे हरवलेले गावसल्या सारखे उगीचच भासू लागलें. एव्हाना तो गाणे म्हणणारा वृद्ध कृश बाबा मला ओलांडून देखील गेला होता. मी त्याला हाक मारून थांबविले आणि एक रुपया त्याच्या हातात दिला. मागे न वळून बघताच पैसे घेऊन तो सरळ पुढे निघून गेला आणि मला प्रश्न चिन्हात सोडून गेला. जणू काय मी ते शब्द त्याच्याकडून एका रुपयात विकतच घेतले होते.  ह्या गाण्याशी माझ्या आयुष्याचं जवळचे नाते आहे असं मला राहून राहून वाटू लागलं. खिडकीत बसल्यामुळे भरभर वारा अंगाला झोंबत होता. हाच वारा माझ्या आयुष्याची पुस्तकाची पाने भरभर मागे पलटावीत होता. ह्या गाण्याशी संबंधित असलेला जीवनपट उलगडण्याचा मी प्रयत्न करू लागलो. पण असे असते ना, एकाद्या जुन्या वस्तूवर थर किंवा जळमटं साचली तर बहुतेक ती वस्तू आपण अडगळीत तरी टाकतो किंवा दुर्लक्षित करतो. तसेच जुन्या किंवा बालपणीच्या घटना सुद्धा आपल्या मेंदूच्या कप्प्यात वर्षांनुवर्षे एका कोंदणात लपलेल्या असतात. आपल्याला आठवून आठवूनही आठवत नाहीत. तळ्यातल्या पाण्याचं तळ बघायचा असेल तर पाणी शांत व्हावं लागतं, तसं मनाचंही असच असतं. "विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत" ह्या ओळी भोवती मनाचा पिसारा फुलतच गेला. लहानपणी आईने मला तळहाताच्या फोडासारखं जपलं. कधी कुठे मला मजुरी करायला पाठविले नाही. घराची जबाबदारी तिच्यावरच होती. गांवातलीं स्रियांची निर्व्याज्य मनाने तिने  बाळंतपणे केलीत आणि तेही विनामूल्य. त्यामुळे हा तिचा व्यवसाय होता असे म्हणता येणार नाही. मला कळायला लागल्यापासून तिने गांवातली जवळ जवळ सहाशे ते सातशे बाळंतपणे केली असतील परंतु कुठल्याही पुस्तकात तिची नोंद झाली नाही.गांवातली कोणाचीही बारीक सारीक कामे असोत किंवा छोटा मोठा न्याय निवाडा असो तिच्या शिवाय पान हालत नसे. लग्नाची स्थळे जमविण्यासाठी जणु तिनेच ठेका उचलला होता. ह्या कामाखेरीज शेतीची कामे करण्यात ती आघाडीवर असे. जंगलातलं कुठलंही असं शेत नसेल की तिने तेथे काम केले नसेल. त्यामुळे गांवातलं प्रत्येक घर आईच्या परिचयाचं होतं. गावातील प्रत्येकजण आईशी आदराने वागून मानपान देत असत. घरी येतांना ती कधीही खाली हाथ येतं नसे, नेहमी तिची खोळ भरलेली असे. आणि तीच भरलेली खोळ मला आयुष्यभर पुरली. बाहेरून गावांत आलेल्या कुटुंबाला देखील तिने घरदार शेतीवाडी घेऊन देण्यास मदत केली परंतु कोणाकडूनही तिने कमिशन घेतले नाही. ती फक्त आपल्या मुलाला तुमचे आशीर्वाद कामास येतील असे ती म्हणत असे. पण मी त्यावेळेस लहान होतो आणि मला काही कळत नव्हतं. पण आज कळतं आहे, ज्या उच्च पदावरून मी निवृत्त झालो हे तेच आशीर्वाद होते. लोणावळा स्थानकावर ट्रेन चे आगमन होताच चिक्कीवाल्याच्या आरोळीने मी दचकून भानावर आलो. माझ्या बालपणाचा पट कसा उलगडत गेला हे कळलंच नाही. तो गाणं म्हणणारा वृद्ध बाबाअजून डोळ्यासमोरच फिरून येतो आहे असा भास झाला.

एव्हाना गाडीने लोणावळा कधीच सोडून खंडाळ्याच्या घाटात शिरली होती. का कोण जाणे अथांग समुद्राच्या पृष्ठभागावरुन उडत जाणाऱ्या पक्षाला आपला निवारा सापडू नये, आणि त्यासाठी त्याने पृष्ठभागावरच्या पाण्याला सतत स्पर्श करत रहावा, त्या प्रमाणे खंडाळाच्या घाटातून दूर दूर दऱ्याखोऱ्यातून उंच उंच पर्वतराजीच्या पलीकडे माझी नजर काही तरी शोधत होती, कदाचित त्याच्याही पलीकडे मी हरवत चाललो होतो. तेव्हढ्यात निर्मनुष्य असलेल्या पळसदरी या स्टेशनवर गाडी थांबली. एकही पॅसेंजर चढला नाही किंवा उतरला नाही. माझ्या जागी एखादा कवी किंवा लेखक असता तर त्याने सरळ "पळसदरीतली भुताटकी या विषयावर कविताच केली असती किंवा एखादा लेख तरी लिहिला असता. निर्मनुष्य रेल्वे स्टेशन कधी असू शकतं का असा प्रश्न उगीचच बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनाला घायाळ करत होता. शोले पिक्चर मधल्या निर्मनुष्य रामगड रेल्वे स्टेशनवरचा सीन खरा असू शकतो अशी आता माझी पक्की खात्री झाली होती आणि तो प्रश्न मी निकालात काढला.

जेंव्हा जेंव्हा मी माझ्या गांवीं जातो तेंव्हा मी अनुभवतो. स्टेशनवरून जाणारी ती चाकोरीबद्ध पांढरी  वाकडी तिकडी बैलगाडीची  वाट आता राहिली नाही की नुकतीच या वाटेवरून बैलगाडी गेली असल्याची दर्शविणारी खूण ही राहिली नाही. त्याच जागी कमी रुंदीचा डांबरी रस्ता मात्र जरूर झाला आहे. भलेच प्रशांत महासागराचा विलोभनीय किनारा माझ्या गांवाला नसेल परंतु  पावसाळ्यात खळखळून वाहणारी एक छोटीशी नागमोडी वळणाची नदी आहे,  की तिने कधीही उग्र रूप धारण केले नाही. पावसाळ्यात शेती हिरवा शालू नेसून नवरी सारखी सजते. गांवा लगतच मराठी कौलारू शाळा आहे. त्या शाळेत मी शिकलो, सवरलो, अजून ती कौलारू शाळा त्याच जागी उभी आहे. पण कौलं जीर्ण तुटलेल्या अवस्थेत झाली आहेत. क्षणभर त्या कौलांवरून माझी नजर ढळत नाही. पण गांवा मधील काही घरे पक्क्या स्वरूपाची झाली आहेत. गावांत मारुतीचे मंदीर आहे, त्या देवळांचा देखील थोडया फार प्रमाणात जीर्णोद्धार झालेला आहे. मी ही माझ्या आईचं घर पक्क्या स्वरूपात बांधून घेतलं आहे. शेजारीच माझे काका काकू राहतात. गावांतील घरं जरी पक्क्या स्वरूपाची बांधली गेली असली तरी माणसे तीच आहेत. मी बऱ्याच वर्षा पासून मुंबईला असल्यामुळे माझी नजर गावांतील बुजुर्ग मंडळींवर ओळखण्यासाठी सहसा सहसी लवकर पकड घेत नाही. मग ती बुजुर्ग मंडळी मलाच आपण होऊन म्हणतात, तो आपल्याला कसं ओळखेल. तो त्यावेळेस खूप लहान होता. आता किती मोठा झाला आहेस. एखाद्या चांगल्या गोष्टीचं वा चांगल्या वस्तुचं प्रतिबिंब हे मूळच्या रचनेपेक्षा अधिक सुंदर दिसतं, असे  म्हणतात त्याची पदोपदी प्रचिती मला येते. मग गावांतील त्या  बाया माणसं मला माझं नांव न विचारता मला लगेच म्हणतात, तू भागाबाईचा मुलगा ना. मी लगेच होकारार्थी मान हलवितो आणि पदस्पर्श करतो.  आणि मी माझ्या मनातल्या मनात म्हणतो  "विठ्ठलाच्या पायी विट, झाली भाग्यवंत"

दूर नजरेच्या टप्प्यात
पैल टेकडीच्या अलीकडे
कौलारू शाळेला वळसा देत
माझं ते छोटंसं गावं
वाट बैल गाडीची
नागमोडीची
चढण आणि उतरणीची
गळ्यातील बैलांच्या घुंगरांची गाज
गाडीवान दादाला देती साद
हिरव्या कुरणातल्या गर्द सावल्या
चांदण्यात रातीत न्हाहल्या
उंच झाडांच्या कमानी
कोलमडून पडल्या डोहावरती
काजव्यांच्या ध्यानी न मनी
विखुरलं चांदणं रानो रांनी
जागो जागी उगवल्या होत्या
बालपणीच्या आठवणी
जिथे माझा जन्म झाला
ती मात्र तेथे नव्हती
गेली होती निघून दूर
नजरेच्या पल्याड
निसर्गाच्या पलीकडे
ती
माझी
आई

No comments:

Post a Comment